Friday, April 5, 2019

राज...राज ना रहा !


एका पक्षाचा अध्यक्ष इतर दोन पक्षांचा प्रचार करतोय. असं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेण्याची वेळ आलीय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. इतकंच नव्हे तर मनसेचे उमेदवार निवडून आले तर ते मोदींना पाठींबा देतील असंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
अर्थात तेव्हा मनसेचे उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोदींना पाठींबा देण्याची वेळ आली नाही. पण आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ राज ठाकरे आणि मनसेवर आली आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांची मिमिक्री केली. भुजबळांवर टीका करत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. पण आता छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी राज ठाकरेंना सभा घ्यावी लागणार आहे. नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते समीर भुजबळांचा प्रचार करत आहेत.
असंच चित्र मावळच्याही बाबतीत आहे. अजित पवार यांनी, धरणात मुतू का ? असं वक्तव्य केल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच्या एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला आता मत नाही, मूत मिळेल असं म्हटलं होतं. पण झालं उलटंच. आता हेच राज ठाकरे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज ठाकरे नऊ सभा घेण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे मतदारांना साकडं घालणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनसेच्या माजी आमदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. भाजपवाल्यांना दुसऱ्यांची पोरं कडेवर घेण्याची हौस आहे. पण काही महिन्यातच ही वेळ आता राज ठाकरेंवर आली आहे. राज ठाकरेंवर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मुलं कडेवर घेण्याची वेळ आलीय. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही स्टार कॅम्पेनर नाही. त्यामुळे आघाडीलाही राज ठाकरेंवर अवलंबून राहावं लागत आहे.
अर्थात यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं काहीच नुकसान होणार नाही. पण एक पक्ष आणि नेता म्हणून राज ठाकरेंची विश्वसनीयता कमी होणार आहे. काँग्रेस आघाडी राज ठाकरेंच्या मनसेला त्यांच्या आघाडीत घेत नाही. पण राज ठाकरे त्यांना प्रचारासाठी हवे आहेत. तर जे पक्ष मनसेला आघाडीत एक जागाही द्यायला तयार नाही, त्यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. असं असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार मनसेकडे आकर्षित होतील का ? असा सवाल निर्माण होतो. #संगो

Wednesday, March 20, 2019

बिनमुद्याची लोकसभा निवडणूक !

2019 मधली ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पण या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्देच दिसत नाहीत. 'मैं भी चौकीदार' आणि 'चौकीदार चौर हैं' या सारख्या थिल्लर कॅम्पेनमध्ये ही निवडणूक अडकली आहे. त्यातच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हळद आणि नारळ सारखे मुद्दे येतात. भाजपची जाहिरात कशी चुकली यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना खिजवणा-या पोस्ट टाकल्या जातात. यामुळे सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांना खरोखरच निवडणुकीचं गांभीर्य राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं.
भाजपनं शेतक-यांच्या मालाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हा हमीभाव मिळाला का ? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसनं का घेतलं नाही ? निवडणुकीत या मुद्यावरून काँग्रेस भाजपला जेरीस आणू शकली असती. पण तसं झालं नाही. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पूर्ण झालं नाही. रोजगार निर्मिती का झाली नाही ? हा मुद्दाही काँग्रेसनं हाती घेतला नाही. देशात मागील पाच वर्षात किती नवीन कंपन्या, उद्योग आले याची आकडेवारी काँग्रेसनं सरकारला विचारली नाही. मागील पाच वर्षात देशात किती गुंतवणूक झाली ? हा आकडा काँग्रेसनं भाजपला का विचारला नाही. परदेशातलं किती काळं धन देशात आलं ? हा प्रश्न राहुल गांधी का विचारत नाहीत. नोटबंदी झाली पण दहशतवादी हल्ले का थांबले नाही ? हे अपयश कोणाचं ? पुलवामातला हल्ला हे कोणाचं अपयश ? हे सवाल काँग्रेस विचारणार नाही तर पाकिस्तान विचारणार आहे का ? वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर घेण्यात काँग्रेसला यश आलं नाही. राफेलवरून आरोपांची राळ उठवल्यानंतर आता काँग्रेसनं मौन का बाळगलंय ? हा प्रश्नही मतदारांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी काँग्रेस देशात कुठेही रस्त्यावर उतरली नाही. आंदोलन केलं नाही. चौकीदार चोर हैं, हे कॅम्पेन छान आहे. पण त्यामुळे मतं मिळतीलच याची गॅरंटी नाही.
सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरणारे हे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न विचारण्याची हिंमत काँग्रेस दाखवू शकली नाही. कारण काँग्रेस पराभूत मानसिकतेत गेलेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगडमधल्या विजयानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. पण हे चैतन्य लोकसभेच्या रणांगणा आधीच मावळलं आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधी-वाड्रा यांना मैदानात उतरवलं आहे. पण त्याचाही फार फायदा होण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत.
देशासमोरचे प्रश्न घेऊन विरोधकांनी लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असतं. तर सत्ताधा-यांनी केलेल्या कामांचा दाखला आणि भविष्यातला त्यांचा विकासाचा प्लॅन मतदारांना सांगायचा असतो. पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मुद्दे नकोसे झाले आहेत, हे चित्र सध्या दिसून येतंय. देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुद्यांऐवजी सवंग कॅम्पेन करत आहेत. या दोन्ही पक्षांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे.
आता मतदारांनीच या दोन्ही पक्षांना, आमच्या विकासाचं काय ? विकासाच्या मुद्याचं काय ? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. मुद्यांपासून भरकलेल्या या दोन्ही पक्षांना, मुद्याचं बोला असं ठासून सांगण्याची गरज आहे. अर्थात या दोन्ही पक्षांकडून या प्रश्नांची उत्तर मिळतीलच असं म्हणता येत नाही. पण भाजप आणि काँग्रेसनं मुद्यापासून दूर जाणं हे त्यांचं अपयश आहे की मतदारांचं ? हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर जर मतदारांनीच शोधलं तर काही मार्ग निघू शकण्याची चिन्हं आहेत. #संगो

Tuesday, March 12, 2019

पोराचा व्याप...बापाला ताप !

महाराष्ट्रात 90 च्या दशकात घरोघरी एक वेगळं राजकारण पाहायला मिळत होतं. शहरी भागातली शिवसेना ग्रामीण भागात वेगानं पसरत होती. त्यामुळे ग्रामीण भागातले अनेक तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत होते. ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. परिणामी वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा शिवसेनेत असं चित्र त्यावेळी अनेकांनी पाहिलेलं आहे. अर्थात वडील काँग्रेसमध्ये असले तरी ते कार्यकर्ते आणि मुलगा शिवसेनेत असला तरी तो कार्यकर्ताच. त्यामुळे यावर काही फार मोठी चर्चा झाली नाही.
आता 30 वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. पण इथं कार्यकर्ते नाही तर राज्यातल्या मातब्बर राजकीय घराण्यात ही परिस्थिती निर्माण झालीय. विखे कुटुंबात वडील काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये, हे चित्र पाहायला मिळतं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यानं थेट भाजपचा झेंडा हाती धरलाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसचं नाक कापलं गेलंय. तसं पाहिलं तर विखे कुटुंबासाठी युती काही अस्पृश्य नाही. शिवसेनेमुळं विखे कुटुंबाला पहिल्यांदा लाल दिवा मिळाला होता. राधाकृष्ण विखे पाटील युतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. तर बाळासाहेब विखे पाटलांना थेट केंद्रात शिवसेनेमुळं मंत्रीपद मिळालं होतं.आता शिवसेनेचा 'मित्र'पक्ष असलेल्या भाजपला सुजय विखे पाटील यांनी पसंती दिलीय. विखे कुटुंबानं या निमित्तानं युतीचं वर्तुळ पूर्ण केलं. पण राधाकृष्ण विखे पाटील यांचं दिल्ली दरबारी असलेलं वजन आता निश्चित कमी होणार यात शंका नाही.
कोकणातले बडे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांचं प्रकरणही याच वळणाचं आहे. नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण त्यांचे पुत्र नितेश राणे हेच वडिलांच्या पक्षात नाहीत. नितेश राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. नारायण राणेंना भाजपनं राज्यसभेचं सदस्यत्व दिलंय. कोकणातल्या राजकारणातला हा व्यापही तसा तापदायकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मुलगा, पुतण्या यांची सोय करायला प्राधान्य दिलेलं आहे. मुलगा आमदार तर पुतण्या माजी खासदार. आणि नंतरही त्यांनाच तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न. असं असेल तर कार्यकर्त्यांना राजकीय भवितव्य उरतं का ?
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी तर चक्क, मुलांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. सध्याचं वातावरण पुढच्या पिढीसाठी चिंताजनक असल्याचं प्रिया दत्त यांना वाटतं. पण त्यासाठी इतर कोणीही कार्यकर्त्यानं निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत नाही. तर निवडणूक स्वत:च लढवावी असं प्रिया दत्त यांना वाटतं.
कुटुंबातल्या सगळ्यांची राजकीय सोय लावणं हेच जणू नेत्यांचं कार्य असावं, अशी सध्याची स्थिती आहे.  नेत्यांनी त्यांची मुलं, सुना आणि आता नातवंडं यांना राजकीय सोयीसाठी राजकारण आणलं आहे. नेत्यांचं हे सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागलंय. नेत्यांची मुलंच जर खासदार, आमदार होणार असतील तर सतरंज्या उचलायच्या आणि घोषणा द्यायच्या हेच कार्यकर्त्यांच्या नशिबी असणार आहे.
सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांना कार्यकर्ते हवेत ते फक्त हाणामा-या करण्यासाठी. कार्यकर्त्यांनी घोषणा द्याव्या आणि खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करावा असा त्यांना वाटतं. पण घोषणांची भाकरी होत नाही आणि झेंड्यांचे कपडे होत नाहीत. कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो. पण पद आणि तिकीट कोणाला द्यायचं हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा विचार होत नाही. परिणामी किती दिवस नेत्यांच्या पिढ्यान पिढ्या खांद्यावर घेऊन नाचवायच्या याचा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज निर्माण झालीय.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभासाठी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इतर वेळी पक्षनिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांची माळ जपली जाते. पण निवडणुका आल्यावर ही माळ अडगळीत टाकली जाते. इलेक्टिव्ह मेरिट आणि निवडून यायचंच या हव्यासातून अनेक व्याप आणि ताप मतदारांना बघायला मिळतील.
 #संगो

Friday, March 1, 2019

अलविदा tv9 मराठी !

17 डिसेंबर 2012 रोजी सुरू झालेला tv9 मराठीतला प्रवास आज 1 मार्च 2019 रोजी संपला. 6 वर्ष 2 महिने 12 दिवसांचा हा प्रवास थांबला. सहा वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. पण खासगी चॅनेलमध्ये इतकी वर्ष नोकरी करणं या क्षेत्रात मोठं मानलं जातं.
17 डिसेंबर 2012 या दिवशी tv9च्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. पण इथं कधीच नवखेपणा जाणवला नाही. ई टीव्हीतले अनेक जुने सहकारी आणि सीनिअर्स इथं आधीपासून होते, तर काही नंतर जॉईन झाले. अभिजित कांबळे, गजानन कदम, धनंजय कोष्टी, चंद्रकांत फुंदे, नरेश बोभाटे, निखिल देशपांडे, सुनील बोधनकर, माणिक मुंढे, कृष्णा आजगावकर, रमेश जोशी, शंकरन सर हे सर्व ई टीव्हीयन्स पुन्हा भेटले. त्यांच्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.
तर झी 24 तासमध्ये ज्यांच्यासोबत काम केलं ते डॉक्टर प्रसाद घाणेकर, विशाल पाटील, विनीत डंभारे, गणेश रूपाले, किरण खुटाळे, आशिष काटकर, ऋषी देसाई, रघू या सहका-यांसोबतही पुन्हा tv9 मध्ये भेट झाली.
tv9ची सर्वात मोठी स्ट्रेन्थ म्हणजे, नो ऑफिस पॉलिटिक्स. या ऑफिसमध्ये कोणतेही गट, गॉसिप्स हे फालतू प्रकार नाहीत. इथं फक्त आवाज असतो तो कामाचाच. सहका-यांमधला सौहार्द हे या चॅनेलचं बलस्थान आहे, यात वाद नाही.

ब्रेकींग न्यूज क्षणात उतरवणं, ती प्ले अप करणं, आक्रमकपणे मांडणं यात इथले सहकारी निष्णात आहेत.
मी इथं काम केलं ते रन डाऊनवर. अनेक बुलेटिन प्रोड्युस केली. अर्ध्या तासाचे स्पेशल शो, स्पेशल बुलेटिन केली. टॉक शो केले. यावेळी अनेकांचं सहकार्य लाभलं. शरद जाधव, पंकज भनारकर, गिरीश गायकवाड, अंकिता शिंदे, श्रद्धा देसाई, श्रद्धा पवार, अनिता, संतोष थळे हे सर्व सहकारी नेहमीच आठवणीत राहतील.
प्रॉडक्शन एक्झिक्युटीव्ह, व्हिडीओ एडिटर आणि ग्राफिक्सची टीम क्षणात व्हिज्युअल्स, बाईट, पॅकेज आणि ग्राफिक्स तयार करून देतात. यांच्यामुळेच tv9 मध्ये सर्वात जास्त न्यूज पॅकेज तयार होतात. या सहका-यांमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे संतोष परब, अमान, अब्बासजी, अभिषेक, परेश सपकाळ या व्हिडीओ एडिटर्सकडून अर्ध्या किंवा एक तासाचा स्पेशल प्रोग्राम अवघ्या पाच तासात कसा एडिट करता येऊ शकतो हे गुप्त ज्ञानही शिकायला मिळालं. भविष्यात त्याचा फायदा होईलच यात शंका नाही.
विनायक कुंदराम, दुर्गा यांची ग्राफिक्सची टीम म्हणजे मायानगरी तयार करण्यात वाकबगार आहे. कोणतंही ग्राफिक्स अर्ध्या तासाच्या आत देण्याची क्षमता त्यांच्या टीममध्ये आहे. प्रॉडक्शनच्या टीममध्ये अनेक सहकारी आहेत, अनेक जण सोडून गेलेत. सर्वांची नावं टाकत नाही, पण नावापेक्षा त्यांचं कामच जास्त बोलतं. पण प्रमोद जगताप, दुर्गेश राजमाने, अर्जुन, सुशील, सोनी मगर, गौरी, कुणाल सिंग, अश्विनी, पूजा यांना विसरता येणं अशक्य.
ब्रेकींग न्यूजच्या वेळी जसा गोंधळ न्यूजरूममध्ये असतो, तसाच गोंधळ पीसीआरमध्येही असतो. पण अशा वेळी संयमानं काम करणारे पीसीआरमधले सहकारी यांना विसरणं शक्यच नाही. विजय, गौतम यांची टीम आणीबाणीच्या वेळी सर्व परिस्थिती संयमानं हाताळत असतात.
प्रोमो डिपार्टमेंट एकहातीपणे सांभाळणारी रसिका डायालकर तर उत्साहाचा अखंड धबधबाच. रसिका असल्याने प्रोमो, क्रोमा, स्टिंग, डाऊन बॅंडचं कधी टेन्शन घ्यावं लागलं नाही.
tv9 हे नेहमीच सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करण्यात आघाडीवर राहिलेलं आहे. 2012 मध्ये मी इथं जॉईन झालो त्यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. सिंचन घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यासह इतर घोटाळ्यांवरून काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतरही tv9च्या कार्यशैलीत फरक पडला नाही. केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही तुटून पडताना कोणतीही कसर tv9नं सोडली नाही.
श्रीनिवास रेड्डी, उमेश कुमावत, निलेश खरे, रोहित विश्वकर्मा या सर्व सिनीअर्सकडून बातमी आक्रमकपणे कशी प्रझेंट करायची हे शिकायला मिळालं. कामाचं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. कोणतीही बातमी आल्यानंतर ती या पक्षाची आहे म्हणून थांबवा आणि त्या पक्षाची आहे म्हणून चालवा असा प्रकार कधी घडला नाही. हा आवडता नेता, तो ना आवडता नेता अशी कोणतीही कॅटेगिरी इथं नाही. त्यामुळे बातमी आली की, ती क्षणात उतरवली जाते. जो चुकला तो ठोकला, ही इथली निती.
tv9चं असाईनमेंट अत्यंत जलद आहे. क्षणात फोनो जोडणं, लाईव्ह उपलब्ध करून देणं ही सर्व प्रोसेस सर्वात फास्ट केली जाते. tv9चे सर्व रिपोर्टर्स ब्रेकींग न्यूज देण्यात निष्णात आहेत. कोणतीही ब्रेकींग न्यूज tv9च्या रिपोर्टरकडे सर्वात आधी असते, त्यामुळे tv9वर सर्वात जास्त न्यूज ब्रेक केल्या जातात. परिणामी tv9चा स्क्रिन हा 24 तास हलत असतो. ब्रेकींग न्यूज आल्यानंतर ऑनएअर असणारे अँकर्स त्या बातमीला न्याय देतात. यात निखिला म्हात्रे जर ऑनएअर असतील तर बुलेटिन प्रोड्युसरला फार काही कष्ट करावे लागत नाहीत. असाच अनुभव इतर अँकर्सचाही आहे.
सहा वर्षांमध्ये करिअरमधला अतिशय सुंदर अनुभव इथं मिळाला. आज थांबण्याची वेळ आली आहे. खरंच मन भरून आलं आहे. असे सहकारी पुन्हा मिळतीलच असं म्हणता येत नाही. एचआर डिपार्टमेंटचे रणजीत सर, रिसेप्शन वरील कविता मॅडम, बॅक ऑफीस, फॅसिलिटी, कॅन्टीन या सर्वांच्याच आठवणी मनात आहेत. आयुष्यातला चांगला काळ इथं घालवला. मनात सर्वांच्या आठवणी घेऊन जात आहे. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत.
शेवट या गाण्याच्या ओळींनी करतो...

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...

मित्रांनो या वळणावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. या वळणावर नवा प्रवास सुरू करतोय. धन्यवाद. तुमचाच गारू...संतोष गोरे...#संगो #tv9

Sunday, February 17, 2019

कॅन्सर : काश्मीरचा आणि टाईम्सचा


अतिरेकी आदिल दार याचा TIMES OF INDIAनं दिलेल्या बातमीच्या शिर्षकात अतिरेकी असा उल्लेख करण्याऐवजी लोकल यूथ असा उल्लेख करण्यात आला. पुलवामात आत्मघातील हल्ला करणारा, पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला आदिल याला अतिरेकी म्हटलं गेलं नाही. त्यामुळे देशभरात गदारोळ माजला. अनेक जणांनी TIMES OF INDIA बंद करत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. मी ही TIMES OF INDIA बंद केला आहे.

 अतिरेकी आदिल दार याचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिला आहे. त्या व्हिडीओत आदिल दार याचे भारत आणि हिंदू धर्मियांविषयी काय विचार आहेत, हे जगानं पाहिलं आहे. आदिल हा पूर्णपणे कट्टरपंथीय होता. मुलांनी प्रेमात पडू नये, असं तो म्हणायचा. काश्मीरमध्ये काही दहशतवादी मुलींच्या प्रेमात पडून लष्कराच्या हाती लागले होते. यामुळे तो असं म्हणायचा. तसंच व्हॅलेंटाईन डे हे काही इस्लामला अनुसरून नाही. त्यामुळेही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा हेतू असू शकतो. तसंच महिलांनी बुरख्यातच राहावं अशी त्याची बुरसटलेली जिहादी विचारसरणी होती. इतकंच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा, असंही तो त्याच्या नातेवाईकांना सांगायचा. आत्मघाती हल्ला केल्यानंतर जन्नत मिळते, असा या जिहादी श्वापदांचा समज आहे. आणि खरंच असं असेल तर जगातल्या सर्व जिहादींनी एकाच वेळी त्यांच्या राहत्या घरात स्वत:ला बॉम्बने उडवून टाकावं. म्हणजे त्यांना जन्नत मिळेल. आणि ती घाण संपल्यामुळे या पृथ्वीचा स्वर्ग होईल.
 आदिल हा पाकिस्तानात एक वर्षापासून ट्रेनिंग घेत होता. संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरू याला नऊ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे याच तारखेच्या आसपास घातपाताचा त्यांचा डाव होता. तसंच ताल्हा रशीद  आणि उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला होता. मसूद अझरच्या पुतण्यालाही ठार करण्यात आलं होतं. त्यामुळेही जैशचे अतिरेकी बदला घेण्याची संधी शोधत होते. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला ते ठिकाण आदिल दार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच त्यानं त्याची गाडी सुमारे दोनशे किलो स्फोटकांनी भरून आणली होती. हीच गाडी भरधाव वेगानं त्यानं सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून आत्मघाती हल्ला घडवून आणला.  
आदिल दार याला स्फोट घडवण्यासाठी जे वाहन देण्यात आलं, ते लोकल मदतीमुळे मिळालं. याचाच अर्थ दहशतवाद्यांचा स्लीपर सेल हा किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, हे लक्षात येतं. या स्लीपर सेलकडे पाकिस्तानातले दहशतवादी स्फोटकं पुरवतात. 
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. अनेक दहशतवादी संघटना तिथं कार्यरत आहेत. मसूद अझरच्या जैश ए महंमदनं काश्मीरसह भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानात जैश ए महंमदचा तळ आहे. त्याच ठिकाणी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा कट शिजलाय. पुलवामातल्या आत्मघाती हल्ल्याचा कटही त्याच ठिकाणी शिजला. आदिल दार हा काश्मीरमधून तिथं पोहोचला होता. 
एक वर्षापासून आदिलचं पाकिस्तानात मानवी बॉम्ब बनण्याचं ट्रेनिंग सुरू होतं.
सहा महिन्यांपूर्वी  जैश ए महंमदने मोठ्या हल्ल्याचा कट आखला. कट रचण्यात आला त्यावेळी मानवी बॉम्ब बणून आत्मघाती हल्ला करण्यासाठीचं आदिल दार याचं तेव्हा तिथेच ट्रेनिंग सुरू होतं. जैश ए महंमदचा म्होरक्या मसूद अझर, आदिल दारसह तिघांनी हल्ल्याचा कट रचला. जैशच्या मुख्यालयात या कटाची माहिती फक्त मसूद अझर याला होती. भारतातल्या त्यांच्या स्लीपर सेललाही या कटाची माहिती नव्हती. त्यांना फक्त लोकल सपोर्ट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधले पुलवामा, त्राल हे दहशतवाद्यांचे गड मानले जातात. या भागात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. इथंच आदिल दार आणि त्याच्या हॅण्डलरलाही आश्रय मिळाला. त्यांना स्थानिक पातळीवरूनही मदत झाली. जर या दोघांना आश्रय मिळाला नसता, मदत मिळाली नसती तर हा हल्ला टळला असता.
काश्मीर खो-यातल्या नागरिकांची मानसिकता ही भारतविरोधी आहे. काश्मीरच्या कॅन्सरमुळे भारताच्या इतर भागांचं नुकसान होतंय. त्यावर आता जालीम उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे चर्चा, वाटाघाटी असल्या निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता सरकारने बॉम्ब आणि बुलेटची भाषा करावी. आणि तसं होत नसेल तर ती 56 इंचाची छाती, मोदी जॅकेटमध्येच लपवून ठेवावी.

Saturday, February 16, 2019

शहिदांच्या ज्वाला, देशात अंगार


देशभरात  नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर कित्येकांचे डोळे पाणावले. देशासारखीच स्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या मातीतले मलकापूरचे वीर जवान संजय राजपूत यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावातले शहीद नितीन राठोड यांनी हौतात्म्य पत्कारलं. 
शहीद जवान नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून नागरिकांनी गर्दी केली. शहीद जवान नितीन राठोड अमर रहे असा जयघोष सुरू होता. भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन नागरिक त्यांचा संताप व्यक्त करत होते. सरणा-या दिवसाबरोबर गर्दी वाढत होती. मिळेल त्या ठिकाणी नागरिक दाटीवाटीनं उभे होते. अखेर अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली. बंदुकीच्या फैरी झाडून शहीद नितीन राठोड यांना मानवंदना देण्यात आली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद नितीन राठोड यांनी जिथे जन्म घेतल्या त्या गावातल्या मातीत त्यांना अग्नि देण्यात देण्यात आला. धगधगत्या ज्वालांमध्ये भारत मातेचा पूत्र देशाच्या मातीचा सन्मान राखण्यासाठी त्याच मातीत मिसळून गेला. 
ज्या गावात, ज्या घरात शहीद संजय राजपूत हे लहानाचे मोठे झाले तिथला प्रत्येक माणूस रडला. ज्या घरात संजय राजपूत मोठे झाले, त्या घरावर शोककळा पसरली होती. त्यांचे सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडाले.  राजपूत कुटुंबीयाची जी भावना आहे, तीच भावना सध्या सर्व देशवासीयांची सर्वांना हवाय तो फक्त बदला.
मलकापूरमध्ये संजय राजपूत यांचं पार्थिव पोहोचल्यावर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा  देण्यात आल्या.  भल्या मोठ्या मैदानात शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं. पण हे भलंमोठं मैदानही गर्दीसमोर तोकडं पडलं. अखेरचा सलाम देण्यासाठी जागा मिळेल तिथे नागरिक उभे होते. मैदानात आणि घरांच्या गच्चीवर नागरिक उभे होते. झाडांवर चढून शहिदाच्या निरोपाचा हा क्षण डोळयात साठवण्यासाठी अनेकांची धडपड सरू होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अंगार पेटला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावण्यात आली. फुलं, पुष्पचक्र हे अश्रूंमध्ये भिजवून वाहिले जात होते. शहिदाच्या शवपेटीला अखेरचा हात लागावा यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. देशाचा सुपूत्र त्याचं कर्तव्य बजावून पुढच्या प्रवासासाठी निघाला. यावेळी आपला हात तरी शहिदाच्या शवपेटीला लागावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती.  जय आणि शुभम ही संजय राजपूत यांची दोन मुलं. शहीद पित्यावर अंत्यसंस्काराचे विधी या लहान वयात करण्याची वेळ नियतीनं आणली. हे दृश्य पाहून सर्व उपस्थित हेलावले.  बंदुकीच्या फैरी झाडून शहीद संजय राजपूत यांना सलामी देण्यात आली. बुंदकीतून फैरी झाडल्या जात होत्या याचवेळी नागरिकांमधूनही सातत्यानं घोषणाबाजी सुरूच होती.  भारत माता की जय आणि संजय राजपूत अमर रहे, असा जयघोष सुरू होता. भारतमातेसाठी बॉम्बच्या ज्वाळात शहीद झालेल्या या सुपूत्राचा धगधगत्या ज्वालांमध्ये अंत्यसंस्कार सुरू झाला. सरणात जशा ज्वाला भडकल्या तशाच ज्वाला इथं उपस्थित असलेल्यांच्या मनात भडकल्या होत्या. 
या ज्वालांनी शहीद संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण देशातल्या नागरिकांच्या मनात भडकलेल्या ज्वाला लवकर शांत होणार नाहीत.  जो पर्यंत या शहिदांचे मारेकरी, दहशतवाद्यांना आसरा देणारे गद्दार आणि दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान या सर्वांचा हिशेब होत नाही, तोपर्यंत देशाच्या नागरिकांच्या मनात असलेला हा बदल्याचा अग्निही शांत होणार नाही.

Monday, February 11, 2019

'ठाकरे' : मैदानातले, मनातले आणि पडद्यावरचे


जाहीर सभेत लाखोंच्या गर्दीत मैदान गाजवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या महाराष्ट्राने पाहिले आहेत. लाखो लोकांनी त्यांच्या जाहीर सभा ऐकल्या नव्हे तर जीवंत अनुभवल्या आहेत. त्या लाखो लोकांसारखा मी सुद्धा आहे. शिवसेनाप्रमुखांची तर मी अनेक भाषणं ऐकली आहेत. शिवसेनाप्रमुखांची भाषणं मी वेगवेगळ्या शहरात जाऊन ऐकली आहेत. संभाजीनगर, मुंबई, नाशिक, अमरावती या ठिकाणी झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अनेक जाहीर सभेतली भाषणं ऐकली आहेत.
ठाकरे सिनेमाच्या सिल्व्हर स्क्रिनला नवाजुद्दीन सिद्दीकी यानं व्यापून टाकलं होतं, यात शंका नाही. पण त्या सिल्व्हर स्क्रिनवर म्हणजेच पडद्यावर मी, शिवसेनाप्रमुखांनी गाजवलेली मैदानं शोधत होतो. मुंबईतलं शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ सिनेमात आहे. पण संभाजीनगरमधलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान यात नाही. याच मैदानात 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा घेतली. आणि तिथून  शिवसेना मराठवाड्यात झपाट्यानं आणि जोमानं वाढली. संभाजीनगर हे माझं आवडतं शहर, असा उल्लेख शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे करायचे. पण या सिनेमात मराठवाडा सांस्कृतिक मैदान दिसलंच नाही. 

सिनेमात औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव दिल्याचा उल्लेख 1994 सालातला दाखवण्यात आलाय. पण तो चुकीचा आहे. 1988 मध्येच शिवसेनाप्रुखांनी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं.
नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानावर शिवसेनेचं 1994 मध्ये अधिवेशन झालं होतं. शिवसेनेला सत्तेत आणण्यात त्या अधिवेशनाचा मोठा वाटा होता. पण सिनेमात ना गोल्फ क्लब दिसलं ना त्या वेळचं अधिवेशन.
मैदानातले ठाकरे शोधत ठाकरे सिनेमा पाहिला. अर्थात शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे हे अडीच तासांच्या सिनेमात दाखवणं तसं अशक्यच. पण हे शिवधनुष्य पेलण्यात संजय राऊत आणि अभिजित पानसे यशस्वी झाले.
माझ्या लहानपणी पाहिलेले आक्रमक, सावळे आणि दाढी ठेवणारे शिवसैनिक सिनेमात दिसले. शिवसेनेच्या पाटीवर जसा आक्रमक वाघ असतो अगदी तसेच शिवसैनिक या सिनेमात घेण्यात आले. शिवसेनाप्रुखांचा आक्रमकपणा, विनोदीपणा आणि हजरजबाबीपणा या सिनेमात पाहायला मिळाला.
नागपूरच्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांना निडरपणे सामारे जाणारे शिवसेनाप्रमुख पाहताना अंगावर रोमांच उभं राहिलं. तर समुद्राकडे धाव घेणा-या चिमुरडीच्या आईला, मुलीला पोहायला शिकवलं का ? असं विचारताना शिवसेनाप्रमुखांचा मिश्किलपणा पुन्हा आठवला. दंगल, आणीबाणी, बॉम्बस्फोट हे सर्व प्रसंग सिनेमात पाहताना, प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होतो.
दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी पडद्यावर पाहायला मिळाले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ही मंडळी जर शिवसेनेत असती तर त्यांनाही पडद्यावर मोठं स्थान मिळालं असतं. आणि अजून एक भुजबळ, राणे यांची आता जी अवस्था झालेली आहे, ती अवस्था ते जर शिवसेनेत असते तर झाली नसती. हा सुद्धा 'ठाकरे' महिमा म्हणायला हवा. #संगो