Tuesday, June 16, 2020

ग्लॅमर, सक्सेस आणि सुसाईड !

बॉलिवूडमध्ये ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. या रूपेरी दुनियेत अनेक जण त्यांची स्वप्नं साकारण्यासाठी येतात. काहींची स्वप्न साकार होतात. मात्र अधिक प्रसिद्धी, मोठं यश मिळवण्याची इर्षा असते. अपयश मिळाल्यानं येणारं नैराश्य पचवण्याची ताकद सगळ्यांकडेच नसते. आणि मग त्याचा शेवट होतो तो आत्महत्येत.
मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. या मायानगरीतलं बॉलिवूड कोणालाही क्षणात स्टार करू शकतं. हीच स्टार होण्याची नशा दररजो हजारो युवकांना मुंबईत आणते. इथल्या बॉलिवूडमध्ये अभिनय करणं, टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये छाप पाडणं, मॉडेलिंगच्या क्षेत्रात यश मिळवणं हे त्यांचं ध्येय असतं. हेच सुशांत सिंह राजपूतचं ध्येय होतं. ते ध्येय साकारण्यात तो यशस्वीही झाला. बॉलिवूडमधला लंबी रेस का घोडा म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. मात्र वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यानं आत्महत्या केली. नैराश्यातून त्यानं केलेल्या आत्महत्येनं अवघा देश हळहळला.
मात्र बॉलिवूडमधली ही काही पहिलीच आत्महत्या नाही. १९६४ मध्ये अभिनेते गुरूदत्त यांच्या आत्महत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. तर यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. दिव्या भारतीचा मृत्यू हा आत्महत्या होता की हत्या ? हा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत होता. अभिनेत्री परवीन बॉबीला स्किझोफेनियानं ग्रासलं होतं. प्रचंड यश मिळवणाऱ्या परवीन बाबीचा मृतदेह तिच्या घरात दोन दिवस पडून होता. जगभर फॅन्स असलेली परवीन बाबी घरात मात्र एकटीच होती.
या शिवाय अभिनेत्री जिया खान, साऊथची फेमस अभिनेत्री सिल्क स्मिता, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रित्युषा बॅनर्जी, प्रेक्षा मेहता, राहुल दीक्षित, कुलजीत रंधावा, 'फेमिना मिस इंडिया यूनिवर्स असलेली नफीसा,  प्रसिद्ध मॉडेल विवेका बाबाजी यांच्या आत्महत्येनंही सर्वसामान्यांना धक्का बसला होता.
बॉलिवूड सर्वांनाच यश देत नाही. ज्यांना यश मिळतं त्यांनाही ते टिकवता येईल की नाही, हे सांगता येत नाही. आणि त्यामुळेच यशाला तडा गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्याचा अनेक जण सामना करू शकत नाहीत. यश हे क्षणभुंगूर असलं तरी जीवन हे अमर्याद आहे. ते भरभरून जगायला हवं, हेच बॉलिवूड विसरत चाललंय. #संगो
स्टार्स आणि सेलिब्रिटी हे अनेकांचे रोल मॉडल असतात. मात्र हेच स्टार्स अपयश पचवू शकत नाहीत. नैराश्याचा सामना करू शकत नाहीत. जीवनात प्रत्येकालाच आव्हानांचा सामना करावा लागतो. आयुष्य हे कधीच सरळ नसतं. संकटं परीक्षा घेतात हे खरं. मात्र हिच संकटं संधी ही देतात. संकटात पाय रोवून उभं राहणं महत्त्वाचं असतं. वेळ कोणतीही असो ती कायम राहत नाही. काळ चांगला असो की वाईट तो जाणारच असतो. फक्त काळाच्या कसोटीवर टिकणं महत्त्वाचं आहे.