Friday, April 5, 2019

राज...राज ना रहा !


एका पक्षाचा अध्यक्ष इतर दोन पक्षांचा प्रचार करतोय. असं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेण्याची वेळ आलीय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. इतकंच नव्हे तर मनसेचे उमेदवार निवडून आले तर ते मोदींना पाठींबा देतील असंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
अर्थात तेव्हा मनसेचे उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोदींना पाठींबा देण्याची वेळ आली नाही. पण आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ राज ठाकरे आणि मनसेवर आली आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांची मिमिक्री केली. भुजबळांवर टीका करत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. पण आता छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी राज ठाकरेंना सभा घ्यावी लागणार आहे. नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते समीर भुजबळांचा प्रचार करत आहेत.
असंच चित्र मावळच्याही बाबतीत आहे. अजित पवार यांनी, धरणात मुतू का ? असं वक्तव्य केल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच्या एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला आता मत नाही, मूत मिळेल असं म्हटलं होतं. पण झालं उलटंच. आता हेच राज ठाकरे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज ठाकरे नऊ सभा घेण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे मतदारांना साकडं घालणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनसेच्या माजी आमदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. भाजपवाल्यांना दुसऱ्यांची पोरं कडेवर घेण्याची हौस आहे. पण काही महिन्यातच ही वेळ आता राज ठाकरेंवर आली आहे. राज ठाकरेंवर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मुलं कडेवर घेण्याची वेळ आलीय. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही स्टार कॅम्पेनर नाही. त्यामुळे आघाडीलाही राज ठाकरेंवर अवलंबून राहावं लागत आहे.
अर्थात यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं काहीच नुकसान होणार नाही. पण एक पक्ष आणि नेता म्हणून राज ठाकरेंची विश्वसनीयता कमी होणार आहे. काँग्रेस आघाडी राज ठाकरेंच्या मनसेला त्यांच्या आघाडीत घेत नाही. पण राज ठाकरे त्यांना प्रचारासाठी हवे आहेत. तर जे पक्ष मनसेला आघाडीत एक जागाही द्यायला तयार नाही, त्यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. असं असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार मनसेकडे आकर्षित होतील का ? असा सवाल निर्माण होतो. #संगो

1 comment:

  1. कारण दोस्त दोस्त ना रहा...

    ReplyDelete