Sunday, December 31, 2023

एकाची एन्ट्री अन् दोन बाजीगर

 

2023 या मावळत्या वर्षात मनोज जरांगे-पाटील हे नवं नेतृत्व समोर आलं आहे. उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील हिरो झालं. ज्या कुणी लाठीचार्जचा आदेश दिला त्याचे तर जरांगे पाटलांनी आभार मानायला हवे. गोळीबार झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकंदरीतच लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगे-पाटील यांचं नेतृत्व इतर कोणत्याही मराठा नेत्यांपेक्षा मोठं झालं आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे खुजे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आणि असे अनेक मराठा नेते जरांगे पाटील यांच्या लोकप्रियतेशी तुलना करू शकत नाहीत, यात शंकाच नाही.


बड्या नेत्यांना घेता येणार नाहीत अशा लाखांच्या सभा मनोज जरांगे-पाटलांनी घेतल्या. शंभर एकरच्या मैदानात भरगच्च झालेली गर्दी, असा करिश्मा मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवला आहे. राज्यभरात कुठेही सभा घेतली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं कसब मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारला मराठा आरक्षणासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची वेळ आली. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नवा नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांची एन्ट्री झाली.

दुसरीकडे अजित पवार सरत्या वर्षातील खरे बाजीगर ठरले. शिवसेना-भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून अजित पवार यांची प्रतिमा मलिन केली होती. पण त्याच अजित पवारांसोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मविआचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांच्या घोटाळ्याचे पुरावे भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपने चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केले होते. सिंचन घोटाळा संदर्भातील सुमारे 14 हजार पानाचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीवरून नेण्यात आले होते. संभाजीनगरमधील वाल्मीत चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते. ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना आपल्या सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली.  

अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवत आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला होता. त्याच शिवसेना शिंदे गटासोबतही अजित पवार टेचात सरकारमध्ये सहभागी झाले. दुसरा एखादा नेता असता तर कोलमडून गेला असता. पण अजित पवारांनी ज्यांनी टीका केली, त्यांच्यावरच सोबत नेण्याची वेळ आणली. हरलेली बाजी जिंकत अजित पवार बाजीगर ठरले.

तर दुसरीकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. तेलगी घोटाळ्यातही भुजबळांचं नाव आलं होतं. वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ मधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या सर्व घोटाळ्याच्या आरोपांमुळे आणि जेलवारीमुळे छगन भुजबळ बदनाम झाले होते. पण मविआच्या काळात त्यांना पावन करून सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. त्यानंतर महा्युतीच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री झाले. ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याच सोबत छगन भुजबळ बसले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनाच बळ देण्याचं काम सरकारला करावं लागलं, अशी चर्चा आहे. एकंदरीतच जेलवारी, घोटाळ्यांचे आरोप यावर मात करत छगन भुजबळ दुसरे बाजीगर ठरले.

राजकारणात कोणताच पराभव हा शेवटचा नसतो असं म्हटलं जातं. त्या सोबत आता असं म्हणावं लागेल की, कोणताही घोटाळा आणि जेलवारीमुळे राजकीय नेत्याचा शेवट होत नसतो. सरत्या वर्षानं हा दिलेला धडा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. #संगो

Friday, June 30, 2023

'रिमझिम' आणि 'आरडी'

 

मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यावर 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं आपसूकच ओठांवर येतं. आणि याच पावसाळ्यात या गाण्याचे संगीतकार आर.डी. बर्मन यांचा जन्मदिवस. 27 जून हा आर. डी. बर्मन यांचा जन्मदिवस. पावसाळ्यात जन्मदिन असणाऱ्या या संगीतकाराचं चिंब पावसानं भरलेलं आणि मुंबईचं  सौंदर्य खुलवणारं रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे मास्टरपीसच. पंचमदांनी दिलेल्या सुमधूर संगीतानं ओथंबलेलं हे गाणं पावसात चिंब झालेल्या कोट्यवधी प्रेमिकांच्या मनात नेहमीच गुंजत असतं.  संगीतकार राहुल देव बर्मन हे आर.डी. बर्मन या नावानं सर्वांनाच माहित आहेत. आणि त्यांच्या जादुई संगीतामुळे त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. पंचमदांच्या संगीताच्या जोरावर अनेक सिनेमे सुपरहिट झाले. काळाच्या पुढे असलेल्या या संगीतकाराच्या संगीताची जादू आजही कायम आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाईच्या ओठांवर असलेल्या गाण्याच्या भावना पंचमदांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं प्रेममय करून टाकल्या. जब हम जवां होंगे, हे गाणं त्याची साक्ष देतं. 

थिरकवणाऱ्या संगीताचा साज देतानाच प्रेमिकांच्या मनाचा आवाजही आर.डी. बर्मन यांनी ओळखला. आणि प्रेमिकेच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या गाण्याला अप्रतिम संगीताची साथ दिली. आर.डी. बर्मन यांच्या संगीताचं गारूड अनेक वर्षांनंतरही कायमच आहे. उलट जितके आर.डी. ऐकावे तितकंच त्यांचं संगीत अविट होत जातं. थिरकवणारं संगीत, प्रेमात पडलेल्यांना आवडणारं संगीत देणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी गंभीर पठडीतल्या गाण्यांनाही साज चढवला. याचं उदाहरण म्हणजे, 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आहे.

सिनेसृ्ष्टीत किती तरी संगीतकार आले आणि गेले. मात्र काळाच्या अतित असं संगीत देण्याची जादू केली ती फक्त आर.डी. बर्मन यांनी. त्यामुळेच पंचमदांचं संगीत बेभान करतं, तुम्हाला धुंद करतं आणि कायम तुमच्या ओठांवर राहतं. इतकंच नव्हे या पिढीतल्या संगीतकारांनाही पंचमदांचा संगीत खुणावतं. पंचमदांच्या गाण्यांचं रिमिक्स मोठ्या प्रमाणात करण्याचा मोह संगीतकारांना होतो. एकंदरीतच रिमिक्सच्या या जमान्यातही फिक्स असलेले एकमेव संगीतर आर. डी. बर्मनच आहेत आणि भविष्यातही राहतील यात शंकाच नाही. आर. डी. बर्मन म्हणजे बॉलिवूडला झिंग देणारा संगीतकार.  आर. डी. बर्मन पंचमदा या नावानंही ओळखले जातात. त्यांनी संगीत दिलेल्या शोले सिनेमातलं सर्वच  गाणी गाजली. मात्र असं संगीत पुन्हा होणं अशक्यच. 

आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला किशोरकुमारचा आवाज हे कॉम्बिनेशन म्हणजे सुपरहिटचा फॉर्म्युलाच. आणि हा फॉर्म्युला दोन सुपरस्टारसाठी लकी ठरला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठीही पंचमदांचं संगीत, किशोरकुमारांचा स्वरसाज जादूई ठरला.  त्यामुळेच बेमिसाल सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. काश्मीरचं सौंदर्य, किशोरकुमारांचा आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं 'कितनी खूब सुरत ये तस्बीर हैं' या गाण्याचं चित्र प्रत्येकाच्या मनात कायमचंच ठसलं. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला आशा भोसलेंचा स्वर असेल तर ते गाणं कायमचंच रसिकांच्या हृदयात कोरलं जातं. 'दो लफ्जों की', हे गाणं रसिकांच्या मनात कायमचंच घर करून राहिलं आहे.

मागील सात दशकातील कोणताही सिनेमा पाहा आणि त्यातली गाणी ऐका. प्रत्येक सुपरहिट सिनेमातल्या गाण्यांना संगीत फक्त आर. डी. बर्मन यांचंच आहे. त्यातले काही सिनेमे तर फक्त आर.डी. बर्मन यांच्या जादुई संगीतामुळे हिट झालेत. आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या तालावर बॉलिवूडेच सुपरस्टार ठेका धरत सिनेमा सुपरहिट करून गेले. त्या सिनेमांच्या यादी पाहायची झाली तर ती खूप मोठी आहे. त्यामुळे त्यातल्या मोजक्याच सिनेमांची ही नावं पाहा.शोले, शान, दिवार, शक्ती,  द ग्रेट गॅम्बलर, सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा,  अजनबी, कटि पतंग,  अमर प्रेम, आप की कसम,  मेरे जीवन साथी,  बहारों के सपने,   तीसरी मंजिल,  घर,  द ट्रेन,  आंधी, परिचय, अनामिका,  आंधी,  पडोसन, हम किसी से कम नहीं,  रामपूर का लक्ष्मण,  गोलमाल,  यादों की बारात, मासूम, सागर,  रॉकी,  लव्ह स्टोरी,  1942 अ लव्ह स्टोरी. ही नावं पाहूनच या सिनेमातली गाणी का हिट ठरली हे लक्षात येतं. कारण त्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये संगीत नव्हे तर त्यात प्राण ओतण्याचं काम पंचमदांनी केलं होतं. पंचमदांनी तयार केलेली धून अवर्णनीय अशीच असायची. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनेक गायक-गायिकांनी गायली. मात्र आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असेल तर गाणं सुपरहिट होणारच यात कोणतीही शंकाच नव्हती. मात्र आशाताईं प्रमाणेच  आर.डी. बर्मन यांच्या संगीताचा साज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजालाही तितकाच परिसस्पर्श देणारा ठरला. 

थिरकायला लावणारं संगीत ही आर.डी. बर्मन यांच्या संगीताची जादू. हा संगीतकार काळाच्या खूप पुढे होता. त्यामुळेच की काय पंचमदा कधीही आऊटडेटेड होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक पिढी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्यांच्या सूराला संगीत देण्याचं काम पंचमदा करत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताला वेगळा टच देण्याचं काम आर.डी. बर्मन यांनी केलं. त्यांच्या संगीतावर आतापर्यंत पाच पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. आताच्या तरूण पिढीतही त्यांचीच गाणी जास्त प्रमाणात रिमिक्स केली जातात. तरूणाई कोणत्याही काळातली असो त्यांना थिरकवणारं संगीत हे फक्त पंचमदा यांचंच असतं. थिरकवणारं संगीत देणाऱ्या पंचमदा यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गीतांनाही साज चढवला. आणि त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर. डी. बर्मन यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या कानात गुंजत राहतं. पंचमदा जितके ऐकावेत तितकं त्यांचं संगीत अजून ऐकावं, असंच वाटत राहतं. #संगो

Saturday, February 18, 2023

शिवसेना : बाळासाहेब ते शिंदे

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. 56 वर्ष ज्यांची पकड होती त्या शिवसेनेवर आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेनं आक्रमकपणे लढली. सुरवातीला मुंबई आणि ठाणे परिसरात जोमानं वाढलेली शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यात विस्तारासाठी सज्ज झाली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. 1995च्या विधानसबा निवडणुकीत शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले होते. राज्यात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी असलेलं युती सरकार सत्तेत आलं होतं. 

1999 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात जास्त सक्रीय नव्हते. कारण उद्धव ठाकरे पक्षात सक्रीय होऊ लागले होते. महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. शिवसेनेसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याचे पडसाद पुढच्या दोन वर्षातच उमटले. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती. शिवसेना या धक्क्यातूनही सावरली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली. शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून मविआच्या साथीनं सत्ता स्थापन केली. हा शिवसेनेसाठी दुसरा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या सत्तेमुळे शिवसेनेतील हिंदूत्ववादी नेते दुखावले. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पक्षाला मारक ठरत असल्यानं एकनाथ शिंदेंनी दुसरा गट स्थापन करून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली लढाई सुरू झाली. निवडणूक आयोगातली लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदेंना मिळालं. पक्षावरील ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही शिवसेनेनं अनेक बंड पाहिले, पक्षांतरं पाहिली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण या आघातानंतरही शिवसेना वाढली. इतके सर्व बंड पचवणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

आव्हान वाढलं...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्हं हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता शुन्यातून सुरूवात करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकला. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अशा शब्दात त्यांनी निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे.

कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. धनुष्यबाण चिन्हं सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना मतदारांसमोर जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत. त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकाही एका वर्षावर आल्या आहेत. आणि त्या आधीच पक्ष आणि चिन्हं गेल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात? यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. #संगो

Sunday, July 31, 2022

राजकारणातला 'सेफ गेम'

 

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव दहशतीला घाबरणार नसल्यानं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले होते. गळ्यातील भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच एक प्रकारे संजय राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही, याचा पुनरूच्चार केला. 

शिवसेना महाराष्ट्र कमजोर होणार नाही. संजय राऊत झुकणार नाही. पक्ष सोडणार नाही. संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले, तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळे सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला, शिंदे गटातही राऊत गेले नाही. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं.  मात्र या राजकीय लढाईत संजय राऊतांनी स्वत: पेक्षा आणि स्वत:च्या घराला सेप करण्यापेक्षा जास्त महत्व शिवसेनेला सेफ करायला दिलं. तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वत:ला सेफ करायला महत्त्व दिलं. शिंदे गटातील आमदार आणि संजय राऊत यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक इथे दिसून आला. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरू शकते.

ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना सहा महिन्यांपूर्वीच आला होता. त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे दोन नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्रीपदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून ऊरत होते. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती. आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला. त्या मुद्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली. मात्र या संकटात संजय राऊतांनीही राजकीय संधी साधली. शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.  राजकारणात शह आणि काटशह दिले जातात. राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो. 2019 मध्ये संजय राऊतांनी मविआचं सरकार आणून भाजपला मात दिली होती. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एकप्रकारे चेकमेटच देण्यात आलाय. आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही. कारण मौका सब को मिलता हैं. आता पुढचा मौका कोणाचा असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संजय राऊत  यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे 'ईडी'तील सूत्रांचं म्हणणे आहे. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले होते. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा 'ईडी'चा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही 'ईडी'ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर 'ईडी'ने पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली होती. एकंदरीतच पत्राचाळीच्या माध्यमातून भाजपनं संजय राऊतांचा हिशेब चुकता केला. #संगो #SANJAYRAUT #EKNATHSHINDE #SHIVSENA #ED

Thursday, March 10, 2022

कॉमेडी आणि राजकारण

 

2008 मध्ये भगवंत मान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी झाले होते. आणि आता 2022 मध्ये मान मुख्यमंत्री होणार आहेत. म्हणजेच चौदा वर्षात कॉमेडी, टीव्ही आणि राजकारण असा प्रवास करत त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. चौदा वर्षांपूर्वी स्टार वन या वाहिनीवर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो सुरू झाला होता. त्यातूनच कपिल शर्मा, सुनील पाल यांच्याप्रमाणे अनेक कॉमेडियन प्रसिद्ध झाले. 


भगवंत मान यांच्या प्रमाणेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा प्रवास झालाय. कायद्याचा अभ्यास करत असतानाच झेलेन्स्की कॉमेडी शो मध्ये सहभाग घेत होते. 17 वर्षांचे असताना झेलेन्स्की एका स्थानिक विनोदी स्पर्धेच्या टीममध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 1997 मध्ये ते मेजर लीगमध्ये काम करून विजयी झाले. 2008 मध्ये त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केलं. तर 2011 मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. काही वर्षांपूर्वी कॉमेडी करणाऱ्या या नेत्यानं बलाढ्य रशियाला चांगलीच झुंज दिली.

झेलेन्स्की, भगवंत मान यांच्यावरच ही यादी थांबत नाही. तर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 2 राजीव निगम हा कॉमेडियन सध्या यू ट्यूबवर सक्रिय आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व्हिडिओ तयार करून निगम ते यू ट्युबवर अपलोड करतात. ट्विटरवरही व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतो.  श्याम रंगीला हा कॉमेडियन पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांची हुबेहुब मिमिक्री करतो. काही दिवसांनी हे दोघेही राजकारणात आले तर नवल वाटणार नाही.

कॉमेडी सर्कस सिझन 2 मधील रेहमान खान हा कॉमेडियन अनेक स्टँडअप कॉमेडीमध्ये सहभागी होऊन केंद्र सरकारवर टीका करताना दिसतो. मुस्लिमांचे प्रश्न मांडून सरकारवर कॉमेडीच्या माध्यमातून रेहमान खान निशाणा साधतो. 

दक्षिण भारतात जयललिता, एन.टी. रामाराव, एम.जी. रामचंद्रन हे कलाकार राजकारणात यशस्वी झाले, मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात कमल हासन आणि इतर कलाकारही राजकारणात आले. बॉलिवूडमधील धर्मेंद्र, हेमामालिनी, शत्रूघ्न सिन्हा यांच्यासारखे कलाकार लोकसभेवर निवडून गेले. मात्र भगवंत मान यांनी मिळवलेलं यश हे या सर्वांपेक्षा मोठं आहे. काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी राजकारणाचा विनोद केला होता. अर्थात राजकारणाचा विनोद आजही कमी-जास्त प्रमाणात कायम आहे. पण आता अनेक कॉमेडियन राजकारणात येत आहेत. त्यामुळे आधी राजकारणाचा विनोद झाला होता, आता विनोदाचं राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. 

#संगो

Sunday, March 6, 2022

झुंड, दिवार आणि विजय

 

अमिताभ बच्चन यांच्या दिवार आणि झुंड सिनेमातील व्यक्तीरेखेचं नाव विजय आहे. दिवारमध्ये अँग्री यंग मॅन तर झुंडमध्ये प्रशिक्षक अशा व्यक्तीरेखेत विजय पाहायला मिळतो. झुंड सिनेमात दाखवण्यात आलेल्या कॉलेजच्या दिवारच्या (भिंत) एका बाजूला इंडिया तर दुसऱ्या बाजूला भारत (झोपडपट्टी) दाखवलेला आहे. इंडिया आणि भारत यांच्या असलेली ही भिंत पाडण्याचं काम अमिताभ बच्चन यांनी केलं.

झोपडपट्टी म्हणजे नाक मुरडण्याचा विषय. नावं ठेवण्याचा विषय. मात्र हाच विषय पडद्यावर दाखवण्याची हिंमत नागराज मंजुळे यांनी दाखवली. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमातला वावर महानायकाचा वाटत नाही. अर्थात तो तसा असण्याची गरजही नाही. महानायकासमोर सामान्य चेहऱ्याच्या छोट्या कलाकारांनी केलेला अभिनय लक्षात राहतो. डॉन, बाबू, रितीक यांचे डायलॉग खळखळून हसवतात. आणि डोळ्याच्या कडाही पाणवतात. 

फेसबुकवर या सिनेमाविषयी बरंच नकारात्मक वाचण्यात आलं होतं. मात्र हा सिनेमा पाहताना त्या नकारात्मक पोस्ट कुठच्या कुठे उडून गेल्या. फँड्रीत जब्याने भिरकावलेला दगड अनेकांना लागला होता. या सिनेमात दगड भिरकावलेला नाही. तरीही त्या दगडानं अचूक मारा केला आहे. #संगो #झुंड # #jhund

Monday, February 21, 2022

पुन्हा 'तिसरा' गिअर?


 केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला.  चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो