Monday, February 21, 2022

पुन्हा 'तिसरा' गिअर?


 केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला.  चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो

Sunday, February 6, 2022

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

 

लता मंगेशकरांच जीवनाचा प्रवास थांबला. मात्र त्यांचा आवाज जगभरात नेहमीच गुंजत राहणार आहे. जगभरातल्या नागरिकांवर असलेली त्यांच्या आवाजाची मोहिनी अशीच कायम राहणार आहे. कारण तो फक्त आवाज नाही. तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला काही तरी देणारा एक चिरंतन ठेवा आहे.
लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांना झालेला लतास्पर्श जीवनाचंच गाणं ठरतो. 'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणं तर प्रेमासाठी बंड करणाऱ्या तरूणाईचा आवाज आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला लतादीदींच्या स्वरानं नवी अनुभती दिली. उद्याची रात्र असेल किंवा नसेल अशा परिस्थितीत प्रियकराला गाण्यातून दिलेली साद हजारो वर्ष कोणीही विसरणार नाही.  लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो, हे गाणं ऐकताना प्रेमात पडलेली कोणतीही व्यक्ती शहारून गेली नसेल तरच नवल.  तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी लतादीदींचं हे गीत हमखास असतंच. जब हम जवां होंगे, या गाण्यातून पाहिलेली भावी प्रेमाची स्वप्नं शब्दातून मांडण्याचं काम लताजींनी केलं. प्रेमात पडल्यावर प्रियकराला पत्र लिहताना प्रेयसीच्या मनात हेच गीत दाटून आलेलं असतं. जे लतादीदींनी गायलंय, हमने सनम को खत लिखा. प्रेमात बेभान झालेल्या प्रेयसीच्या भावनांना आवाज दिला तो लता दीदींनी. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा हैं, हे बेभान गाणं मृत्यूवर मात करून जीवन कसं जगावं याचाच संदेश होतं.  अर्थात प्रत्येकाचंच प्रेम यशस्वी होत नाही. प्रेमभंग सहन करणाऱ्या हृदयानं घातलेली साद ऐकावी ती लतादीदींच्या गाण्यातूनच. शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता हैं, हे गाणं ऐकताना डोळ्यातून आपसूक अश्रू वाहू लागतात.  अनेक वर्षांनंतर आयुष्याच्या एका वळणावर भेटलेल्या प्रियकरासाठी लतादीदींनी दिलेल्या स्वरापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा नहीं, हे गाणं सर्व काही विसरून कोणतीही तक्रार करू नका, हा संदेश देतं असंच वाटत राहतं.
लतादीदींचा आवाज आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा देतो. प्रेमात पडलेल्याचं जग सुंदर करण्याचं काम लतादीदींच्या आवाजनं केलं. त्यामुळे पुढील हजारो वर्ष हा स्वर्गीय आवाज सर्वांना प्रेमाची आणि जगण्याची अनुभती देणार आहे. तुम्ही निराशा व्हाल तेव्हा प्रसन्न करण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे, प्रेमात पडाल तेव्हा तुमच्या हृदयाचा आवाज बनण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा तुमच्या हृदयाला समजावणारा लतादीदींचा आवाज. जीवनात संकटं येतील तेव्हा धीर देण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. जीवनातल्या कोणत्याही टप्प्यावर आवाज द्या, साद देण्यासाठी तुम्हाला लतादीदींचा आहे. फुलाच्या सुगंधाप्रमाणे हा आवाज आपलं जीवन असंच सुवासिक करणार आहे, लतादीदींनी गायलेल्या पुढील गाण्याप्रमाणे.... रजनीगंधा फुल तुम्हारे  यु ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में...
#संगो