Saturday, November 24, 2018

मुंबई टू अयोध्या

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही अयोध्येला भेट दिली नव्हती. तरीही राम मंदिर प्रकरणात त्यांची नेहमीच चर्चा होते. कारण 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभरात आगडोंब उसळला. मात्र मंदिर वहीं बनायेंगे अशी घोषणा देणारे भाजपचे नेते बॅकफूटवर आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मशीद पाडली नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
तर अयोध्येत न जाता फक्त मुंबईत बसून बाळासाहेब ठाकरेंनी बाजी पलटवून टाकली. "जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्यांचा अभिमान वाटतो", असं वक्तव्य करून बाळासाहेब ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. देशासह जगभरातल्या मीडियात फक्त बाळासाहेब ठाकरेंची चर्चा सुरू झाली. भारतातले सर्वात मोठे हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख जगभरात बनली.
अर्थात मराठी माणसाचा मुद्दा घेऊन जन्माला आलेल्या शिवसेनेला हिंदूत्वाचं कधीच वावगं नव्हतं. 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू हैं, असा नारा देत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. तर आता 26 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेताना 'पहले मंदिर फिर सरकार', ही घोषणा दिली. 
मराठीचा मुद्दा सत्तेवर येण्याइतकी मतं मिळवून देत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदूत्वाचा कैवार घेतलाय. त्यामुळे चलो अयोध्या, हा नारा देत उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहोचले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. अयोध्येत त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. तसंच मंदिर बांधण्यासाठी सरकारनं विधायक आणावं, त्याला शिवसेना पाठींबा देईल असंही स्पष्ट केलं.
स्पष्ट बहुमत असूनही मंदिर बनत नाही, या मुद्याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. मंदिर कधी बांधणार याची तारीख हवी, असं बोलून त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंदिर बांधून झाल्यावर भक्त होऊन दर्शनासाठी येईल असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. लक्ष्मण किलावर त्यांनी उपस्थिती लावली. पूजा केली. शरयू नदीवरील आरतीमध्येही त्यांनी सहभाग घेतला. एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी तिथं कारसेवाच केली. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक त्यांनी अयोध्येत नेऊन शक्ति प्रदर्शन केलं. इतकंच नव्हे तर देशभरातल्या मीडियाचं लक्षही वेधून घेतलं.
शिवसेनाप्रमखांचा 1992 मधला कालखंड आणि आता 2018 मधला उद्धव ठाकरेंची अयोध्या भेट यात मोठा फरक आहे.  1989 पासून हा राम मंदिराचा मुद्दा तापायला सुरूवात झाली होती. त्यामुळे शिवसेनेनंही, हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असा नारा दिला. राजकारणाची दिशा ओळखून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. मुंबईतही मोठ्या प्रमाणात दंगल पेटली. त्यावेळी शिवसैनिकांनी हिंदूंचं रक्षण केलं असा दावा शिवसेनेकडून आजही केला जातो. दंगलींनंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बारा बॉम्बस्फोट झाले. महाराष्ट्र आणि देशभरात धार्मिक राजकारण, दंगली यामुळे मतांचं ध्रवीकरण झालं. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं राज्यात सर्वाधिक 75 जागा जिंकल्या. या यशाला किनार होती ती, बाबरी मशीद पाडणं, जातीय दंगली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटांची. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद, बॉम्बस्फोट, दंगली या मुद्दांचं त्यांच्या भाषणात चांगलंच भांडवल केलं. तेव्हा हे सर्व मुद्दे ताजे होते. निवडणुकांपर्यंत या मुद्यांची धग जाणवत होती. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. राम मंदिराच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मतदारांना मंदिर मशीद नव्हे तर विकासाचे मुद्दे हवे आहेत. त्यातच निवडणुकांना अजून पाच महिने तरी अवकाश आहे. त्यामुळे राम मंदिराचा हा मुद्दा निवडणुकीपर्यंत जीवंत ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 
राजकारणात 26 वर्ष हा काही छोटा कालखंड नसतो. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. 26 वर्षांपूर्वीचा मुद्दा आता पुन्हा चालेलच याची कोणतीही खात्री नाही. 26 वर्षांपूर्वी देशात असलेली स्थिती आता बदलली आहे. आताची युवा पिढी ही करिअरवर लक्ष देणारी आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. जागतिकीकरणामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर - मशीद हे भावनिक मुद्दे आताच्या पिढीला तितकेसे आकर्षित करतील का ? याबद्दल साशंकताच आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन शक्ति प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्व मीडियाचा फोकस स्वत:वर केंद्रीत करण्यात यश मिळवलं. पण 1995 मध्ये बाबरीमुळे बाळासाहेब ठाकरेंना जसा फायदा झाला  तसा फायदा राम मंदिराच्या मुद्यामुळे उद्धव ठाकरेंना 2019 च्या निवडणुकीत होईल का ? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल.