Sunday, September 6, 2020

'क्वीन'चा नवा 'पंगा'

 

शिवसेना आणि मुंबईचं नातं वेगळं सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेचा ठसा असलेल्या या मुंबईत हिंदी सिनेमाची इंडस्ट्री चांगलीच बहरली. मुंबईतलं बॉलिवूड आपल्या देशाची ओळख आहे. एकाच शहरात शिवसेना आणि बॉलिवूडचं साम्राज्य आहे. मात्र अनेकदा  हे दोन्ही साम्राज्य एकमेकांना भिडतात तेव्हा मोठा वाद निर्माण होता. यावेळी शिवसेना आणि बॉलिवूडची क्वीन यांच्यात चांगलीच खणाखणी सुरू झाली. 

शिवसेनेची मुंबई शहरावर अनेक वर्षांपासून सत्ता आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी मुंबईच्या रस्त्यांवर साम्राज्य असतं ते शिवसेनेचं.  शिवसेनेची धाक, दहशत, दरारा ही कार्यपद्धती. शिवसेना मुंबईची किंग आहे. तर या किंगच्या विरोधात आता बॉलिवूडची क्वीन सरसावलीय. मणिकर्णिका सिनेमात कंगना राणावतनं झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका ताकदीनं वठवली होती. अनेक राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला होता. कंगनाच्या लक्ष्मीबाईच्या भूमिकेची प्रचंड तारीफ झाली. सिनेमाच्या पडद्यावर तलवार घेऊन लढाई करणाऱ्या कंगनानं आता सोशल मीडियाच्या रणांगणात ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून कंगनानं बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती. बॉलिवूडमधल्या बड्या प्रोडक्शन्सवर कंगनानं गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर निशाणा साधून कंगनानं मोठी खळबळ उडवू दिली. कंगना आणि बॉलिवूड असा वाद पेटलेला असतानाच कंगनानं मुंबईवरून ट्विट केलं आणि सर्व परिस्थितीच बदलली. कंगना आणि बॉलिवूडचा वाद थेट राजकीय वेळणावर गेला. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतीय ? असा सवाल ट्वीटच्या माध्यमातून कंगनानं विचारल्यानं तिचा थेट शिवसेनेसोबत सामना सुरू झाला.

'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.' असं ट्विट करून संजय राऊतांनी शिवसेनेचे इरादे जाहीर केले. दुसरीकडे राज्यभरात कंगनाच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. संजय राऊतांनीही  कंगनानं ट्विटर हँडल स्वतः वापरायला शिकावं, असा टोला लगावत भाजपकडे अंगुलीनिर्देश केला. भाजपनंही कंगना राणावतची पाठराखण करण्याची भूममिका सोडून देत यू टर्न घेतला. त्यामुळे कंगणानंही नरमाईची भूमिका घेतली. मुंबई आपल्यासाठी यशोदामाता असल्याचं तिनं एका  ट्विटमध्ये म्हटलं.  मला ओळखणाऱ्यांना माझ्या बोलण्याचा हेतू माहीत आहे, असंही तिनं म्हटलं. 'मुंबई आपली  कर्मभूमी असल्याचं सांगतानाचं मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नसल्याचंही तिनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं. 

राजकारण, समाजकारण आणि बॉलिवूड तिन्ही भिन्न क्षेत्र आहेत. एक प्रकारे त्यांची लक्ष्मण रेषा आखण्यात आलेली आहे. जेव्हा एखादा कलाकार राजकारण किंवा समाजकारणावर बोलतो तेव्हा त्याचं मत राजकीय वादात अडकतं. म्हणजेच आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडल्यास वाद होणार हे निश्चित. जो पर्यंत लक्ष्मण रेषेच्या आत राहून प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रात काम करतो तेव्हा कोणालाच अडचण नसते. मात्र कलाकारांनी राजकीय भाष्य केल्यास वाद झाल्याशिवाय राहात नाही, हे आपल्या देशातलं कटू वास्तव आहे.

कलाकारांनी पडद्यावर अभिनय करावा अशीच राजकीय पक्षांची इच्छा असते. कलाकारांनी राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल्यास राजकीय पक्ष कलाकारांवर टीका करतात. कलाकार राजकारण करत असल्याचा आरोप करतात. राजकारण करण्याऐवजी कलाकारांनी थेट राजकारणात यावं अशीही भाषा केली जाते. शिवसेना वगळून मुंबईचा विचार केला जावू शकत नाही. तसंच बॉलिवूडशिवायही मुंबईचा विचार करता येत नाही. शिवसेना आणि बॉलिवूड या शहरातच मोठे झाले. मात्र जेव्हा एखादा कलाकार शिवसेनेनं आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी वाद होतोच. हा आता पर्यंतचा इतिहास आहे. आणि या इतिहासाला कंगनाही अपवाद नाही.