Friday, December 28, 2018

सिनेमा लोकसभा निवडणुकीचा !



लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपनं आधार घेतलाय तो गांधी कुटुंबावर टीका करण्याचा. तर शिवसेनेला आजही 'ठाकरे' या करिश्माई नावाशिवाय इतर पर्याय नसल्याचं या सिनेमाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होतं. एकंदरीतच निवडणुकीच्या आधी मतांसाठी हे सिनेमे तयार केलेत का ? असा प्रश्न निर्माण होतो.
2019च्या जानेवारी महिन्यात 'ठाकरे', द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर आणि एनटीआर हे तीन सिनेमा प्रदर्शित होत आहेत. या तिन्ही सिनेमात राजकीय व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या आहेत. मात्र 'ठाकरे' आणि 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर' वादाच्या भोव-यात अडकलेत.
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच हे सिनेमा प्रदर्शित करण्याचं टायमिंग साधण्यात आलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुका सत्ताधा-यांसाठी सोप्या नाहीत. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना पक्ष त्यांच्याच करिश्म्यावर वाटचाल करत होता. मात्र आता बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण शिवसेनेची भिस्त अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही खेळी आहे, हे उघड गुपित आहे.
या सिनेमात मराठी मतदार आणि हिंदूत्ववादी मतदार यांना आवडतील अशा डायलॉगचा भडिमार करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे वादळ. "वादळ असताना शांत राहयाचं असतं, आणि बाहेर शांतता असताना वादळ निर्माण करायचं असतं", हे बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य. पण शिवसेनाप्रमुखांचं हे वक्तव्य ते हयात नसले तरी तितकंच सत्य ठरलंय. आणि तेही त्यांच्याच आडनावानं त्यांच्यावर निघालेल्या सिनेमाच्या निमित्तानं.
'ठाकरे' सिनेमातल्या शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडून निघालेले डायलॉग्ज आजही वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखल बसेल असाही एक डायलॉग सध्या जोरदार गाजतोय. ठाकरे सिनेमातल्या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जोरदार टोला लगावण्यात आलाय. एकंदरीतच काही डायलॉग्ज हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्फोटक करण्यात आलेत, यात शंका नाही.
शिवसेनेसारखीच स्थिती भाजपचीही आहे. कारण भाजपकडेही स्वत:चं सांगण्यासारखं असं काही फारसं नाही. त्यामुळे गांधी कुटुंबावर टीका करण्याशिवाय दुसरा हुकूमी पत्ता भाजपकडे नाही. त्यामुळे या सिनेमातून भाजपला काँग्रेसवर जी टीका अपेक्षित आहे किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बदनामी करायची आहे तितकी करण्याची संधी साधून घेण्यात आली आहे, असं ट्रेलरवरून तरी दिसतं.

सिनेमात गांधी कुटुंबाला व्हिलन ठरवलं जात नाही ना, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण मनमोहन सिंग यांची चितारण्यात आलेली व्यक्तीरेखा ही जाणूनबुजून त्यांना दुबळं दाखवण्याचा प्रयत्न आहे का ? अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे. कारण अनुपम खेर यांनी साकारलेल्या व्क्तीरेखेत मनमोहन सिंग यांचे सर्व संवाद हे दुय्यम असल्याचं लक्षात येतं. त्यांची बॉडी लँग्वेज ही पराभूत मानसिकता दाखवणारी असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं.
या सिनेमात राहुल गांधी हे मोबाईलवर खेळत असताना दाखवण्यात आलं आहे. या दृश्यातून त्यांना बालिश दाखवण्याचा प्रयत्न केला तर नाही ना, अशी शंका येते. पण हे इथंच थांबत नाही. कलंकित नेत्यांना निवडणुका लढवण्यापासून रोखणारा अध्यादेश काँग्रेस सरकार काढणार होतं. पण त्या आधी दिल्ली पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत तो अध्यादेश फाडून टाकला होता. हे दृश्यही सिनेमात चित्रीत करण्यात आलं आहे.
यूपीएचं सरकार मनमोहन सिंग नव्हे तर सोनिया गांधी चालवत होत्या, असाच सूर या सिनेमात लावण्यात आल्याचं दिसतंय.
एकंदरीतच द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमाचा ट्रेलर पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप होण्याची शक्यता आहे. सिनेमा रिलीज होईपर्यंत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
#संगो #बाळासाहेब #शिवसेना #भाजप #काँग्रेस #LOKSABHA2019

Sunday, December 23, 2018

टीव्हीतली माणसं

10 जुलै 2003 रोजी मी हैदराबादला ई टीव्ही मराठीच्या प्रोग्रामींग विभागात रुजू झालो होतो. त्यानंतर साधारणत: सात-आठ महिन्यांनी सुट्टी काढून संभाजीनगरला आलो. (त्या काळी सुट्ट्या मिळत होत्या.) संभाजीनगर शेजारीच असलेल्या आमच्या मूळ गावी सोलेगावला गेलो. आजीला भेटलो. आजीच्या शेजारी दुसरी एक महिला होती. त्यांनी विचारलं, तुमचा नातू काय करतो ? आजीनं सांगितलं, त्यो टिहीत रंग भरितो.
आजीला वाटलं मी ई टीव्ही म्हणजेच टीव्हीचं उत्पादन करणा-या कंपनीत काम करत आहे. अर्थात टीव्हीत कधी रंग भरलेच नाही, असं नाही. कारण 1999 मध्ये चितेगावमधल्या व्हिडीओकॉन इंटरनॅशनल कंपनीत ट्रेनी म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्याच कंपनीत पर्मनंट होऊन सुखात आयुष्य घालवू असा विचार केला होता. पण या कंपन्या बदमाश असतात. अकरा महिन्यानंतर घरी पाठवतात. असं केलं नाही तर ट्रेनींना पर्मनंट करावं लागतं. व्हिडीओकॉननं मला पर्मनंट केलं नाही. आता बघा व्हिडीओकॉनची काय अवस्था झाली आहे. माझ्या सारख्या ट्रेनी कामगारांचे तळतळाट भोवले, दुसरं काय.
फेसबुक, यु ट्यूब, इंटरनेट अशी मनोरंजनाची अनेक साधणं आली असली तरी टीव्ही आजही आपलं महत्व राखून आहे. टीव्हीवर दिसणारी प्रतिमा हेच तिचं मुख्य बलस्थान आहे. व्हिडीओकॉन कंपनीत टीव्ही तयार करत असताना, या अशाच टीव्हीत आपण कधी दिसू असं स्वप्नही कधी पडलं नव्हतं. अर्थात आता पर्यंत जी काही स्वप्नं पडली, ती खरी झाली असंही झालेलं नाही. 
ई टीव्ही प्रोग्रामींगमध्ये असताना रघुनंदन बर्वे, विजय गालफाडे, अरविंद पाटील, कौराजी गावंडे या 'सज्जनां'चा सहवास लाभला. तिथं असणारं ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे राज साळोखे यांचा 'सत्संग' घडला. तर प्रकाश फडणीस या अवलिया माणसाकडून बरंच काही शिकायला मिळालं. ई टीव्हीला हैदराबादमध्ये जास्तीत जासत ईनहाऊस प्रोग्राम व्हायचे. फुलोरा, गाणे तुमचे आमचे, दर्शन हे कार्यक्रम आम्ही करत असू. नवं काही तरी करायचं म्हणून फुलोरा या कार्यक्रमात स्किट करण्याचं ठरलं. बाहेरून तीन-चारच कलाकार आणले. जास्त कलाकार आणले असते तर बजेट वाढणार होतं. त्यामुळे मी आणि रघुनंदननं त्या स्किटमध्ये अभिनय केला. ती स्किट ई टीव्हीवरून प्रसारित झाली. माझ्या सारख्या माणसाचा फोटो कधी पेपरमध्ये छापून येईल असं वाटायचं नाही, तो टीव्हीवर अभिनय करताना दिसला. फुलोरा, दर्शनमध्ये दिग्दर्शक म्हणूनही संतोष गोरे हे नाव दररोज जात होतं. हे सर्व स्वप्नवतच होतं. 
त्यानंतर ई टीव्ही न्यूजमध्ये बदली करून घेतली. अमरावतीमध्ये रिपोर्टिंग करताना अनेक पीटीसी न्यूज पॅकेजमध्ये ऑनएअर गेले. नंतर tv9 मध्येही अनेकदा लाईव्ह दिलं. टीव्ही पाहणारा माझ्या सारखा सामान्य माणूस टीव्हीतला माणूस बनला. पण आताच्या काळात टीव्हीत दिसणं हे काही अप्रूप राहिलेलं नाही. कारण फेसबुक लाईव्ह करूनही तुम्ही तुमच्या भावना, मतं अनेकांपर्यंत पोहचवू शकतात. तुमचे व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करू शकता. अगदी स्वत:चं यू ट्यूब चॅनेलही काढू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून लाईव्ह करू शकता. परिणामी सोशल मीडियामुळे सामान्य नागरिकांनाही चेहरा मिळाला आहे. तुमचा चेहरा झळकण्यासाठी आता फक्त टीव्हीवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
अर्थात सगळ्यांचाच चेहरा काही धड नसतो (माझ्यासकट). पण तो चेहरा कुठे तरी दिसावा, आपल्याला लोकांनी ओळखावं असं वाटण्यात काहीच चूक नाही. टीव्हीतली माणसं जशी फेमस होतात तशी आता सोशल मीडियातली माणसंही फेमस होऊ लागली आहे. मी कंपनीत असताना जसे टीव्हीत रंग भरले, तसेच रंग आता अनेक युवक सोशल मीडियात भरत आहेत.
खमंग फोडणी - टेलिव्हिजनमध्ये आतापर्यंत 15 वर्ष काढली आहेत. चार चॅनेलमध्ये काम केलंय, म्हणजे नोकरीच केली. पण कधी चॅनेलचा मालक होईल असा विचारही कधी मनाला शिवला नाही. पण माझा मुलगा चॅनेलचा मालक झालाय. विश्वास बसणार नाही, पण तो चॅनेलचा मालक आहे. त्यानं स्वत:चं यू ट्यूब चॅनेल काढलं आहे. काळाचा महिमा. #संगो

Saturday, December 8, 2018

भाजपची EXIT, POLL मध्ये काँग्रेसची बाजी ?


2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं अनेक मोठे विजय मिळवला. ख-या अर्थानं भाजपला अच्छे दिन आले. पण राजकारणाचं वारं कधी पलटेल याचा नेम नसतो. शुक्रवारी एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. आणि आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार, असे संकेत मिळू लागले आहेत.राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र या तिन्ही राज्यांमध्ये मतदार बदल घडवण्याच्या मनस्थितीत असल्याचं एक्झिट पोलच्या निष्कर्षावरून स्पष्ट झालंय. एक्झिट पोलप्रमाणे जर कौल मिळाला तर राज्यातलं राजकारण झपाट्यानं बदलणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलीही परिस्थिती काही वेगळी नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी मोदी आणि फडणवीस यांना मनी ऑर्डर पाठवून त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. इतर पिकांनाही भाव देण्यात सरकार अपयशी ठरलंय. परिणामी शेतक-यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर कर्जमाफीचा घोळ मिटला अजून मिटलेला नाही. त्यामुळे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. दुष्काळ जाहीर करण्यात मोठा वेळ घेतला गेला. दुष्काळाची मदत शेतक-यांना मिळालेली नाही. ग्रामीण भागात यामुळे मोठा रोष पसरलेला आहे.
एक्झिट पोलच्या निष्कर्षाप्रमाणे निकाल लागले तर भाजप कमजोर होईल. शिवसेनेसमोर तोरा मिरवणा-या भाजपला बॅकफूटवर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. जागावाटपाच्या बोलणीत भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा शब्द अंतिम असेल. आधी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शिवसेना त्यांच्या अटी-शर्तींवर बोलणी करेल. मागील साडेचार वर्षांपासून अवमान सहन करणारी शिवसेना उट्टे काढणार यात शंका नाही.  त्यामुळे भाजप पडती बाजू घेऊन शहाणपण दाखवले की स्वबळाचा नारा देईल याचा अंदाज आता काढता येणं अवघड आहे.
सत्तेच्या मस्तीत असलेल्या भाजपला इतके दिवस त्यांच्या विरोधात असलेला रोष दिसत नव्हता. सामान्यांचा संताप समजत नव्हता. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि एनडीएतल्या पक्षांनाही किंमत दिली जात नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आता मोठं आव्हान असेल. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणा-या भाजपचे बुरे दिन आता सुरू झालेत, हे मात्र खरं.