Tuesday, August 17, 2021

तालिबानची सत्ता, जगाला धोका


 अफगाणिस्तानचा राष्ट्रपती कोण होणार ? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे. तालिबानच्या अव्वल चार नेत्यांपैकी एक जण राष्ट्रपती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादाचं नाव राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहे. हैबतुल्लाह अखुनजादा हा तालिबानचा सर्वात मोठा नेता आहे. तोच अफगाणिस्तानाचा नवा राष्ट्रपती असेल असं बोललं जातंय. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि अन्य बाबींवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि सैन्य विषयक बाबींवर त्याचा शब्द अंतिम मानला जातो. अख्तर मंसूर मारल्या गेल्यानंतर हैबतुल्लाह अखुनजादा याने तालिबानचं नेतृत्व सांभाळलं. हैबतुल्लाह याने तालिबानच्या विखुरलेल्या शक्तीला एकत्र केलं. हारलेल्या तालिबानींमध्ये त्याने विश्वास निर्माण केला. त्यामुळेच अवघ्या 103 दिवसात तालिबानींनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं.  मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादा याच्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादरचं नावही अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होण्यासाठी आघाडीवर आहे. बरादर हा तालिबानच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे. राजकीय कार्यालय प्रमुख आणि शांती वार्ता पथकाचा तो सदस्य आहे. तालिबानची राजकीय वाटचाल कशी असेल याचा निर्णय अब्दुल गनी बरादरकडे असणार आहे. 1980 मध्ये अफगाणी सरकारविरोधातल्या लढ्यात बरादर आघाडीवर होता. कंदहारच्या मदरशात कमांडर मोहम्मद उमरसह त्यानं काम केलंय. 1996 ते 2001 मध्ये हेरात प्रांताचा तो गव्हर्नर होता. सिराजुद्दीन हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. हक्कानी नेटवर्क या नावानं कुख्यात असलेल्या नेटवर्कनं अमेरिका आणि नाटोला मोठा तडाखा दिला. मागील 20 वर्षात अमेरिका आणि नाटोच्या सैन्यावर अनेक आत्मघाती हल्ले करण्यात आले. हक्कानी नेटवर्कनं हे हल्ले केले होते. त्यामुळे  हक्कानीवर अमेरिकेनं 1 कोटी डॉलरचं बक्षिस जाहीर केलं. सिराजुद्दीन हक्कानी हा रशियाच्या विरोधात लढलेल्या जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यातही हक्कानी नेटवर्कचा हात होता.

सिराजुद्दीन हक्कानीनंतर मुल्ला मोहम्मद याकूब तालिबानमधला सर्वात प्रबळ नेता मानला जातो. तालिबानची स्थापना करणाऱ्या मुल्ला उमरचा याकूब हा मुलगा आहे. मुल्ला याकूबनं पाकिस्तानातल्या मदरशांमध्ये शिक्षण घेतलं. सध्या तो तालिबानच्या  मिलिट्री कमीशनचा प्रमुख आहे. त्याच्या अखत्यारीत अनेक कमांडर येतात. त्यांच्यावर विविध हल्ले करण्याची जबाबदारी दिली जाते. मुल्ला याकूब हा ऑपरेशनसाठी या कमांडरचा वापर करतो. मुल्ला उमरचा मुलगा असल्यानं याकूबला तालिबानमध्ये मोठा मान दिला जातो.  अफगाणिस्तानचा राष्ट्रपती या चार जणांपैकी कोणी तरी एक जण असणार आहे. तालिबान्यांनी रक्तरंजीत मार्गानं सत्ता हस्तगत केलीय. मात्र यानंतरचा काळ तिथल्या जनतेसाठी खडतर असणार आहे. तसंच तालिबानसमोरही अनेक आव्हानं आहेत.

अफगाणिस्तानवर विजय मिळवणं आणि त्यावर सत्ता गाजवणं कोणालाच शक्य झालं नाही. ब्रिटन, रशिया, अमेरिकेलाही अफगाणिस्तानात यश मिळालं नाही. अमेरिकेनं बॉम्बचा वर्षाव करून अफगाणिस्तान बेचिराख करून टाकला. मात्र तालिबानचा नायनाट करण्यात त्यांना अपयश आलं. जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या महासत्ता अफगाणिस्तानात पराभूत झाल्या. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहिल्यानंतरही अमेरिकेला तालिबानची पाळंमुळं उखडून फेकता आली नाही. अमेरिकेच्या आधी ब्रिटन आणि 90च्या दशकात रशियालाही इथून पराभूत होऊन परतावं लागंल. अफगाणिस्तानची भौगोलिक रचनाच अशी आहे की, त्यांच्या जमिनीवर त्यांचा पराभव होऊ शकत नाही. डोंगराळ भागावर हवाई हल्ले करता येतात. मात्र टोरा बोरासारख्या असंख्य पर्वत रांगांमध्ये तालिबानी लपून बसतात. हवाई हल्ल्यातही त्यांचं जास्त नुकसान होत नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात अफगाणिस्तानच्या सैन्याला प्रशिक्षण दिलं. त्यांना अत्याधुनिक शस्त्रात्रं दिली. मात्र असं असूनही अफगाणिस्तानच्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त सैन्यानं तालिबानींचा प्रतिकार केला नाही. साठ हजार तालिबानींनी अवघ्या 103 दिवसात अफगाणिस्तान ताब्यात घेतला. अफगाणिस्तानच्या पळपुट्या सैनिकांनी रणांगणातून पळ काढला.

तालिबानला भारतानं अधिकृतरीत्या कधीच मान्यता दिली नाही. भारताचं तालिबानसोबत चर्चा करण्याचं आणखी एक सर्वात मोठं कारण आहे की, अफगाण सरकारसोबतच्या भारताच्या नात्यात वितुष्ट आलं असतं. भारत-अफगाणिस्तानमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिले आहेत. मात्र, आता स्थिती बदललीय. असं असलं तरी  गेल्या काही दिवसात तालिबानकडून भारतविरोधी कुठलंच वक्तव्य समोर आलेलं नाही. तालिबाननं अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या भूमिकेलाही चूक म्हटलं नाही.

दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जवळपास 2611 किलोमीटर लांबीची सीमा आहे. आपल्या सीमेवर अफगाणिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींची गर्दी होतेय की काय, याची चिंता पाकिस्तानला आहे.

तर चीनलाही चिंतेनं घेरलंय. चीनमधला शिनजियांग प्रांत संपन्न असून त्या प्रांताची अफगाणिस्तानसोबत जवळपास 8 किलोमीटरची सीमा आहे. तालिबाननं चीनच्या शिनजियांग प्रांतात सक्रिय असणाऱ्या ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट या फुटीरतावादी गटाला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर अफगाणिस्तान इस्लामिक कट्टरतावादाचं केंद्र होईल अशी भीती रशियाला आहे. अफगाणिस्तानात इस्लामिक कट्टरतावाद वाढला तर पूर्ण मध्य आशियासाठी मोठा धोका निर्माण होईल आणि हिंसाचार झाला तर त्याचे पडसाद मॉस्कोपर्यंत पोहोचतली अशी भीती रशियाला आहे. जगातल्या सर्वच देशांना तालिबानच्या राजवटीमुळे धोका निर्माण झालाय. आता या सर्व धोक्यावर काय तोडगा निघणार, यावर सर्वांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

Tuesday, July 27, 2021

कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री!

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 62व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत 28 नोव्हेंबर 2019 ही तारिख अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण याच दिवशी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं शक्तीस्थान असलेल्या ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मंत्री किंवा मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. तसं त्यांनी जाहीरपणेही सांगितलं होतं. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अर्थात त्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता. मात्र यावेळी उद्धव ठाकरेंनी रिमोट कंट्रोल हाती घेण्याऐवजी थेट राज्याचीच सूत्रं हाती घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सत्तेत आली.  संजय राऊत, शरद पवार, सोनिया गांधी आणि इतर महत्त्वाचे नेते यांच्यात मोठी चर्चा होऊन राज्याच्या राजकारणात नवं समीकरण उदयाला आलं. उद्धव ठाकरेंनी सत्तेची सूत्र हाती घेतली.

मात्र इथून पुढचा प्रवास मोठा खडतर होता. कारण त्याचवेळी राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांना दिलासा आणि नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर होती. हे संकट संपत नाही तोच २०२० वर्ष उजाडलं ते कोरोनाचं संकट घेऊन. कोरोनानं सर्व जगाला जसा तडाखा दिला तसाच भारतालाही दिला. महाराष्ट्रात तर कोरोनामुळे बिकट स्थिती निर्माण झाली. पहिल्या लाटेत रूग्णांना बेड मिळत नव्हते. औषधींचा तुटवडा होता. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती खडतर झाली. अनेकांचे रोजगार गेले. सरकारवर मोठी टिका सुरू झाली. हळूहळू लाट ओसरली अनलॉक सुरू झाला. थोडासा दिलासा मिळतोय असं वाटत असतानाच दुसरी लाट प्रचंड वेगानं पसरली. ऑक्सिजनच्या अभावी शेकडो जणांना जीव गमवावे लागले. पुन्हा बेड्सचा तुटवडा निर्माण झाला. रेमेडिसिव्हर सारख्या औषधीसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागलं. कित्येकांनी त्यांचे नातलग गमावले. दुसरी लाट आता आटोक्यात येऊ लागलीय. सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्या. कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं. महाराष्ट्रानं देशात लसीकरणात आघाडी घेतली. राज्याच्या आरोग्य खात्याचंच हे यश आहे. अशा अनेक यश-अपयशांचा सामना उद्धव ठाकरेंनी केलाय.

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं होतं. त्यानंतर 2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली. त्यात शिवसेनेला यश मिळालं.  2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात युती मोठं यश मिळवणार असं वातावरण होतं. मात्र मुंबई, नाशिक, पुण्यात मनसेच्या उमेदवारांनी लाख-लाख मतं घेतली आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. 2012च्या पालिका निवडणुकीत बीएमसीवर पुन्हा शिवसेनेनं झेंडा फडकवला. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर 63 जागा मिळवल्या. 2017च्या पालिका निडणुकीतही बीएमसीत शिवसेना अव्वल ठरली. 

हे सर्व यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं मिळवलं. रिमोट कंट्रोलनं सरकारवर नियंत्रण ठेवण्याऐवजी फ्रंट सीटवर येऊन थेट राज्य चालवण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय शिवसेनेसाठी महत्वाचा ठरताना दिसतोय. कारण शिवसेना पुन्हा लोकप्रिय होऊ लागलीय. कोरोनाच्या कठिण काळात संयमानं कारभार करून उद्धव ठाकरेंनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नागरिकांचा हा विश्वासच त्यांच्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल.

Wednesday, June 9, 2021

थेट दरवाज्याआडून...



 (दोन बड्या नेत्यांची भेट झाली. त्यावेळी सर्वांना चकवा देत मिळवलेली ही खास खबर. )


दिल्लीश्वर - आओनी मुंबईकर भाई


मुंबईकर - जय महाराष्ट्र. थांबा दरवाजा उघडा ठेवतो. किंबहुना उघडा ठेवायलाच हवा.


दिल्लीश्वर - कोई वांधा नहीं, राहू द्या बंद


मुंबईकर - नको, मागील वेळी मोटाभाई सोबत बंद दरवाज्याआड चर्चा केली होती. पुढे काय लफडं झालं तुम्हाला माहित आहे.


दिल्लीश्वर -  झालं गेलं माँ गंगेला मिळालं. माझ्याच मतदारसंघातून वाहते गंगा नदी


मुंबईकर - सर्व देश किंबहुना सर्व जगच तुमचे मतदारसंघ आहेत.


दिल्लीश्वर - मला टोमणे मारता काय ? (दोघांचं हास्य) बरं काय खाणार ? ढोकळा देऊ का ?


मुंबईकर - शिव वडापाव सोबत आणला आहे. मी ढोकळा खातो, तुम्ही वडापाव खा.


दिल्लीश्वर - चोक्कस. बरं सकाळीच मुंबईहून निघालात. वेळेत विमान मिळालं ?


मुंबईकर - अजित दादा सोबत होते. मागील दीड वर्षपासून त्यांना लवकर उठण्याची सवय लागली आहे. (पु्न्हा दोघांचं हास्य) त्यामुळे लवकर पोहोचलो.


दिल्लीश्वर - बरं, काय म्हणतात तुमचे नवे मित्र.


मुंबईकर - ज्यांचं बोट तुम्ही राजकारणात आला, त्यांचा हात पकडून आम्ही सत्तेत आलो. (पु्न्हा दोघांचं हास्य) पण आपली जुनी मैत्री अजूनही लक्षात आहे.


दिल्लीश्वर - मी तर नेहमीच मित्रों, असं म्हणत असतो. बाकी अजून काय म्हणता ?


मुंबईकर - GST मधला राज्याचा वाटा मिळाला नाही.


दिल्लीश्वर - जी एसटी येईल ती पकडायची. (पु्न्हा दोघांचं हास्य)


मुंबईकर - बरं, आता निघतो. जय महाराष्ट्र.


दिल्लीश्वर - येत राहा. चांगलं वाटतं. मेरा और महाराष्ट्र का बचपन से नाता रहा हैं.


मुंबईकर - होय. त्याच नात्यानं तुमच्याकडे, मी पुन्हा येईन.  (दोघांच्या हास्याचा स्फोट)