Saturday, December 8, 2018

भाजपची EXIT, POLL मध्ये काँग्रेसची बाजी ?


2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं अनेक मोठे विजय मिळवला. ख-या अर्थानं भाजपला अच्छे दिन आले. पण राजकारणाचं वारं कधी पलटेल याचा नेम नसतो. शुक्रवारी एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. आणि आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार, असे संकेत मिळू लागले आहेत.राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र या तिन्ही राज्यांमध्ये मतदार बदल घडवण्याच्या मनस्थितीत असल्याचं एक्झिट पोलच्या निष्कर्षावरून स्पष्ट झालंय. एक्झिट पोलप्रमाणे जर कौल मिळाला तर राज्यातलं राजकारण झपाट्यानं बदलणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलीही परिस्थिती काही वेगळी नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी मोदी आणि फडणवीस यांना मनी ऑर्डर पाठवून त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. इतर पिकांनाही भाव देण्यात सरकार अपयशी ठरलंय. परिणामी शेतक-यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर कर्जमाफीचा घोळ मिटला अजून मिटलेला नाही. त्यामुळे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. दुष्काळ जाहीर करण्यात मोठा वेळ घेतला गेला. दुष्काळाची मदत शेतक-यांना मिळालेली नाही. ग्रामीण भागात यामुळे मोठा रोष पसरलेला आहे.
एक्झिट पोलच्या निष्कर्षाप्रमाणे निकाल लागले तर भाजप कमजोर होईल. शिवसेनेसमोर तोरा मिरवणा-या भाजपला बॅकफूटवर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. जागावाटपाच्या बोलणीत भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा शब्द अंतिम असेल. आधी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शिवसेना त्यांच्या अटी-शर्तींवर बोलणी करेल. मागील साडेचार वर्षांपासून अवमान सहन करणारी शिवसेना उट्टे काढणार यात शंका नाही.  त्यामुळे भाजप पडती बाजू घेऊन शहाणपण दाखवले की स्वबळाचा नारा देईल याचा अंदाज आता काढता येणं अवघड आहे.
सत्तेच्या मस्तीत असलेल्या भाजपला इतके दिवस त्यांच्या विरोधात असलेला रोष दिसत नव्हता. सामान्यांचा संताप समजत नव्हता. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि एनडीएतल्या पक्षांनाही किंमत दिली जात नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आता मोठं आव्हान असेल. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणा-या भाजपचे बुरे दिन आता सुरू झालेत, हे मात्र खरं.

No comments:

Post a Comment