Friday, April 19, 2019

शिवसेनेचा 'भार' मतदार हलका करणार?

लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलण्याची हिंमत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही. काही खासदारांना पाचव्यांदा, चौथ्यांदा, तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. निष्क्रिय खासदारांच्या विरोधात नाराजी असतानाही शिवसेनेनं भाकरी उलथली नाही. परिणामी निकालानंतर शिवसेनेची ही भाकरी करपली तर कोणालाही नवल वाटणार नाही. अगदी उद्धव ठाकरेंनाही.
चंद्रकांत खैरे पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. शिवाजीराव अढळराव पाटील चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव हे ही तिसऱ्यांदा मैदानात उतरत आहेत. रवींद्र गायकवाड वगळता एकाही विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेचे 17 खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परिणामी रांगडी शिवसेना खासदारांसमोर हतबल झाली का ? हा सवाल उपस्थित होतो.
शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंसमोर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी जोरदार आव्हान निर्माण केलं आहे. 'एकच फॅक्टर, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर' ही घोषणा लोकप्रिय ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीनं दलित आणि मुस्लीमांच्या भागांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुल्ताबादमध्ये आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात हर्षवर्धन जाधवांनी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरावर जोर दिलाय. मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी ग्रामीण मतदारांमध्ये सहानुभूती आहे. मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यात हर्षवर्धन जाधव यांना यश आलं आहे. त्यातच महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवारानं हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार यांनीही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा दिला. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई आहेत. त्यामुळे भाजपचा हर्षवर्धन जाधवांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधातली नाराजी हर्षवर्धन जाधवांसाठी फायद्याची ठरत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत मतदारांनी खान विरूद्ध बाण अशा निवडणुका पाहिल्या आहेत. पण पहिल्यांदाच खानही नको आणि बाणही नको, पण विकास हवा अशा वळणावर जिल्ह्यातले मतदार आले आहेत. खैरेंनी जिल्ह्यात कोणते मोठे उद्योग आणले ? असा सवाल विचारला जात आहे. शहरातल्या विविध प्रश्नांवरून प्रचार करताना शिवसेनेच्या नेतृत्वाची अडचण होताना दिसत आहे.
अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना स्थानिक नसल्याच्या मुद्यावरून रोषाला सामोरं जावं लागत आहे. खासदार जिल्ह्यात उपलब्ध नसतात अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जाते. या टीकेला समाधानकारक उत्तर शिवसेनेला देता आलेलं नाही. शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील तीनदा निवडून गेले. मात्र यावेळी त्यांच्याविरोधात मतदारसंघात मोठी नाराजी आहे. पण शिवाजीरावांचं तिकीट कापण्याची हिंमत दाखवली गेली नाही. त्यामुळे आता मतदारांनी 'संभाजी'चा (डॉ. अमोल कोल्हे) राज्यभिषेक केला तर नवल वाटायला नको.
बुलढाणा मतदारसंघातही प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराजी आहे. पण इथंही शिवसेनेनं कच खाल्ली. यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळी यांना किती वेळा लोकसभेवर पाठवायचं ? याचाही विचार करण्याची गरज आली आहे. मुंबईतून गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी तरूण शिवसैनिकाला संधी देण्याची संधी शिवसेनेला होती. पण ही संधी शिवसेनेनं साधली नाही. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवलं. असं असताना ज्यांच्या विरोधात नाराजी आहे, त्या श्रीरंग बारणेंना शिवसेनेनं मैदानात का उतरवलं ? हा प्रश्न निर्माण होतो.
नाराजी असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापण्याऐवजी मतदारांच्या हातूनच जुन्या खोडांचा 'कार्यक्रम' करण्याचा शिवसेनेचा डाव असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच शिवसेनेवरचा हा निष्क्रिय उमेदवारांचा 'भार' मतदार हलका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. #संगो

1 comment:

  1. तुमची दूरदृष्टी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे!

    ReplyDelete