Monday, October 12, 2015

'शाई'चे राजकीय रंग

शिवसेनेनं सुधींद्र कुलकर्णींवर शाई टाकून जोरदार सुरूवात केली. दणादण ब्रेकिंग न्यूज, त्यावरील प्रतिक्रिया, फोनो, लाईव्ह सुरू झाले. आता खुर्शीद कसुरींचं पुस्तक काही प्रकाशित होत नाही, असं वाटायला लागलं. धावती मुंबई थांबते की काय, असं वाटलं. मात्र दिवस जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतशी परिस्थिती बदलत गेली. शिवसेना विरोध कायम असल्याचं सांगत होती. मात्र दिवस मावळताना खुर्शीद कसुरींचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णींनी, शिवसेनेला खडे बोलही सुनावले. मुंबई महाराष्ट्रीय आहे. तसंच मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असल्याचहीं सांगितलं. गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपनंही वचपा काढत, मुंबईत दणक्यात कार्यक्रम होऊ दिला. शिवसेनेनं कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध ही आंतरराष्ट्रीय बातमी ठरली. मात्र त्याला स्थानिक राजकारणाचे पदर आहेत, हे त्यामागील सत्य आहे.
आता हे ही खरं आहे की, सीमेवर जवान शहीद होतात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येतात. तेच दहशतवादी देशात बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय नागरिक ठार होतात. दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा मिळतो. काश्मीरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन देतो. दर शुक्रवारी श्रीनगरमध्ये नमाजनंतर भारताचा झेंडा जाळला जातो. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. जवानांवर दगडफेक केली जाते. हे सगळं खरं असलं तरीही पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारणं गरजेचं आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे नागरिक, कलाकार भारतात येणंही गरजेचं आहे.
आता शिवसेनेनंही थोडा विचार करावा. अर्थात शिवसेनेची पाकिस्तानच्या विरोधातली भूमिका काही नवी नाही. मात्र त्यात सातत्य दिसत नाही. कित्येक पाकिस्तानी कलाकार या मुंबईत येतात. चित्रपट, सिरीअल, लाफ्टर शोमध्ये सहभागी होतात. अदनान सामीला तर त्याचा देश पाकिस्तान आहे, हे सुद्धा आठवतं का ? अशी शंका येते. कित्येक पाकिस्तानी क्रिकेटर्स मुंबईत येत असतात. विरोध करायचाच असेल तर तो सगळ्यांनाच करा, नसता कोणालाच करू नका.

खमंग फोडणी - भारत आणि पाकिस्तानमध्ये एवढी कटुता असली तरी पाकिस्तानी नागरिकांचा ओढा भारताकडेच आहे. अगदी त्यांच्या दहशतवाद्यांचाही. आपले चित्रपट, सिरीअल त्यांना खुणावत असतात. दहशतवादात जगत असलेल्या पाकिस्तानला त्यामुळे लोकशाहीप्रधान भारत आवडत असावा. नाही तरी किती काही झालं तरी, शेवटी बाप हा बापच असतो. त्यामुळे कार्ट कितीही वाया गेलेलं असलं तरी शेवटी बापाकडेच येतं, हे पाकिस्तानकडे पाहून लक्षात येतं.

No comments:

Post a Comment