Friday, October 30, 2015

युतीला सत्ता कळेना ? (अचूक मारा - 5)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्ष राज्यावर सत्ता गाजवली. त्यांच्यातही धुसफूस सुरू असायची. अनेक वादाचे प्रसंग यायचे. मात्र किती ताणायचं आणि कधी सोडायचं यात आघाडीवाले बनेल होते. यात वादच नाही. पंधरा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे सरकारच्या विरोधात रान उठवायचे. मात्र आता सत्ता आल्यावर हे दोघे सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.
वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारलाच रस्त्यावर आणण्याची भाषा केली आहे. भाजपचे मंत्री वर्षपूर्तीच्या सोहळ्यात रंगलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपचा रंग खरडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अर्थात याला भाजपचे बनेल नेतेही कारणीभूत आहेतच. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. या यशानं उत्साहित झालेल्या भाजपनं राज्यातली शिवसेने बरोबरची युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपनं स्वबळावर 122 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीनंही आश्चर्यकारकरित्या राज्यात स्थिर सरकारची भाषा सुरू केली. त्यामुळे 63 जागा मिळवूनही शिवसेनेला किंमत मिळाली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेचा चांगलाच राजकीय गेम केला. मुख्यमंत्र्यांबरोबर फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला. नंतर विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. त्यातही हवी ती खाती मिळाली नाही. मंत्र्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली. यामुळे शिवसेना दुखावली गेली. शिवसेनेची धुसफूस सुरूच राहिली. वाढत्या महागाईमुळे जनतेतही सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आपण सरकारपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली. त्या बरोबरच गुलाम अलींच्या मैफलीला विरोध, पाकिस्तानी कलाकारांना विरोध, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक ही जुनी विरोधाची हत्यारं बाहेर काढून भाजपचा होईल तितका मूखभंग करणंही शिवसेनेनं सुरूच ठेवलं. सरकारमध्ये दिलेला अल्प वाटा, वारंवार करण्यात आलेला अपमान याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावर आणण्याचा इशारा दिल्याचं स्पष्टच आहे.  आता खरंच कोण कोणाला रस्त्यावर आणतं हे लवकरच स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment