Sunday, October 4, 2015

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य' (अचूक मारा - 3)

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य'

एका वेळच्या जेवणाला माणसाला लागतं तरी किती ? अर्थात कोणी किती खावं ? काय खावं ? काय खाऊ नये ? याचा हिशेब करण्याचा या लिखाणाचा हेतू नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पर्युषण पर्वात मांसाहार बंदीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावेळी भाजपचे नेते मांसाहार बंदीसाठी पेटून उठले होते. त्या आधी दुष्काळ दौ-यावर गेलेल्या शरद पवारांचा एक फोटोही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. दुष्काळ दौ-यात सुका मेवा आणि शरद पवार दिसत होते. त्यावरूनही चांगलाच धुराळा उडाला होता. मात्र त्यावेळी हे सभ्यतेला धरून आहे का ? असा सवाल विचारला गेला नव्हता. अर्थात राजकीय नेत्यांनीही परिस्थितीचं भान राखलंच पाहिजे. कारण आता फक्त माध्यमं दाखवतील तीच बातमी राहिलेली नाही. सोशल मीडिया हा सर्वसामान्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे नेतेच काय, तर सगळ्यांनीच सारासार विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली प्लेट आणि समोरच्या टेबलवर खच्चून ठेवलेले विविध खाद्यपदार्थांचा, हा फोटो चांगलाच गाजतोय. सोशल मीडियासाठी हा फोटो खाद्य ठरला नसता तरच नवल. हातात प्लेट धरून बसलेले सीएम, टेबलवरून काकडी उचलत असलेले रावसाहेब दानवे, भरपेट खाल्ल्यानंतर तोंड पुसणारे विनोद तावडे ही मंडळी फोटोत दिसत आहेत. तर टेबलवर मिठाई, सुका मेवा, फळं आणि सलाड मांडून ठेवलेलं आहे. या पदार्थांची संख्या जवळपास 20 हून अधिक आहे. या नेत्यांनी या खाद्याचा समाचार घेतला. तर सोशल मीडियावर या नेत्यांचा समाचार घेणं सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे टायमिंग साधण्यात वाकबगार असलेल्या शिवसेनेनं तर हा फोटो व्हायरल केला नसेल ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतक-यांची विचारपूस करत आहेत आणि सीएमचा हा फोटो, असे एकत्रित फोटोही चांगलेच व्हायरल झालेत. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारे भाजप नेते, आणि शेतक-यांची विचारपूस करणारे उद्धव ठाकरे, हे दोन्ही फोटो बरंच काही सांगून जातात. आता तर कुठे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संग्रामाला सुरूवात झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी सोशल मीडियावरही ही लढाई अजून जोरकसपणे लढली जाईल, यात शंका नाही.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्या आधी भाजपची मुंबई आणि परिसरात भीमरथ यात्रा निघणार आहे. भूमिपूजनाची माहिती या निमित्ताने दिली जाणार आहे. टायमिंग साधण्यात भाजपवालेही काही कमी नाहीत. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मागच्या महिन्यात होणार होता. पण तेव्हा कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तर भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला नसेल ? अशी शंका येते. आता निवडणुकीची घोषणाही झालेली आहे. 11 ऑक्टोबरला भूमिपूजनही होईल आणि मतांची पायाभरणीही होईल.

No comments:

Post a Comment