Saturday, December 18, 2010

राहुल बाबाचे बोबडे बोल


केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वापरलेला 'भगवा दहशतवाद', दिग्विजय सिंह यांनी उधळेली 'हिंदू दहशतवाद' ही मुक्ताफळं, बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांविषयी तोडलेले अकलेचे (चाँद) तारे हे काही अचानक घडलेले नव्हेत किंवा ती उत्सफूर्त प्रतिक्रिया नव्हती हे आता स्पष्ट झालंय. कारण काँग्रेसचे युवराज राहुल गांधींच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा विकिलिक्सने जगासमोर टराटरा फाडला आहे. लष्कर ए तोयबापेक्षा हिंदू संघटना खतरनाक असल्याचं हे युवराज अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर यांच्याबरोबर झालेल्या भेटीत बोलले होते. त्यामुळं चिदंबरम, दिग्विजय सिंह, बॅ. ए. आर. अंतुले यांचा बोलविता धनी हा युवराजच तर नसेलना ? अशी शंका उपस्थित होते.
राहुल गांधींचे तर काँग्रेसवाल्यांनी देशाचे भावी पंतप्रधान असं बारसं केव्हाच करून टाकलंय. त्याच्या बारशाच्या घुग-यांचा वासही या काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडातून येत असतो. मात्र आता हे युवराज असं काही बरळायला लागल्यावर काँग्रेसवाल्यांना मूग गिळून गप्प रहाण्याची वेळ आली आहे.
बरं हे भावी पंतप्रधान कधी महाराष्ट्रात येऊन शहिदांचा अपमान करतात, बिहारमध्ये जाऊन बिहारीच देशाचा विकास करत असल्याचं सांगतात, युवराजांचे खान दोस्त शाहरूख खानसाठी महाराष्ट्राचा पोलीस फाटा तैनात करतात अशी ही त्यांची कर्तबगारी आहे. मात्र या वेळी तर युवराजांनी हद्दच केली. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला उपयोग होईल, असे बोल या युवराजाने काढले. युवराजामुळे काँग्रेसची पार भंबेरी उडाली. मग सारवासारव करत सर्वच प्रकारचा दहशतवाद हा देशासाठी घातक असल्याचं युवराज म्हणाले.
धर्मनिरपेक्षतेचा आव आणणा-या या गांधी घराण्याने आता पर्यंत फक्त मुस्लिमांचा अनुनयच केलाय. आणि हेच सत्य पुन्हा एकदा प्रकाशात आले आहे.
युवराज आता चाळीशीत आहेत. सर्वसामान्य नागरिक चाळीशीत समजदार होतो. विवाह करून तो संसाराला लागलेला असतो. संसाराची जबाबदारी पार पाडत असतो. आपल्या मुलांना अंगखांद्यावर खेळवून त्यांच्यावर चांगले संस्कार करत असतो. अर्थात त्यासाठी योग्य वयात लग्न होणं गरजेचे असते. योग्य वयात लग्न झाले नाही तर काही लोक बावचळल्यासारखे वागू शकतात. अर्थात हे वाक्य सगळ्यांनाच लागू होतं असं नाही. त्यामुळं या वाक्याचा राहुल गांधीं बरोबर थेट संबंध कुणीही जोडू नये. प्लीज.
इथं कुणाच्या जाती - धर्माविषयीही मुद्दा उपस्थित करण्याची गरज नाही. कारण धर्म ही प्रत्येकाची वैयक्तीक बाब आहे. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घराच्या आत ठेवावा. मात्र जेव्हा काही नेते चूकीचे विधान करून शत्रू राष्ट्राला फायदा होईल असं वागत असतील तर काही प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच ते प्रश्न इथं विचारावे वाटतात. या युवराजांची मुंज झालीय का ? त्यांचा बाप्तिस्मा झालाय का ? किंवा त्यांची सुंता झालीय का ? जर यापैकी काही झालं असेल किंवा नसेल ही. तरी देशाला धोका पोहचेल असं विधान करू नये. तुमची बेगडी धर्मनिरपेक्षता, मतांचे राजकारण, धर्माचे राजकारण चूलीत घाला. आणि आता तरी देशधर्माचे पालन करा.

2 comments:

  1. केवळ एका उत्तरप्रदेशच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी जर युवराजांनी हि पोपट पंची केली असेल तर मग त्याची लायकी आणि बुद्धी किती प्रगल्भ असेल याचा अंदाज सर्वसामान्य हिंदूना ( जे गर्वाने हिंदु म्हणवतात ते)नक्कीच आला असेल....स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान देणार्‍या इतक्या जुन्या पक्षाचे झालेले वैचारिक अधःपतन पाहून त्यांचे इहलोकी गेलेले नेते सुद्धा अशृ ढाळत असतील......
    असल्या उथळ व्यक्तीला भावी युवराज म्हणुन पुढे आणणे हास्यास्पद तर आहेच पण हिंदुस्थानात केवळ राहुल गांधी एकदम हिरो सारखा दिसतो म्हणुन पंतप्रधानपदी असावा असे मत व्यक्त करणारे तथाकथित उच्चविद्याविभुषित व्यक्ती माझ्या माहितीत आहेत अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तितकी कमीच....
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!

    ReplyDelete
  2. ब्लॉग चांगला आहे पण लवकर आटोपता घेतला आहे. राहुलबाबांच्या यापूर्वीच्याही बोबड्या बोलाची बत्तीशी बाहेर काढली असती तर मजा आली असती.

    ReplyDelete