Tuesday, May 19, 2009

भांडा सौख्य भरे...

निवडणुकांचे निकाल आता लागलेत. निवडणुकीच्या आधी प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप केले. अर्थात यात नवीन असं काहीच नाही. मात्र राज्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्यातील लढाई आता पुन्हा तीव्र होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत रांगणारे मनसे बाळ दोन वर्षाच्या आतच धावायला लागल्याने शिवसेनेची चांगलीच धावपळ होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेनं राज्यात अकरा जागा जिंकून घवघवीत यश मिळवलंय. शहरी चेहरा असल्याचा आरोप होणारी शिवसेना आता ग्रामीण भागात बळकट झाल्याचं दिसून येतंय. तर मनसेमुळे शिवसेनेला चार जागांवर पराभव स्वीकारावा लागल्याने शिवसेनेचे संभाव्य मोठे यश आकुंचित झाले. काँग्रेसला 17 जागांची लॉटरी लागली. तर संजीव नाईक, समीर भुजबळ आणि संजय पाटील यांना मनसेमुळे लोकसभेचे दार उघडले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळणार होत्या त्या वाढून आठपर्यंत पोचल्या.
परिणामी शिवसेना जिंकूनही हारली, तर मनसे हारूनही जिंकली. काँग्रेस अनायसे राज्यात पहिल्या क्रमांकावर पोचली. तर राष्ट्रवादी मनसेच्या मेहेरबानीमुळे तीन जागांवर विजयी झाली. आता मुंबई आणि नवी मुंबईत शिवसेना आणि मनसेत पोस्टरबाजी सुरू झालीय. त्यावरून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये हाणामा-याही सुरू झाल्यात. आता विधानसभा निवडणुका निकट आल्या आहेत. आणि त्यामुळे या पुढिल काळात हा संघर्ष तीव्र होणार यात शंका नाही. मराठी माणसाचे तारणहार कोण? हा प्रश्न आता उपस्थित झालाय.
काँग्रसमध्येही आता मिळालेल्या यशामुळे स्वबळावर लढण्याची उर्मी निर्माण झालीय. विलासराव देशमुख आणि बाळासाहेब विखे पाटील यांनीही स्वबळावर लढण्याची भाषा केलीय. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त आठच जागा मिळाल्याने त्यांना डिवचण्याची संधी हे पवार विरोधक सोडणार नाहीतच. मनसेने लोकसभेत शिवसेनेबरोबर सर्वच पक्षांची मते घेतली. विधानसभा निवडणुकीतही मनसे मोठ्या प्रमाणात मते घेणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आघाडी झाली नाही तर यांच्यात होणारी मताची विभागणी युती आणि अर्थातच मनसेच्याही पथ्यावर पडू शकणारी आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे रामदास आठवलेही बिथरलेत. रिपाइंच्या मतांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतात याची आठवणही त्यांनी करून दिली. आठलेंच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांची पुतळे जाळले, काँग्रेस भवनवर दगडफेक केली. मात्र काहीही झाले तरी आठवले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून स्वबळावर निवडणूक लढवणार नाहीत, हे ही तितकंच खरं. जो पर्यंत रिपाइं स्वबळावर लढणार नाही तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते मोठे होणार तरी कसे, हा प्रश्न आठवले यांना पडत नसेल का? राज ठाकरे यांनी 12 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले, त्यांना लाखांनी मतदान झालं. भलेही ते निवडून आले नाही, मात्र एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची दखल घेतली गेली. जर आठवले रिपाइंचे उमेदवारच उभे करणार नसतील तर त्यांचा पक्ष वाढणार कसा? काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून ना त्यांचा पक्ष वाढणार ना कार्यकर्ते मोठे होणार, त्यामुळे आठवले यांनी राज ठाकरे यांच्याकडून हा बोध घ्यायला हरकत नाही.
परिणामी आगामी काळात शिवसेना विरूद्ध मनसे, काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, (पद मिळेपर्यंत) रामदास आठवले हा संघर्ष सुरू राहणार आहे. आता यात सरशी कुणाची होणार हे मात्र अर्थातच ( नेहमीप्रमाणे) निवडणुकांच्या निकाला नंतरच स्पष्ट होईल. तो पर्यंत होवून जाऊ दे ढिश्यूम...ढिश्यूम.

1 comment:

  1. मतभेद आणि वाद हा लोकशाही व्यवस्थेमधील सर्वात महत्वाचा घटक आहे.परंतु आपल्या देशातले नेते लोकांच्या हिताकरता नाही तर स्वत:च्या फायद्यासाठी भांडतात.हेच खरं दुखणं आहे.आताही प्रत्येक नेत्याला काही तरी साध्य करायचे आहे.तो हेतू साध्य झाला की मग पुन्हा तुझ्या गळा..माझ्या गळा

    ReplyDelete