Wednesday, April 8, 2009

गावस्कर आणि शाहरूख

काळ हा नेहमीच गतीमान राहीलाय. दर दहा वर्षांनी एक पिढी बदलते. त्याच बरोबर त्या पिढीचे आदर्श, आवडीनिवडीही बदलतात. एके काळी कसोटी क्रिकेटला असलेली लोकप्रियता ही काळाच्या ओघात कमी होत गेली. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटला तुफान लोकप्रियता मिळाली. एकदिवसीय क्रिकेट सामने सुमारे 35 वर्षापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र फुटबॉल, टेनिसचे सामने हे दोन तासात निकाली लागत असल्याने त्यांचाही मोठा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. झटपट निकाल लावण्याचे हे सुत्र लक्षात ठेवून 20-20 क्रिकेटचा जन्म झाला. त्याचा विश्वचषकही झाला, तो भारताने जिंकलाही. त्यामुळे ही लोकप्रियता आणि त्यातून मिळणारा पैसा डोळ्यासमोर ठेवून इंडियन प्रिमीअर लीगचा जन्म झाला. त्यातून पहिली आयपीएल स्पर्धाही भरवली गेली. या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला.
आयपीएलचे क्रिकेट संघ हे उद्योगपती आणि अभिनेत्यांनी विकत घेतले. त्यात शाहरूख खानचाही समावेश आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स हा संघ विकत घेतला. या संघाचा कोच जॉन बुकनन याने संघासाठी मांडलेल्या एका पेक्षा अधिक कर्णधाराच्या विचारावर सुनील गावस्कर यांनी टीका केली. आणि किंग खान भडकला. संघ मी विकत घेतलाय त्यामुळे तो माझ्या मर्जी प्रमाणे वागवणार अशी किंग भूमिका शाहरूखने घेतली. अर्थात त्याचे तरी काय चुकले म्हणा? पैसा फेक तमाशा देख, असा हा सरळ हिशोब. शाहरूखच्या बोलण्याचे क्रिकेट रसिकांनी वाईट वाटून घेवू नये. आता क्रिकेटचा बाजार मांडलाच आहे, तर यात किंग मालकाला बोलणार तरी कोण ?
सुनील गावस्कर यांनी 20-20 क्रिकेट खेळलेले नाही, त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये. त्यांना माझी संकल्पना योग्य वाटत नसेल तर त्यांनीही एखादा संघ खरेदी करावा आणि तो चालवावा, या भाषेत शाहरूखने हिशेब चुकता केला. आता लोकशाही असल्याने कुणी काय म्हणावे याला अटकाव करता येणार नाही. मात्र शाहरूखला समोरची व्यक्ती कोण आहे, याचा बहुतेक पैश्यामुळे विसर पडला असेल. क्रिकेटमध्ये देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम सुनील गावस्कर यांनी केलंय.
शाहरूखच्या म्हणण्याप्रमाणे वागल्यास कोणतीही व्यक्ती त्याचे क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलू शकणार नाही. हॉकीपटूने क्रिकेट किंवा फुटबॉलवर तोंड उघडण्याचा प्रसंगच येणार नाही. टेनिसपटू बॅडमिंटनवर बोलणार नाही. डॉक्टर पत्रकारांविषयी बोलणार नाही, अर्थात ही यादी वाढतच जाईल.
मात्रा शहाणपणा आणि शाहरूखचे ब-याचदा जमत नाही. अमरसिंगवर फिल्मफेअरच्या कार्यक्रमात खालच्या पातळीवर केलेला विनोद आजही अनेकांच्या लक्षात आहे. 2000 मध्ये हृतिकचे दणदणीत आगमन झाले. हृतिकने कोकची जाहिरात केली. त्या जाहिरातीचे शाहरूखने विडंबन केले होते. या सारख्या घटनांमधून शाहरूखचा कोतेपणा दिसून येतो. दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची एकत्रीत आवृत्ती म्हणजे शाहरूख असाही त्याच्यावर आरोप होतो.
ओसामा बिन लादेन नंतर सर्वाधिक लोकप्रिय मुसलमान असल्याचं त्याचं वक्तव्य त्याची बौद्धीक पातळी दाखवून देणारं आहे. पैश्यासाठी उद्योगपतींच्या लग्न आणि कार्यक्रमात नाचणा-या या नाच्यांकडून पैश्याच्या गुर्मीत कुणासाठी चांगलं बोललं जाईल अशी अपेक्षाही करणं गैर आहे. त्यामुळे बीसीसीआय आता तरी जागे व्हा. तुमच्या पैशाच्या बाजारात क्रिकेटचे सत्व विकू देवू नका. क्रिकेटच्या देवतांवर आघात होवू देवू नका. क्रिकेटचा संघ विकत घेणारे अनेक मिळतील. मात्र वेस्ट इंडिजचा तोफखाना हेल्मेटशिवाय निधड्या छातीने टोलावून लावणारा सुनील गावस्कर मिळणार नाही. आता पैसा श्रेष्ठ की क्रिकेट संघाचा मालक याचा निर्णय कोण घेणार ?

2 comments:

  1. मस्त जमलाय लेख.. सुंदर..

    ReplyDelete
  2. शाहरुख हे बोलला हे चुकीचं आहेच...परंतु त्याचबरोबर तो बुकाननची बाजू घेऊन गावस्करला बोलला ही बाब जास्त चीड आणणारी आहे.एका सामान्य दर्जाच्या परदेशी कोचची शाहरुखनं वकिली केलीय.या स्पर्धेतल्या खराब कामगिरीनंतर शाहरुखला गावस्करच्या शब्दाचे महत्व कळेल.

    ReplyDelete