Saturday, November 2, 2019

संजयचं ‘महाभारत’ !


सामनाचे संपादक, खासदार आणि शिवेसनेचे नेते अशा तीन आघाड्यांवर कामगिरी बजावणाऱ्या संजय राऊतांनी सध्या चांगलाच धुरळा उडवून दिलाय. राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झालेला असताना संजय राऊतांनी शिवसेनेसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्रीपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्टपणे दिसतंय. लेखणीचे 'रोखठोक' सपासप वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या 'सच्चाई'च्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे. सध्याच्या काळात सगळ्या न्यूज चॅनेल्सवर संजय राऊतांचेच बाईट दिसत आहेत. एकट्या संजय राऊत यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलं आहे. भाजपचे बडे नेते, प्रवक्ते या सर्वांची संजय राऊतांना उत्तर देताना दमछाक होत आहे.
सामनाचे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना सुरू केला. शिवसेनाप्रमुखांच्या जहाल अग्रलेख आणि व्यंगचित्रांमुळे सामना लोकप्रिय झाला. तर नंतरच्या काळात सामनाला ब्रॅण्ड करण्यात संजय राऊतांचं योगदान आहे. संजय राऊत यांचं ज्वलंत लिखाण हे सामनाला ब्रॅण्ड करण्यासाठी फायद्याचं ठरलं. याच सामनातून केंद्र आणि राज्यातल्या भाजपवर बाण सोडण्यात आले. सामनातल्या अग्रलेखांमुळे भाजपचा प्रचंड तडफडाट झाल्याचं जगानं पाहिलं. संजय राऊतांमुळे शिवसेना अडचणीत येते, असा आरोपही केला जातो. मात्र अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. त्यावेळी राज्यात पक्ष सत्तेत नसताना शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आताही सत्तेच्या संग्रामात शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसताहेत.
उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिलाय यात शंका नाही.
समाजात जागृती आणनं, अन्यायाला वाचा फोडणं हे संपादकांचं काम. मात्र आता बदलत्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं मुखपत्र असलेल्या दैनिकांमधल्या संपादकांना जनजागृतीपेक्षा सत्ताजागृती महत्त्वाची झाली आहे. आणि त्यामुळेच अग्रलेख लिहणारे संजय राऊत सत्तेच्या कुरूक्षेत्रात राजकीय महाभारत घडवत आहेत. 
#संगो #SHIVSENA #शिवसेना

Thursday, October 24, 2019

मी पुन्हा येईन, आम्हीही येणार !



मी पुन्हा येईन, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. मात्र पुन्हा येताना भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. चार-पाच वेळा मेगाभरती करूनही भाजपला 2014 मिळवलेल्या 122 जागा मिळवता आल्या नाही. शिवसेनेलाही 2014 मध्ये मिळवलेल्या 63 जागा राखता आल्या नाही.
मात्र निकाल लागल्यानंतर राज्यभरात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. युतीनं सत्ता राखण्याचा पराक्रम केल्यानं कार्यकर्ते बेभान झाले. भाजपनं सेंच्युरी पार केली. तर शिवसेनाही साठीत पोहोचली. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर मिळवलेल्या जागांपेक्षा हा आकडा कमीच होता. युती करूनही दोन्ही पक्षांना 2014च्या तुलनेत दमदार यश मिळवता  आलं नाही. राजकारणात एक अधिक एक दोन होईल असं नसतं, असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती या निवडणुकीत आली. शिवसेना भाजपनं एकत्र निवडणुका लढूनही त्यांच्या जागा कमी झाल्या. भाजपनं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतरही मेगाभरतीचा सपाटा लावला. सर्वच पक्षातल्या आजी माजी आमदारांची भाजपचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सरदार भाजपच्या गोटात सामील झाले. पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले सरदार भाजपला सत्तेच्या लढाईत चांगली साथ देऊ शकले नाही. भाजपप्रमाणेच शिवसेनेतही निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग झालं, अनेकांनी शिवबंधन बांधलं. पण नव्यानं पक्षात आलेले सैनिक आधीच्या शिवसैनिकांसारखे लढवय्ये निघले नाही. ऐन मोक्याच्या लढाईत नव्या सैनिकांनी कच खाल्ली. परिणामी 2014च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. त्यामुळे आता आघाडीचे नेते आम्हीही येणार असं म्हणू लागले आहेत. काँग्रेसनं जिंकलेल्या जागांचा आकडा पाहून राहुल गांधीनांही धक्का बसला असेल. काहीही न करता काँग्रेसनं 50चा आकडा गाठला. काँग्रेसनं जरी काही केलं नसलं तरी शरद पवारांनी राज्यभर घेतलेल्या सभा, जिगरबाजपणे पावसात केलेलं भाषण याचा फायदा काँग्रेसलाही झाला. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितपणे 40 जागाही मिळतील असं वाटत नव्हतं. मात्र शरद पवारांमुळे हवा बदलली. आघाडीचा आकडा शंभरच्या पलीकडे पोहोचला. या विजयामुळे राज्यातल्या आगामी पालिका आणि झेडपी निवडणुका सत्ताधाऱ्यांना सोप्या जाणार नाहीत. पवारांनी आघाडीत आत्मविश्वास निर्माण केला. राज्यात विरोधकांना शक्ति मिळाल्यानं सरकारवरही अंकुश राहिल. परिणामी आता सरकारला चांगलं काम करावंच लागेल. नाही तर पवारांच्या हाती असलेला आसूड सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर ओढला जाईल. #संगो

Sunday, September 29, 2019

नायक नहीं महानायक !

मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा अमिताभ बच्चन यांचा उतरता काळ सुरू झाला होता. (मला बरंच लवकर कळायला लागलं, हा भाग वेगळा) चित्रपटसृटीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविषयी काही लिहावसं वाटलं. बच्चन यांच्या उतरत्या काळानंच सुरूवात करूया. 
1988 मध्ये अमिताभ यांचा शहंशाह हा सिनेमा प्रदर्शित झाला. 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं', हा डायलॉग आणि 'जाने दे जाने दे मुझे जाना हैं' हे गाणं हिट झालं. पण मिनाक्षी शेषाद्रीसोबत अमिताभ यांची जोडी मॅच होत नव्हती. त्यानंतर  जादुगर, तुफान निराशाजनक ठरले. त्यातल्या त्यात बरा निघाला तो आज का अर्जुन.  1990 सालच्या अग्निपथनं अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. अमिताभ नावाची जादू चालली. मात्र अग्निपथ हिट म्हणता येणार नाही. पण त्या नंतरचे अजुबा, अकेला, हम, इंद्रजित फ्लॉप ठरले. हममध्ये तर रजनीकांत, गोविंदा असूनही तो सिनेमा प्रचंड हिट ठरला नाही. त्या नंतरचा खुदा गवाह थोडासा सुसह्य होता. मात्र नंतरच्या काळात आलेले लाल बादशाह, मृत्यूदाता पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. मेजर साब, हिंदुस्थान की कसम, कोहरामही आपटले. बडे मियां छोटे मियां थोडा चालला, पण त्याचं क्रेडिट गोविंदाला मिळालं. याच काळातच अमिताभ यांची एबीसीएल कंपनीही तोट्यात गेली. उतरता काळ असेल तर कशातही यश येत नाही.

मात्र जिगरबाज अमिताभ यांनी हार मानली नाही. 3 July 2000 रोजी इतिहास घडला. स्टार प्लसवर कौन बनेगा करोडपती सुरू झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात क्रांती झाली. अमिताभ यांची लोकप्रियता पुन्हा प्रचंड वाढायला लागली. प्रश्नोत्तर आणि उत्तर देणाऱ्याला बक्षीस असा हा कार्यक्रम, मात्र तो प्रचंड लोकप्रिय झाला. अजूनही कौन बनेगा करोडपती सुरू आहे. अमिताभ यांची स्पर्धकांसोबत संवाद साधण्याची शैली या कार्यक्रमाचं बलस्थान. स्टार प्लस चॅनेल हिट झालं आणि अमिताभ यांचे सितारेही बुलंद झाले. एक दशक अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या अमिताश यांच्या यशाची दुसरी जबरदस्त इनिंग सुरू झाली. सर्व अपयश धुऊन काढलं.

मोहब्बते, कभी खुशी कभी गम, बागबान, ब्लॅक, पा, बंटी और बबली, सरकार, चिनी कम, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी दमदार अभिनय साकारला. सिल्व्हर स्क्रिनवर अमिताभ बच्चन यांनी विजय ही व्यक्तीरेखा अनेकदा साकारली. कारकिर्दीला उतरती कळा लागल्यावरही खचून न जाता, 'विजय'नं बाजी पलटवली. अँग्री यंग मॅन बनून स्क्रिनवर गुंडांना बदडणारा विजय हा प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळेच विजय कधी पराभूत होत नाही. त्यामुळे हेच म्हणावसं वाटतं, 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं.' 
#संगो #amitabh #falkeaward #kbc

Monday, September 23, 2019

रोजचा सवाल थांबला !

#रोजचासवाल - 1787 दिवस झाले, सिंचन घोटाळा करणा-यांना अटक कधी ? टोलमुक्त महाराष्ट्र कधी ? शेतक-यांच्या पिकाला चांगला भाव (हमी भाव) कधी ? धनगर समाजाला आरक्षण कधी ? शिवसमुद्रात शिव शिवस्मारक कधी ? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी?(देवेंद्र फडणवीस यांनी 31-10-2014 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला एक दिवस झाल्यानंतर म्हणजे 1-11-2014 पासून, निवडणुकीच्या काळात दिलेल्या विविध आश्वासनांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. उत्तर मिळेपर्यंत.) #cmfadanvis @Dev_Fadnavis #संगो

1 नोव्हेंबर 2014 पासून फेसबुकवर सरकारला फेस आणणारा रोजचा सवाल सुरू करण्यात आला. 22 सप्टेंबर 2019 रोजी विचारलेला 1787वा सवाल हा शेवटचा सवाल. सलग पाच वर्ष रोजचा सवाल फेसबुकवर सुरू होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ट्विटरवरूनही रोजचा सवाल सुरू करण्यात आला. मात्र आता आचारसंहिता लागू झालीय, त्यामुळे भाजपनं दिलेली आश्वासनं आता काही पूर्ण होतील असं वाटत नाही. मात्र मागील 5 वर्षात कशाला हा ताप ? हा सवाल मला अनेकांनी विचारला. भक्त तर चेकाळलेच. आधीच्या सरकारला विचारला होता का सवाल ? असा सवाल मला विचारण्यात आला.
पण निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना भुलून मतदार मतदान करत असतात. मात्र दिलेल्या आश्वासनांचं काय झालं ? हे कोणीच विचारत नाही. पाच वर्ष झाल्यानंतर कोणती आश्वासनं दिली होती, याची कोणाला आठवणही राहत नाही. अगदी माध्यमांमध्येही याचा अनुभव येतो. त्यामुळे सत्तेत आलेल्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचं काम करावं हा हेतू होता.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं. विनोद तावडेंनी आली रे आली आता तुझी बारी आली असा टोला अजित पवारांना लगावला होता. सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप भाजपकडून व्हायचा. पाच वर्ष सत्ता असताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला अटक झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट भाव देऊ असं खुद्द पंतप्रधान म्हणाले. मात्र पिक मालाला भाव मिळालाच नाही. धनगर समाजालाही आरक्षण मिळालं नाही. शिवसमुद्रात शिव स्मारकाची एक विटही रचली गेली नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू झालं नाही.
म्हणजेच भाजपनं दिलेली ही आश्वासनं पूर्ण झालीच नाहीत. मग आता भाजपवाले कोणत्या तोंडानं मतं मागणार ? पण दिलेल्या आश्वासनांवर मतं देणारे मतदारही जाब विचारताना दिसत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पुन्हा नव्यानं आश्वासनं देणार यात शंका नाही. त्यामुळे सर्वांनीच सरकारला दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारण्याची गरज आहे. प्रश्न विचारली तरच उत्तरं मिळतील.
रोजचा सवाल मला फेसबुकवर नव्हे तर चॅनेलवर सुरू करायचा होता. 2014 मध्ये मी जिथे काम करत होतो तिथल्या वरिष्ठांना ही कल्पना सांगितली. पण रोज स्क्रिनवर बगच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणं शक्य नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे हा रोजचा सवाल फेसबुकवर सुरू करण्यात आला. रोजचा सवाल आता बंद झालाय. पण 'रोजचा सवाल - 2' येणार आहे. सरकार कोणतंही असो, प्रश्न विचारले जातील. आता रोजचा सवाल थेट असेल. तो फेसबुकवर नव्हे तर ट्विटरवर असेल. तर मग लवकरच भेटूयात, ट्विटरवर.

Wednesday, September 18, 2019

1 निवडणूक 12 भानगडी !


राज्यात निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 12 पक्षांच्या 12 भानगडी पाहूयात. त्याची सुरूवात करूयात भाजपपासून.

पहिली भानगड, भाजप - गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील कदाचित जगातही सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणजे भाजपच. राज्यात एकेकाळी भाजप छोटा भाऊ  होता. पण आता हा पक्ष मोठा भाऊ झाला आहे. आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मोठा भाऊ मोठाच राहतो. आणि छोटा भाऊ छोटाच राहतो. पण राजकीय पक्ष म्हणून जन्म घेतल्यावर काहीही होऊ शकतं. अशा या मोठ्या भावानं स्वबळावर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या छोट्या भावाला हिंदूत्वाची गोळी देऊन युतीसाठी राजी केलं. विधानसभेला 50-50 जागा असं स्वप्नही छोट्या भावाला दाखवण्यात आलं. पण आता मोठी भानगड झाली. 144 जागा देण्याऐवजी मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणजे शिवसेनेला 115 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. परिणामी भाजपची ही भानगड स्वबळाच्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरी भानगड, शिवसेना - भाजपला कमळाबाई असं हिणवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पक्ष. पण आता कमळाबाई घराची मालकीणबाई झालीय. मोठा भाऊ असलेला शिवसेना छोटा भाऊ झाला. लोकसभा निवडणुकीच्या दिलेली हिंदूत्त्वाची गोळी चघळूण झाली. पण आता 50-50 जागांचा फॉर्म्युला अस्तित्वात आला नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वबळाची भानगड मोठं लफडं होणार, हे नक्की.

तिसरी भानगड, काँग्रेस - गावातला राबता असलेला मोठा वाडा भग्न झाल्यानंतर जसा दिसतो तशी सध्या काँग्रेसची परिस्थिती झालीय. भानगड करायलाही काँग्रेसमध्ये कोणी उरलेलं नाही. त्यामुळे कालचा 'वंचित' काँग्रेसची राजकीय छेड काढताना दिसतो.

चौथी भानगड, राष्ट्रवादी काँग्रेस - आयात नेत्यांच्या जीवावर आणि सत्तेच्या टॉनिकवर हा पक्ष राज्यात पसरला. पवारांच्या पॉवरबाज पक्षाचं सत्तेचं टॉनिक संपलं आणि आयात नेत्यांची निर्यात सुरू झालेली. दणादण पक्षांतर झाल्यानं घड्याळाचे काटे निखळले. बडे नेते बाहेर पडल्यानं आता शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. त्यातच जर छगन भुजबळ जर शिवसेनेत परतले तर राष्ट्रवादी काँग्रेसची भानगड शेवटच्या घटका मोजण्याची वेळ येऊ शकते.

पाचवी भानगड, म.स्वा.प. - म.स्वा.प. वाचून ही नेमकी भानगड काय, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. म.स्वा.प. म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांचा प्रचंड मोठा पक्ष. या पक्षाचा एकही आमदार नाही. खुद्द नारायण राणे भाजपच्या जीवावर राज्यसभा सदस्य झाले. तसं असलं तरी हा पक्ष मोठाच. भाजपमध्ये अनेक नेते गेले. पण नारायण राणे त्यांच्या म.स्वा.प. या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करून, त्यांची भानगड कायमचीच संपवणार यात शंका नाही. पण भाजपला राणेंची भानगड भाजपला कितपत परवडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सहावी भानगड, VBA - VBA म्हणजे वंचित बहुजन आघाडी. लोकसभेला या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण वंचितच्या जीवावर एमआयएमचा खासदार झाला. ते म्हणतात ना, मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर असा प्रकार घडला. अंडा खाणाऱ्या एमआयएमला बाजूला करून वंचित सर्व जागा लढवणार आहे. वंचितमुळे भानगड झाली ती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. दुष्काळात तेरावा महिना, ही म्हण आठवण्याची वेळ आघाडीवर आलीय.

सातवी भानगड, MIM - हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हा पक्ष. एमआयएमला रझाकारांविषयी सहानुभूती असल्याचा आरोप केला जातो. त्या आरोपाला बळ देण्याचं काम एमआयएमच्या कृतीतूनच दिसून येतं. मात्र आता वंचितनं एमआयएमची साथ सोडली आहे. वंचितची मतं एमआयएमला मिळतात. मात्र एमआयएमची मतं वंचितला मिळत नाहीत यामुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर ही भानगड एमआयएमसाठी अपशकून ठरली.

आठवी भानगड, स्वा.शे.प. - स्वाभिमानी शेतकरी पक्ष. हा पक्ष 2014 मध्ये युती सोबत. मात्र भाजपसोबत भानगड झाल्यानं हा पक्ष आता आघाडीसोबत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हेच या पक्षाचे एकमेव नेते.

नववी भानगड, रयत क्रांती संघटना - राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांचं रयत क्रांती संघटना हे छोटं दुकान सुरू केलं. खोत सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र स्वत:च्या दुकानातून लढण्याऐवजी भाजप या मोठ्या मॉलच्या तिकीटावर खोत लढणार आहेत. त्यामुळे ही भानगड तशी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे.

दहावी भानगड, शेकाप - शेतकरी कामगार पक्ष, ज्या प्रकारे सध्या शेतकरी आणि कामगारांना किंमत राहिलेली नाही त्या प्रकारे या पक्षालाही किंमत राहिलेली नाही. हा पक्ष आघाडीसोबत असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातल्या काही भागात अस्तित्व असलेल्या या पक्षाची भानगड तशी अदखलपात्र झालीय.

अकरावी भानगड, रिपाइं (आ) - जायकवाडी धरणासारखी रामदास आठवलेंच्या या पक्षाची भानगड. मराठवाड्यात पाऊस पडला नाही, तरी औरंगाबादमधलं जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. त्याच प्रकारे पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना मंत्री होण्याची भानगड जमवण्यात रामदास आठवलेंना यश आलं. भाजपसोबत असलेल्या या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पडणाऱ्या जागा देण्याची भानगड भाजपकडून केली जाते. यावेळी काय होतं हे निवडणुकीनंतर लक्षात येईल.

बारावी भानगड, सपा-बसपा - उत्तर प्रदेशातली ही भानगड महाराष्ट्रात काही चालत नाही. अर्थात त्यांचं आता यूपीतही काही चालत नाही. सपा हा पक्ष आघाडी सोबत आहे. भिवंडी आणि गोवंडी अशा दोन जागा मिळाल्या तर सपाची भानगड उरत नाही. तर एकही जागा मिळत नसली तरी प्रत्येक निवडणूक उत्साहानं का लढतात, ही बसपाची भानगड काही कळत नाही.

#संगो #BJP #SHIVSENA #CONGRESS #NCP #VBA #MIM #SP #BSP #RPI

Thursday, August 22, 2019

स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से





पार्ले बिस्कीटांची चव चार ते पाच पिढ्यांनी अनुभवली आणि अनुभवत आहेत. देशात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या त्यांची चकाचक प्रॉडक्ट घेऊन आल्या. पण पार्लेचा मार्केटमधला शेअर आणि जिभेवरची चव यांना धक्का देऊ शकल्या नाही. देशातल्या कोणत्याही गावात आणि दुर्गम ठिकाणीही पार्ले बिस्कीट मिळतात. मुंबई असो की मेळघाट पार्ले जी बिस्कीट मिळतंच. आणि अवघ्या पाच रुपयातही मिळणाऱ्या पार्लेची चव काय वर्णावी ? वाफाळलेल्या चहासोबत या बिस्कीटाची चव तर अमृतालाही लाजवेल अशीच असते. तुम्हीच आठवा, कडक थंडीत तुम्ही प्यायलेला चहा आणि त्याला पार्लेनं दिलेली चवदार साथ. असं जबरदस्त आणि स्वस्त कॉम्बिनेशन जगात कुठे तरी मिळत असेल का ? स्वस्त बिस्कीट असताना त्यातही 20 ते 25 टक्के फ्री देणारी अशी कंपनी जगात असणं अशक्यच.
पार्ले जी बिस्कीटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे बिस्कीट चहा आणि दुधात मिक्स करूनही पिता येतं. लहानपणीचा हा माझा आवडीचा छंद. चहाच्या कपात तीन ते चार बिस्कीट टाकून ती चमच्यानं चाखण्याची मजा काही औरच होती. आता हा छंद तसा कमी झालाय. पण चहात पार्लेचं बिस्कीट हवंच असतं. नाही म्हणायला काही गुड डे या बिस्कीटांनी पार्ले समोर काही काळ थोडं आव्हान निर्माण केलं होतं. पण गुड डे बिस्कीटांचा अतिकडकपणा आणि जास्त किंमत यामुळे त्यांचा लवकरच बॅड डे झाला. तसंच राष्ट्रप्रमानं टिच्चून भरलेली पतंजलीची बिस्कीटही चाखून बघितली. देशासाठी तर एवढं आपण करू शकतोच. पण देशभक्तीचा डोस देऊनही पतंजलीची बिस्कीटं पार्लेसमोर टिकली नाही ती नाहीच.
जीएसटीमुळे आर्थिक संकट गडद झाल्यानं पार्ले कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची बातमी आल्यानंतर देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण पार्ले कंपनीत एकूण किती कर्मचारी काम करतात ? हा प्रश्न निर्माण झालाय. पार्ले कंपनीत तर एकूण साडेचार हजार कर्मचारी असताना दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कसं काढणार असा प्रश्न काही नेटिझन्सनी उपस्थित केला. अर्थात यात काय खरं आणि काय खोटं, हे आता तरी कळायला मार्ग नाही.
पार्ले बिस्कीटांसोबत माध्यमातल्या अनेक सहकाऱ्यांची आठवण आहे. तुळशीदास भोईटे सर हे नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चहापान करत असताना पार्ले बिस्कीटांचं वाटप करतात. झी २४ तासपासून त्यांचा सुरू झालेला हा स्वाद भरे...शक्ति भरे...बरसो से प्रवास अनेकांनी चाखलाय. भोईटे सरांचं हे बिस्कीट वाटप आणि पार्ले कंपनीतल्य कर्मचाऱ्यांची नोकरी अशीच सुरू राहावी. #संगो #parleg

Tuesday, August 13, 2019

पुरती 'शोभा' झाली !

नेहमीच वादात अडकणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्या विरोधात ट्विटरवर जोरदार ट्रेंड सुरू आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारच्या विरोधात लेख लिहल्याची धक्कादायक माहिती उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली. परिणामी शोभा डे यांचा देशभरात निषेध केला जात आहे. ट्विटरवर तर नेटिझन्स शोभा डे यांचा खरपूस समाचार घेत आहेत.लेखिका शोभा डे यांच्यावर सोशल मीडियात ट्रोल होण्याची वेळ आली. ॲंटी नॅशनल असा शब्द वापरण्याऐवजी 'आंटी नॅशनल' अशा शब्दात शोभा डे यांची खिल्ली उडवली जातेय. शोभा डे यांचं लिखाण तसं थ्री पेज कल्चरमध्येच वाचलं जातं. त्यांचा कोणताही लेख संपूर्णपणे वाचायचा म्हटला तरी वाचला जात नाही, इतकं ते सुमार दर्जाचं असतं. मात्र पाकिस्तानसाठी लिहलेल्या, 'Burhan Wani is dead but he'll live on till we find out what Kashmir really wants' या लेखासाठी शोभा डे यांनी चांगलीच 
मेहनत घेतली. एकंदरीतच त्यांचा लिखाणानाचा आवाका पाहता, लेखाची स्क्रिप्टही पाकिस्तानातूनच तर आली नाही ना ? अशीही शंका मनात येते. बुऱ्हाण वाणीवर लिहलेला हा पाकमय लेख द टाईम्स ऑफ इंडियानं छापला होता. 17 जुलै 2016 रोजी टाईम्स ऑफ इंडियानं छापलेला लेख, त्यांनी का छापला ? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर अब्दुल बासित यांनी भारतीय पत्रकारांची भेट घेतली. त्या भेटीत डे यांना लेख लिहण्याविषयी विनंती करण्यात आली. ती विनंती त्यांनी मान्य करून डे यांनी लेख खरडल्याचं बासित यांनी सांगितलं. तर  अब्दुल बासित यांची एकदाच भेट झाल्याचं शोभा डे यांनी सांगितलं. मात्र बासित पूर्णपणे खोटं बोलत असल्याचं स्पष्ट करत, हा माझा अपमान असल्याचं शोभा डे म्हणाल्या आहेत.
भारतातले लेखक पाकिस्तानच्या इशाऱ्यावर लिखाण करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानचीही शोभा झाली. काश्मीरच काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे मान्य करायला हवं, असं मत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी व्यक्त केलं. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून मदत मिळत नाही. त्यातच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानचा बुरखाच फाडला. "पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचेच भाग आहेत. तिथले हिंदू त्यांचा धर्म सोडून इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा आहे. हे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षा जुना आहे. हे मान्य करायलाच हवं", अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानचा नक्शा उतरवला.ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. तसंच या मुद्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली होती. "राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. हे दोघे स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत," असा आरोप तौवहिदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला होता. एकंदरीतच कलम ३७० वरून भारताला जगभरातून समर्थन मिळत असताना पाकिस्तान एकाकी पडलाय. तर इस्लामी नेत्यांनीही समर्थन केल्यानं भारताचं पारडं जड झालंय. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला अमेरिका, चीनसह कोणत्याचा देशाचा पाठिंबा मिळताना दिसत नाही. इस्लामी देशही पाकिस्तानसोबत नाही. यामुळे पाकिस्तानचं वैफल्य वाढत चाललंय.
एकंदरीतच पाकिस्तानच्या अब्दुल बासितमुळे डे यांची शोभा झाली. तर इमाम मोहम्मद तौवहिदी यांच्यामुळे पाकिस्तानची शोभा झाली. आता झालेल्या या शोभेमुळं तरी डे आणि पाकिस्तानला काही अक्कल यायला हवी, हीच सदिच्छा. 

Sunday, August 11, 2019

पत्रकारितेतला वैचारिक दहशतवाद !


'तुम्ही संघवाले आईच्या पोटातच का नाही मेला ?' काँग्रेसी विचारसरणीच्या एका पत्रकाराचं हे वाक्य. मी ज्या चॅनेलध्ये काम करत होतो त्याच ठिकाणी माझ्यासमोर त्या पत्रकारानं एका सहकाऱ्याला हा प्रश्न विचारला. त्या बिचाऱ्याचा दोष इतकाच होता की, तो संघ विचारांचा समर्थक होता. ही घटना 2014च्या आधीची आहे. त्यावेळी मोदी भक्तांचा जन्म व्हायचा होता. परिणामी त्या काळात नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त यांचा उन्माद सुरू होता. ही सर्व भक्तमंडळी संघ, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचा उद्धार करायची. नव्हे तर हा उद्धार केला नाही तर तुम्ही पत्रकारच नाहीत असा समज प्रचलित होता. पत्रकार हा नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त किंवा डाव्यांचाभक्त असावा. पण पत्रकार कधीही हिंदूत्ववादी असू नये असा अलिखित नियम होता. (काही) डावे पत्रकार तर इतके टोकाचे असतात की, ते फुटिरतावादी काश्मीरी नेते आणि फुटिरतावादी काश्मीरींच्या बाजूनं असतात.(काही) डावे पत्रकार चीनच्या बाजूनं असतात. पण ते कधीही भारताच्या बाजूने नसतात. त्यामुळे या पुरोगामी आणि डावेभक्त पत्रकारांना मुस्लीम दहशतवाद, रस्त्यावरील नमाज, मशिंदीवरील भोंगे, काश्मीरी पंडित हे विषय वर्ज्य असतात. असल्या विषयांवर भक्त पुरोगामी पत्रकार काहीच लिहित नव्हती. राष्ट्रवाद हा शब्द उच्चारला तरी त्या भक्तांचा तिळपापड व्हायचा. हा सर्व प्रकार म्हणजे पुरोगामी पत्रकारितेचा दहशतवाद का म्हणू नये ?

पण कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. मौका सभी को मिलता हैं, या उक्तीप्रमाणे घडलं. 2014 मध्ये सरकार बदललं. पुरोगामी पत्रकारांचा दहशतवाद संपूष्टात आला नाही मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला. जी पत्रकारमंडळी बॅकफूटवर होती ती आता मोदीभक्त म्हणून हायलाईट झाली, पुढे आली. पत्रकारितेचा बुरखा काढून पण माध्यमांमध्ये राहून खुलेआमपणे मोदीभक्त म्हणवून घेऊ लागली. परिणामी पुरोगामी पत्रकारांनंतर मोदीभक्त पत्रकारांचा दहशतवाद सुरू झाला. कोण देशभक्त ? कोण देशद्रोही ? याचे घाऊक प्रमाणात सर्टिफिकेट दिलं जाऊ लागलं. सरकारच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. सरकारला प्रश्न विचारण्याची सोय राहिली नाही. सरकारच्या विरोधात काही बोललं की, कुत्री जशी मागे लागतात तसे भक्तांचे ट्रोलर्स मागे लागतात. विकासाचे प्रश्न मागे पडून फक्त राष्ट्रवादाचाच ज्वर वाढत राहिल, अशीच काळजी मोदीभक्त पत्रकारांकडून घेतली जाते. एखादा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देण्याऐवजी मोदीभक्त पत्रकार आधी काय झालं होतं, याचे दाखले देत बसतात. त्यामुळे मोदीभक्त पत्रकार हे पत्रकार आहेत की आणि भाजपचे प्रवक्ते ? असा प्रश्न निर्माण झालाय.
एकंदरीतच नेहरूभक्त, केतकरभक्त, एनडीटीव्हीभक्त, जेएनयूभक्त, डावेभक्त विरूद्ध मोदीभक्त पत्रकारांमुळे नुकसान होतंय ते पत्रकारितेचं. पत्रकारितेतला हा दोन्ही बाजूंचा दहशतवाद माध्यमांची विश्वासार्हता घालवू लागलाय. माध्यमांची पत टिकवायची असेल तर दोन्ही बाजूंनी भक्ताच्या भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झालीय. #संगो

Monday, August 5, 2019

बाळासाहेबांचं स्वप्न शाहांनी साकारलं !

काश्मीर प्रश्नावर देशात सर्वात आक्रमक भूमिका घेतली ती शिवसेाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. काश्मीरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात बोलणारा एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुखच. कलम ३७० हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं केली होती. माझ्या हाती जर सत्ता दिली तर कलम ३७० रद्द करेन असं शिवसेनाप्रमुख अनेक जाहीर सभांमध्ये म्हटलं. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न अमित शाहांनी साकारलं. काश्मीर प्रश्न आणि दहशतवादावर शिवसेनाप्रमुखांनी त्यांची परखड मतं व्यक्त केली होती. त्यावरून अनेकदा वादही निर्माण झाला होता. पण आता केंद्रातल्या एनडीए सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरात शिवसैनिक जल्लोष करताहेत. शिवसेनाप्रमुखांची इच्छा पूर्ण झाली. दहशतवादामुळे काश्मीरी जनता आणि काश्मीरी पंडित यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण त्या विषयावर बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणीच भाष्य करत नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही या क्षणी बाळासाहेबांचीच आठवण आली. राज्यभरात रस्त्यांवर शिवसैनिकांचा जल्लोष, मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आणि तिकडे दिल्लीत संजय राऊतांनीही राज्यसभेत आनंद व्यक्त केला. संजय राऊत राज्यसभेत बोलत असताना इतर सदस्यही त्यांच्या वक्तव्यांना जोरदार दाद देत होते. 
शिवसेना भाजप ही देशातली सर्वात जुनी युती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती साकारली. हिंदूत्व आणि काश्मीरच्या प्रश्नावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेत्यांचं एकमत होतं.
शिवसेना भाजपमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. पण अनेक महिन्यांनी दोन्ही पक्षांचं एकमत झालं. शिवसेनेनं दिलखुलासपणे भाजपचं अभिनंदन केलं. एकंदरीतच मिशन काश्मीरच्या निमित्तानं दोन्ही पक्षाचं युतीचं नंदनवन पुन्हा बहरलं, असंच म्हणावं लागेल.
तर दुसरीकडे अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकनं देशातलं वातावरणच बदलून गेलं. देशभरात जल्लोष सुरू झाला. काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत देश जल्लोषात बुडून गेला. मुंबईत शिवसेना भवनसमोरही शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलम ३७० हटवण्यासाठी नेहमीच आग्रही होते. काश्मीरच्या मुद्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा काँग्रेस आणि पाकिस्तानवर टीका केली. पण शिवसैनिकांसह देशातल्या नागरिकांना जल्लोष करण्याची संधी दिली ती अमित शाह यांनी. अमित शाह हे अत्यंत कठोर निर्णय घेणारे नेते आहेत.  मागील आठवडाभरापासून काश्मीरमधला बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काश्मीरविषयी मोठा निर्णय घेतला जाणार याची तेव्हाच जाणिव झाली होती. काश्मीरच्या प्रश्नावर भाजपनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतलीय. अखेर भाजपनं त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याची हिंमत दाखवली. काश्मीरमध्ये असंच घडायला हवं अशी जनतेची इच्छा होती. अखेर तब्बल ७० वर्षांनंतर भळभळती जखमी भरली गेली. त्यामुळे जनता बेभान होऊन जल्लोष करायला लागली. देशात आता पर्यंत काश्मीरविषयी कठोर निर्णय घेण्याची हिंमत कोणीच दाखवली नव्हती. पण अमित शाह यांनी हा निर्णय घेतला. अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधक गर्भगळीत झाले. देशहिताचा आणि देशवासीयांच्या मनात जे आहे ते शाह यांनी करून दाखवलं. भाजपला या निर्णयाचा कितपत राजकीय फायदा होईल, हा पुढचा भाग राहिला. मात्र अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेला हे नक्की.
दहशतवाद हा चर्चेनं नव्हे तर बंदूकीच्या गोळीनं संपतो, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची रोखठोक विचारसरणी. अमित शाह हे भाजपचे असले तरी त्यांची विचारसरणी आणि कृती ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित असल्याचं जाणवतं. ३७० तर सुरूवात आहे. आगामी काळात समान नागरी कायदा देशात लागू होईल, यात आता शंका उरली नाही.

Sunday, July 21, 2019

आगामी परीक्षा आणि विद्यार्थ्यांची तयारी !

परीक्षा जवळ आल्यावर बरेच विद्यार्थी अभ्यासाची तयारी सुरू करतात. वर्षभर अभ्यास केलेला नसल्यामुळे परीक्षेच्या काळात त्यांची तारांबळ उडते. तर जे अभ्यासू विद्यार्थी असतात ते वर्षभर अभ्यास करतात, परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेचं टेन्शन नसतं.
वाचकहो, मी शालेय किंवा महाविद्यीन परीक्षांविषयी बोलत नाही. तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राजकीय परीक्षांविषयी बोलतोय. विधानसभेची निवडणूक म्हणजे राजकीय परीक्षाच आहे. मागील परीक्षेत म्हणजे 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत भाजपनं पहिला तर शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे भाजपला मॉनिटर (सीएम) करण्यात आलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या वेळी नापास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या मॉनिटरला स्थिर वर्गासाठी (सरकार) पाठिंबाही दिला होता. अर्थातच त्यामुळे दुसरा क्रमांक मिळवूनी सन्मान मिळत नसल्यानं शिवसेना फटकून वागली. नंतर झालेल्या घटक चाचणी परीक्षेत वेगळा अभ्यास केला. स्वबळावर मॉनिटर होऊ असा नाराही दिला. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकट्यानंच अभ्यास केला. मात्र लोकसभेच्या सराव परीक्षेत शिवसेनेनं मॉनिटरसोबत जुळवून घेतलं. लोकसभा परीक्षेच्या आधी अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेते मंडळी एकाच वाहनातून आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढच्या परीक्षेचा अभ्यास एकत्रितपणे करणार असल्याची ग्वाही दिली.

आता परीक्षा अवघी दोन महिन्यांवर आली आहे. मागील पाच वर्षात शिवसेना भाजपने वेगवेगळा अभ्यास करूनही चांगले मार्क मिळवले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परीक्षेत यश मिळवता आलं नाही. त्यातच लोकसभेच्या परीक्षेआधी महाराष्ट्र प्रशालेत वंचित नावाचा विद्यार्थी दाखल झाला. या विद्यार्थ्यानं त्याचा मोठा अभ्यास झाला असल्याचा दावा केला. आता पर्यंत सोडवलेल्या परीक्षेचा दाखला दिला. पहिला नंबर मिळवूच असा दावा केला. पण केलेल्या दाव्यापासून तो विद्यार्थीच वंचित राहिला. तर मनसे या जुन्या विद्यार्थ्यानं परीक्षाच दिली नाही. मात्र नापास झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या विद्यार्थ्यांना 'कॉपी' पुरवली. मनसेनं चांगले पॉईंट्स काढले. अभ्यास केला. पण मनसेच्या 'कॉपी'चा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला नाही. ते पुन्हा नापास झाले.
विधानसभेच्या परीक्षेसाठी शिवसेना आणि भाजपनं 'आमचं ठरलंय' असं सांगत अभ्यास झाला असल्याचं जाहीर केलं आहे. तसंही महाराष्ट्र वर्गाचा मॉनिटर हा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहेच. 288 मार्कापैकी दोन्ही विद्यार्थ्यांनी 144-144 मार्कांची तयारी केलीय. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन विद्यार्थी एकत्रपणे अभ्यास करण्याची फक्त चर्चाच करत आहेत. त्यांनी अजून पुस्तकही उघडलेलं नाही. काँग्रेसला मनसे हा विद्यार्थी त्यांच्यासोबत अभ्यास करायला नकोय. कारण मनसे सोबत आली तर दुसऱ्या वर्गातल्या परीक्षेत मार्क कमी होण्याची भीती काँग्रेसला वाटते. वंचित या विद्यार्थ्यानं आपल्यासोबत अभ्यास करावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण आपल्याच पुस्तकाप्रमाणे अभ्यास करायचा अशी अट वंचितनं ठेवलीय. त्यामुळे मागच्या रांगेतल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. काँग्रेस आणि वंचित या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे युतीच्या विद्यार्थ्यांना आता किंचितही टेन्शन राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. या परीक्षेत चांगले मार्क मिळवूच असा विश्वास युतीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीतच या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासणारे शिक्षक आहेत ते, महाराष्ट्रातले मतदार. हा शिक्षकरूपी मतदार सर्व गोंधळ पाहत आहे. या गोंधळाचा मार्कांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   #संगो #bjp #shivsena #congress #ncp #mns #vba

Thursday, July 11, 2019

वन नेशन, वन स्पोर्ट !


क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानं देशभरातले क्रिकेट फॅन निराश झाले. क्रिकेट हा देशाताला लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला धर्म आणि सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. त्यामुळे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत झालेला पराभव टीम क्रिकेट फॅन्सच्या जिव्हारी लागणारा ठरला. अर्थात आपल्या देशात क्रिकेटशिवाय इतर खेळ जास्त लोकप्रिय नाहीत. नाही म्हणायला देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण हॉकीतला जिंकलो काय आणि हरलो काय, कोणालाच काही वाटत नाही. जगात फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. पण फुटबॉलमध्येही आपल्या देशाची छाप दिसत नाही.
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसह चीन आणि युरोपियन देश पदकांची लयलूट करतात. ऑलिम्पिकची मेडल लिस्ट बघताना आपल्याला खालून सुरूवात केली तरच भारत लवकर सापडतो. ऑलिम्पिकमधली सुमार कामगिरी आपल्या जिव्हारी लागत नाही. क्रिकेटला दिलं जाणारं प्रचंड महत्त्व. क्रिकेट स्पर्धांचं जास्त प्रमाणात होणारं आयोजन, आयपीएल या सर्वांमुळे देशातल्या नागरिकांसमोर क्रिकेटशिवाय इतर खेळ येतच नाही. एकाच खेळावर आपला देश अवलंबून आहे. फुटबॉल, हॉकी या सांघिक खेळांना महत्त्व देणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल हॉकी आणि फुटबॉलमध्ये देशाची कामगिरी सुधारणं गरजेचं आहे. तसंच टेनिस, बॅडमिंटन या खेळांमध्येही जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होणं गरजेचं आहे. ऑलिम्पिकमधल्या जिम्नॅस्टिकसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल मिळवत नाही, तो पर्यंत क्रिकेटची लोकप्रियता कायम राहिल. अर्थात क्रिकेटचा प्रत्येक वर्ल्ड कप टीम इंडिया जिंकू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नैराश्य निर्माण होतं. हे टाळायचं असेल तर इतर सांघिक आणि वैयक्तिक खेळांची कामगिरी उंचावणं गरजेचं आहे.

खमंग फोडणी - भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानं क्रिकेट फॅन निराश झाले. पण मोदीविरोधक प्रचंड खूश झाले. कारण टीम इंडियानं जिंकलेल्या वर्ल्ड कपसोबत नरेंद्र मोदींचा फोटो नसणार, या कल्पनेनंच मोदीविरोधकांना हर्षवायू झाला. नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे या म्हणीची या निमित्तानं आठवण झाली. मोदींचा विरोध मान्य. लोकशाहीत विरोध करणं चुकीचं नाही. पण वर्ल्ड कपमध्ये भारत हारावा इतका मोदीद्वेष योग्य वाटत नाही. पण एक सांगू का, थोडं चुकीचं वाटेल. पण मोदी विरोधक समजू शकतील. 1983 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकला. इंदिरा गांधींनी टीम इंडियासोबत फोटो काढला. 1984 मध्ये इंदिरा गांधीची दुर्दैवानं हत्या झाली. देशाला मोठा राजकीय नेता आणि पंतप्रधान गमवावा लागला. 2011 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकला. मनमोहनसिंग यांनी टीम इंडियासोबत फोटो काढला. 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली. 2019 मध्येही काँग्रेसचा पराभव झाला. 2024 मध्येही सत्तेत येण्याची शक्यता नाही.

Thursday, April 25, 2019

ये 'मुलाकात' एक बहाना हैं...

सबसे बडा खिलाडी अक्षय कुमारनं खिलाडीयों का खिलाडी नरेंद्र मोदींची 'गैरराजकीय' मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अशी 'गैरराजकीय' मुलाखत होऊ शकते, याचा देशवासीयांना पहिल्यांदाच प्रत्यय आला. पण मोदी है तो मुमकीन है, या उक्तीचा या निमित्तानं प्रत्यय आला. 'सबसे बडा खिलाडी' आणि 'खिलाडीयों का खिलाडी' यांनी एकत्र येऊन 'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमाच्या नावाप्रमाणे देशवासीयांना 'अनाडी' समलजं की काय ? असा प्रश्न निर्माण होतो.
पण 'गैरराजकीय' मुलाखतीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या मुलाखतीवरुन अनेक मिम्स व्हायरल झाले. ओव्हर अॅक्टींगसाठी पैसे कापण्याचा मिम्स तर सर्वात लोकप्रिय ठरला. अक्षय कुमारपेक्षा चांगली अॅक्टींग नरेंद्र मोदींनी केल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. 'गैरराजकीय' मुलाखतीच्या नावाखाली देशातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचाच हा प्रयत्न होता, यात शंका नाही. निवडणुक जिंकायची असेल तर राजकीय आणि गैरराजकीय अशा दोन्ही आयुधांचा वापर करायला मागेपुढे पाहायचं नसतं, हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं.
एनडीटीव्हीवर रवीश कुमार यांनी, आंब्याची इमेज दाखवत 'गैर राजनीतिक प्राइम टाइम' सादर केला. रवीश कुमार यांचा हा प्राइम टाइम सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यांच्या नेहमीच्या अंदाजात त्यांनी 'दोन खिलाडींच्या' 'गैरराजकीय' मुलाखतीची साल काढली, असं म्हणावं लागेल. अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत ज्या आंब्याचा उल्लेख झाला होता त्या आंब्याच्या सालीप्रमाणे 'खिलाडीं'ची रवीश कुमार यांनी साल काढली.
राजकीय नेत्याची अभिनेत्यानं मुलाखत घेतली. यामुळे अक्षय कुमारवर राजकीय टीका होणारच होती. तसंही पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांमुळे अक्षय कुमारवर  भाजपचा शिक्का बसलाच होता. पण खरंच अभिनेत्यांचं काम अवघड असतं. 
2008 मध्ये अक्षय कुमारचा सिंग इज किंग हा सिनेमा आला होता. हा सिनेमा गाजला होता. त्याच्या दुसऱ्याच वर्षी अक्षय कुमारला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आलं होतं. सिंग इज किंग सिनेमा आणि तेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते. याच कारणामुळे अक्षय कुमारला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आलं, अशी टीका झाली होती. म्हणजेच काँग्रेस असो किंवा भाजप कोणाच्याही निकट गेलं तरी शेकलं ते, अक्षय कुमारवरच. 
सैफ अली खानलाही पद्मश्री मिळाला होता. सैफची आई शर्मिला टागोर त्यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा होत्या. शर्मिला टागोर यांच्यामुळे सैफला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. एकंदरीतच अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, सेलिब्रिटी यांनी कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर किंवा पक्षाबरोबर जवळीक साधल्यावर त्यांच्यावर टीका केली जाते. अर्थात तसं पाहिलं तर अभिनेते हे सॉफ्ट टार्गेटही आहेत. या मंडळींनी कोणत्या एका विषयावर भूमिका घेतली तरी त्यांना ते सोयीचं नसतं. कारण त्यांनी घेतलेली भूमिका न आवडलेले त्यांच्यावर टीका करतात. भूमिका घेतली नाही, म्हणूनही अभिनेत्यांवर टीका केली जाते. म्हणजे काही केलं तरी, अभिनेतेच टीकेचे धनी होणार. सिनेमात एकाच वेळी अनेक गुंडांना लोळवून हिरो होणारे अभिनेते सोशल मीडियात नाहकच व्हिलन ठरवले जातात. #संगो

Friday, April 19, 2019

शिवसेनेचा 'भार' मतदार हलका करणार?

लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलण्याची हिंमत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही. काही खासदारांना पाचव्यांदा, चौथ्यांदा, तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. निष्क्रिय खासदारांच्या विरोधात नाराजी असतानाही शिवसेनेनं भाकरी उलथली नाही. परिणामी निकालानंतर शिवसेनेची ही भाकरी करपली तर कोणालाही नवल वाटणार नाही. अगदी उद्धव ठाकरेंनाही.
चंद्रकांत खैरे पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. शिवाजीराव अढळराव पाटील चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव हे ही तिसऱ्यांदा मैदानात उतरत आहेत. रवींद्र गायकवाड वगळता एकाही विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेचे 17 खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परिणामी रांगडी शिवसेना खासदारांसमोर हतबल झाली का ? हा सवाल उपस्थित होतो.
शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंसमोर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी जोरदार आव्हान निर्माण केलं आहे. 'एकच फॅक्टर, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर' ही घोषणा लोकप्रिय ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीनं दलित आणि मुस्लीमांच्या भागांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुल्ताबादमध्ये आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात हर्षवर्धन जाधवांनी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरावर जोर दिलाय. मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी ग्रामीण मतदारांमध्ये सहानुभूती आहे. मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यात हर्षवर्धन जाधव यांना यश आलं आहे. त्यातच महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवारानं हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार यांनीही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा दिला. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई आहेत. त्यामुळे भाजपचा हर्षवर्धन जाधवांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधातली नाराजी हर्षवर्धन जाधवांसाठी फायद्याची ठरत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत मतदारांनी खान विरूद्ध बाण अशा निवडणुका पाहिल्या आहेत. पण पहिल्यांदाच खानही नको आणि बाणही नको, पण विकास हवा अशा वळणावर जिल्ह्यातले मतदार आले आहेत. खैरेंनी जिल्ह्यात कोणते मोठे उद्योग आणले ? असा सवाल विचारला जात आहे. शहरातल्या विविध प्रश्नांवरून प्रचार करताना शिवसेनेच्या नेतृत्वाची अडचण होताना दिसत आहे.
अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना स्थानिक नसल्याच्या मुद्यावरून रोषाला सामोरं जावं लागत आहे. खासदार जिल्ह्यात उपलब्ध नसतात अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जाते. या टीकेला समाधानकारक उत्तर शिवसेनेला देता आलेलं नाही. शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील तीनदा निवडून गेले. मात्र यावेळी त्यांच्याविरोधात मतदारसंघात मोठी नाराजी आहे. पण शिवाजीरावांचं तिकीट कापण्याची हिंमत दाखवली गेली नाही. त्यामुळे आता मतदारांनी 'संभाजी'चा (डॉ. अमोल कोल्हे) राज्यभिषेक केला तर नवल वाटायला नको.
बुलढाणा मतदारसंघातही प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराजी आहे. पण इथंही शिवसेनेनं कच खाल्ली. यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळी यांना किती वेळा लोकसभेवर पाठवायचं ? याचाही विचार करण्याची गरज आली आहे. मुंबईतून गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी तरूण शिवसैनिकाला संधी देण्याची संधी शिवसेनेला होती. पण ही संधी शिवसेनेनं साधली नाही. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवलं. असं असताना ज्यांच्या विरोधात नाराजी आहे, त्या श्रीरंग बारणेंना शिवसेनेनं मैदानात का उतरवलं ? हा प्रश्न निर्माण होतो.
नाराजी असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापण्याऐवजी मतदारांच्या हातूनच जुन्या खोडांचा 'कार्यक्रम' करण्याचा शिवसेनेचा डाव असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच शिवसेनेवरचा हा निष्क्रिय उमेदवारांचा 'भार' मतदार हलका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. #संगो

Friday, April 5, 2019

राज...राज ना रहा !


एका पक्षाचा अध्यक्ष इतर दोन पक्षांचा प्रचार करतोय. असं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेण्याची वेळ आलीय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. इतकंच नव्हे तर मनसेचे उमेदवार निवडून आले तर ते मोदींना पाठींबा देतील असंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
अर्थात तेव्हा मनसेचे उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोदींना पाठींबा देण्याची वेळ आली नाही. पण आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ राज ठाकरे आणि मनसेवर आली आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांची मिमिक्री केली. भुजबळांवर टीका करत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. पण आता छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी राज ठाकरेंना सभा घ्यावी लागणार आहे. नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते समीर भुजबळांचा प्रचार करत आहेत.
असंच चित्र मावळच्याही बाबतीत आहे. अजित पवार यांनी, धरणात मुतू का ? असं वक्तव्य केल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच्या एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला आता मत नाही, मूत मिळेल असं म्हटलं होतं. पण झालं उलटंच. आता हेच राज ठाकरे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज ठाकरे नऊ सभा घेण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे मतदारांना साकडं घालणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनसेच्या माजी आमदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. भाजपवाल्यांना दुसऱ्यांची पोरं कडेवर घेण्याची हौस आहे. पण काही महिन्यातच ही वेळ आता राज ठाकरेंवर आली आहे. राज ठाकरेंवर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मुलं कडेवर घेण्याची वेळ आलीय. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही स्टार कॅम्पेनर नाही. त्यामुळे आघाडीलाही राज ठाकरेंवर अवलंबून राहावं लागत आहे.
अर्थात यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं काहीच नुकसान होणार नाही. पण एक पक्ष आणि नेता म्हणून राज ठाकरेंची विश्वसनीयता कमी होणार आहे. काँग्रेस आघाडी राज ठाकरेंच्या मनसेला त्यांच्या आघाडीत घेत नाही. पण राज ठाकरे त्यांना प्रचारासाठी हवे आहेत. तर जे पक्ष मनसेला आघाडीत एक जागाही द्यायला तयार नाही, त्यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. असं असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार मनसेकडे आकर्षित होतील का ? असा सवाल निर्माण होतो. #संगो

Wednesday, March 20, 2019

बिनमुद्याची लोकसभा निवडणूक !

2019 मधली ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पण या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्देच दिसत नाहीत. 'मैं भी चौकीदार' आणि 'चौकीदार चौर हैं' या सारख्या थिल्लर कॅम्पेनमध्ये ही निवडणूक अडकली आहे. त्यातच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हळद आणि नारळ सारखे मुद्दे येतात. भाजपची जाहिरात कशी चुकली यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना खिजवणा-या पोस्ट टाकल्या जातात. यामुळे सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांना खरोखरच निवडणुकीचं गांभीर्य राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं.
भाजपनं शेतक-यांच्या मालाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हा हमीभाव मिळाला का ? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसनं का घेतलं नाही ? निवडणुकीत या मुद्यावरून काँग्रेस भाजपला जेरीस आणू शकली असती. पण तसं झालं नाही. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पूर्ण झालं नाही. रोजगार निर्मिती का झाली नाही ? हा मुद्दाही काँग्रेसनं हाती घेतला नाही. देशात मागील पाच वर्षात किती नवीन कंपन्या, उद्योग आले याची आकडेवारी काँग्रेसनं सरकारला विचारली नाही. मागील पाच वर्षात देशात किती गुंतवणूक झाली ? हा आकडा काँग्रेसनं भाजपला का विचारला नाही. परदेशातलं किती काळं धन देशात आलं ? हा प्रश्न राहुल गांधी का विचारत नाहीत. नोटबंदी झाली पण दहशतवादी हल्ले का थांबले नाही ? हे अपयश कोणाचं ? पुलवामातला हल्ला हे कोणाचं अपयश ? हे सवाल काँग्रेस विचारणार नाही तर पाकिस्तान विचारणार आहे का ? वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर घेण्यात काँग्रेसला यश आलं नाही. राफेलवरून आरोपांची राळ उठवल्यानंतर आता काँग्रेसनं मौन का बाळगलंय ? हा प्रश्नही मतदारांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी काँग्रेस देशात कुठेही रस्त्यावर उतरली नाही. आंदोलन केलं नाही. चौकीदार चोर हैं, हे कॅम्पेन छान आहे. पण त्यामुळे मतं मिळतीलच याची गॅरंटी नाही.
सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरणारे हे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न विचारण्याची हिंमत काँग्रेस दाखवू शकली नाही. कारण काँग्रेस पराभूत मानसिकतेत गेलेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगडमधल्या विजयानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. पण हे चैतन्य लोकसभेच्या रणांगणा आधीच मावळलं आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधी-वाड्रा यांना मैदानात उतरवलं आहे. पण त्याचाही फार फायदा होण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत.
देशासमोरचे प्रश्न घेऊन विरोधकांनी लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असतं. तर सत्ताधा-यांनी केलेल्या कामांचा दाखला आणि भविष्यातला त्यांचा विकासाचा प्लॅन मतदारांना सांगायचा असतो. पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मुद्दे नकोसे झाले आहेत, हे चित्र सध्या दिसून येतंय. देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुद्यांऐवजी सवंग कॅम्पेन करत आहेत. या दोन्ही पक्षांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे.
आता मतदारांनीच या दोन्ही पक्षांना, आमच्या विकासाचं काय ? विकासाच्या मुद्याचं काय ? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. मुद्यांपासून भरकलेल्या या दोन्ही पक्षांना, मुद्याचं बोला असं ठासून सांगण्याची गरज आहे. अर्थात या दोन्ही पक्षांकडून या प्रश्नांची उत्तर मिळतीलच असं म्हणता येत नाही. पण भाजप आणि काँग्रेसनं मुद्यापासून दूर जाणं हे त्यांचं अपयश आहे की मतदारांचं ? हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर जर मतदारांनीच शोधलं तर काही मार्ग निघू शकण्याची चिन्हं आहेत. #संगो

Tuesday, March 12, 2019

पोराचा व्याप...बापाला ताप !

महाराष्ट्रात 90 च्या दशकात घरोघरी एक वेगळं राजकारण पाहायला मिळत होतं. शहरी भागातली शिवसेना ग्रामीण भागात वेगानं पसरत होती. त्यामुळे ग्रामीण भागातले अनेक तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत होते. ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. परिणामी वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा शिवसेनेत असं चित्र त्यावेळी अनेकांनी पाहिलेलं आहे. अर्थात वडील काँग्रेसमध्ये असले तरी ते कार्यकर्ते आणि मुलगा शिवसेनेत असला तरी तो कार्यकर्ताच. त्यामुळे यावर काही फार मोठी चर्चा झाली नाही.
आता 30 वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. पण इथं कार्यकर्ते नाही तर राज्यातल्या मातब्बर राजकीय घराण्यात ही परिस्थिती निर्माण झालीय. विखे कुटुंबात वडील काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये, हे चित्र पाहायला मिळतं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यानं थेट भाजपचा झेंडा हाती धरलाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसचं नाक कापलं गेलंय. तसं पाहिलं तर विखे कुटुंबासाठी युती काही अस्पृश्य नाही. शिवसेनेमुळं विखे कुटुंबाला पहिल्यांदा लाल दिवा मिळाला होता. राधाकृष्ण विखे पाटील युतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. तर बाळासाहेब विखे पाटलांना थेट केंद्रात शिवसेनेमुळं मंत्रीपद मिळालं होतं.आता शिवसेनेचा 'मित्र'पक्ष असलेल्या भाजपला सुजय विखे पाटील यांनी पसंती दिलीय. विखे कुटुंबानं या निमित्तानं युतीचं वर्तुळ पूर्ण केलं. पण राधाकृष्ण विखे पाटील यांचं दिल्ली दरबारी असलेलं वजन आता निश्चित कमी होणार यात शंका नाही.
कोकणातले बडे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांचं प्रकरणही याच वळणाचं आहे. नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण त्यांचे पुत्र नितेश राणे हेच वडिलांच्या पक्षात नाहीत. नितेश राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. नारायण राणेंना भाजपनं राज्यसभेचं सदस्यत्व दिलंय. कोकणातल्या राजकारणातला हा व्यापही तसा तापदायकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मुलगा, पुतण्या यांची सोय करायला प्राधान्य दिलेलं आहे. मुलगा आमदार तर पुतण्या माजी खासदार. आणि नंतरही त्यांनाच तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न. असं असेल तर कार्यकर्त्यांना राजकीय भवितव्य उरतं का ?
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी तर चक्क, मुलांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. सध्याचं वातावरण पुढच्या पिढीसाठी चिंताजनक असल्याचं प्रिया दत्त यांना वाटतं. पण त्यासाठी इतर कोणीही कार्यकर्त्यानं निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत नाही. तर निवडणूक स्वत:च लढवावी असं प्रिया दत्त यांना वाटतं.
कुटुंबातल्या सगळ्यांची राजकीय सोय लावणं हेच जणू नेत्यांचं कार्य असावं, अशी सध्याची स्थिती आहे.  नेत्यांनी त्यांची मुलं, सुना आणि आता नातवंडं यांना राजकीय सोयीसाठी राजकारण आणलं आहे. नेत्यांचं हे सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागलंय. नेत्यांची मुलंच जर खासदार, आमदार होणार असतील तर सतरंज्या उचलायच्या आणि घोषणा द्यायच्या हेच कार्यकर्त्यांच्या नशिबी असणार आहे.
सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांना कार्यकर्ते हवेत ते फक्त हाणामा-या करण्यासाठी. कार्यकर्त्यांनी घोषणा द्याव्या आणि खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करावा असा त्यांना वाटतं. पण घोषणांची भाकरी होत नाही आणि झेंड्यांचे कपडे होत नाहीत. कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो. पण पद आणि तिकीट कोणाला द्यायचं हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा विचार होत नाही. परिणामी किती दिवस नेत्यांच्या पिढ्यान पिढ्या खांद्यावर घेऊन नाचवायच्या याचा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज निर्माण झालीय.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभासाठी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इतर वेळी पक्षनिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांची माळ जपली जाते. पण निवडणुका आल्यावर ही माळ अडगळीत टाकली जाते. इलेक्टिव्ह मेरिट आणि निवडून यायचंच या हव्यासातून अनेक व्याप आणि ताप मतदारांना बघायला मिळतील.
 #संगो

Friday, March 1, 2019

अलविदा tv9 मराठी !

17 डिसेंबर 2012 रोजी सुरू झालेला tv9 मराठीतला प्रवास आज 1 मार्च 2019 रोजी संपला. 6 वर्ष 2 महिने 12 दिवसांचा हा प्रवास थांबला. सहा वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. पण खासगी चॅनेलमध्ये इतकी वर्ष नोकरी करणं या क्षेत्रात मोठं मानलं जातं.
17 डिसेंबर 2012 या दिवशी tv9च्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. पण इथं कधीच नवखेपणा जाणवला नाही. ई टीव्हीतले अनेक जुने सहकारी आणि सीनिअर्स इथं आधीपासून होते, तर काही नंतर जॉईन झाले. अभिजित कांबळे, गजानन कदम, धनंजय कोष्टी, चंद्रकांत फुंदे, नरेश बोभाटे, निखिल देशपांडे, सुनील बोधनकर, माणिक मुंढे, कृष्णा आजगावकर, रमेश जोशी, शंकरन सर हे सर्व ई टीव्हीयन्स पुन्हा भेटले. त्यांच्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.
तर झी 24 तासमध्ये ज्यांच्यासोबत काम केलं ते डॉक्टर प्रसाद घाणेकर, विशाल पाटील, विनीत डंभारे, गणेश रूपाले, किरण खुटाळे, आशिष काटकर, ऋषी देसाई, रघू या सहका-यांसोबतही पुन्हा tv9 मध्ये भेट झाली.
tv9ची सर्वात मोठी स्ट्रेन्थ म्हणजे, नो ऑफिस पॉलिटिक्स. या ऑफिसमध्ये कोणतेही गट, गॉसिप्स हे फालतू प्रकार नाहीत. इथं फक्त आवाज असतो तो कामाचाच. सहका-यांमधला सौहार्द हे या चॅनेलचं बलस्थान आहे, यात वाद नाही.

ब्रेकींग न्यूज क्षणात उतरवणं, ती प्ले अप करणं, आक्रमकपणे मांडणं यात इथले सहकारी निष्णात आहेत.
मी इथं काम केलं ते रन डाऊनवर. अनेक बुलेटिन प्रोड्युस केली. अर्ध्या तासाचे स्पेशल शो, स्पेशल बुलेटिन केली. टॉक शो केले. यावेळी अनेकांचं सहकार्य लाभलं. शरद जाधव, पंकज भनारकर, गिरीश गायकवाड, अंकिता शिंदे, श्रद्धा देसाई, श्रद्धा पवार, अनिता, संतोष थळे हे सर्व सहकारी नेहमीच आठवणीत राहतील.
प्रॉडक्शन एक्झिक्युटीव्ह, व्हिडीओ एडिटर आणि ग्राफिक्सची टीम क्षणात व्हिज्युअल्स, बाईट, पॅकेज आणि ग्राफिक्स तयार करून देतात. यांच्यामुळेच tv9 मध्ये सर्वात जास्त न्यूज पॅकेज तयार होतात. या सहका-यांमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे संतोष परब, अमान, अब्बासजी, अभिषेक, परेश सपकाळ या व्हिडीओ एडिटर्सकडून अर्ध्या किंवा एक तासाचा स्पेशल प्रोग्राम अवघ्या पाच तासात कसा एडिट करता येऊ शकतो हे गुप्त ज्ञानही शिकायला मिळालं. भविष्यात त्याचा फायदा होईलच यात शंका नाही.
विनायक कुंदराम, दुर्गा यांची ग्राफिक्सची टीम म्हणजे मायानगरी तयार करण्यात वाकबगार आहे. कोणतंही ग्राफिक्स अर्ध्या तासाच्या आत देण्याची क्षमता त्यांच्या टीममध्ये आहे. प्रॉडक्शनच्या टीममध्ये अनेक सहकारी आहेत, अनेक जण सोडून गेलेत. सर्वांची नावं टाकत नाही, पण नावापेक्षा त्यांचं कामच जास्त बोलतं. पण प्रमोद जगताप, दुर्गेश राजमाने, अर्जुन, सुशील, सोनी मगर, गौरी, कुणाल सिंग, अश्विनी, पूजा यांना विसरता येणं अशक्य.
ब्रेकींग न्यूजच्या वेळी जसा गोंधळ न्यूजरूममध्ये असतो, तसाच गोंधळ पीसीआरमध्येही असतो. पण अशा वेळी संयमानं काम करणारे पीसीआरमधले सहकारी यांना विसरणं शक्यच नाही. विजय, गौतम यांची टीम आणीबाणीच्या वेळी सर्व परिस्थिती संयमानं हाताळत असतात.
प्रोमो डिपार्टमेंट एकहातीपणे सांभाळणारी रसिका डायालकर तर उत्साहाचा अखंड धबधबाच. रसिका असल्याने प्रोमो, क्रोमा, स्टिंग, डाऊन बॅंडचं कधी टेन्शन घ्यावं लागलं नाही.
tv9 हे नेहमीच सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करण्यात आघाडीवर राहिलेलं आहे. 2012 मध्ये मी इथं जॉईन झालो त्यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. सिंचन घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यासह इतर घोटाळ्यांवरून काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतरही tv9च्या कार्यशैलीत फरक पडला नाही. केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही तुटून पडताना कोणतीही कसर tv9नं सोडली नाही.
श्रीनिवास रेड्डी, उमेश कुमावत, निलेश खरे, रोहित विश्वकर्मा या सर्व सिनीअर्सकडून बातमी आक्रमकपणे कशी प्रझेंट करायची हे शिकायला मिळालं. कामाचं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. कोणतीही बातमी आल्यानंतर ती या पक्षाची आहे म्हणून थांबवा आणि त्या पक्षाची आहे म्हणून चालवा असा प्रकार कधी घडला नाही. हा आवडता नेता, तो ना आवडता नेता अशी कोणतीही कॅटेगिरी इथं नाही. त्यामुळे बातमी आली की, ती क्षणात उतरवली जाते. जो चुकला तो ठोकला, ही इथली निती.
tv9चं असाईनमेंट अत्यंत जलद आहे. क्षणात फोनो जोडणं, लाईव्ह उपलब्ध करून देणं ही सर्व प्रोसेस सर्वात फास्ट केली जाते. tv9चे सर्व रिपोर्टर्स ब्रेकींग न्यूज देण्यात निष्णात आहेत. कोणतीही ब्रेकींग न्यूज tv9च्या रिपोर्टरकडे सर्वात आधी असते, त्यामुळे tv9वर सर्वात जास्त न्यूज ब्रेक केल्या जातात. परिणामी tv9चा स्क्रिन हा 24 तास हलत असतो. ब्रेकींग न्यूज आल्यानंतर ऑनएअर असणारे अँकर्स त्या बातमीला न्याय देतात. यात निखिला म्हात्रे जर ऑनएअर असतील तर बुलेटिन प्रोड्युसरला फार काही कष्ट करावे लागत नाहीत. असाच अनुभव इतर अँकर्सचाही आहे.
सहा वर्षांमध्ये करिअरमधला अतिशय सुंदर अनुभव इथं मिळाला. आज थांबण्याची वेळ आली आहे. खरंच मन भरून आलं आहे. असे सहकारी पुन्हा मिळतीलच असं म्हणता येत नाही. एचआर डिपार्टमेंटचे रणजीत सर, रिसेप्शन वरील कविता मॅडम, बॅक ऑफीस, फॅसिलिटी, कॅन्टीन या सर्वांच्याच आठवणी मनात आहेत. आयुष्यातला चांगला काळ इथं घालवला. मनात सर्वांच्या आठवणी घेऊन जात आहे. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत.
शेवट या गाण्याच्या ओळींनी करतो...

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...

मित्रांनो या वळणावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. या वळणावर नवा प्रवास सुरू करतोय. धन्यवाद. तुमचाच गारू...संतोष गोरे...#संगो #tv9

Sunday, February 17, 2019

कॅन्सर : काश्मीरचा आणि टाईम्सचा


अतिरेकी आदिल दार याचा TIMES OF INDIAनं दिलेल्या बातमीच्या शिर्षकात अतिरेकी असा उल्लेख करण्याऐवजी लोकल यूथ असा उल्लेख करण्यात आला. पुलवामात आत्मघातील हल्ला करणारा, पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला आदिल याला अतिरेकी म्हटलं गेलं नाही. त्यामुळे देशभरात गदारोळ माजला. अनेक जणांनी TIMES OF INDIA बंद करत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. मी ही TIMES OF INDIA बंद केला आहे.

 अतिरेकी आदिल दार याचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिला आहे. त्या व्हिडीओत आदिल दार याचे भारत आणि हिंदू धर्मियांविषयी काय विचार आहेत, हे जगानं पाहिलं आहे. आदिल हा पूर्णपणे कट्टरपंथीय होता. मुलांनी प्रेमात पडू नये, असं तो म्हणायचा. काश्मीरमध्ये काही दहशतवादी मुलींच्या प्रेमात पडून लष्कराच्या हाती लागले होते. यामुळे तो असं म्हणायचा. तसंच व्हॅलेंटाईन डे हे काही इस्लामला अनुसरून नाही. त्यामुळेही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा हेतू असू शकतो. तसंच महिलांनी बुरख्यातच राहावं अशी त्याची बुरसटलेली जिहादी विचारसरणी होती. इतकंच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा, असंही तो त्याच्या नातेवाईकांना सांगायचा. आत्मघाती हल्ला केल्यानंतर जन्नत मिळते, असा या जिहादी श्वापदांचा समज आहे. आणि खरंच असं असेल तर जगातल्या सर्व जिहादींनी एकाच वेळी त्यांच्या राहत्या घरात स्वत:ला बॉम्बने उडवून टाकावं. म्हणजे त्यांना जन्नत मिळेल. आणि ती घाण संपल्यामुळे या पृथ्वीचा स्वर्ग होईल.
 आदिल हा पाकिस्तानात एक वर्षापासून ट्रेनिंग घेत होता. संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरू याला नऊ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे याच तारखेच्या आसपास घातपाताचा त्यांचा डाव होता. तसंच ताल्हा रशीद  आणि उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला होता. मसूद अझरच्या पुतण्यालाही ठार करण्यात आलं होतं. त्यामुळेही जैशचे अतिरेकी बदला घेण्याची संधी शोधत होते. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला ते ठिकाण आदिल दार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच त्यानं त्याची गाडी सुमारे दोनशे किलो स्फोटकांनी भरून आणली होती. हीच गाडी भरधाव वेगानं त्यानं सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून आत्मघाती हल्ला घडवून आणला.  
आदिल दार याला स्फोट घडवण्यासाठी जे वाहन देण्यात आलं, ते लोकल मदतीमुळे मिळालं. याचाच अर्थ दहशतवाद्यांचा स्लीपर सेल हा किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, हे लक्षात येतं. या स्लीपर सेलकडे पाकिस्तानातले दहशतवादी स्फोटकं पुरवतात. 
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. अनेक दहशतवादी संघटना तिथं कार्यरत आहेत. मसूद अझरच्या जैश ए महंमदनं काश्मीरसह भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानात जैश ए महंमदचा तळ आहे. त्याच ठिकाणी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा कट शिजलाय. पुलवामातल्या आत्मघाती हल्ल्याचा कटही त्याच ठिकाणी शिजला. आदिल दार हा काश्मीरमधून तिथं पोहोचला होता. 
एक वर्षापासून आदिलचं पाकिस्तानात मानवी बॉम्ब बनण्याचं ट्रेनिंग सुरू होतं.
सहा महिन्यांपूर्वी  जैश ए महंमदने मोठ्या हल्ल्याचा कट आखला. कट रचण्यात आला त्यावेळी मानवी बॉम्ब बणून आत्मघाती हल्ला करण्यासाठीचं आदिल दार याचं तेव्हा तिथेच ट्रेनिंग सुरू होतं. जैश ए महंमदचा म्होरक्या मसूद अझर, आदिल दारसह तिघांनी हल्ल्याचा कट रचला. जैशच्या मुख्यालयात या कटाची माहिती फक्त मसूद अझर याला होती. भारतातल्या त्यांच्या स्लीपर सेललाही या कटाची माहिती नव्हती. त्यांना फक्त लोकल सपोर्ट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधले पुलवामा, त्राल हे दहशतवाद्यांचे गड मानले जातात. या भागात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. इथंच आदिल दार आणि त्याच्या हॅण्डलरलाही आश्रय मिळाला. त्यांना स्थानिक पातळीवरूनही मदत झाली. जर या दोघांना आश्रय मिळाला नसता, मदत मिळाली नसती तर हा हल्ला टळला असता.
काश्मीर खो-यातल्या नागरिकांची मानसिकता ही भारतविरोधी आहे. काश्मीरच्या कॅन्सरमुळे भारताच्या इतर भागांचं नुकसान होतंय. त्यावर आता जालीम उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे चर्चा, वाटाघाटी असल्या निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता सरकारने बॉम्ब आणि बुलेटची भाषा करावी. आणि तसं होत नसेल तर ती 56 इंचाची छाती, मोदी जॅकेटमध्येच लपवून ठेवावी.

Saturday, February 16, 2019

शहिदांच्या ज्वाला, देशात अंगार


देशभरात  नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर कित्येकांचे डोळे पाणावले. देशासारखीच स्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या मातीतले मलकापूरचे वीर जवान संजय राजपूत यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावातले शहीद नितीन राठोड यांनी हौतात्म्य पत्कारलं. 
शहीद जवान नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून नागरिकांनी गर्दी केली. शहीद जवान नितीन राठोड अमर रहे असा जयघोष सुरू होता. भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन नागरिक त्यांचा संताप व्यक्त करत होते. सरणा-या दिवसाबरोबर गर्दी वाढत होती. मिळेल त्या ठिकाणी नागरिक दाटीवाटीनं उभे होते. अखेर अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली. बंदुकीच्या फैरी झाडून शहीद नितीन राठोड यांना मानवंदना देण्यात आली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद नितीन राठोड यांनी जिथे जन्म घेतल्या त्या गावातल्या मातीत त्यांना अग्नि देण्यात देण्यात आला. धगधगत्या ज्वालांमध्ये भारत मातेचा पूत्र देशाच्या मातीचा सन्मान राखण्यासाठी त्याच मातीत मिसळून गेला. 
ज्या गावात, ज्या घरात शहीद संजय राजपूत हे लहानाचे मोठे झाले तिथला प्रत्येक माणूस रडला. ज्या घरात संजय राजपूत मोठे झाले, त्या घरावर शोककळा पसरली होती. त्यांचे सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडाले.  राजपूत कुटुंबीयाची जी भावना आहे, तीच भावना सध्या सर्व देशवासीयांची सर्वांना हवाय तो फक्त बदला.
मलकापूरमध्ये संजय राजपूत यांचं पार्थिव पोहोचल्यावर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा  देण्यात आल्या.  भल्या मोठ्या मैदानात शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं. पण हे भलंमोठं मैदानही गर्दीसमोर तोकडं पडलं. अखेरचा सलाम देण्यासाठी जागा मिळेल तिथे नागरिक उभे होते. मैदानात आणि घरांच्या गच्चीवर नागरिक उभे होते. झाडांवर चढून शहिदाच्या निरोपाचा हा क्षण डोळयात साठवण्यासाठी अनेकांची धडपड सरू होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अंगार पेटला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावण्यात आली. फुलं, पुष्पचक्र हे अश्रूंमध्ये भिजवून वाहिले जात होते. शहिदाच्या शवपेटीला अखेरचा हात लागावा यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. देशाचा सुपूत्र त्याचं कर्तव्य बजावून पुढच्या प्रवासासाठी निघाला. यावेळी आपला हात तरी शहिदाच्या शवपेटीला लागावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती.  जय आणि शुभम ही संजय राजपूत यांची दोन मुलं. शहीद पित्यावर अंत्यसंस्काराचे विधी या लहान वयात करण्याची वेळ नियतीनं आणली. हे दृश्य पाहून सर्व उपस्थित हेलावले.  बंदुकीच्या फैरी झाडून शहीद संजय राजपूत यांना सलामी देण्यात आली. बुंदकीतून फैरी झाडल्या जात होत्या याचवेळी नागरिकांमधूनही सातत्यानं घोषणाबाजी सुरूच होती.  भारत माता की जय आणि संजय राजपूत अमर रहे, असा जयघोष सुरू होता. भारतमातेसाठी बॉम्बच्या ज्वाळात शहीद झालेल्या या सुपूत्राचा धगधगत्या ज्वालांमध्ये अंत्यसंस्कार सुरू झाला. सरणात जशा ज्वाला भडकल्या तशाच ज्वाला इथं उपस्थित असलेल्यांच्या मनात भडकल्या होत्या. 
या ज्वालांनी शहीद संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण देशातल्या नागरिकांच्या मनात भडकलेल्या ज्वाला लवकर शांत होणार नाहीत.  जो पर्यंत या शहिदांचे मारेकरी, दहशतवाद्यांना आसरा देणारे गद्दार आणि दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान या सर्वांचा हिशेब होत नाही, तोपर्यंत देशाच्या नागरिकांच्या मनात असलेला हा बदल्याचा अग्निही शांत होणार नाही.

Monday, February 11, 2019

'ठाकरे' : मैदानातले, मनातले आणि पडद्यावरचे


जाहीर सभेत लाखोंच्या गर्दीत मैदान गाजवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या महाराष्ट्राने पाहिले आहेत. लाखो लोकांनी त्यांच्या जाहीर सभा ऐकल्या नव्हे तर जीवंत अनुभवल्या आहेत. त्या लाखो लोकांसारखा मी सुद्धा आहे. शिवसेनाप्रमुखांची तर मी अनेक भाषणं ऐकली आहेत. शिवसेनाप्रमुखांची भाषणं मी वेगवेगळ्या शहरात जाऊन ऐकली आहेत. संभाजीनगर, मुंबई, नाशिक, अमरावती या ठिकाणी झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अनेक जाहीर सभेतली भाषणं ऐकली आहेत.
ठाकरे सिनेमाच्या सिल्व्हर स्क्रिनला नवाजुद्दीन सिद्दीकी यानं व्यापून टाकलं होतं, यात शंका नाही. पण त्या सिल्व्हर स्क्रिनवर म्हणजेच पडद्यावर मी, शिवसेनाप्रमुखांनी गाजवलेली मैदानं शोधत होतो. मुंबईतलं शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ सिनेमात आहे. पण संभाजीनगरमधलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान यात नाही. याच मैदानात 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा घेतली. आणि तिथून  शिवसेना मराठवाड्यात झपाट्यानं आणि जोमानं वाढली. संभाजीनगर हे माझं आवडतं शहर, असा उल्लेख शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे करायचे. पण या सिनेमात मराठवाडा सांस्कृतिक मैदान दिसलंच नाही. 

सिनेमात औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव दिल्याचा उल्लेख 1994 सालातला दाखवण्यात आलाय. पण तो चुकीचा आहे. 1988 मध्येच शिवसेनाप्रुखांनी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं.
नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानावर शिवसेनेचं 1994 मध्ये अधिवेशन झालं होतं. शिवसेनेला सत्तेत आणण्यात त्या अधिवेशनाचा मोठा वाटा होता. पण सिनेमात ना गोल्फ क्लब दिसलं ना त्या वेळचं अधिवेशन.
मैदानातले ठाकरे शोधत ठाकरे सिनेमा पाहिला. अर्थात शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे हे अडीच तासांच्या सिनेमात दाखवणं तसं अशक्यच. पण हे शिवधनुष्य पेलण्यात संजय राऊत आणि अभिजित पानसे यशस्वी झाले.
माझ्या लहानपणी पाहिलेले आक्रमक, सावळे आणि दाढी ठेवणारे शिवसैनिक सिनेमात दिसले. शिवसेनेच्या पाटीवर जसा आक्रमक वाघ असतो अगदी तसेच शिवसैनिक या सिनेमात घेण्यात आले. शिवसेनाप्रुखांचा आक्रमकपणा, विनोदीपणा आणि हजरजबाबीपणा या सिनेमात पाहायला मिळाला.
नागपूरच्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांना निडरपणे सामारे जाणारे शिवसेनाप्रमुख पाहताना अंगावर रोमांच उभं राहिलं. तर समुद्राकडे धाव घेणा-या चिमुरडीच्या आईला, मुलीला पोहायला शिकवलं का ? असं विचारताना शिवसेनाप्रमुखांचा मिश्किलपणा पुन्हा आठवला. दंगल, आणीबाणी, बॉम्बस्फोट हे सर्व प्रसंग सिनेमात पाहताना, प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होतो.
दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी पडद्यावर पाहायला मिळाले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ही मंडळी जर शिवसेनेत असती तर त्यांनाही पडद्यावर मोठं स्थान मिळालं असतं. आणि अजून एक भुजबळ, राणे यांची आता जी अवस्था झालेली आहे, ती अवस्था ते जर शिवसेनेत असते तर झाली नसती. हा सुद्धा 'ठाकरे' महिमा म्हणायला हवा. #संगो

Thursday, January 24, 2019

नवी इंदिरा, जुनी काँग्रेस !

प्रियंका गांधी वाड्रा यांच्या रूपानं काँग्रेसची नवी इंदिरा राजकारणाच्या मैदानात उतरलीय. गांधी कुटुंबाची पाचवी पिढी राजकारणात आलीय. भाजपच्या आव्हानामुळे जिंकण्याचं मोठं आव्हान असताना काँग्रेसनं हा शेवटचा डाव खेळलाय. काँग्रेसची ही नवी इंदिरा युवा वर्गाला आकर्षित करून पक्षाला जिंकवून देणार का ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 प्रियांका गांधी वाड्रा आणि इंदिरा गांधी यांच्यातलं साम्य हिच काँग्रेसची सर्वात मोठी शक्ती आहे.इंदिरा गांधींचा चेहरा आणि प्रियंका गांधीचा चेहरा यांच्यात विलक्षण साम्य आहे. दोन्ही नेत्यांचे टेपोरे डोळे बोलके आहेत. दोघांचे धारदार नाक आणि दातांची ठेवणही सारखीच आहे. इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या केसांची स्टाईलही सारखीच आहे. प्रियंका गांधीत इंदिरा गांधींची सर्व छबी पाहायला मिळते. 
इंदिरा गांधींना जनतेत मिसळून संवाद साधायला आवडायचं. प्रियंका गांधी वाड्रा याही अनेकदा जनतेत मिसळून संवाद साधताना दिसतात.
राहुल गांधींची उत्तर प्रदेशातली कोंडी फोडण्यासाठी प्रियंका यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आलीय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला सपा आणि बसपानं किंमत दिली नव्हती. या दोघांनी काँग्रेससाठी फक्त दोन जागा सोडल्या होत्या. http://santoshgore.blogspot.com/?m=1
ईस्टर्न युपीची जबाबदारी प्रियंका गांधींकडे देण्यात आलीय. हा भाग बिहारला लागून आहे. या ठिकाणी काँग्रेसचा एकही खासदार नाही. त्यामुळे इथं जिंकलेली प्रत्येक जागा हे काँग्रेस आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचं यश असेल. 
एकंदरीतच काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या आधी ही मोठी खेळी खेळलीय. प्रियंकाच्या एन्ट्रीचा काँग्रेसला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण देशात 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार आहेत. महाराष्ट्रात 26 लाख तरूण मतदारांची भर पडली आहे. या युवा मतदाराला इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा प्रियंका गांधी वाड्रा यांच्या रूपातला चेहला नक्कीच आश्वासक वाटू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तर ऍडव्हान्टेज काँग्रेस, असं चित्र निर्माण झालंय. http://santoshgore.blogspot.com/?m=1
1980 मध्ये काँग्रेस पक्ष आजच्या सारखाच अशक्त झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसला तारलं होतं. आता 2019 मध्ये पुन्हा तेच मॅजिक प्रियंका करतील का हा प्रश्न आहे. आणि तसं झालं तर राहुल गांधींपेक्षा प्रियंकांचं वजन वाढणार हे नक्की. 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या त्यावेळी त्यांना मोरारजी देसाईंनी गुंगी गुडिया म्हटलं होतं. पण याच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा निकाशा बदलून टाकला. बांग्लादेश युद्ध जिंकल्यानंतरही 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. देशात वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली.12 जून 1975 मध्ये इंदिरांची खासदारकी अलाहाबाद उच्च न्यायालयानं रद्द केली. दुसरीकडे जयप्रकाश नारायणांचं आंदोलन परमसीमेवर पोहोचलं होतं. राजकीय अराजकतेतून इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. त्यानंतर 1977 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली. काँग्रेससाठी तो अत्यंत वाईट कालखंड होता. http://santoshgore.blogspot.com/?m=1
तशीच परिस्थिती सध्याही आहे. लोकसभेत काँग्रेसचे अवघे 44 खासदार आहेत. मागील पाच वर्षात काँग्रेसला अल्प यश मिळालं. इंदिरा गांधींनी जशी फिनिक्स भरारी घेतली होती, तशीच कामगिरी करण्याचं आव्हान आता प्रियंका गांधींच्या समोर असणार आहे.
मात्र प्रियंका यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, ते रॉबर्ट वाड्रा यांच्यावर होणा-या आरोपांचं. कारण हेच विरोधकांच्या हातातलं मोठं शस्त्र आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने 2008 मध्ये एक पैसाही न खर्चता जमिनीच्या व्यवहारातून 50 कोटी कमावल्याचा आरोप आहे. तर तीच संपत्ती 2012 मध्ये 300 कोटींची झाली. अशोक खेमका या माजी सनदी अधिका-यानं हरियाणातल्या तत्कालीन काँग्रेस सरकारचा 20 हजार कोटींचा जमीन घोटाळा समोर येऊ शकतो, असा दावा केला होता.
आता प्रियंका गांधी वाड्रा या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्यार झालेले हे विविध आरोप पुन्हा नव्यानं होतील. नव्हे तर त्यांचा वेग वाढेल. नवनव्या चौकशींना सामोरं जावं लागेल. एकंदरीतच प्रियंका यांचं स्वागत जरी दणक्यात झालं असलं तर पुढची वाटचाल तितकी सोपी नाही. हे ही तितकंच खरं. #संगो