Sunday, February 14, 2016

असुरक्षित भारत !


जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये देशाच्या विरोधात झालेली घोषणाबाजी, अफजल गुरू आणि मकबूल भटचा शहीद असा केलेला उल्लेख हा आगामी काळात देशात यादवी माजू शकते याचीच चिन्हं म्हणावी लागतील.
जेएनयूत अफजल गुरूसाठी झालेल्या कार्यक्रमाला  पाकिस्तानातला दहशतवादी हफीज सईदचा पाठिंबा होता. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिलीय. त्यामुळे जेएनयूतल्या राष्ट्रद्रोह्यांचे धागे-दोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले असल्याचं स्पष्ट होतं. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे.
श्रीनगरमध्ये दर शुक्रवारी युवक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतात. तिथं पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. मात्र आपले जवान त्या देशद्रोह्यांवर फक्त अश्रूधुराचा मारा करतात. यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रद्रोही शक्तींची हिंमत वाढत चालली आहे. श्रीनगरमधल्या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या असत्या तर, जेएनयूमधली पाकिस्तान धार्जिणी पिलावळ वळवळली नसती. अफजल गुरू आणि मकबूल भटचे फोटो खुलेआमपणे मिरवले नसते. "काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी", अशी घोषणा देण्याची हिंमत झाली नसती.
देशद्रोह्यांची हिंमत अशीच वाढत गेली तर देशात सशस्त्र उठाव होण्याची भीती नाकारता येत नाही.
विद्यापीठांमध्ये राष्ट्रद्रोही कार्यरत आहेत. यावरून राष्ट्रद्रोह्यांची संख्या किती वाढली आहे, याचा अंदाज करता येतो. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची तर ही भारतातली मोठी 'संपत्ती'च म्हणावी लागेल. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर, त्यांना साथ देण्यासाठी हेच राष्ट्रद्रोही पुढे सरसावणार नाहीत हे कशावरून ? नाही तरी त्यांनी दिलेली, "भारत की बरबादी तक जंग चलेगी" ही घोषणा तेच सांगते. भारतापुढे मोठं भीषण संकट उभं ठाकलेलं आहे. राष्ट्रद्रोही, देशाच्या एकात्मतेवर उठलेले (काही) पुरोगामी, देशातल्या अतिरेकी संघटना, त्यांचे स्लीपर सेल, अतिरेक्यांचे समर्थक, नक्षलवादी, माओवादी, बांगलादेशातून आलेले घुसखोर, ईशान्य भारतात वाढलेले बांगलादेशी या सर्व भारतविरोधी  शक्ती उठाव करण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
भारतात नेहमी घातपाती कारवाया करणारा पाकिस्तान या सर्वांना साथ देतोच आहे. कारण या देशाचे तुकडे करणे हा पाकिस्तानचा हेतू लपलेला नाही. आणि देशातच निपजलेल्या राष्ट्रद्रोह्यांनाही देशाचे तुकडेच करायचे आहेत. राजकीय पक्षांमधले मतभेदही पाकिस्तानच्या पथ्यावरच पडणारे आहेत. जेएनयूमध्ये गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चकार शब्दानंही अफजल गुरूचा उदोउदो करणारे, देशविरोधी घोषणा देणारे यांचा निषेध केला नाही. ही बाबही सर्व देशवासियांना धक्का देणारी होती.
ज्या देशात अफजल गुरू, मकबूल भट, इशरत जहाँला शहीद संबोधणारी औलाद पैदा होते, त्या देशाचा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे, असं म्हणता येईल का ?

Friday, February 12, 2016

जेएनयूतले राष्ट्रद्रोही


"काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी‘...ही घोषणा पाकिस्तानात नव्हे तर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खुलेआमपणे देण्यात आली. ‘द कंट्री विदाउट ए पोस्ट ऑफिस’ या शिर्षकाखाली जेएनयूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा दावा विद्यार्थी करत होते. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाची झूल पांघरूण देशविरोधी वक्तव्य तिथं केली गेली. त्यासाठी मुहूर्त निवडला गेला होता तो, 9 फेब्रवारीचा. याच दिवशी तीन वर्षांपूर्वी अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आलं होतं. अफजल गुरू हा भारतीय न्यायव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच ही राष्ट्रद्रोही मंडळी थांबली नाही. 'अफजल हम तुम्हारे अरमानो को मंजिलों तक पहूँचायेंगे', अशी घोषणाबाजी करून संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची गर्भित धमकीच देण्यात आली.
 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भटला फासावर लटकवण्यात आलं होतं. भारतीय विमानाचं अपहरण, ब्रिटनमधल्या भारतीय उच्चायुक्तातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या यात मकबूल भटचा सहभाग होता. तर संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरू दोषी होता. मात्र या दोन्ही दहशतवाद्यांचं उदात्तीकरण सुरू होतं.
भारत सरकार देत असलेल्या निधीतून हे विद्यार्थी जेएनयूमध्ये शिक्षण घेतात. हा निधी सामान्य जनतेनं दिलेल्या कराच्या रूपातून येतो. आणि घेतलेल्या या शिक्षणाचा वापर हे विद्यार्थी देशाच्या विरोधात करतात, असंच यातून स्पष्ट होतं. भारतीयांच्या पैशावर पोसलेली ही औलाद आता देशाच्या विरोधातच गरळ ओकू लागली आहे. विद्यापीठ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं ठिकाण होय. मात्र या ठिकाणी तर चक्क राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र येत असल्याचं चित्र आहे. सियाचीनमध्ये सीमेचं रक्षण करताना बर्फाखाली गाडले गेलेले हणमंतप्पांवर दिल्लीत त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत होते. तर दुसरीकडे फ्रीडम ऑफ स्पिचच्या नावाखाली जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत होती. या असल्या राष्ट्रविरोधी शक्तींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ज्यामुळे नंतर कोणी अशी हिंमत करण्याचं स्वप्नही पाहणार नाही.