Friday, December 30, 2011

असे पाहुणे येती...

'पाहुणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहुणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहुणे म्हणून जातोचना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.
मात्र आज इथं या ब्लॉगवर 'गेस्ट एडिटर' विषयी लिखाण करण्यात आलं आहे. वृत्तपत्रांमध्ये गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच रूजलेली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि त्यातही मराठीमध्ये झी २४ तासनं गेस्ट एडिटरच्या माध्यमातून नेत्यांमधील संपादकीय गुण प्रेक्षकांसमोर आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नेत्यांचा दररोजच पत्रकारांबरोबर संबंध येत असतो. राजकीय नेत्यांच्या विविध भूमिकांवर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून अनेकदा सडकून टीकाही होत असते. नेते मंडळेही 'माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', हे वाक्य अनेकदा टोलवून देत असतात. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेते यांचं नातं हे, 'तुझं माझं जमेना आणि....' या प्रकारातलं असतं.
मी नोकरी करत असलेल्या झी २४ तासनं गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय केली आहे. आतापर्यंत झी २४ तासमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही दिग्गज मंडळी गेस्ट एडिटर म्हणून आले आहेत. नेते असलेली ही मंडळी उत्तम संपादकही आहेत, हे या निमीत्तानं जवळून पाहता आलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कामकाज चालतं तरी कसं ? याची उत्सुकता नेत्यांच्या मनात असते. इनपुट, आऊटपूट, व्हीसॅट, स्टुडिओ, पीसीआर पाहताना त्यांच्या चेह-यावरील जिज्ञासेचे भाव बरंच काही सांगून जातात.

एखादी बातमी कशी प्रझेंट करावी याची जाणही नेत्यांना आहे. संपादकीय बैठकीत विविध बातम्यांवर चर्चा करताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकारितेतली माहिती अपडेट असल्याचं लक्षात आलं. उद्धव ठाकरेंनी संपादकीय बैठकीत शेती आणि शेतक-यांच्या आंदोलनाच्या बातम्यांना प्राधान्य दिलं होतं. तर शरद पवारांनी एका नेत्याच्या 'कारनाम्याची' बातमी जर VISUELS असतील तर हेडलाईन करा असं सांगत सगळ्यांचीच विकेट काढली. राज ठाकरेंनी घेतलेल्या मोहन भागवतांच्या भेटीचं विश्लेषणही त्यांनी खास त्यांच्या शैलीत केलं. कधी - कधी मित्र पक्षांना धक्का देण्यासाठी मीही मातोश्रीवर बाळासाहेबांकडे जात असतो, असं सांगत त्यांनी राजकारणाचा कानमंत्रही दिला.
वरील सर्व नेत्यांबरोबर ऑफिसमधल्या सर्व स्टाफला संवाद साधता आला. या नेत्यांनीही दिलखुलासपणे कोणताही पडदा न ठेवता सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्याचा अनुभव या निमीत्तानं सगळ्यांनाच आला. गेस्ट एडिटर येणार म्हटल्यावर सगळेच आपापले प्रश्न घेऊन तयार असतात. कौटुंबिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न गेस्ट एडिटरला विचारले जातात. राज ठाकरेंची बेधडक शैली, उद्धव ठाकरेंची लपवाछपवी न करता सत्यच सांगण्याची शैली पुन्हा एकदा सर्वांना पाहता आली.
शरद पवारांसारखा राज्य आणि देशातल्या राजकारणावर छाप असणारा नेता या निमीत्तानं जवळून पाहता आला. गेस्ट एडिटर म्हणून त्यांच्यात असलेले पत्रकारितेचे गुणही सगळ्यांना कळाले. कृषी, क्रीडा, राजकारण, सहकार या सारख्या विविध विषयांचा शरद पवारांचा मोठा अभ्यास आहे. परिणामी त्यांना विचारण्यासाठी प्रत्येकाकडे किमान तीन - चार प्रश्न होतेच. अर्थात सगळ्यांचे एवढे प्रश्न जर विचारले गेले असते तर गेस्ट एडिटरला मुक्कामच ठोकावा लागला असता. अर्थात जे प्रश्न विचारले गेले त्याची शरद पवारांनी सविस्तर उत्तरं दिली. त्यांचा शेतीवर असलेला अभ्यास मनाला भावला. शेतक-यांनी फक्त कापूस आणि ऊसाऐवजी इतर पिकांचाही विचार करावा असा पर्याय त्यांनी सुचवला. सहकार, कारखानदारी, राजकारण यातल्या सगळ्याच, काही खोचक प्रश्नांनाही गेस्ट एडिटर असलेल्या शरद पवारांनी उत्तरं दिली.
य़शवंतराव चव्हाण यांचा वाचनाचा व्यासंग किती दांडगा होता हे, या निमीत्तानं सगळ्यांना कळालं. जगात गाजणारं कोणतंही इंग्रजी पुस्तक हे यशवंतरावांनी वाचलेलं असायचं. तब्बल पंधरा हजार ग्रंथ यशवंतरावांच्या संग्रही होते. विदेशातल्या अनेक परराष्ट्रमंत्र्यांबरोबर त्यांची मैत्री होती. जगातल्या सर्वात्तम पुस्तकांवर यशवंतराव चव्हाणांची विदेशातल्या बड्या हस्तींबरोबर चर्चा व्हायची.
अशी दिलखुलास मुलाखत सुरू असताना शरद पवारांचे दिलदार मित्र बाळासाहेब ठाकरे यांचा विषय चर्चेत येणं सहाजिकच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची मैत्री, शिवसेनेचा उदय, गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्यांना शिवसेनेनं दिलेली प्रतिष्ठा यावर शरद पवारांनी सांगितलेल्या आठवणी मनात घर करून राहणा-या आहेत. दोन मित्रांमधला हा जिव्हाळा पुढच्या पिढीत तितकासा उतरलेला नाही, ही 'जनरेशन गॅप'ही त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. अर्थात पुढच्या पिढीत तितका जिव्हाळा नसला तरी त्यांच्यात मैत्री असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय विचारसरणीबद्दल मतभेद आहेत. मात्र त्यांचा दिलदारपणा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेली मैत्री आताच्या राजकारणात दुर्मिळ असल्याचं सांगत पवारांनी सध्याचं राजकारण कसं गढूळ झालंय हे ही दाखवून दिलं. सुप्रिया सुळे पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक लढवत असताना शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. मित्राची मुलगी राजकारणात येत आहे, म्हटल्यावर शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवार दिला नाही, ही आठवण शरद पवारांनी सांगितल्यावर या दोन्ही नेत्यांमधली मैत्री किती निरपेक्ष आहे, हेच पुन्हा सिद्ध झालं. राजकारणात वैयक्तीक प्रहार न करताही मैत्री जपता येते, हेच या दोन मित्रांकडे पाहून लक्षात येतं. अर्थात हे जर इतर नेत्यांच्या लक्षात आलं तर, राज्यातलं राजकारण स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

Thursday, December 8, 2011

ती गाणी, ते दिवस !

गाणी, ही जवळपास प्रत्येकालाच आवडतात. गाण्याला भाषेचंही बंधन नाही. सुश्राव्य वाटणारी गाणी अर्थ माहित नसली तरी ती गुणगुणली जातात. सध्या गाजत असलेले 'कोलावरी डी' हे गाणंही असंच लोकप्रिय झालं आहे. हैदराबादमध्ये नोकरीला असताना अनेक तेलुगु चित्रपट पाहिले. वर्षम, मल्लेश्वरी, घर्षणा या चित्रपटातील गाणी आजही माझ्या ओठांवर आहेत.
मात्र माझ्या हृदयाला स्पर्श करणारी गाणी होती ती आशिकी चित्रपटातली. 1990 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मी आठवीत होतो. संभाजीनगरमध्ये रॉक्सी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्या चित्रपटाचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सात शो लावण्यात आले होते. तरूणाईनं हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. आता मी आठवीत म्हटल्यावर काही तरूण नव्हतो. पण तारूण्याच्या जवळपास जायला सुरूवात झाली होती. आशिकी प्रमाणे सात शो लागण्याचं भाग्य नंतर साजन आणि माहेरची साडीच्या वाट्याला आलं होतं.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आशिकी चित्रपटातली गाणी जणू काही प्रेमग्रंथच होता. अर्थात हा चित्रपट तेव्हा मी थिएटरमध्ये पाहिला नव्हता. अर्थात कोणत्या वडलांना मुलांनी अशी थेरं पाहणं आवडलं असतं ? पण तेव्हा दूरदर्शनवरील चित्रहारमध्ये दर बुधवारी आशिकीतलं एकतरी गाणं लागायचंच. त्यावेळी केबल आणि खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. त्यामुळं बुधवारी चित्रहारमध्ये दाखवलेली गाणी
दुस-या दिवशी सगळ्यांच्या ओठांवर असायची. शाळेत जाताना बसपासून ते वर्गामध्येही तीच गाणी म्हटली जायची.
आशिकीतल्या गाण्यांमध्ये काय नव्हतं ? प्रेमात पडलेला, प्रेमभंग झालेला, प्रेमात पडू पाहणारा या सर्वांना भावतील अशी गाणी त्यात होती. 'जाने जिगर जानेमन' हे गाणं तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. याच गाण्याबरोबर चित्रपटातली इतर गाणी आजही हृदयाच्या गुलाबी कप्प्यात कस्तूरी प्रमाणं जपून ठेवली आहेत. जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही. तशीच या चित्रपटातली गाणी मनातून जात नाहीत. प्रेमभंग झालेल्यांसाठी 'मैं दूनिया भूला दूँगा तेरी चाहत में' हे गाणं विशेष होतं. अर्थात माझा कोणताही प्रेमभंग झालेला नव्हता, हे माझ्या विघ्नसंतोषी मित्रांसाठी आधीच नमूद करून ठेवत आहे. नाही तरी पत्रकारांना कशात काही नसताना, काही तरी असल्याचा वास येत असतो, म्हणून खुलासा केलेला बरा. अर्थात याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मला खात्री आहे. कारण 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या...'
चला वरील मुद्दा बाजूला ठेऊन अजून थोडं मागं जाऊ या. आशिकीच्या आदल्या वर्षी प्रदर्शित झालेला रामलखन आणि त्याच्या आधी 1988 मधल्या तेजाबच्या गाण्यांनीही चांगलाच मनाचा ठाव घेतला होता.
तेव्हा तर स्वत:चं नाव सांगता येत नसणा-या मुलांच्या तोंडून माधूरीचं 'एक दो तीन...' हे गाणं हमखास ऐकायला मिळायचं. आशिकी चित्रपटानंतर सडक आणि साजन चित्रपटातल्या गाण्यांनीही मनात चांगलंच घर केलं होतं. दहावीला जाईपर्यंत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अर्थात साजन चित्रपट काही थिएटरमध्ये पाहता आला नव्हता. तो चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर पाहिला होता. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर चित्रपट पाहण्याची गंमत या पिढीतल्या मुलांना आणि तरूणांना कशी कळणार म्हणा ? याच प्रकारचं वाक्य माझ्या वडलांच्या तोंडी असायचं. ते म्हणतात गणेशोत्सवातल्या मेळ्यांची मजा तुम्हाला काय कळणार ? माझा मुलगा मोठा झाल्यावर गणेशोत्सवातली कोणती मजा सांगेल ? हे त्या गणेशालाच माहित.
मात्र शाळेत असताना सडक चित्रपट मात्र मी थिएटरमध्ये पाहिला होता. शाळेच्या सहलीसाठी वडलांनी खर्चण्यासाठी तब्बल 70 रूपये दिले होते. त्यातले मी फक्त 30 रूपये खर्च केले. मग सहलीवरून आल्यावर मी आणि माझा लहाना भाऊ रवींद्रनं बाल्कनीचं तिकीट काढून संभाजीनगरातल्या अंबा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला. तेव्हा बाल्कनीचं तिकीटही पंधरा रूपये होतं. मग उरलेल्या दहा रूपयात इंटरव्हलमध्ये वडापाव खाऊनही काही पैसे उरले होते.
शाळेनंतर महाविद्यालयीन जीवन सुरू झालं. तेव्हाही अनेक चित्रपट पाहण्यात आले. त्यातली अनेक गाणी ऐकली, गुणगुणली. मात्र आजही मनावरून आशिकी, सडक आणि साजन मधली गाणी पुसली जात नाहीत. त्यातही आशिकीतल्या गाण्यांचा मनावर मोठा पगडा कायम राहिला आहे. प्रेमात पडलेल्यांचा तो प्रेमग्रंथ आजही माझ्या मनात तसाच जपून ठेवला आहे. त्या प्रेमग्रंथातली पानं कधीही निवांत क्षणी चाळली जातात. त्या आठवणीत मन हरपून जातं. अर्थात याचा कुणाला पत्ताही लागत नाही. आपल्या आठवणी या आपल्या साठीच असल्यावर त्याचा कुणाला पत्ता लागण्याची गरजच काय ?