Monday, December 7, 2015

चहा आणि मी !

पहिलं प्रेम सगळ्यांना आठवतं. मात्र पहिला चहा कधी प्यायलो हे कोणालाही आठवणार नाही. मलाही आठवत नाही. पण बहुतेक दुधाचे दात पडल्यानंतर चहाच्या बशीला तोंड लावलं असण्याची शक्यता आहे. प्रत्येक पालकांना त्यांचं मुलं गुटगटीत असावं असं वाटतं. त्यामुळे चहा पिऊ नये, हे बिंबवलं जातं. बोर्नव्हिटा टाकून दिलं जाणारं दूध मी लहानपणी प्यायचो. अर्थात त्यामुळे माझी प्रकृती काही सुधारली नाही. पण बोर्नव्हिटाचा खोटेपणा उघड झाला. बोर्न असताना आपण जे असतो तेच खरं, बाकी व्हिटा-बिटाचं काही खरं नसतं.
लहानपणी कोणाच्या घरी गेल्यावर चहा प्यायचा नाही, असं बजावून सगळे बाहेर पडायचो. मी कितीही आग्रह केला तरी चहा घ्यायचो नाही. मात्र माझा लहाना भाऊ नाही-नाही म्हणत बशी ओढायचा. अर्थात घरी आल्यानंतर त्याला त्याच्या चहाकर्माची फळं मिळायची.
सहावीत असताना मी चहा तयार करायला शिकलो. आमच्या शेजारी राहणा-या गरड काकू, जाधव काकू, बनकर काकू आईकडे गप्पा मारायला यायच्या. मी त्यांना चहा करायचो. काकू मंडळीही 'संतोष चांगला चहा करतो', असं म्हणायच्या. मग मी अधिक उत्साहाने विलायची, अद्रक टाकून मस्त चहा करायचो. कधी-कधी गवती चहाही टाकायचो. आमच्या छोट्या गल्लीत माझं मोठं नाव झालं.
सकाळी शाळेत जाताना थंडीत आईने करून दिलेल्या चहाची चव आजही आठवते. शाळेत असताना पॉकेट मनी ही संकल्पना आमच्या घरात रूढ झालेली नव्हती. परिचितांपैकी कोणाकडेही तसले फॅड नव्हते. त्यामुळे कधी तरी मिळालेले पैसे वाचवून हिवाळ्यात शाळे शेजारच्या टपरीवर चहा पिताना भारीच मजा वाटायची. साधारणपणे आठवी-नववीत असताना बाहेरचा चहा सुरू झाला.
अकरावीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या कॅन्टीनवर नियमीतपणे चहा घ्यायला सुरूवात झाली. मात्र चहाचं बिल कोणी द्यायचं यावरून बराच वेळ मित्रांची वादावादी व्हायची. चहाच्या चवीबरोबर गप्पा रंगत जायच्या. आता कॉलेजमध्ये कोणत्या गप्पा रंगतात त्याचा उल्लेख न करताही तुन्हाला ते कळेलच. मित्रांबरोबर फिरताना शहरात कोणत्या ठिकाणी चहा चांगला मिळतो हे ही कळायला लागलं. कधी-कधी जालन्याला माझा मित्र संभाजी शिरसाठकडे जाणं व्हायचं. तोही अट्टल चहाबाज. जालन्यातल्या सर्व फेमस ठिकाणी चहा घेण्याचा योग आला. अमरावतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने चहाची सर्व चांगली ठिकाणी पादाक्रांत करून चहाचा आस्वाद घेतला. अर्थात या कामात आशिष यावलेची मदत झाली. आशिष चहा घेत नव्हता, मात्र चहा कुठे चांगला मिळतो हे त्याला माहित होते. एक सांगतो, गावाकडे गेल्यानंतर चुलीवर जो चहा केला जातो त्या चहाची लज्जत काही औरच.
चहा हा चहाच असतो. मात्र घरचा चहा वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा सर्वात वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा चहा म्हणजे कधीतरी चांगला होणार चहा असंच म्हणावं लागेल. मला वाटतं सर्व ऑफिसमध्ये असाच अनुभव येत असेल. चहा सर्वत्र मिळतो पण त्या ठिकाणानुसार त्याची चव बदलते. वाईट अनुभव येतो तो रेल्वे प्रवासात मनमाडला. दरवेळी तिथला तोंडाची चव बिघडवणारा चहा मी नव्या उत्साहानं घेतो, आणि तो चहा दरवेळी माझा उत्साहघात करतो.
मुंबईतही अनेक ठिकाणी चहा घेतला. पण चिंचपोकळी परिसरात गवतीचहा आणि अद्रक टाकून तयार केलेला जो चहा मनाला भावला तसा चहा मुंबईत इतरत्र कुठेही मिळाला नाही. आणि हो मी अजूनही घरी रोज चहा करतो. मुंबईत प्रतीक्षानगरला आलात तर घरी या. मग आपण चहा घेऊ.

Sunday, November 29, 2015

चहा, आमीर, माहेर





मुलगा रोज सकाळी साडेआठ वाजता शाळेत जातो. तसा साडेसात वाजता एक चहा होतो. पण तो घाई-गडबडीतला चहा. चहा पिणं ही सुद्धा एक शास्त्रोक्त कला आहे. त्यामुळे मुलगा शाळेच्या स्कूल बसमधून रवाना झाल्यानंतर दुसरा चहा घेणं क्रमप्राप्त ठरतं. चहाचे घोट घेताना पेपरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या बातम्या वाचणंही सुरूच असतं. कितीही असहिष्णुतेची चर्चा असली तर पेपर वाचतोच. आमीर खानची पत्नीही पेपरमधल्याच बातम्या वाचून बेचैन झाली होती. ती मग आमीरला मुलांच्या सुरक्षिततेसाठी परदेशात जाऊ या का, असं म्हणाली. मग काय एकच गदारोळ उडाला.
घरातली गोष्ट बाहेर येऊ द्यायची नसते, या उक्तीचा प्रत्यय आमीरला (माहित असेल तर) आला असेल. संसारात झाकली मूठ महत्त्वाची असते. तसं पाहिलं तर हा आमीरचा दुसरा संसार. मोठा माणूस म्हटल्यावर संसाराची संख्याही वाढत जाऊ शकते. अर्थात तो काही नियम नाही. पण कितीही संसार झाले तरी पतीनं शांतपणे ऐकून घ्यावं आणि बाहेर बोलू नये, हे संसारातलं शाश्वत सत्य.हे सत्य मला पहिल्याच संसारात कळालं. 

त्यामुळे मी पत्नीला विचारलं, पेपरमधल्या बातम्या वाचून तूझं मत काय ? तेव्हा पत्नी म्हणाली, मुख्य पेपरला लगेच हात लावायचाच नाही. आधी पुरवणी वाचा. सखी, मैत्रीण, सई टाईपच्या पुरवण्या वाचा. मग विवा, आरोग्याचा ओवा वाचा. त्यानंतर हॅलो, टुडे सारखं इंग्रजी शिर्षक असलेलं काही तरी वाचा. त्यानंतर मुख्य पेपर वाचा आणि लगेच कामाला लागा. कारण पेपर काढणं हा एक बिझनेस आहे. तुम्ही नाही का चॅनेलमध्ये बुलेटिन काढता तसं. मग काय चहाने नाही, पण पत्नीच्या बोलण्याने किक बसली.
स्वत:ला सावरत पत्नीला विचारलं, या वातावरणात देश सोडून जावं असं तुला वाटतं का ? त्यावर पत्नी म्हणाली, फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी नेत जा. सामान्य पत्रकाराची सामान्य पत्नी.

Friday, October 30, 2015

युतीला सत्ता कळेना ? (अचूक मारा - 5)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्ष राज्यावर सत्ता गाजवली. त्यांच्यातही धुसफूस सुरू असायची. अनेक वादाचे प्रसंग यायचे. मात्र किती ताणायचं आणि कधी सोडायचं यात आघाडीवाले बनेल होते. यात वादच नाही. पंधरा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे सरकारच्या विरोधात रान उठवायचे. मात्र आता सत्ता आल्यावर हे दोघे सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.
वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारलाच रस्त्यावर आणण्याची भाषा केली आहे. भाजपचे मंत्री वर्षपूर्तीच्या सोहळ्यात रंगलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपचा रंग खरडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अर्थात याला भाजपचे बनेल नेतेही कारणीभूत आहेतच. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. या यशानं उत्साहित झालेल्या भाजपनं राज्यातली शिवसेने बरोबरची युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपनं स्वबळावर 122 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीनंही आश्चर्यकारकरित्या राज्यात स्थिर सरकारची भाषा सुरू केली. त्यामुळे 63 जागा मिळवूनही शिवसेनेला किंमत मिळाली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेचा चांगलाच राजकीय गेम केला. मुख्यमंत्र्यांबरोबर फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला. नंतर विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. त्यातही हवी ती खाती मिळाली नाही. मंत्र्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली. यामुळे शिवसेना दुखावली गेली. शिवसेनेची धुसफूस सुरूच राहिली. वाढत्या महागाईमुळे जनतेतही सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आपण सरकारपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली. त्या बरोबरच गुलाम अलींच्या मैफलीला विरोध, पाकिस्तानी कलाकारांना विरोध, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक ही जुनी विरोधाची हत्यारं बाहेर काढून भाजपचा होईल तितका मूखभंग करणंही शिवसेनेनं सुरूच ठेवलं. सरकारमध्ये दिलेला अल्प वाटा, वारंवार करण्यात आलेला अपमान याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावर आणण्याचा इशारा दिल्याचं स्पष्टच आहे.  आता खरंच कोण कोणाला रस्त्यावर आणतं हे लवकरच स्पष्ट होईल.

Monday, October 12, 2015

'शाई'चे राजकीय रंग

शिवसेनेनं सुधींद्र कुलकर्णींवर शाई टाकून जोरदार सुरूवात केली. दणादण ब्रेकिंग न्यूज, त्यावरील प्रतिक्रिया, फोनो, लाईव्ह सुरू झाले. आता खुर्शीद कसुरींचं पुस्तक काही प्रकाशित होत नाही, असं वाटायला लागलं. धावती मुंबई थांबते की काय, असं वाटलं. मात्र दिवस जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतशी परिस्थिती बदलत गेली. शिवसेना विरोध कायम असल्याचं सांगत होती. मात्र दिवस मावळताना खुर्शीद कसुरींचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णींनी, शिवसेनेला खडे बोलही सुनावले. मुंबई महाराष्ट्रीय आहे. तसंच मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असल्याचहीं सांगितलं. गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपनंही वचपा काढत, मुंबईत दणक्यात कार्यक्रम होऊ दिला. शिवसेनेनं कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध ही आंतरराष्ट्रीय बातमी ठरली. मात्र त्याला स्थानिक राजकारणाचे पदर आहेत, हे त्यामागील सत्य आहे.
आता हे ही खरं आहे की, सीमेवर जवान शहीद होतात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येतात. तेच दहशतवादी देशात बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय नागरिक ठार होतात. दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा मिळतो. काश्मीरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन देतो. दर शुक्रवारी श्रीनगरमध्ये नमाजनंतर भारताचा झेंडा जाळला जातो. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. जवानांवर दगडफेक केली जाते. हे सगळं खरं असलं तरीही पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारणं गरजेचं आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे नागरिक, कलाकार भारतात येणंही गरजेचं आहे.
आता शिवसेनेनंही थोडा विचार करावा. अर्थात शिवसेनेची पाकिस्तानच्या विरोधातली भूमिका काही नवी नाही. मात्र त्यात सातत्य दिसत नाही. कित्येक पाकिस्तानी कलाकार या मुंबईत येतात. चित्रपट, सिरीअल, लाफ्टर शोमध्ये सहभागी होतात. अदनान सामीला तर त्याचा देश पाकिस्तान आहे, हे सुद्धा आठवतं का ? अशी शंका येते. कित्येक पाकिस्तानी क्रिकेटर्स मुंबईत येत असतात. विरोध करायचाच असेल तर तो सगळ्यांनाच करा, नसता कोणालाच करू नका.

खमंग फोडणी - भारत आणि पाकिस्तानमध्ये एवढी कटुता असली तरी पाकिस्तानी नागरिकांचा ओढा भारताकडेच आहे. अगदी त्यांच्या दहशतवाद्यांचाही. आपले चित्रपट, सिरीअल त्यांना खुणावत असतात. दहशतवादात जगत असलेल्या पाकिस्तानला त्यामुळे लोकशाहीप्रधान भारत आवडत असावा. नाही तरी किती काही झालं तरी, शेवटी बाप हा बापच असतो. त्यामुळे कार्ट कितीही वाया गेलेलं असलं तरी शेवटी बापाकडेच येतं, हे पाकिस्तानकडे पाहून लक्षात येतं.

Sunday, October 4, 2015

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य' (अचूक मारा - 3)

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य'

एका वेळच्या जेवणाला माणसाला लागतं तरी किती ? अर्थात कोणी किती खावं ? काय खावं ? काय खाऊ नये ? याचा हिशेब करण्याचा या लिखाणाचा हेतू नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पर्युषण पर्वात मांसाहार बंदीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावेळी भाजपचे नेते मांसाहार बंदीसाठी पेटून उठले होते. त्या आधी दुष्काळ दौ-यावर गेलेल्या शरद पवारांचा एक फोटोही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. दुष्काळ दौ-यात सुका मेवा आणि शरद पवार दिसत होते. त्यावरूनही चांगलाच धुराळा उडाला होता. मात्र त्यावेळी हे सभ्यतेला धरून आहे का ? असा सवाल विचारला गेला नव्हता. अर्थात राजकीय नेत्यांनीही परिस्थितीचं भान राखलंच पाहिजे. कारण आता फक्त माध्यमं दाखवतील तीच बातमी राहिलेली नाही. सोशल मीडिया हा सर्वसामान्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे नेतेच काय, तर सगळ्यांनीच सारासार विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली प्लेट आणि समोरच्या टेबलवर खच्चून ठेवलेले विविध खाद्यपदार्थांचा, हा फोटो चांगलाच गाजतोय. सोशल मीडियासाठी हा फोटो खाद्य ठरला नसता तरच नवल. हातात प्लेट धरून बसलेले सीएम, टेबलवरून काकडी उचलत असलेले रावसाहेब दानवे, भरपेट खाल्ल्यानंतर तोंड पुसणारे विनोद तावडे ही मंडळी फोटोत दिसत आहेत. तर टेबलवर मिठाई, सुका मेवा, फळं आणि सलाड मांडून ठेवलेलं आहे. या पदार्थांची संख्या जवळपास 20 हून अधिक आहे. या नेत्यांनी या खाद्याचा समाचार घेतला. तर सोशल मीडियावर या नेत्यांचा समाचार घेणं सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे टायमिंग साधण्यात वाकबगार असलेल्या शिवसेनेनं तर हा फोटो व्हायरल केला नसेल ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतक-यांची विचारपूस करत आहेत आणि सीएमचा हा फोटो, असे एकत्रित फोटोही चांगलेच व्हायरल झालेत. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारे भाजप नेते, आणि शेतक-यांची विचारपूस करणारे उद्धव ठाकरे, हे दोन्ही फोटो बरंच काही सांगून जातात. आता तर कुठे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संग्रामाला सुरूवात झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी सोशल मीडियावरही ही लढाई अजून जोरकसपणे लढली जाईल, यात शंका नाही.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्या आधी भाजपची मुंबई आणि परिसरात भीमरथ यात्रा निघणार आहे. भूमिपूजनाची माहिती या निमित्ताने दिली जाणार आहे. टायमिंग साधण्यात भाजपवालेही काही कमी नाहीत. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मागच्या महिन्यात होणार होता. पण तेव्हा कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तर भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला नसेल ? अशी शंका येते. आता निवडणुकीची घोषणाही झालेली आहे. 11 ऑक्टोबरला भूमिपूजनही होईल आणि मतांची पायाभरणीही होईल.

Monday, September 28, 2015

विविधतेत एकता (अचूक मारा - 2 )

'अचूक मारा' या साप्ताहिक सदराच्या पहिल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर जाण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार पंतप्रधान अमेरिकेच्या
दौ-यावर आहेत. अर्थात तिथे त्यांची जोरदार भाषणबाजीही सुरू आहे. मोदी रविवारी फेसबुकच्या मुख्यालयात गेले. त्यांनी सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. लहान असताना आई उपजीविकेसाठी भांडी घासायची, असं मोदींनी सांगितलं. पण ते जाऊ द्या. कारण मोदींची भाषणं आता भारतात नव्हे विदेशातच जास्त ऐकली जातात.

नरेंद्र मोदी अमेरिकेत असतानाच इकडे गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. वाजतगाजत, डीजेच्या कल्लोळात बेधुंद होत गणरायाला भावुक होऊन कसा निरोप देतात ? हे त्या भक्तांनाच माहित. गणेश विसर्जनाच्या आधी बकरी ईद होऊन गेली. त्यावेळी अनेक ठिकाणी नेहमी प्रमाणे रस्त्यावर नमाज अदा केली गेली. आपल्या देशात विविधतेत एकता आहे, असं जे म्हटलं जातं त्याची प्रचिती आली.
बघा तुमची गणेशोत्सवाची मिरवणूक रस्त्यावर तर आमची नमाजही रस्त्यावरच. तुम्ही सामान्यांना त्रास देता, आम्हीही देतो. दुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाही, आम्ही पण बुरसटलेले. तुम्ही 5 हजार वर्षांपूर्वीच्या प्रथा पाळता, आम्ही पण अरबस्थानातल्या जुनाट प्रथांचं अंधपणे पालन करतो. खरंच विविधतेत एकता म्हणतात ती यालाच. हे विश्व चालवणारी शक्ती खरंच अस्तित्वात असेल तर, यांना अक्कल देण्यासाठी पुन्हा अवतार घे. नको, नको अवतार नको. पुन्हा तुझे नवे भक्त निर्माण व्हायचे. त्यांचा नवा धर्म व्हायचा. इथं आधीच्याच धर्मांनी काय कमी उच्छाद मांडलाय, त्यात पुन्हा नवा धर्म हवाच कशाला. जाऊ द्या, चाललंय ते चालू द्या....एन्जॉय...बाकी काय म्हणता ?

Tuesday, September 22, 2015

काय, चाललंय काय ?

(मित्रांनो, मागील काही दिवसांपासून ब्लगॉवरील नियमीत लिखाणात खंड पडला आहे. मात्र आता दर सप्ताहाला ब्लॉगवरून नियमीतपणे  'अचूक मारा' केला जाणार आहे. त्यात आठवड्यातील (मला वाटलेल्या) महत्वाच्या घटनांवर घणाघात केला जाणार आहे. 'अचूक मारा' हे साप्ताहिक सदर फेसबुकवरही टाकलं जाईल. )

काय, चाललंय काय ? असाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. देशात 'अच्छे दिन' येऊन आता कुठे सव्वा वर्ष झालंय. (सव्वा रुपया दक्षिणा काढा, अशी कोटी मी करणार नाही. कारण सव्वा रुपयासाठीचे 25 पैसे चलनातून बाद झाले आहेत.) पंतप्रधान यथा शक्ती विदेशात जाऊन देशाची गरिमा वाढवत आहेत. पंतप्रधान पुन्हा विदेशात जात आहेत. 23 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर रवाना होत आहेत. आपल्या देशात कितीतरी म्हणजे, अब्जावधींची गुंतवणूक दुसरे देश करत आहेत. अर्थात अजून मूर्त स्वरूपात ही गुंतवणूक दिसलेली नाही. पण दिसेल, लगेच धीर सोडून चालणार नाही. काश्मीरमध्ये दर शुक्रवारी नमाजनंतर पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकत आहेत. लगेच सव्वा वर्षात फुटिरतावादी राष्ट्रीय विचारधारेत येतील, असं म्हणनं ही चुकीचंच म्हणावं लागेल. पण हीच गोष्ट दोन वर्षांपूर्वी घडली असती तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर कोणत्या शब्दात टीका झाली असती ? याचा तुम्हीच विचार करा.
आता सामान्य माणसाच्या हातात फक्त विचार करण्याशिवाय राहिलंय तरी काय म्हणा. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर, त्यांनी सर्वात आधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना हटवण्याची मागणी केली असती. राजनाथसिंहांच्या जागी रामदास कदम यांनाच केंद्रीय गृहमंत्री केलं असतं. नाही तरी रामदास कदम यांना राज्यातलं गृहमंत्री हवंच आहे. त्यांना थेट प्रमोशन मिळालं असतं. शिवसेनाप्रमुखांनीही रामदास कदमांना काश्मीरमधल्या राष्ट्रद्रोह्यांना यमसदनी पाठवण्याचा आदेश दिला असता. कदमांनीही सैन्याला आदेश देऊन, राष्ट्रद्रोह्यांच्या योग्य ठिकाणी गोळ्या घातल्या असत्या. असो.
तरी बरं झालं पाऊस पडला. नाही तर राज्य सरकार हे दुष्काळातच वाहून गेलं होतं. दुष्काळग्रस्त भागात दुष्काळाची दाहकता दिसत होती. पण सरकारचं अस्तित्व दिसत नव्हतं. मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यानं सरकारच्या नाकर्तेपणावर पाणी पडलं.
पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सनातन्यांचं पीकही राज्यात चांगलंच फोफावलंय. विचारांचा प्रतिवाद करण्याऐवजी आता थेट गोळ्या घालण्याचीच आधूनिक पद्धती सनातन्यांनी विकसीत केली आहे. एक मात्र भारी आहे, सनातन्यांना धर्म पुरातन हवा आहे. मात्र माणसं मारण्यासाठी हत्यारं आधुनिक वापरली जातात. पाहा हा विरोधाभास.

Wednesday, July 15, 2015

आमदारांची नाटक कंपनी ते भजनी मंडळ

महाराष्ट्राने रंगभूमीला अनेक गुणी कलाकार दिले आहेत. रंगभूमीवर त्यांनी अजरामर भूमिकाही केल्या आहेत. मात्र या सर्व कलाकार आणि नटांना तोडीसतोड असे नवे नट उदयाला आले आहेत. राज्यात सध्या पाऊस नाही. मात्र पावसाळी अधिवेशनात या नटांचा पाऊस पडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून नेते कम नटांनी त्यांचे अभिनयाचे गुण उधळायला सुरूवात केली आहे. शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी विरोधी पक्षातील आमदार झपाटून कामाला (नाटकाला) लागले आहेत. पंधरा वर्ष सत्तेत असताना शेतक-यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, त्याला स्वस्तात वीज मिळावी, बाजार समितीत होणारी पिळवणूक थांबवावी, व्यापा-यांकडून होणारी लूट थांबावावी या साठी तेव्हा ही मंडळी काय करत होती ? हा प्रश्नच आहे. अर्थात जे काम त्यांना जमलं नाही, ते काम नव्या सरकारनं करावं यासाठी विरोधकांनी आंदोलन करण्यातही काही चूक नाही. पण हे आंदोलन तरी कसं म्हणावं ? कारण त्यात आंदोलन कमी आणि नौटंकीच जास्त दिसत आहे.
गळ्यात घातलेल्या चिक्कीच्या माळा, आमदार कम कलाकारांचा हा उच्छाद पाहून, लोकशाहीच्या
पुजा-यांची नौटंकीच सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. मात्र नेत्यांच्या अदाकारीलाही दाद द्यावीच लागेल. तोंडावर काळं फडकं बांधलेल्या शशिकांत शिंदेंना जितेंद्र आव्हाड चिक्की भरवत होते. ऐ चिकी बोलो चिकी, असा जोरदार डायलॉग आव्हाडांनी लगावला. त्यानंतर एका सहकलाकाराची चिक्की आव्हाडांनी हिसकावून घेतली. ती चिक्की त्यांनी अमिन पटेल यांना विकली. नंतर चिक्की आणि पैसेही हिसकावून घेतले. त्या नंतर त्यांनी जो फिल्मी डायलॉग मारला त्याला तोड नाही. 'हम फेके हुये पैसे नहीं उठाते', आईशप्पथ अमिताभ बच्चन मुंब्र्यात पाणी भरेल असा डायलॉग आव्हाडांनी फेकला.
नौटंकीबाजीनंतर विरोधक उतरले ते भजनावर. कर्जमाफीसाठी सर्व आमदार टाळ कुटत भजन करत होते. सत्ताविरह रसात न्हाऊन निघालेले आमदार भजन करत होते. या भजनी मंडळींनी सत्तेत असताना, शेतक-यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं असतं, तर शेतकरी यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. मात्र असं झालं नाही. त्यामुळे विरोधी पक्षातल्या आमदारांनी नौटंकी आणि भजनं थांबवावीत. शेतक-यांना मदत मिळावी यासाठी सरकारला धारेवर धरावं. पिकमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले तर राज्यातली जनताही विरोधकांची वाहवाच करो

Sunday, May 24, 2015

राजकारणातून करूया पर्यावरणाचे रक्षण !

दिवसेंदिवस तापमानात होत चाललेली वाढ जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. आपल्या देशाचा विचार केला तरी यंदाच्या उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढतं शहरीकरण आणि कमी होत जाणारं वन क्षेत्र यामुळे वातावरणातली उष्णता वाढत चालली आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण ही गरज आहे. मात्र ही गरज भागवताना पर्यावरणाचं होणारं नुकसान भरून काढावंच लागेल.
त्यासाठी देशात मोठ्या संख्येनं वृक्ष लावण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर ही मोहिम हाती घेतली तरी त्याला काही मर्यादा आहेत. मात्र ही मोहिम सर्वच राजकीय पक्षांनी एखादी चळवळ म्हणून हाती घेतली तर, त्याचे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. भाजप हा जगातला सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनला आहे. देशात भाजपचे दहा कोटी सदस्य आहेत. भाजपने त्यांच्या त्या दहा कोटी सदस्यांना प्रत्येकी एक वृक्ष लावून, त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश द्यायला हवा. त्यामुळे एका दिवसात दहा कोटी वृक्ष लावली जाऊ शकतात. काँग्रेसचेही प्रत्येक राज्यात आणि गावागावात कार्यकर्ते आहेत. काँग्रेसनंही त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश दिल्यास, देशभरात कोट्यवधी वृक्ष उभे राहू शकतात. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पुढील दोन महिन्यात या दोन राष्ट्रीय पक्षांनी देशभरात ही मोहिम हाती घेतली तरी त्याचा मोठा फायदा होणार आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी वृक्षारोपणाची मोहिम राबवली तर देशात मोठी पर्यावरण क्रांती होईल यात शंकाच नाही.
अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष बलवान आहेत. तिथेही हा प्रयोग नक्कीच यशस्वीपणे करता येऊ शकतो. महाराष्ट्राचा विचार केल्यास शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं जाळं शहर आणि गावांमध्ये आहे. या सैनिकांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास पर्यावरणासाठीची लढाईही त्यांना लढता येऊ शकेल. आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे सर्वच राजकीय पक्ष यात पुढाकार घेऊ शकतात.
राजकारणात अशी स्पर्धा केली तर सामान्य नागरिकही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्वागतच करतील. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरी भागातल्या राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करावेत. ज्यामुळे भूगर्भातीला पाण्याची पातळी वाढू शकेल. ग्रामीण भागातही राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा सारखे प्रयोग करून शेतकरी सुखी करता येऊ शकेल.

Monday, April 13, 2015

महामानवाला अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी केलेल्या कार्यापासून जगानं प्रेरणा घेतली. शतकानुशतnके अन्याय सहन करणा-या दलितांना त्यांनी खरं स्वातंत्र्य दिलं. देशातल्या परिवर्तनाच्या चक्राला ख-या अर्थानं गती दिली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच.
सामाजिक विषमता, विषमताजनक सामाजिक व्यवस्था आणि अन्यायाविरूद्ध अविरत संघर्ष यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या तमाम दलितांची शतकानुशतकाच्या जोखडातून मुक्तता केली. देशातल्या सर्व नागरिकांना समान दर्जा मिळाला. समता हाच राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि यामुळेच जगात भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानली जाते.
घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आपला देश एकसंघ राहण्यास मदत झाली. वेगवेगळे धर्म, जाती, संस्कृती, परंपरा या सर्वांना राज्यघटनेच्या चौकटीत स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा खरा अर्थ देशवासियांना कळाला तो राज्यघटनेमुळेच.
स्वतंत्र भारताला राज्यघटना मिळाली. मात्र इथल्या समाजात जातियवादी मनोवृत्ती कायमच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्याची चांगलीच माहिती होती. धर्मांतर करण्याच्या आधीपासूनच त्यांनी हिंदू धर्मातल्या जातियवादावर टीका करून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला.
'दलित वर्गाच्या हाती राजकीय सत्ता गेली की, चातुर्वर्ण्यजन्य विषमता धुळीस मिळालीच असे समजावे. आजवर ती टिकली आहे याचे कारण राज्यसत्तेचा तिच्यावर कधीच मारा झाला नाही हे होय', या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्यातून त्यांनी सांगितलेल्या राज्यकर्ती जमात व्हा, हा संदेश किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं.
दलितांना नवी ओळख हवी असेल तर त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय पर्याय नाही, याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाणिव होती. त्यामुळे धर्मांतराची  घोषणा केल्यानंतर त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. या अभ्यासातून बौद्ध धम्मासारखा समानतेचा अंगीकार करणारा दुसरा कोणताही धर्म नाही याची त्यांना जाणिव झाली. आणि अखेर १४ ऑक्टोबर १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही घटना देशाच्याच नव्हे तर जगाच्याही इतिहासात नोंद करणारी ठरली. या महामानवाला अभिवादन.

Sunday, March 22, 2015

राडा आणि सुसंस्कृतपणा !


शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्र्यात पोटनिवडणूक होतेय. शिवसेनेनं तिथं बाळा सावंत यांच्या पत्नी  तृप्ती सावंत यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचा त्यांच्या प्रथेला साजेसा घोळ नेहमीप्रमाणे सुरू होता. मात्र नारायण राणेंनीही वेळोवेळी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. तसंच उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच राणेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचा पाठिंबाही मिळवला होता. त्यानंतर खुद्द सोनिया गांधींनीच राणेंना फोन करून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता इथं काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी नव्हे तर राणे विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार, यात शंका नाही. त्यामुळे यांच्यातल्या संघर्षाने राज्याला परिचित झालेली राडा संस्कृती पुन्हा मुंबईतल्या रस्त्यावर दिसली तर नवल वाटायला नको. त्यातच नारायण राणेंना काँग्रेसमधील प्रिया दत्त, कृपाशंकरसिंग आणि नसीम खान कितपत मदत करतील, या विषयीही शंकाच आहे.
मागील निवडणुकीचं बलाबल पाहिल्यास शिवसेनेची बाजू भक्कम वाटते. गेल्या वेळी शिवसेनेला 41 हजार 544 तर भाजपला 25 हजार 221 मते मिळाली होती. राष्ट्रवादीला 9 हजार 470 तर काँग्रेसला 12 हजार 200 मते मिळाली होती. आता भाजपनंही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. भाजपचा सेनेला आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा विचारात घेतला तर नारायण राणेंना तिप्पट पिछाडी भरुन काढावी लागणार आहे.
बाळा सावंत यांच्या निधनामुळे शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांना सहानुभूती मिळू शकते. मात्र या मतदारसंघात असलेलं मुस्लिम आणि दलितांचं प्राबल्य, कोकणी मतदार यावर राणेंची भिस्त असणार आहे. 1999 आणि 2004च्या निवडणुकीत काँग्रेसनं या मतदारसंघात विजय मिळवलेला होता. अर्थात ही सर्व जुनी समीकरणं आहेत. कोकणात होमपिचवर पराभूत झालेल्या नारायण राणेंनाही त्यांची ताकद दाखवून देण्यासाठी संधी मिळालीय. नारायण राणे मैदानात उतरत असल्यानं शिवसेनाही इथं जोर लावणार यात शंका नाही. 'मातोश्री'च या मतदारसंघात असल्यानं पुन्हा एकदा राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागणार आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना इर्षेने लढणार हे नक्की....

खमंग फोडणी - तासगावमध्येही आर. आर.पाटील यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणार आहे. तिथं आर. आर. पाटील यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. तिथं उमेदवार देणार नसल्याचा निर्णय घेत राजकीय पक्षांनी सुसंस्कृतपणा दाखवून दिला. मात्र तासगावातला सुसंस्कृतपणा मुंबईत दिसला नाही. ठिक आहे, पण किमान इथं राडा तरी दिसू नये, ही माफक अपेक्षा.

Monday, March 16, 2015

सत्ताधारी आणि विरोधकांचा 'अविश्वास'!

विधान परिषदेत सोमवारी वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळालं. सभापतींच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होती. तब्बल पाच तास चाललेल्या चर्चेला, शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल करून सुरूवात केली. रामदास कदमांनी तर भाजपवर तिखट टीका केली. भाजप राष्ट्रवादी युती केव्हा झाली हे आम्हालाही कळलं नाही, असा टोला कदमांनी लगावला. राष्ट्रवादीनं जसं काँग्रेसला फसवलं तसं भाजपने आम्हाला फसवलं, असा भाजपच्या वर्मी लागणारा घाव कदमांनी घातला. त्यांना भाजपच्या गिरीश बापटांनी रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेत काय सुरू आहे, हे कळत नाही असा टोला त्यांनी लगावला. तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केली. असं कोणतं कारण होतं ज्यामुळे राष्ट्रवादीला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला, याचं उत्तर त्यांनी राज्यातल्या जनतेला द्यावं असं आव्हान त्यांनी दिलं. तर आमच्याकडे संख्याबळ असल्यानं सभापतीपद राष्ट्रवादीकडे असावं असा पवित्रा सुनील तटकरेंनी घेतला. एकंदरीतच सभागृहात झालेली ही गरमागरम चर्चा राजकीय वारे कुठे वाहताहेत हे दाखवण्यासाठी पुरेशी आहे. मात्र भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा असल्यानं त्यांना राष्ट्रवादीची साथ हवी आहे. तसंच आगामी काळात विधेयकं पारित करून घेण्यासाठी भाजपला विधान परिषदेत चांगला साथीदार हवा होता, तो राष्ट्रवादीच्या रूपानं मिळालाय. तसंच एकाचवेळी शिवसेना आणि काँग्रेसची जिरवण्याची संधीही भाजपला अनायसेच मिळाली. तसं पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेनेलाही फार काही गमवावं लागलं अशी परिस्थिती नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड झाल्याची प्रतिक्रिया या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनीही दिलीच आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आपापले हिशेब चुकते केल्याचं चित्र दिसतंय.

खमंग फोडणी - राज्यात भाजपबरोबर सत्तेत असलेली शिवसेना विरोधी पक्षात असल्या सारखी वाटतेय. 1995 ते 1999 या युतीच्या पहिल्या सरकारमध्ये शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. मात्र आता युतीची सत्ता असली तरी शिवसेना भाजपच्या घरात भाड्यानं राहत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरूंच्या भांडणांची आठवण येत राहते. तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात असली तरी सत्तेतल्या भाजपबरोबर त्यांनी चांगलंच जमवून घेतलंय. त्यामुळे भाजपच्या घरातला भाडेकरू हुसकावून लावून राष्ट्रवादी तिथं घुसली तर नवल वाटायला नको. भाजपला नवा भाडेकरू चांगला वाटू शकेल. मात्र या भाडेकरूने काँगे

Saturday, March 14, 2015

मुंबई हायकोर्टाचं अभिनंदन !

सार्वजनिक उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप उभारणा-या उत्सवमूर्तींचे बांबू हायकोर्टाच्या आदेशामुळे उखडले जाणार आहेत. कारण सार्वजनिक उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप नको, असा आदेशच मुंबई हायकोर्टाने दिलाय. इतकंच नव्हे तर रस्त्यावर चालणे हा सर्वसामान्य माणसांचा मूलभूत हक्क आहे. तो हिरावून घेता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हायकोर्टाच्या या आदेशामुळे सर्वसामान्य सुखावणार यात शंका नाही. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अर्थात यातही सर्वसामान्यच मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. उत्सवासाठी भररस्त्यात मंडप टाकले जातात. रस्ते अडवले जातात. याचाही त्रास हा सर्वसामान्य नागरिकांनाच होतो. त्यामुळे हायकोर्टाने घेतलेली ही भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.
इतकंच नव्हे तर ध्वनीप्रदूषणावरही हायकोर्टाने मत मांडलंय. मोठमोठ्याने वाजवल्या लाऊडस्पीकरचा त्रास होत असल्यास त्याविरोधात कोणालाही तक्रार करण्याची मुभा आहे. त्यासाठीची तक्रार नोंदविण्यासाठी फोन, ई-मेल, एसएमएसद्वारे तक्रार नोंदवण्याची यंत्रणा उभारण्य़ाचे पालिका आणि प्राधिकरणांना राज्य सरकारने निर्देश द्यावे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांनी 100 नंबरवर तक्रार करावी. तक्रारीची गुप्तता पाळण्याची जबाबदारी ही पोलिसांची असन त्यांनी ती पार पाडावी, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
रेल्वे स्टेशन, रहदारीचे मार्ग, हॉस्पिटल, टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड, शाळा-कॉलेजच्या परिसरात मंडप उभारण्यास आणि लाऊडस्पीकर लावण्यास कायद्याने परवानगी देता येत नाही.
एकंदरीतच आता गणेशोत्सवाची गरज उरली आहे का ? हा ही प्रश्नच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नागरिकांमध्ये एकजूट करणे, प्रबोधन करणे यासाठी गणेशोत्सव गरजेचा होता. मात्र आता गणेशोत्सव हा राजकीय नेत्यांच्या हातात गेलेला आहे. प्रबोधनाचा भागही कधीच लयाला गेलेला आहे. तीच गत दहीहंडीची झालीय. हा उत्सव तर कधीच राजकीय नेत्यांचा इव्हेंट झालाय. नवरात्रौत्सवातही धार्मिकता कमी आणि धांगडधिंगा जास्त अशी परिस्थिती आहे. या उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप लावले जात असल्यानं वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो. आता कोर्टाच्या निर्णयानंतर हे चित्र बदलेल अशी आशा आहे. मात्र सर्वपक्षीय राजकीय नेते, अगदी पुरोगामी-प्रतिगामीही या मुद्याकडे कसे पाहतात ? हे ही तितकंच महत्त्वाचं ठरणारं आहे.
रस्त्यावरील मंडपच नव्हे तर सर्वच धर्मांच्या निघणा-या मिरवणुका, जुलूस यांमुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या मुद्याकडेही तितकंच लक्ष देण्याची गरज आहे.

खमंग फोडणी - रस्त्यावर मंडप उभारणं बंद झालं तर रेडिमेड नेते तयार होण्याची प्रक्रिया थांबण्याची शक्यता वाटतेय. मात्र रस्त्यावर मंडप उभारून नेते होण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्यास चांगल्या नेतृत्वाची भरणी होईल.

Tuesday, February 24, 2015

भुजबळांच्या चौकशीचा निषेध !

मराठी माणूस व्यापार, उद्योग-व्यवसायात प्रगती का करत नाही ? हा प्रश्न अनेक पिढ्यांपासून विचारला जातो. त्याचं उत्तर आहे, ते आपल्या वृत्तीमध्ये. तीच ती खेकड्याची वृत्ती. कोणी जरा चार पैसे (अगदीच शब्दश: घेऊ नका) कमवायला लागलं की, मराठी माणसाच्या पोटात दुखायलाच हवं.
आता हेच पाहा ना. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात. आपण भले, आपलं राजकारण भलं आणि आपले उद्योग भले. (उद्योग हा शब्द व्यवसाय या अर्थाने घेतला आहे.) मात्र आता यांच्याच मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. राजकारण्यांनी फक्त काय राजकारणच करायला हवं का ? राजकारण करून उद्योग करू नये, असं कोणी लिहून ठेवलं आहे का ?
मराठी माणसाला आपण जर उकिरडे धुंडाळत असू तर इतरांनीही तेच केले पाहिजे असे वाटते. इतर उद्योगपती विदेशात खाणी विकत घेतात. मात्र आपल्या मराठी माणसापैकी कोणी उद्योग केला, त्यात यशस्वी झाला तर त्याच्याकडे मोठा गुन्हा केल्यासारखं पाहिलं जातं. माजी खासदार समीर भुजबळ, विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांनी जर काही कंपन्या स्थापन केल्या असतील तर त्यात चुकीचं ते काय ? आणि कंपन्या जर फायद्यात चालत असतील तर त्याबद्दल तरी त्यांना दोष कसा द्यायचा ?
आता राजकारणी लोकांच्या कंपन्या तोट्यात चालत का नाहीत ? असा प्रश्न जर कोणी विचारत असेल तर, त्याला माझ्याकडे उत्तर नाही. पण टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे सगळे उद्योगपती आहेत. मग आपले भुजबळ, मराठी भुजबळ उद्योगपती असतील तर त्यात वावगं असं काय आहे ? आता पंधरा वर्ष आघाडीचं सरकार होतं. त्या काळात मराठी उद्योजक निर्माण झाला, हे तर खरं म्हणजे आघाडी सरकारचं यशच मानायला हवं. आता युतीचं (की महायुतीचं ?) सरकार आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांनंतर हे सरकारही असंच एखादं राजकारणी कुटुंब उद्योगामध्ये, पोटापाण्याला लावेल. मग त्यांचीही अशीच चौकशी करणार का ? कोणत्याही राजकीय उद्योजकाची चौकशी करूच नका. उलट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या यशस्वी उद्योजकांची व्याख्यानं ठेवा. यशस्वी उद्योजक कसं व्हावं ? या विषयावर त्यांचं मार्गदर्शन घ्या. तरुण मराठी बेरोजगारांना या नेते कम उद्योजकांनी मोफत मार्गदर्शन करायला हवं. कळू द्या बेरोजगारांना यशस्वी उद्योजक कसं व्हावं....

Saturday, February 21, 2015

धर्म रिटायर, दहशतवाद रिटायर !

मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना,
हिंदी है हम, हिंदी है हम !
कवी इक्बाल यांचं हे गीत शाळेत असताना जोरजोरात म्हटल्याचं सगळ्यांना आठवत असेलच. मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना, अशी रचना करणारे इक्बालच देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानात गेले. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावरच झाली होती, हे सत्य आहे. तरीही आपण म्हणत असू की, 'धर्म तोडता नहीं जोडता है', तर तो जोकच म्हणायला हवा. आणि आता तर जगच जणू धार्मिक फाळणीच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं भयावह चित्र निर्माण झालंय. वाढत्या दहशतवादामुळे इस्लामी जग विरूद्ध इतर अशी सरळसरळ फाळणी होण्याचा स्पष्ट धोका दिसतोय. वाढत्या दहशतवादी घटनांमुळे सर्व धर्मीयांच्या मनात दहशतवाद आणि अतिरेकी धर्मप्रेमाच्या विरोधात रोष निर्माण होऊ लागला आहे. कारण प्रत्येकाला रोजच्या जीवनात जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यात पुन्हा दहशतवादाचा धोका, हा संघर्ष आता सामान्यांना नकोसा झाला आहे.
आणि काय तर म्हणे सगळेच धर्म शांततेचा संदेश देतात. सगळे धर्म जर शांततेचा संदेश देत असतील, सर्व धर्मीयांमध्ये संघर्ष का होतोय ? याचं उत्तर मिळू शकेल का ? अर्थात याचं उत्तर मिळणार नाही. पण रोजच्या जीवनात धर्माची गरज उरलेली नाही. आपल्या रोजच्या संघर्षात धर्माचं कोणतंही स्थान नाही.
त्यामुळे मजहब, धर्म, रिलीजन या संकल्पनाच आता रिटायर करण्याची वेळ आली आहे. कारण जगातल्या सर्वच दहशतवादाचं मूळ हे धर्मातच आहे. अगदी पेशावर ते पॅरिस पर्यंतच्या घटना पाहिल्या तरी हे लक्षात येतं. परिणामी धर्म, मजहब या कालबाह्य आणि दहशतवादी संकल्पना डोक्यातून दूर गेल्यासच व्यक्ती एकमेकांकडे माणूस म्हणून पाहू शकतो हे ही तितकंच खरं. अमूक एक्या जातीची किंवा धर्माची व्यक्ती असेल तर तो असाच वागणार, अथवा ते लोकच तसे, ही पूर्वग्रहदूषित मतंही जळून जातील.
धर्म रिटायर झाले तर, यावर गुजराण करणा-या दलालांची रोजी-रोटीच बंद होईल. मग त्यांनाही सामान्यांना गंडवता येणार नाही, फसवणूक करता येणार नाही. पर्यायानं ते ही अंगमेहनत करतील, नेकीनं पैसा कमावतील. म्हणजे जे काम धर्मानं झालं नाही ते धर्म रिटायर झाल्यानं होऊ शकेल.

खमंग फोडणी - जगात खरं पाहिलं तर दोनच धर्म आहेत. त्यातला पहिला शरीरधर्म आणि दुसरा शेजारधर्म. आणि जात म्हणाल तर एकच आणि ती म्हणेज जावयाची जात. कोणाचं या पेक्षा वेगळं मत असेल तर सांगा...

संघर्षशील दादा !


1 फेब्रुवारी 2015 रोजी माझे वडील विठ्ठलराव गोरे यांचं निधन झालं. 11 जानेवारीला वडिलांच्या बाईकला एका कारने धडक दिली होती. संभाजीनगरजवळ नगर रोडवर हा अपघात झाला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेला. पण जवळच असलेल्या बडवे इंजिनिअरींग कंपनीतल्या कामगारांनी वेळीच धाव घेऊन मदत केली. अर्ध्या तासाच्या आत वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 11 जानेवारीलाच ऑपरेशन झालं. मात्र त्याच दिवसापासून वडील कोमात होते. वयाच्या 65 व्या वर्षी वडिलांनी तब्बल 22 दिवस मृत्यूबरोबर झुंज दिली, संघर्ष केला. वडिलांना आम्ही भावंडं, काका आणि गावाकडची सगळी मंडळी दादाच म्हणायचो.
संघर्ष तर लहानपणापासूनच दादांचा सोबती होता. गंगापूर तालुक्यातल्या आमच्या सोलेगावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे पहिलीपासूनच दादांना शिक्षणासाठी घर सोडावं लागलं. मामा आणि आत्याच्या गावाला आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. कासोडा, एकलहरा, म्हारोळा या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं. रोज दहा-दहा किलोमीटर पायपीट केली. नववी-दहावी पर्यंतचं शिक्षण गंगापूरला घेतलं.  गव्हर्मेंट कॉलेजला B.A.चं शिक्षण सुरू असतानाच 1970 मध्ये दादांचा विवाह झाला. 1972च्या भीषण दुष्काळात आईनेही गावाकडे कष्ट केले. 1975 मध्ये वडिलांना परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरी मिळाली. त्यानंतर आई-वडील परभणीला गेले. माझा जन्म 1977चा, त्याच वर्षी वडिलांची संभाजीनगरला बदली झाली. 1984 पर्यंत आम्ही तिघे भावंडे आणि आई-वडील कृषी विद्यालयाच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. त्यानंतर पदमपुरा, नक्षत्रवाडी, पुन्हा क्वार्टर आणि शेवटी उल्का नगरीत घर घेतलं. 1985-86 मध्ये दादांनी गावाकडे विहीर खोदण्यासाठी कर्ज घेतलं, विहीर बांधली. या काळात इतर लोक स्वस्तात प्लॉट घेत होते. मात्र दादांना ओढ होती ती गावाची आणि शेतीची. अर्थात हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. कर्ज वाढलं. पण याचा आमच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही. तिघा भावंडांना हवं ते क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. माझा लहाना भाऊ रवींद्र शालेय-महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धेत यश मिळवत होता. याचाही वडिलांना अभिमान होता. रवींद्र याच गुणाच्या जोरावर त्याच्या वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होतोय. आपल्या कुटुंबातला पहिला वकिल रवींद्र झाल्याचा दादांना सार्थ अभिमान होता. माझी बहिण शिक्षिका झाली. तिला सरकारी नोकरी मिळाली, ते ही लाच न देता. हा प्रसंग वडील वारंवारपणे सांगायचे.
शिक्षणाची आवड असणा-या दादांनी आम्ही लहान असताना M.A. पूर्ण केलं. निरक्षर असणा-या आमच्या आईला साक्षर केलं. लहाण्या काकाचंही शिक्षण पूर्ण केलं. गावाकडे गेल्यावर तसंच लग्न कार्याच्या निमीत्ताने एकत्र आल्यावरही दादा शिक्षणा विषयी बोलायचे. मुलींना शिकवा, त्यांचं लवकर लग्न करू नका, हे सांगायचे. दहावीनंतर कृषी पदविका या अभ्यासक्रमाला अनेकांना दादांनी प्रवेश मिळवून दिला.
2008 मध्ये दादा रिटायर झाले. मात्र त्यानंतर दादा जास्तच अॅक्टिव्ह झाले. गावाकडे संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून शेतीचे उपक्रम सुरू केले. कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, शेतकरी मेळावे या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. शेतक-याच्या पिकाला भाव मिळत नाही, याची त्यांना खंत होती.  मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर वडील रोज सकाळी एक तास वॉक करायचे. तीन महिन्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये दादांचा दुसरा क्रमांक आला होता. सर्व कसं छान सुरू होतं. मात्र त्या अपघाताने दादांना हिरावून मोठा आघात केला. असं असलं तरी सतत संघर्ष करून कधीच हार न मानणारे दादा, भविष्यातही मानसिक बळ देत राहतील.