Saturday, November 2, 2019

संजयचं ‘महाभारत’ !


सामनाचे संपादक, खासदार आणि शिवेसनेचे नेते अशा तीन आघाड्यांवर कामगिरी बजावणाऱ्या संजय राऊतांनी सध्या चांगलाच धुरळा उडवून दिलाय. राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झालेला असताना संजय राऊतांनी शिवसेनेसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्रीपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्टपणे दिसतंय. लेखणीचे 'रोखठोक' सपासप वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या 'सच्चाई'च्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे. सध्याच्या काळात सगळ्या न्यूज चॅनेल्सवर संजय राऊतांचेच बाईट दिसत आहेत. एकट्या संजय राऊत यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलं आहे. भाजपचे बडे नेते, प्रवक्ते या सर्वांची संजय राऊतांना उत्तर देताना दमछाक होत आहे.
सामनाचे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना सुरू केला. शिवसेनाप्रमुखांच्या जहाल अग्रलेख आणि व्यंगचित्रांमुळे सामना लोकप्रिय झाला. तर नंतरच्या काळात सामनाला ब्रॅण्ड करण्यात संजय राऊतांचं योगदान आहे. संजय राऊत यांचं ज्वलंत लिखाण हे सामनाला ब्रॅण्ड करण्यासाठी फायद्याचं ठरलं. याच सामनातून केंद्र आणि राज्यातल्या भाजपवर बाण सोडण्यात आले. सामनातल्या अग्रलेखांमुळे भाजपचा प्रचंड तडफडाट झाल्याचं जगानं पाहिलं. संजय राऊतांमुळे शिवसेना अडचणीत येते, असा आरोपही केला जातो. मात्र अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. त्यावेळी राज्यात पक्ष सत्तेत नसताना शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आताही सत्तेच्या संग्रामात शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसताहेत.
उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिलाय यात शंका नाही.
समाजात जागृती आणनं, अन्यायाला वाचा फोडणं हे संपादकांचं काम. मात्र आता बदलत्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं मुखपत्र असलेल्या दैनिकांमधल्या संपादकांना जनजागृतीपेक्षा सत्ताजागृती महत्त्वाची झाली आहे. आणि त्यामुळेच अग्रलेख लिहणारे संजय राऊत सत्तेच्या कुरूक्षेत्रात राजकीय महाभारत घडवत आहेत. 
#संगो #SHIVSENA #शिवसेना