Thursday, October 24, 2019

मी पुन्हा येईन, आम्हीही येणार !



मी पुन्हा येईन, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. मात्र पुन्हा येताना भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. चार-पाच वेळा मेगाभरती करूनही भाजपला 2014 मिळवलेल्या 122 जागा मिळवता आल्या नाही. शिवसेनेलाही 2014 मध्ये मिळवलेल्या 63 जागा राखता आल्या नाही.
मात्र निकाल लागल्यानंतर राज्यभरात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. युतीनं सत्ता राखण्याचा पराक्रम केल्यानं कार्यकर्ते बेभान झाले. भाजपनं सेंच्युरी पार केली. तर शिवसेनाही साठीत पोहोचली. मात्र 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर मिळवलेल्या जागांपेक्षा हा आकडा कमीच होता. युती करूनही दोन्ही पक्षांना 2014च्या तुलनेत दमदार यश मिळवता  आलं नाही. राजकारणात एक अधिक एक दोन होईल असं नसतं, असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती या निवडणुकीत आली. शिवसेना भाजपनं एकत्र निवडणुका लढूनही त्यांच्या जागा कमी झाल्या. भाजपनं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतरही मेगाभरतीचा सपाटा लावला. सर्वच पक्षातल्या आजी माजी आमदारांची भाजपचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सरदार भाजपच्या गोटात सामील झाले. पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले सरदार भाजपला सत्तेच्या लढाईत चांगली साथ देऊ शकले नाही. भाजपप्रमाणेच शिवसेनेतही निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग झालं, अनेकांनी शिवबंधन बांधलं. पण नव्यानं पक्षात आलेले सैनिक आधीच्या शिवसैनिकांसारखे लढवय्ये निघले नाही. ऐन मोक्याच्या लढाईत नव्या सैनिकांनी कच खाल्ली. परिणामी 2014च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. त्यामुळे आता आघाडीचे नेते आम्हीही येणार असं म्हणू लागले आहेत. काँग्रेसनं जिंकलेल्या जागांचा आकडा पाहून राहुल गांधीनांही धक्का बसला असेल. काहीही न करता काँग्रेसनं 50चा आकडा गाठला. काँग्रेसनं जरी काही केलं नसलं तरी शरद पवारांनी राज्यभर घेतलेल्या सभा, जिगरबाजपणे पावसात केलेलं भाषण याचा फायदा काँग्रेसलाही झाला. निवडणुका जाहीर होण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रितपणे 40 जागाही मिळतील असं वाटत नव्हतं. मात्र शरद पवारांमुळे हवा बदलली. आघाडीचा आकडा शंभरच्या पलीकडे पोहोचला. या विजयामुळे राज्यातल्या आगामी पालिका आणि झेडपी निवडणुका सत्ताधाऱ्यांना सोप्या जाणार नाहीत. पवारांनी आघाडीत आत्मविश्वास निर्माण केला. राज्यात विरोधकांना शक्ति मिळाल्यानं सरकारवरही अंकुश राहिल. परिणामी आता सरकारला चांगलं काम करावंच लागेल. नाही तर पवारांच्या हाती असलेला आसूड सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर ओढला जाईल. #संगो