Sunday, September 29, 2019

नायक नहीं महानायक !

मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा अमिताभ बच्चन यांचा उतरता काळ सुरू झाला होता. (मला बरंच लवकर कळायला लागलं, हा भाग वेगळा) चित्रपटसृटीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविषयी काही लिहावसं वाटलं. बच्चन यांच्या उतरत्या काळानंच सुरूवात करूया. 
1988 मध्ये अमिताभ यांचा शहंशाह हा सिनेमा प्रदर्शित झाला. 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं', हा डायलॉग आणि 'जाने दे जाने दे मुझे जाना हैं' हे गाणं हिट झालं. पण मिनाक्षी शेषाद्रीसोबत अमिताभ यांची जोडी मॅच होत नव्हती. त्यानंतर  जादुगर, तुफान निराशाजनक ठरले. त्यातल्या त्यात बरा निघाला तो आज का अर्जुन.  1990 सालच्या अग्निपथनं अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. अमिताभ नावाची जादू चालली. मात्र अग्निपथ हिट म्हणता येणार नाही. पण त्या नंतरचे अजुबा, अकेला, हम, इंद्रजित फ्लॉप ठरले. हममध्ये तर रजनीकांत, गोविंदा असूनही तो सिनेमा प्रचंड हिट ठरला नाही. त्या नंतरचा खुदा गवाह थोडासा सुसह्य होता. मात्र नंतरच्या काळात आलेले लाल बादशाह, मृत्यूदाता पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. मेजर साब, हिंदुस्थान की कसम, कोहरामही आपटले. बडे मियां छोटे मियां थोडा चालला, पण त्याचं क्रेडिट गोविंदाला मिळालं. याच काळातच अमिताभ यांची एबीसीएल कंपनीही तोट्यात गेली. उतरता काळ असेल तर कशातही यश येत नाही.

मात्र जिगरबाज अमिताभ यांनी हार मानली नाही. 3 July 2000 रोजी इतिहास घडला. स्टार प्लसवर कौन बनेगा करोडपती सुरू झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात क्रांती झाली. अमिताभ यांची लोकप्रियता पुन्हा प्रचंड वाढायला लागली. प्रश्नोत्तर आणि उत्तर देणाऱ्याला बक्षीस असा हा कार्यक्रम, मात्र तो प्रचंड लोकप्रिय झाला. अजूनही कौन बनेगा करोडपती सुरू आहे. अमिताभ यांची स्पर्धकांसोबत संवाद साधण्याची शैली या कार्यक्रमाचं बलस्थान. स्टार प्लस चॅनेल हिट झालं आणि अमिताभ यांचे सितारेही बुलंद झाले. एक दशक अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या अमिताश यांच्या यशाची दुसरी जबरदस्त इनिंग सुरू झाली. सर्व अपयश धुऊन काढलं.

मोहब्बते, कभी खुशी कभी गम, बागबान, ब्लॅक, पा, बंटी और बबली, सरकार, चिनी कम, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी दमदार अभिनय साकारला. सिल्व्हर स्क्रिनवर अमिताभ बच्चन यांनी विजय ही व्यक्तीरेखा अनेकदा साकारली. कारकिर्दीला उतरती कळा लागल्यावरही खचून न जाता, 'विजय'नं बाजी पलटवली. अँग्री यंग मॅन बनून स्क्रिनवर गुंडांना बदडणारा विजय हा प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळेच विजय कधी पराभूत होत नाही. त्यामुळे हेच म्हणावसं वाटतं, 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं.' 
#संगो #amitabh #falkeaward #kbc

Monday, September 23, 2019

रोजचा सवाल थांबला !

#रोजचासवाल - 1787 दिवस झाले, सिंचन घोटाळा करणा-यांना अटक कधी ? टोलमुक्त महाराष्ट्र कधी ? शेतक-यांच्या पिकाला चांगला भाव (हमी भाव) कधी ? धनगर समाजाला आरक्षण कधी ? शिवसमुद्रात शिव शिवस्मारक कधी ? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी?(देवेंद्र फडणवीस यांनी 31-10-2014 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला एक दिवस झाल्यानंतर म्हणजे 1-11-2014 पासून, निवडणुकीच्या काळात दिलेल्या विविध आश्वासनांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. उत्तर मिळेपर्यंत.) #cmfadanvis @Dev_Fadnavis #संगो

1 नोव्हेंबर 2014 पासून फेसबुकवर सरकारला फेस आणणारा रोजचा सवाल सुरू करण्यात आला. 22 सप्टेंबर 2019 रोजी विचारलेला 1787वा सवाल हा शेवटचा सवाल. सलग पाच वर्ष रोजचा सवाल फेसबुकवर सुरू होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ट्विटरवरूनही रोजचा सवाल सुरू करण्यात आला. मात्र आता आचारसंहिता लागू झालीय, त्यामुळे भाजपनं दिलेली आश्वासनं आता काही पूर्ण होतील असं वाटत नाही. मात्र मागील 5 वर्षात कशाला हा ताप ? हा सवाल मला अनेकांनी विचारला. भक्त तर चेकाळलेच. आधीच्या सरकारला विचारला होता का सवाल ? असा सवाल मला विचारण्यात आला.
पण निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना भुलून मतदार मतदान करत असतात. मात्र दिलेल्या आश्वासनांचं काय झालं ? हे कोणीच विचारत नाही. पाच वर्ष झाल्यानंतर कोणती आश्वासनं दिली होती, याची कोणाला आठवणही राहत नाही. अगदी माध्यमांमध्येही याचा अनुभव येतो. त्यामुळे सत्तेत आलेल्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचं काम करावं हा हेतू होता.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं. विनोद तावडेंनी आली रे आली आता तुझी बारी आली असा टोला अजित पवारांना लगावला होता. सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप भाजपकडून व्हायचा. पाच वर्ष सत्ता असताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला अटक झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट भाव देऊ असं खुद्द पंतप्रधान म्हणाले. मात्र पिक मालाला भाव मिळालाच नाही. धनगर समाजालाही आरक्षण मिळालं नाही. शिवसमुद्रात शिव स्मारकाची एक विटही रचली गेली नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू झालं नाही.
म्हणजेच भाजपनं दिलेली ही आश्वासनं पूर्ण झालीच नाहीत. मग आता भाजपवाले कोणत्या तोंडानं मतं मागणार ? पण दिलेल्या आश्वासनांवर मतं देणारे मतदारही जाब विचारताना दिसत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पुन्हा नव्यानं आश्वासनं देणार यात शंका नाही. त्यामुळे सर्वांनीच सरकारला दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारण्याची गरज आहे. प्रश्न विचारली तरच उत्तरं मिळतील.
रोजचा सवाल मला फेसबुकवर नव्हे तर चॅनेलवर सुरू करायचा होता. 2014 मध्ये मी जिथे काम करत होतो तिथल्या वरिष्ठांना ही कल्पना सांगितली. पण रोज स्क्रिनवर बगच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणं शक्य नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे हा रोजचा सवाल फेसबुकवर सुरू करण्यात आला. रोजचा सवाल आता बंद झालाय. पण 'रोजचा सवाल - 2' येणार आहे. सरकार कोणतंही असो, प्रश्न विचारले जातील. आता रोजचा सवाल थेट असेल. तो फेसबुकवर नव्हे तर ट्विटरवर असेल. तर मग लवकरच भेटूयात, ट्विटरवर.

Wednesday, September 18, 2019

1 निवडणूक 12 भानगडी !


राज्यात निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 12 पक्षांच्या 12 भानगडी पाहूयात. त्याची सुरूवात करूयात भाजपपासून.

पहिली भानगड, भाजप - गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील कदाचित जगातही सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणजे भाजपच. राज्यात एकेकाळी भाजप छोटा भाऊ  होता. पण आता हा पक्ष मोठा भाऊ झाला आहे. आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मोठा भाऊ मोठाच राहतो. आणि छोटा भाऊ छोटाच राहतो. पण राजकीय पक्ष म्हणून जन्म घेतल्यावर काहीही होऊ शकतं. अशा या मोठ्या भावानं स्वबळावर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या छोट्या भावाला हिंदूत्वाची गोळी देऊन युतीसाठी राजी केलं. विधानसभेला 50-50 जागा असं स्वप्नही छोट्या भावाला दाखवण्यात आलं. पण आता मोठी भानगड झाली. 144 जागा देण्याऐवजी मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणजे शिवसेनेला 115 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. परिणामी भाजपची ही भानगड स्वबळाच्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरी भानगड, शिवसेना - भाजपला कमळाबाई असं हिणवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पक्ष. पण आता कमळाबाई घराची मालकीणबाई झालीय. मोठा भाऊ असलेला शिवसेना छोटा भाऊ झाला. लोकसभा निवडणुकीच्या दिलेली हिंदूत्त्वाची गोळी चघळूण झाली. पण आता 50-50 जागांचा फॉर्म्युला अस्तित्वात आला नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वबळाची भानगड मोठं लफडं होणार, हे नक्की.

तिसरी भानगड, काँग्रेस - गावातला राबता असलेला मोठा वाडा भग्न झाल्यानंतर जसा दिसतो तशी सध्या काँग्रेसची परिस्थिती झालीय. भानगड करायलाही काँग्रेसमध्ये कोणी उरलेलं नाही. त्यामुळे कालचा 'वंचित' काँग्रेसची राजकीय छेड काढताना दिसतो.

चौथी भानगड, राष्ट्रवादी काँग्रेस - आयात नेत्यांच्या जीवावर आणि सत्तेच्या टॉनिकवर हा पक्ष राज्यात पसरला. पवारांच्या पॉवरबाज पक्षाचं सत्तेचं टॉनिक संपलं आणि आयात नेत्यांची निर्यात सुरू झालेली. दणादण पक्षांतर झाल्यानं घड्याळाचे काटे निखळले. बडे नेते बाहेर पडल्यानं आता शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. त्यातच जर छगन भुजबळ जर शिवसेनेत परतले तर राष्ट्रवादी काँग्रेसची भानगड शेवटच्या घटका मोजण्याची वेळ येऊ शकते.

पाचवी भानगड, म.स्वा.प. - म.स्वा.प. वाचून ही नेमकी भानगड काय, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. म.स्वा.प. म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांचा प्रचंड मोठा पक्ष. या पक्षाचा एकही आमदार नाही. खुद्द नारायण राणे भाजपच्या जीवावर राज्यसभा सदस्य झाले. तसं असलं तरी हा पक्ष मोठाच. भाजपमध्ये अनेक नेते गेले. पण नारायण राणे त्यांच्या म.स्वा.प. या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करून, त्यांची भानगड कायमचीच संपवणार यात शंका नाही. पण भाजपला राणेंची भानगड भाजपला कितपत परवडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सहावी भानगड, VBA - VBA म्हणजे वंचित बहुजन आघाडी. लोकसभेला या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण वंचितच्या जीवावर एमआयएमचा खासदार झाला. ते म्हणतात ना, मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर असा प्रकार घडला. अंडा खाणाऱ्या एमआयएमला बाजूला करून वंचित सर्व जागा लढवणार आहे. वंचितमुळे भानगड झाली ती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. दुष्काळात तेरावा महिना, ही म्हण आठवण्याची वेळ आघाडीवर आलीय.

सातवी भानगड, MIM - हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हा पक्ष. एमआयएमला रझाकारांविषयी सहानुभूती असल्याचा आरोप केला जातो. त्या आरोपाला बळ देण्याचं काम एमआयएमच्या कृतीतूनच दिसून येतं. मात्र आता वंचितनं एमआयएमची साथ सोडली आहे. वंचितची मतं एमआयएमला मिळतात. मात्र एमआयएमची मतं वंचितला मिळत नाहीत यामुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर ही भानगड एमआयएमसाठी अपशकून ठरली.

आठवी भानगड, स्वा.शे.प. - स्वाभिमानी शेतकरी पक्ष. हा पक्ष 2014 मध्ये युती सोबत. मात्र भाजपसोबत भानगड झाल्यानं हा पक्ष आता आघाडीसोबत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हेच या पक्षाचे एकमेव नेते.

नववी भानगड, रयत क्रांती संघटना - राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांचं रयत क्रांती संघटना हे छोटं दुकान सुरू केलं. खोत सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र स्वत:च्या दुकानातून लढण्याऐवजी भाजप या मोठ्या मॉलच्या तिकीटावर खोत लढणार आहेत. त्यामुळे ही भानगड तशी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे.

दहावी भानगड, शेकाप - शेतकरी कामगार पक्ष, ज्या प्रकारे सध्या शेतकरी आणि कामगारांना किंमत राहिलेली नाही त्या प्रकारे या पक्षालाही किंमत राहिलेली नाही. हा पक्ष आघाडीसोबत असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातल्या काही भागात अस्तित्व असलेल्या या पक्षाची भानगड तशी अदखलपात्र झालीय.

अकरावी भानगड, रिपाइं (आ) - जायकवाडी धरणासारखी रामदास आठवलेंच्या या पक्षाची भानगड. मराठवाड्यात पाऊस पडला नाही, तरी औरंगाबादमधलं जायकवाडी धरण 100 टक्के भरलं. त्याच प्रकारे पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना मंत्री होण्याची भानगड जमवण्यात रामदास आठवलेंना यश आलं. भाजपसोबत असलेल्या या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पडणाऱ्या जागा देण्याची भानगड भाजपकडून केली जाते. यावेळी काय होतं हे निवडणुकीनंतर लक्षात येईल.

बारावी भानगड, सपा-बसपा - उत्तर प्रदेशातली ही भानगड महाराष्ट्रात काही चालत नाही. अर्थात त्यांचं आता यूपीतही काही चालत नाही. सपा हा पक्ष आघाडी सोबत आहे. भिवंडी आणि गोवंडी अशा दोन जागा मिळाल्या तर सपाची भानगड उरत नाही. तर एकही जागा मिळत नसली तरी प्रत्येक निवडणूक उत्साहानं का लढतात, ही बसपाची भानगड काही कळत नाही.

#संगो #BJP #SHIVSENA #CONGRESS #NCP #VBA #MIM #SP #BSP #RPI