Sunday, July 31, 2022

राजकारणातला 'सेफ गेम'

 

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव दहशतीला घाबरणार नसल्यानं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले होते. गळ्यातील भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच एक प्रकारे संजय राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही, याचा पुनरूच्चार केला. 

शिवसेना महाराष्ट्र कमजोर होणार नाही. संजय राऊत झुकणार नाही. पक्ष सोडणार नाही. संजय राऊतांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले, तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळे सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला, शिंदे गटातही राऊत गेले नाही. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं.  मात्र या राजकीय लढाईत संजय राऊतांनी स्वत: पेक्षा आणि स्वत:च्या घराला सेप करण्यापेक्षा जास्त महत्व शिवसेनेला सेफ करायला दिलं. तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वत:ला सेफ करायला महत्त्व दिलं. शिंदे गटातील आमदार आणि संजय राऊत यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक इथे दिसून आला. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरू शकते.

ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना सहा महिन्यांपूर्वीच आला होता. त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलं होतं. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे दोन नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्रीपदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून ऊरत होते. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती. आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला. त्या मुद्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली. मात्र या संकटात संजय राऊतांनीही राजकीय संधी साधली. शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.  राजकारणात शह आणि काटशह दिले जातात. राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो. 2019 मध्ये संजय राऊतांनी मविआचं सरकार आणून भाजपला मात दिली होती. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एकप्रकारे चेकमेटच देण्यात आलाय. आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही. कारण मौका सब को मिलता हैं. आता पुढचा मौका कोणाचा असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संजय राऊत  यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे 'ईडी'तील सूत्रांचं म्हणणे आहे. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले होते. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले होते. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा 'ईडी'चा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही 'ईडी'ने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर 'ईडी'ने पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली होती. एकंदरीतच पत्राचाळीच्या माध्यमातून भाजपनं संजय राऊतांचा हिशेब चुकता केला. #संगो #SANJAYRAUT #EKNATHSHINDE #SHIVSENA #ED