Friday, March 1, 2019

अलविदा tv9 मराठी !

17 डिसेंबर 2012 रोजी सुरू झालेला tv9 मराठीतला प्रवास आज 1 मार्च 2019 रोजी संपला. 6 वर्ष 2 महिने 12 दिवसांचा हा प्रवास थांबला. सहा वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. पण खासगी चॅनेलमध्ये इतकी वर्ष नोकरी करणं या क्षेत्रात मोठं मानलं जातं.
17 डिसेंबर 2012 या दिवशी tv9च्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. पण इथं कधीच नवखेपणा जाणवला नाही. ई टीव्हीतले अनेक जुने सहकारी आणि सीनिअर्स इथं आधीपासून होते, तर काही नंतर जॉईन झाले. अभिजित कांबळे, गजानन कदम, धनंजय कोष्टी, चंद्रकांत फुंदे, नरेश बोभाटे, निखिल देशपांडे, सुनील बोधनकर, माणिक मुंढे, कृष्णा आजगावकर, रमेश जोशी, शंकरन सर हे सर्व ई टीव्हीयन्स पुन्हा भेटले. त्यांच्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.
तर झी 24 तासमध्ये ज्यांच्यासोबत काम केलं ते डॉक्टर प्रसाद घाणेकर, विशाल पाटील, विनीत डंभारे, गणेश रूपाले, किरण खुटाळे, आशिष काटकर, ऋषी देसाई, रघू या सहका-यांसोबतही पुन्हा tv9 मध्ये भेट झाली.
tv9ची सर्वात मोठी स्ट्रेन्थ म्हणजे, नो ऑफिस पॉलिटिक्स. या ऑफिसमध्ये कोणतेही गट, गॉसिप्स हे फालतू प्रकार नाहीत. इथं फक्त आवाज असतो तो कामाचाच. सहका-यांमधला सौहार्द हे या चॅनेलचं बलस्थान आहे, यात वाद नाही.

ब्रेकींग न्यूज क्षणात उतरवणं, ती प्ले अप करणं, आक्रमकपणे मांडणं यात इथले सहकारी निष्णात आहेत.
मी इथं काम केलं ते रन डाऊनवर. अनेक बुलेटिन प्रोड्युस केली. अर्ध्या तासाचे स्पेशल शो, स्पेशल बुलेटिन केली. टॉक शो केले. यावेळी अनेकांचं सहकार्य लाभलं. शरद जाधव, पंकज भनारकर, गिरीश गायकवाड, अंकिता शिंदे, श्रद्धा देसाई, श्रद्धा पवार, अनिता, संतोष थळे हे सर्व सहकारी नेहमीच आठवणीत राहतील.
प्रॉडक्शन एक्झिक्युटीव्ह, व्हिडीओ एडिटर आणि ग्राफिक्सची टीम क्षणात व्हिज्युअल्स, बाईट, पॅकेज आणि ग्राफिक्स तयार करून देतात. यांच्यामुळेच tv9 मध्ये सर्वात जास्त न्यूज पॅकेज तयार होतात. या सहका-यांमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे संतोष परब, अमान, अब्बासजी, अभिषेक, परेश सपकाळ या व्हिडीओ एडिटर्सकडून अर्ध्या किंवा एक तासाचा स्पेशल प्रोग्राम अवघ्या पाच तासात कसा एडिट करता येऊ शकतो हे गुप्त ज्ञानही शिकायला मिळालं. भविष्यात त्याचा फायदा होईलच यात शंका नाही.
विनायक कुंदराम, दुर्गा यांची ग्राफिक्सची टीम म्हणजे मायानगरी तयार करण्यात वाकबगार आहे. कोणतंही ग्राफिक्स अर्ध्या तासाच्या आत देण्याची क्षमता त्यांच्या टीममध्ये आहे. प्रॉडक्शनच्या टीममध्ये अनेक सहकारी आहेत, अनेक जण सोडून गेलेत. सर्वांची नावं टाकत नाही, पण नावापेक्षा त्यांचं कामच जास्त बोलतं. पण प्रमोद जगताप, दुर्गेश राजमाने, अर्जुन, सुशील, सोनी मगर, गौरी, कुणाल सिंग, अश्विनी, पूजा यांना विसरता येणं अशक्य.
ब्रेकींग न्यूजच्या वेळी जसा गोंधळ न्यूजरूममध्ये असतो, तसाच गोंधळ पीसीआरमध्येही असतो. पण अशा वेळी संयमानं काम करणारे पीसीआरमधले सहकारी यांना विसरणं शक्यच नाही. विजय, गौतम यांची टीम आणीबाणीच्या वेळी सर्व परिस्थिती संयमानं हाताळत असतात.
प्रोमो डिपार्टमेंट एकहातीपणे सांभाळणारी रसिका डायालकर तर उत्साहाचा अखंड धबधबाच. रसिका असल्याने प्रोमो, क्रोमा, स्टिंग, डाऊन बॅंडचं कधी टेन्शन घ्यावं लागलं नाही.
tv9 हे नेहमीच सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करण्यात आघाडीवर राहिलेलं आहे. 2012 मध्ये मी इथं जॉईन झालो त्यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. सिंचन घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा यासह इतर घोटाळ्यांवरून काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतरही tv9च्या कार्यशैलीत फरक पडला नाही. केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही तुटून पडताना कोणतीही कसर tv9नं सोडली नाही.
श्रीनिवास रेड्डी, उमेश कुमावत, निलेश खरे, रोहित विश्वकर्मा या सर्व सिनीअर्सकडून बातमी आक्रमकपणे कशी प्रझेंट करायची हे शिकायला मिळालं. कामाचं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. कोणतीही बातमी आल्यानंतर ती या पक्षाची आहे म्हणून थांबवा आणि त्या पक्षाची आहे म्हणून चालवा असा प्रकार कधी घडला नाही. हा आवडता नेता, तो ना आवडता नेता अशी कोणतीही कॅटेगिरी इथं नाही. त्यामुळे बातमी आली की, ती क्षणात उतरवली जाते. जो चुकला तो ठोकला, ही इथली निती.
tv9चं असाईनमेंट अत्यंत जलद आहे. क्षणात फोनो जोडणं, लाईव्ह उपलब्ध करून देणं ही सर्व प्रोसेस सर्वात फास्ट केली जाते. tv9चे सर्व रिपोर्टर्स ब्रेकींग न्यूज देण्यात निष्णात आहेत. कोणतीही ब्रेकींग न्यूज tv9च्या रिपोर्टरकडे सर्वात आधी असते, त्यामुळे tv9वर सर्वात जास्त न्यूज ब्रेक केल्या जातात. परिणामी tv9चा स्क्रिन हा 24 तास हलत असतो. ब्रेकींग न्यूज आल्यानंतर ऑनएअर असणारे अँकर्स त्या बातमीला न्याय देतात. यात निखिला म्हात्रे जर ऑनएअर असतील तर बुलेटिन प्रोड्युसरला फार काही कष्ट करावे लागत नाहीत. असाच अनुभव इतर अँकर्सचाही आहे.
सहा वर्षांमध्ये करिअरमधला अतिशय सुंदर अनुभव इथं मिळाला. आज थांबण्याची वेळ आली आहे. खरंच मन भरून आलं आहे. असे सहकारी पुन्हा मिळतीलच असं म्हणता येत नाही. एचआर डिपार्टमेंटचे रणजीत सर, रिसेप्शन वरील कविता मॅडम, बॅक ऑफीस, फॅसिलिटी, कॅन्टीन या सर्वांच्याच आठवणी मनात आहेत. आयुष्यातला चांगला काळ इथं घालवला. मनात सर्वांच्या आठवणी घेऊन जात आहे. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत.
शेवट या गाण्याच्या ओळींनी करतो...

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...

मित्रांनो या वळणावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. या वळणावर नवा प्रवास सुरू करतोय. धन्यवाद. तुमचाच गारू...संतोष गोरे...#संगो #tv9

5 comments: