Wednesday, March 20, 2019

बिनमुद्याची लोकसभा निवडणूक !

2019 मधली ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पण या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्देच दिसत नाहीत. 'मैं भी चौकीदार' आणि 'चौकीदार चौर हैं' या सारख्या थिल्लर कॅम्पेनमध्ये ही निवडणूक अडकली आहे. त्यातच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हळद आणि नारळ सारखे मुद्दे येतात. भाजपची जाहिरात कशी चुकली यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना खिजवणा-या पोस्ट टाकल्या जातात. यामुळे सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांना खरोखरच निवडणुकीचं गांभीर्य राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं.
भाजपनं शेतक-यांच्या मालाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हा हमीभाव मिळाला का ? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसनं का घेतलं नाही ? निवडणुकीत या मुद्यावरून काँग्रेस भाजपला जेरीस आणू शकली असती. पण तसं झालं नाही. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पूर्ण झालं नाही. रोजगार निर्मिती का झाली नाही ? हा मुद्दाही काँग्रेसनं हाती घेतला नाही. देशात मागील पाच वर्षात किती नवीन कंपन्या, उद्योग आले याची आकडेवारी काँग्रेसनं सरकारला विचारली नाही. मागील पाच वर्षात देशात किती गुंतवणूक झाली ? हा आकडा काँग्रेसनं भाजपला का विचारला नाही. परदेशातलं किती काळं धन देशात आलं ? हा प्रश्न राहुल गांधी का विचारत नाहीत. नोटबंदी झाली पण दहशतवादी हल्ले का थांबले नाही ? हे अपयश कोणाचं ? पुलवामातला हल्ला हे कोणाचं अपयश ? हे सवाल काँग्रेस विचारणार नाही तर पाकिस्तान विचारणार आहे का ? वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर घेण्यात काँग्रेसला यश आलं नाही. राफेलवरून आरोपांची राळ उठवल्यानंतर आता काँग्रेसनं मौन का बाळगलंय ? हा प्रश्नही मतदारांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी काँग्रेस देशात कुठेही रस्त्यावर उतरली नाही. आंदोलन केलं नाही. चौकीदार चोर हैं, हे कॅम्पेन छान आहे. पण त्यामुळे मतं मिळतीलच याची गॅरंटी नाही.
सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरणारे हे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न विचारण्याची हिंमत काँग्रेस दाखवू शकली नाही. कारण काँग्रेस पराभूत मानसिकतेत गेलेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश,  छत्तीसगडमधल्या विजयानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. पण हे चैतन्य लोकसभेच्या रणांगणा आधीच मावळलं आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधी-वाड्रा यांना मैदानात उतरवलं आहे. पण त्याचाही फार फायदा होण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत.
देशासमोरचे प्रश्न घेऊन विरोधकांनी लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं असतं. तर सत्ताधा-यांनी केलेल्या कामांचा दाखला आणि भविष्यातला त्यांचा विकासाचा प्लॅन मतदारांना सांगायचा असतो. पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मुद्दे नकोसे झाले आहेत, हे चित्र सध्या दिसून येतंय. देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुद्यांऐवजी सवंग कॅम्पेन करत आहेत. या दोन्ही पक्षांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे.
आता मतदारांनीच या दोन्ही पक्षांना, आमच्या विकासाचं काय ? विकासाच्या मुद्याचं काय ? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. मुद्यांपासून भरकलेल्या या दोन्ही पक्षांना, मुद्याचं बोला असं ठासून सांगण्याची गरज आहे. अर्थात या दोन्ही पक्षांकडून या प्रश्नांची उत्तर मिळतीलच असं म्हणता येत नाही. पण भाजप आणि काँग्रेसनं मुद्यापासून दूर जाणं हे त्यांचं अपयश आहे की मतदारांचं ? हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर जर मतदारांनीच शोधलं तर काही मार्ग निघू शकण्याची चिन्हं आहेत. #संगो

No comments:

Post a Comment