Monday, September 23, 2019

रोजचा सवाल थांबला !

#रोजचासवाल - 1787 दिवस झाले, सिंचन घोटाळा करणा-यांना अटक कधी ? टोलमुक्त महाराष्ट्र कधी ? शेतक-यांच्या पिकाला चांगला भाव (हमी भाव) कधी ? धनगर समाजाला आरक्षण कधी ? शिवसमुद्रात शिव शिवस्मारक कधी ? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी?(देवेंद्र फडणवीस यांनी 31-10-2014 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला एक दिवस झाल्यानंतर म्हणजे 1-11-2014 पासून, निवडणुकीच्या काळात दिलेल्या विविध आश्वासनांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. उत्तर मिळेपर्यंत.) #cmfadanvis @Dev_Fadnavis #संगो

1 नोव्हेंबर 2014 पासून फेसबुकवर सरकारला फेस आणणारा रोजचा सवाल सुरू करण्यात आला. 22 सप्टेंबर 2019 रोजी विचारलेला 1787वा सवाल हा शेवटचा सवाल. सलग पाच वर्ष रोजचा सवाल फेसबुकवर सुरू होता. तसंच मागील तीन वर्षांपासून ट्विटरवरूनही रोजचा सवाल सुरू करण्यात आला. मात्र आता आचारसंहिता लागू झालीय, त्यामुळे भाजपनं दिलेली आश्वासनं आता काही पूर्ण होतील असं वाटत नाही. मात्र मागील 5 वर्षात कशाला हा ताप ? हा सवाल मला अनेकांनी विचारला. भक्त तर चेकाळलेच. आधीच्या सरकारला विचारला होता का सवाल ? असा सवाल मला विचारण्यात आला.
पण निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना भुलून मतदार मतदान करत असतात. मात्र दिलेल्या आश्वासनांचं काय झालं ? हे कोणीच विचारत नाही. पाच वर्ष झाल्यानंतर कोणती आश्वासनं दिली होती, याची कोणाला आठवणही राहत नाही. अगदी माध्यमांमध्येही याचा अनुभव येतो. त्यामुळे सत्तेत आलेल्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचं काम करावं हा हेतू होता.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं. विनोद तावडेंनी आली रे आली आता तुझी बारी आली असा टोला अजित पवारांना लगावला होता. सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप भाजपकडून व्हायचा. पाच वर्ष सत्ता असताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला अटक झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट भाव देऊ असं खुद्द पंतप्रधान म्हणाले. मात्र पिक मालाला भाव मिळालाच नाही. धनगर समाजालाही आरक्षण मिळालं नाही. शिवसमुद्रात शिव स्मारकाची एक विटही रचली गेली नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू झालं नाही.
म्हणजेच भाजपनं दिलेली ही आश्वासनं पूर्ण झालीच नाहीत. मग आता भाजपवाले कोणत्या तोंडानं मतं मागणार ? पण दिलेल्या आश्वासनांवर मतं देणारे मतदारही जाब विचारताना दिसत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पुन्हा नव्यानं आश्वासनं देणार यात शंका नाही. त्यामुळे सर्वांनीच सरकारला दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारण्याची गरज आहे. प्रश्न विचारली तरच उत्तरं मिळतील.
रोजचा सवाल मला फेसबुकवर नव्हे तर चॅनेलवर सुरू करायचा होता. 2014 मध्ये मी जिथे काम करत होतो तिथल्या वरिष्ठांना ही कल्पना सांगितली. पण रोज स्क्रिनवर बगच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणं शक्य नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे हा रोजचा सवाल फेसबुकवर सुरू करण्यात आला. रोजचा सवाल आता बंद झालाय. पण 'रोजचा सवाल - 2' येणार आहे. सरकार कोणतंही असो, प्रश्न विचारले जातील. आता रोजचा सवाल थेट असेल. तो फेसबुकवर नव्हे तर ट्विटरवर असेल. तर मग लवकरच भेटूयात, ट्विटरवर.

No comments:

Post a Comment