Saturday, January 6, 2018

ढिम्म सरकार, ३ दिवस हिंसाचार

भीमा कोरेगावसह सणसवाडी, वढू बुद्रूक, शिरुर परिसरात १ जानेवारी रोजी भयानक हिंसाचार झाला. भीमा कोरेगावमधल्या विजयस्तंभावर येणा-या अनुयायांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हा हल्ला जरी एक तारखेला झाला असला तरी त्याची तयारी ब-याच महिन्यांपासून सुरू होती. या भागात पद्धतशीरपणे मराठा युवकांचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं, याची माहिती आता उघड झाली आहे. या ब्रेन वॉशमधूनच गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड करण्यात आली. संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र करून गोविंद गायकवाड यांनी अंत्यसंस्कार केले होते. नंतर या गोविंद गायकवाड यांनाही मोघलांनी मारून टाकलं होतं. हा बहुजनांच्या एकतेचा इतिहास बदलून टाकण्याचा विडाच जातियवादी संघटनांनी घेतलेला आहे. गोविंद गायकवाड यांचं कर्तृत्व नाकारण्यात आलं. मराठा तरूणांना भडकवण्यात आलं. भडकवणा-या संघटना बाजूला राहिल्या. १ तारखेला हिंसाचार घडवण्याचं पातक घडलं. या हिंसाचारासाठी दगड साठवण्यात आले होते. याची खबरही गृहखात्याला नव्हती. ब-याच महिन्यांपासून खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नव्हतं. १ जानेवारीला हिंसाचार घडत होता, गाड्या फोडल्या जात होत्या, अनुयायांवर हल्ले होत होते तरीही पोलिसांनी काहीच केलं नाही. त्या दिवशीच जर पोलिसांनी लाठीमार केला असता किंवा गोळीबार केला असता तर हिंसाचार लगेचच थांबला असता. १ जानेवारीला पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यामुळे २ आणि ३ जानेवारीलाही पोलीस, सरकार ढिम्म राहिलं.
१ जानेवारीचे पडसाद २ जानेवारीला उमटले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. १ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा उद्रेक ३ तारखेला पहायला मिळाला. बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडलाही. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. बेस्ट बसेस, अनेक कार, दुचाकींचं नुकसान झालं. काही ठिकाणी लोकलवर दगडफेक झाली. बाईकवरून जाणारेही आंदोलकांच्या रोषाला बळी पडले. अर्थात पोलीस १ तारखेच्या निष्क्रीयतेमुळे आधीच बॅकफूटवर गेलेले होते. त्यामुळे मुंबई परिसर हा जणू काही काश्मीर किंवा सीरिया झाला होता. अर्थात हा काही पहिलाच बंद नव्हता की, ज्यात हिंसाचार झाला. अर्थात हा काही शेवटचाही बंद नसेल. या राज्यानं आणि मुंबईनं अनेक बंद पाहिले आहेत. अगदी दंगली, बॉम्बस्फोटही पाहिले आहेत. आझाद मैदानात धर्मांध मुस्लीमांनी केलेला जिहादही पाहिलेला आहे.
बंद घडवणारे जॉर्ज फर्नांडिस यांना बंदसम्राट म्हटलं जायचं. डाव्या पक्षांनीही अनेकदा बंद करून उद्योगांची वाट लावलेली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपनंही बंद केलेच आहेत. धाक, दहशत, दरारा या पद्धतीनं बंद करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व राज्यभरात मोठं झालं. बंद यशस्वी करणं ही नेतृत्व प्रस्थापित करण्याची एक पायरी आहे. या पायरीवरून आता पर्यंत अनेक नेते पुढे गेले आहेत. तीच पायरी पार करून प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्वही मोठं व्हायला मदत झाली आहे. बंद हे असंवैधानिक आहेत. तरीही ते पुकारले जातातच. दुष्काळ आवडे सर्वांना याप्रमाणे बंद आवडे राजकीय पक्षांना अशी स्थिती आहे.
पण या ३ दिवसाच्या हिंसाचारामुळे राज्यात पुन्हा जातीयवाद फोफावणार हे स्पष्ट झालं आहे. मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला आहे. गुजरातला संघाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. गुजरात मॉडेल म्हणजे विकासाचं मॉडेल नाही. तर मुस्लीमांची भीती दाखवून मतं मिळवायची, हे गुजरात मॉडेल आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या काही हताश पुरोगामी शक्ती कार्य करत आहेत, असं वाटतंय. जिग्नेश मेवानी, उमर खालिद, कन्हैया कुमार यासारखी मंडळी राज्यात फिरवून तणाव निर्माण करायचा. भाजप जशी मुस्लीमांची भीती दाखवतं, त्याचप्रमाणे ही मंडळी हिंदूत्ववाद्यांची भीती दाखवून मतांची मशागत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जशी संघाची गुजरातची प्रयोगशाळा धोकादायक आहे तशीच ही काही हताश पुरोगाम्यांची महाराष्ट्रातली प्रयोगशाळाही धोकादायक आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेतून जातीयवादाची रसायनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील. अजून मोठे हिंसात्मक बंद, मोठे मोर्चे पुकारले जातील. अर्थात त्यावेळीही सरकार ढिम्मच राहील. कारण यातूनच मतांचं पीक बहरणार आहे. शेतक-यांच्या पिकाला जरी भाव नसला तरी हे मतांचं पिक सत्ता मिळवण्यासाठी मदतीचं ठरणार आहे.


No comments:

Post a Comment