Sunday, October 1, 2017

अगर तुम न होते...

राजकीय नेते आणि पत्रकार, म्हणजे एक दुजे के लिये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (असून अडचण नसून खोळंबा ही म्हण इथे लागू होत नाही, याची कृपया टीकाकारांनी नोंद घ्यावी.) वृत्तपत्रांना बातम्यांसाठी नेते मंडळी हवी असते. पण त्यांचं कसं आहे की, नेते किेंवा प्रवक्त्यांना कॉल केला, बातमी केली. ती वेब एडिशनला किंवा दुस-या दिवशी वृत्तपत्रात छापून आली विषय संपला.
पण न्यूज चॅनेलचं तसं नाही. न्यूज चॅनेल सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड सुरू असतात. (नशीब रात्री १२ नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम असतात. नाही तर आम्ही नेते आणि प्रवक्त्यांना झोपूही दिलं नसतं.) दिवसभर (काही ना काही) बातम्या दाखवायच्या असतात. आमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सगळ्यात आधी सामनात काय छापून आलं ते बघायचं. अग्रलेखात सरकारवर टीका. लगेच सात वाजता ब्रेकींग करायची. तिकडे असाईनमेंट डेस्कही कामाला लागतो. आठच्या बुलेटिनला संजय राऊत यांचा फोनो. नेहमीचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न. आम्ही काहीही विचारलं तर उत्तरं मात्र राऊत यांना जी हवी आहेत तीच मिळतात. मग लगेच भाजपच्या प्रवक्त्याला फोन. आम्ही सांगतो बघा, बघा तुमच्या सरकारविषयी सामनात काय छापून आलं. लगेच माधव भंडार, मधू चव्हाण गरम आवाजात बोलायला लागतात. आमचा प्रयत्न असतो, राऊत आणि भाजपच्या प्रवक्त्याला भिडवून द्यायचं. पण तोपर्यंत संजय राऊत फोन कट करतात. मग पुढची पाच मिनीटं भाजपचे प्रवक्ते त्यांची खदखद बाहेर काढतात, सरकारला धोका नाही असं ते शेवटी निक्षूण सांगतात. मला तर असं वाटतं, आशिष शेलार, माधव भंडारी सकाळीच सामनावाचून काढत असतील. न्यूज चॅनेलमधून कॉल येण्याच्या आधीच कोणते मुद्दे मांडायचे याची तयारी ते आधीच करत असतील. या विषयावर काँग्रेसच्या नेते मंडळींचा फोनो घ्यायचा असतो. पण काँग्रेसमध्ये या विषयावर बोलणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. लगेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं नाव समोर येते. चांगले सदगृहस्थ. कधीही फोन करा, फक्त विषय सांगा. धन्यवाद, म्हणेपर्यंत बोलत राहतात. त्यांचं बोलणं होतं, आणि इकडं बुलेटिनही संपतं.
फोनो घेताना काही विषयांमध्ये तज्ज्ञ असे नेते आहेत. दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर म्हटलं तर संजय राऊत यांच्या शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित घोटाळे असल्यावर डॉ. नीलम गो-हे (माझं आडनाव गोरे आहे. आमचं आडनाव थोडं सारखं असल्यानं, मी अनेकदा नीलम ताईंच्या फोनोला प्राधान्य देतो. आता म्हणा आडनावात काय आहे ?) दुर्दैवानं महिला अत्याचाराची बातमी आल्यावर डॉ. नीलम गो-हे, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावं प्राधान्यानं समोर येतात. सनातन, इशरत जहाँ, डेव्हिड हेडलीचा विषय आल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय बोलणारा हुकुमी एक्का दुसरा कोणीच नसतो. छगन भुजबळांच्या विषयी फोनो घ्यायचा म्हटलं तर किरीट सोमय्यांशिवाय पानही हलत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की, आधी सोमय्यांचा फोनो होतो आणि नंतर ईडीची कारवाई होते.
एकनाथ खडसे यांच्याविषयी थोडंही खट्ट झालं की, अंजली दमानिया, प्रिती मेनन-शर्मा, नवाब मलिक दणक्यात फोनो देतात. चिक्की घोटाळ्याच्या वेळी तर किती फोनो घेतले असतील याची गणती नाही. भाजपचेच नेते असाईनमेंटला फोन करून सांगायचे, आमचे फोनो घ्या. त्यांना पंकजा मुंडेंना वाचवायचं होतं की गोत्यात आणायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.
पण फोनो देण्यात सर्वात अव्वल दर्जाचे नेते आणि प्रवक्ते भाजपचेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ही मंडळी आता सत्तेत आहे म्हणून. त्यांनी दिलेले फोनो आजही सर्वच चॅनेलमध्ये काम करणा-यांच्या लक्षात आहेत. मला तर असं वाटतं फोनो, लाईव्ह, मुलाखती, 121, बाईट्स देऊन ही मंडळी सत्तेत बसली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, माधव भंडारी, मधू चव्हाण, अवधूत वाघ या मंडळींना कधीही फोन केला आणि ते फोनोला नाही म्हटले हे आठवत नाही. आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवण्यात या मंडळींनी दिलेले फोनो आणि लाईव्ह महत्त्वाचे होते. लाईव्हसाठी तर ही मंडळी कुठूनही धावतपळत ऑफिसला पळत यायची. आता मात्र ओबीशिवाय ही मंडळी लाईव्हला बसत नाहीत.
हे असं आमचं नातं आहे. अगर तुम न होते, खरंच नेते मंडळी आणि प्रवक्ते मंडळी अगर तुम न होते तो हमारे बुलेटिन न निकलते. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, स्टुडिओत ऑनएअर एकमेकांवर जोरजोरात आरोप-प्रत्यारोप करणारे, ओरडणारे हे नेते आणि प्रवक्ते टॉक शो संपल्यावर हसत-हसत एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर पडतात. कधीकधी तर एकाच गाडीतूनही जातात. त्या दिवसाचा टॉक शो संपतो. रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते. काही तरी घडतं, आणि पुन्हा सुरू होतात...फोनो...फोनो...फोनो...लाईव्ह...लाईव्ह...लाईव्ह.

No comments:

Post a Comment