Sunday, January 29, 2017

शिवसेना काबिल, भाजप रईस

(सदरहू लेखकाने हा ब्लॉग प्रकाशित करण्याआधी काबिल आणि रईस हे दोन्ही चित्रपट पाहिले. त्यानंतर दोन्ही पक्षांना यात फिट बसवले. चित्रपटातले डायलॉग पक्ष आणि नेत्यांच्या तोंडी बसवले. या ब्लॉगमधलं सर्वच खरं असेल असं नाही. किंवा सर्वच खोटं असेल असंही नाही.)

राज्यात आता पालिका, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडायाला सुरूवात झाली आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय, ते मुंबई महापालिकेकडे. युती तोडण्याचा सर्जिकल स्ट्राईक करून उद्धव ठाकरेंनी भाजपला शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये धोबीपछाड दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याच मैदानावर पाणी पित का होईना, पण पाणी पाजू असं स्पष्ट केलं.
आता वळू मुख्य विषयाकडे. काबिल चित्रपटाचं सर्व कथानक मुंबई शहरातलं आहे. तर रईस गुजरातमधला. शिवसेनेचं जन्मस्थान मुंबई. तर भाजपचे महत्त्वाचे नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह ही मंडळी गुजरातची. हवं तर रईसच्या गाववाले म्हणा. त्यामुळे बरेच गुण जुळूही शकतात.
काबिल चित्रपटात राजकीय गुंड कम नेता दाखवला आहे. त्याचं नाव आहे माधवराव शेलार. लगेच भांडारींची आठवण आली. माधवरावचा लहाना भाऊ, अमित. लगेच आठवण आली, ती शाह यांची. एका क्षणी तर असं वाटलं की, माधवरावचं नाव आशिष का ठेवलं नसेल ? तर चित्रपटातली ही गुंड मंडळी. ही मंडळी काबिल असलेल्या हृतिक रोशनच्या वैवाहिक आयुष्याला नजर लावतात. अंध दाम्पत्य असलं तरी त्यांच्या पारदर्शक संसारात विष कालवतात. मग काय अंध आणि एकटा असला तरी हृतिक रोशन हा वसीम, अमित आणि माधवरावला ढगात पाठवतो.
पण हा चित्रपट पाहताना शिवसेना भाजपला बोलत आहे असं मला भासत होतं.  "यह खेल उन्होंने शुरू किया था, तमाशा आप लोगों ने देखा...खतम मैं करूंगा". विधानसभा निवडणुकीच्या आधी युती तोडून भाजपनं खेळ सुरू केला होता. आता पालिका निवडणुकीत हा खेळ शिवसेना संपवणार आहे, या प्रकारे हृतिकचा डायलॉग मला भासला. "आदमी का खुद पे भरोसा, उसकी ताकद होती है". म्हणजेच स्वबळ हीच ताकद आहे, हा आवाज सेना भवनमधून घुमत असल्याचा भास झाला. पण हृतिकच्या एका डायलॉगवर मात्र मला काहीच सूचलं नाही. "अँधेरे में अगर किसी का साथ हो ना, तो अँधेरा कम लगता है". या निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेकडे कोणताही मित्र पक्ष नाही. त्यामुळे अँधेरा कम होण्याची शक्यता काही दिसत नाही. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अशी परिस्थिती उदभवू शकते. ज्यात हृतिक म्हणतो, "आप की आँखे तो खुली रहेंगी, लेकिन आप कुछ देख नहीं पायेंगे. आप के कान खुले रहेंगे, पर आप कुछ सून नहीं पायेंगे. आप का मुंह खुला रहेगा लेकिन आप कुछ बोल नहीं पायेंगे. " भाजपच्या मस्तवाल नेत्यांना मुंबईकरांनी दणका दिल्यावर, त्यांची वरील डायलॉगप्रमाणे मराठीत सांगायचं म्हणजे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती होईल.
आता वळू या रईसकडे. शाहरूखचा चित्रपट म्हटल्यावर त्यात इतरांना महत्त्वच नसतं. अगदी भाजपसारखंच. सत्तेत आल्यावर सगळा फोकस आपल्यावर, मलईदार खाते आपल्याच पक्षाकडे, मित्रपक्षांना किंमत न देणे. गुजरात ही रईसच्या अवैध व्यवसायाची कर्मभूमी होती. अगदी संघाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात ओळखला जातो तशीच. गुजरातमधला माफिया असलेल्या रईसनं सर्व गुजरातवर त्याचं वर्चस्व निर्माण झाल्यावर मुंबई बॉम्बस्फोटाला मदत केली होती. अर्थात चित्रपटात जरा वेगळंच दाखवलं. ते जाऊ द्या. पण रईसप्रमाणेच नरेंद्र मोदींनी सर्व गुजरातवर वर्चस्व निर्माण केल्यावर राष्ट्रीय पातळीवर प्रवेश करून थेट पंतप्रधानपद मिळवलं.
रईस चित्रपटात शाहरूख जेव्हा, "बनिये का दिमाग", हा डायलॉग फेकतो तेव्हा बनिया अमित शाह डोळ्यासमोर येतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लावलेला दिमाग, सर्व देशाने पाहिलेला आहे. "अम्मी जान कहती थी. कोई धंदा छोटा नहीं होता. और धंदे से बडा कोई धर्म नहीं होता". बस्स, लगेच डोळ्यासमोर आली राष्ट्रवादी काँग्रेस. स्थिर सरकारसाठी भाजपला पाठींबा देणारी राष्ट्रवादी. फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेली राष्ट्रवादी. आणि मग शाहरूखचा डायलॉग पुढील प्रमाणे भासला. "साहेब कहते है, कोई राजकारण छोटा नहीं होता. और राजकारण से बडा कोई धंदा नहीं होता."
"जो धंधे के लिये सही वो सही...जो धंधे के लिये गलत वो गलत...इससे ज्यादा कभी सोचा नहीं". या डायलॉगनंतर डोळ्यासमोर आले नरेंद्र मोदी. शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो, असं मोदी बोलले होते. ते आठवून गहिवरून गेलो. मग वरील डायलॉग मोदी म्हणताहेत असा भास झाला. "जो राजनिती के लिये सही वो सही...जो राजनिती के लिये गलत वो गलत...इससे ज्यादा कभी सोचा नहीं."
आणि मास्टरस्ट्रोक होता तो पुढेच. रईस म्हणतो, "दिन और लोगो के होते है..मजूमदार साहिब...शेरों का जमाना होता है". या डायलॉगनंतर डोळ्यासमोर आले ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि मग ते त्यांच्या ठाकरी शैलीत म्हणाले, "लाट ही काही पक्षांची असते, नरेंद्र भाई. महाराष्ट्रात डरकाळी असते ती फक्त वाघाची"
हा माझा जरा फिल्मी अंदाज होता. आता मतदारांना शिवसेना काबिल वाटते की भाजपवाले रईसजादे वाटतात ? हे निकालानंतर कळेलच. तो पर्यंत हे छोटंसं मनोरंजन. दोन्ही चित्रपटात कोण बदला घेतो, आणि कोण मरतो हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण काबिल आणि रईस मी पुन्हा पाहणार आहे. कारण पहिल्यांदा पाहताना त्यात, नेते मंडळी आली होती. पुन्हा दोन्ही चित्रपट पाहीन.
       आपलाच प्रेक्षक आणि समीक्षक - संतोष गोरे.




5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Relate the dailougs with political parties was gr8 thought nd awesome observation ....

    ReplyDelete
  3. Relate the dailougs with political parties was gr8 thought nd awesome observation ....

    ReplyDelete
  4. संतोष जी हसु की रडु खरंच कळत नाही म्हणुन रडता रडता हसतो अप्रतिम निरीक्षण आणी कल्पकता..

    ReplyDelete