Friday, February 12, 2016

जेएनयूतले राष्ट्रद्रोही


"काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी‘...ही घोषणा पाकिस्तानात नव्हे तर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खुलेआमपणे देण्यात आली. ‘द कंट्री विदाउट ए पोस्ट ऑफिस’ या शिर्षकाखाली जेएनयूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा दावा विद्यार्थी करत होते. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाची झूल पांघरूण देशविरोधी वक्तव्य तिथं केली गेली. त्यासाठी मुहूर्त निवडला गेला होता तो, 9 फेब्रवारीचा. याच दिवशी तीन वर्षांपूर्वी अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आलं होतं. अफजल गुरू हा भारतीय न्यायव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच ही राष्ट्रद्रोही मंडळी थांबली नाही. 'अफजल हम तुम्हारे अरमानो को मंजिलों तक पहूँचायेंगे', अशी घोषणाबाजी करून संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची गर्भित धमकीच देण्यात आली.
 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भटला फासावर लटकवण्यात आलं होतं. भारतीय विमानाचं अपहरण, ब्रिटनमधल्या भारतीय उच्चायुक्तातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या यात मकबूल भटचा सहभाग होता. तर संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरू दोषी होता. मात्र या दोन्ही दहशतवाद्यांचं उदात्तीकरण सुरू होतं.
भारत सरकार देत असलेल्या निधीतून हे विद्यार्थी जेएनयूमध्ये शिक्षण घेतात. हा निधी सामान्य जनतेनं दिलेल्या कराच्या रूपातून येतो. आणि घेतलेल्या या शिक्षणाचा वापर हे विद्यार्थी देशाच्या विरोधात करतात, असंच यातून स्पष्ट होतं. भारतीयांच्या पैशावर पोसलेली ही औलाद आता देशाच्या विरोधातच गरळ ओकू लागली आहे. विद्यापीठ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं ठिकाण होय. मात्र या ठिकाणी तर चक्क राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र येत असल्याचं चित्र आहे. सियाचीनमध्ये सीमेचं रक्षण करताना बर्फाखाली गाडले गेलेले हणमंतप्पांवर दिल्लीत त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत होते. तर दुसरीकडे फ्रीडम ऑफ स्पिचच्या नावाखाली जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत होती. या असल्या राष्ट्रविरोधी शक्तींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ज्यामुळे नंतर कोणी अशी हिंमत करण्याचं स्वप्नही पाहणार नाही.

No comments:

Post a Comment