Friday, September 21, 2012

गणेशोत्सव : संभाजीनगर टू मुंबई व्हाया हैदराबाद

वरील शिर्षक वाचून चाणाक्ष वाचकांनी हा लेख तीन शहरातल्या गणेशोत्सवावर आहे, हे ओळखलं असेलच. ( अर्थात ओळखू येऊ नये, इतकं ते अवघडही नव्हतं. ) गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तीचा अनोखा उत्सव. आपल्या लाडक्या दैवताच्या भक्तीत भक्त या  काळात दंग होतात. संभाजीनगरला माझ्या लहानपणापासून गणपतीचं आगमन होतं. गणपतीच्या आरतीसाठी फुलं आणि दुर्वा आणण्यातला आनंद आणि उत्साह अवर्णनीय असाच असायचा. माझ्या लहानपणी संभाजीनगरला गणेशोत्सवात मेळे चांगलेच भरायचे. अर्थात तेव्हा मेळे शेवटच्या घटका मोजत होते. आता तर बहुतेक मेळे हा प्रकारच बंद पडल्यात जमा आहे. मी स्वत: सातवीत असताना तर माझा लहाना भाऊ पाचवीत असताना या मेळ्यात सहभागी झालो होतो. या मेळ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जायचा. या माध्यमातून माझं रंगभूमीवर पदार्पण झालं. मग काही शालेय नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याचा शेवटही झाला. मात्र माझा भाऊ रवींद्र याने मेळ्यात आलेल्या स्टेज डेअरिंगचा फायदा घेत शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात वक्तृत्व आणि वाद-विवादाच्या क्षेत्रात चांगलंच नाव कमावलं. मेळा, वक्तृत्व आणि आता वकिली या मार्गाने त्याचा प्रवास झाला.
गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी आई-वडिलांबरोबर जाण्याची गंमतच निराळी होती. शहागंज मधली गणेशोत्सवाची लाईटिंग पाहण्यासाठी गर्दी व्हायची. गुलमंडीवरही आकर्षक लाईटिंग असायची. गुलमंडीवर गेल्यावर उत्तम मिठाई भांडारमधली इम्रती खाल्ल्याशिवाय पाय निघायचा नाही.
लहानपणी केबल वाहिन्या नसल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गल्लीत व्हिडीओवरील चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. नगिना, त्रिदेव, तिरंगा, राम लखन, अशी ही बनवाबनवी असे अनेक चित्रपट तेव्हा तुफान जल्लोषात पाहिले.
शालेय जीवनानंतर अकरावीत गेल्यावर मी आमच्या भागातल्या सर्वोदय गणेश मंडळाचा कार्यकर्ता झालो. हे 1994 हे वर्ष होतं. त्यावेळी आम्ही घरोघरी जावून वर्गणी गोळा केली. मंडळाला स्वत:चं झांज आणि ढोल पथक स्थापन करायचं होतं. मात्र जमा झालेली वर्गणी आणि होणारा एकूण खर्च यांचा काही मेळ बसत नव्हता. त्यावर आमची माथापच्ची सुरू होती. यामुळे वैतागेलेला आमचा एक सहकारी गुलचंद याने 'काय ती झांज, अन काय ते धंदे', असा अफलातून डायलॉग मारला. आणि या डायलॉगमुळे तणाव नाहीसा झाला आणि सगळेच हसायला लागले. आता तर गुलचंदचा 1994 मधला डायलॉग दरवर्षी आठवला जातो. मंडळातले सगळेच जुने सहकारी म्हणजेच विलास गायकवाड, सुरेश गायकवाड, राजू शिंदे, गजानन लंबे, किरण हडदगुणे, सतीष निकम, बबलू त्रिवेदी आताही संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवात दंग झाले आहेत. संभाजीनगरात जल्लोषात निघणारी विसर्जन मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.
2003 मध्ये नोकरीच्या निमीत्ताने हैदराबादला गेलो. तिथंही मोठ्या धडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. रामोजी फिल्म सिटीतल्या ई टीव्हीमध्ये तेव्हा गणेशोत्सव होत नव्हता. 2004 मध्ये ई टीव्ही मराठी प्रोग्रामींगच्या समीर भोळे, रघुनंदन बर्वे, राज साळोखे, विजय गालफाडे अर्थात मीही होतोच. यांच्या पुढाकाराने फिल्मसिटीतल्या आलमपनाहमध्ये कोजागिरीच्या दिवशी चांदरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा मी प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्ये होतो. त्यानंतर गणेशोत्सवाच्या ई टीव्हीच्या न्यूज डेस्कवर गणेश महाराज विराजमान झाले. विसर्जनानंतर आलमपनाहमध्ये पुन्हा कार्यक्रम ठेवण्यात आला. सर्व सहका-यांनी हिंदी - मराठी गीतांवर तुफान डान्स केला. या कार्यक्रमानंतर एका महिन्यात माझी न्यूज डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. ही सर्व गणेशाची कृपा, असं मत सर्व सहका-यांनी व्यक्त केलं. त्यानंतरचा 2005 आणि 2006चा गणेशोत्सव तर कधीच विसरणार नाही, असा झाला. या दोन्ही वर्षी सगळ्या सहका-यांच्या केलेल्या नकला आणि मारलेले 'मार्मिक पंच' अजूनही लक्षात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात डेस्कवर मोठा उत्साह असायचा सकाळ - संध्याकाळ आरती चुकायची नाही. सजावट करण्यासाठीही सहका-यांचा उत्साह असायचा. गणेशोत्सवाच्या काळात माझं नकला करण्यासाठीचं स्क्रिप्टींग सुरू असायचं. आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी दणादण फटाके फुटायचे.
कार्यक्रमाचा शेवट हा सामूहिक नृत्यानं व्हायचा. त्याची तर सगळेच वाट बघायचे. त्यात एकेकाचं पदलालित्य म्हणजे अफलातून असंच असायचं. 2007चा गणेशोत्सव अमरावतीत साजरा झाला. बातमी आणि गणेशोत्सव दोन्हीही एकाच वेळी झाले.

2008 पासून मुंबईतल्या गणेशोत्सवात सहभागी होण्याचं भाग्य मिळालं. झी 24 तासच्या ऑफिसमध्ये दरवर्षी गणेश महाराजांचं आगमन होतं. अर्थात ही मुंबई आहे. त्यामुळे इथं सगळं कसं फास्ट असतं. इथं हैदराबादसारखा दहा दिवसांचा गणपती नसतो. इथं आपला दीड दिवसांपासून ते तीन, चार, पाच दिवसांचे गणपती असतात. अर्थात उत्साहात कुठेही कमतरता नसते. मात्र आता बाप्पा आमचा उत्साह जिवंत तरी राहणार की नाही, अशी शंका येतेय. देशात वाढत असलेला इस्लामी दहशतवाद तुझ्या भक्तीच्या आड येत आहे. तुझ्या भक्तीत दंग असताना दहशतवादी त्यांचा डाव तर साधणार नाही ना ? अशी भीती वाटत राहते. देवा तुला माहितच आहे की ज्या देशात आम्ही राहतो तो बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. मात्र हा बहुसंख्य हिंदूंचा देश धर्मनिरपेक्ष असा आहे बरं का. आता जगात 'इनोसेन्स'च्या नावावरून एका जमातीचा जो काही 'नॉनसेन्स' सुरू आहे त्यांना जरा सुबुद्धी देरे बाप्पा. आता या लोकांना कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या सांगणार नाहीत. बाप्पा तुला आठवतच असेल की, एक हुसेन नावाच्या चित्रकाराने हिंदू देवींची आक्षेपार्ह चित्रं काढली होती. त्यावर हिंदू संघटनांनी आवाज उठवल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळे काढण्यात आले होते. मात्र आता 'इनोसेन्स'साठी कसं कुणीच आपल्या धर्मनिरपेक्ष देशात उभं रहात नाही. या चित्रपटावर तर बंदीही टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. बाप्पा संकटं फार आहेत.
लेखाचं शिर्षक आणि शेवट थोडं विसंगत आहे. मात्र बाप्पा चुकलं-माकलं माफ कर.

2 comments:

  1. गणेशित्सवावरील लेख सुरेख आहे. मला आवडला. आमच्या पिढीत ’मेळे’ लोकप्रिय असत. त्याबद्दल मी काय लिहिले आहे ते ’मैत्री’ अनुदिनीवरील माझ्या लेखात वाचा. संतोष, सुंदर लेखाबद्दल तुमचे अभिनंदन.
    यशवंत कर्णिक

    ReplyDelete
  2. संतोष दादा तुम्ही लिहिलेला प्रतेक लेख मी वाचतो
    अतिशय सुंदर आणि रोक-ठोक शैलीत लिहिलेले तुमचे लेख वाचायला फार आवडतात

    तुमच हे हिंदून वर असलेल प्रेम वाचून आम्हालाही हिंदू असल्याचा गर्व होतो :-)

    ReplyDelete