Sunday, April 22, 2012

अमरावतीतली पत्रकारिता


20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा. मात्र या पैकी कोणताही प्रयत्न न करता माझी अमरावतीसाठी निवड झाली होती. याचा माझ्यासह अनेकांना धक्का बसला होता. अर्थात कोणतंही राजकारण न करता, बदल घडवता येतात, हे यातून तेव्हा दिसून आलं. एक प्रकारे डेस्कवर कोणत्याही राजकारणात न राहता अलिप्त राष्ट्रांप्रमाणे आगेकूच करणा-या विचारसरणीचा तो विजय. आता तुम्ही म्हणाल साधी बदली पण काय कौतुक ? आता आपलं कौतुक आपणच करण्याचे हे दिवस आहेत. त्याला काय करणार ?
अर्थात मी मागितलं होतं संभाजीनगर, मात्र मला मिळाली अमरावती. असा हा प्रकार घडला होता. नाही तरी जे मागितलं ते मिळण्याऐवजी दुसरंच पदरी पडण्याचा दोषच माझ्या मागे लागला आहे. अर्थात हा दोषही दूर होईलच. थोड्याशा नाराजीनं मी अमरावतीमध्ये प्रवेश केला. वडाळी भागातल्या आमच्या ऑफिसमध्ये मी सकाळी पोहोचलो. तिथं माझी आणि प्रफुल्ल साळुंखेची भेट झाली. कॅमेरामन आशिष यावले, कृष्णा भागबोले आणि मिलिंद वाडे ही आमची तिथली टीम. तर अमरावतीच्या ब्युरोमध्ये माझ्याबरोबर उमेश अलोने, सत्यपाल घाटे, दिनेश पवार, आशिष मलबारी हे रिपोर्टर अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिममध्ये काम रिपोर्टिंग करत होते. अर्थात माझी ही नाराजी काही दिवसातच दूर झाली. मी जणू या शहराच्या प्रेमातच पडलो. मालटेकडी भागात मिळणारं भजी-पोहे हे कॉम्बिनेशन अफलातून होतं. कचोरीबरोबर जर मिरची नसेल तर हॉटेलमध्ये दंगलसदृश्य परिस्थितीच निर्माण व्हायची. कचोरी आणि मिरचीवर अमरावतीकरांचं भारीच प्रेम.
मी आणि कॅमेरामन आशिष यावले ही जोडीही अफलातून होती. शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचं दृश्य आम्ही दोघे बरोबर असताना कुणाच्याही डोळ्यासमोर यावं, अशी आमच्या दोघांची उंची. आम्ही दोघे एकमेकांना 'भाऊ' या नावाने हाक मारायचो. अर्थात अमरावती शहरात सगळेच एकमेकांना भाऊ म्हणतात. सगळे पत्रकारही भाऊ, आणि नेतेही भाऊच. तर अशा या 'भाऊ'गर्दीच्या शहरात अल्प काळ का होईना पण पत्रकारिता करता आली. अमरावती शहराचं वैशिष्ट्य असं आहे की, या शहरानं जर एखाद्याला स्वीकारलं तर त्याला जीवापासून स्वीकारतात. आणि एकदा का व्यक्ती मनातून उतरली की मग त्याची कारकिर्द संपलीच म्हणून समजा. अशी अनेक उदाहरणं अमरावतीकरांना माहित आहेत. देवाच्या दयेनं अशी वेळ माझ्यावर आली नाही.

कोणत्याही एजंटची मदत न घेता आणि डिपॉझिट न देता घरही भाड्यानं मिळालं. संजीवनी कॉलनीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आमच्या शेजारी. अँडव्हेकोट अनिल कडू यांचा मी भाडेकरू. तसंच शेजारी असलेल्या राऊत कुटुंबाबरोबरही चांगलाच जिव्हाळा निर्माण झाला होता. अर्थात याचं कारण म्हणजे तेव्हा दोन महिन्यांचा असणारा माझा मुलगा वेद. कडू आणि राऊत कुटुंबात छोटं मुल नसल्यानं वेद चांगलाच लाडोबा झाला होता. घरापासून दूर असलो तरी त्याचं घरच्यासारख कोडकौतुक तिथं सुरू असायचं. त्यामुळे स्टोरीसाठी बाहेरगावी मुक्काम असला तरी पत्नी आणि मुलाची चिंता करावी लागत नव्हती. मात्र पत्नीबरोबर खरेदीला गेल्यावर छोट्या वेदला घेऊन दुकानाबाहेर उभं रहावं लागायचं. रिपोर्टिंगच्या धबडग्यातून तसा कुटुंबासाठी वेळही कमीच मिळायचा. मात्र 'जोशी मार्केट'मध्ये खरेदी करणं कधी जीवावर यायचं नाही. अर्थात 'जोशी मार्केट'मधली हिरवळ इथं मुद्दाम सांगण्याची वेगळी गरज नाही. दुकानाबाहेर मी छोट्या मुलाला घेऊन उभा असायचो. छोटासा गोंडस वेद सगळ्यांनाच आवडायचा. त्याला बघून सगळे माझ्याशी बोलायचे. नाही तर आमच्या बरोबर बोलायला कोणाला आवडेल म्हणा ?
याच वेदनं मला हेडलाईन दिली होती. तो आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं होतं. तिथं मोठी धावपळ सुरू होती. डॉक्टरला विचारल्यावर त्यांनी डेंग्यूचा पेशंट असल्याची माहिती दिली. मग काय वेदवर उपचार करून तडक घरी गेली. आशिष बरोबर होताच. लगेच मेडिकल रिपोर्ट, हॉस्पिटलची शॉट्स आणि डॉक्टरचा बाईट घेऊन बातमी फाईल केली. थेट हेडलाईनच. पत्रकाराचा मुलगा पत्रकाराला मदत करतो ती अशी.

बहुतेक 2006 च्या डिसेंबरमध्ये दर्यापूरची पोटनिवडणुक झाली. प्रचाराच्या काळात मला एका प्रतिस्पर्धी चॅनेलमधील रिपोर्टरचा फोन आला. तुझं पाकीट तयार आहे, ते घेण्यासाठी ये. हा फोन ऐकून मी हादरलो, मात्र ही कामं मी करत नाही असं त्याला सांगितलं. तत्कालीन महापौरांनी ही पाकीटं पोचती केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई - वडिलांनी केलेल्या उच्च संस्कारांपुढे अशी पाकीटं कधीही उभी राहू शकत नाहीत. मात्र या घटनेमुळं राजकीय वर्गात चांगली इमेज निर्माण झाली. ( अर्थात इमेज आधीपासून चांगलीच होती. ) मात्र प्रतिस्पर्धी चॅनेलमधले अनेक सहकारी मेळघाटमध्ये जाऊन तर कुणी अधिका-यांना ब्लॅकमेल करायचे. काहींना तर टोल नाक्यावाले नियमीत हप्ता देत होते, अशाही खबरा कानावर यायच्या.

मात्र या बजबजपुरीतही मोहन अटाडकर, अविनाश दुधे, सध्या मुंबईत असलेले रघुनाथ पांडे, प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर या पत्रकार आणि संपादकांचा अभ्यास मनाला भावला. त्यांचा विविध विषयातला अभ्यास नवख्या पत्रकारांना नक्कीच प्रेरक ठरणारा आहे. या शिवाय कामाच्या निमीत्तानं अनेक तालुका प्रतिनिधींची ओळख झाली. अशोक पिंजरकर, अनंत बोबडे, भारत राऊत यांच्या सारेख धडपडे पत्रकारही कायमचे लक्षात राहिले.

तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम  यांचा यवतमाळमध्ये शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पहिला जाहीर सत्कार अमरावतीमध्ये झाला होता. असा हा शेवट आणि आरंभ कव्हर करण्याची संधी मला मिळाली. खैरलांजीच्या घटनेचे उमटलेले हिंसक पडसाद कव्हर करताना चांगलीच दमछाक झाली होती. या काळात पीएम पॅकेजची अधिका-यांनी कशी वाट लावली, याच्या बातम्या कव्हर करण्यासाठी मी आणि आशिषनं शर्थ केली होती. शेतकरी आत्महत्येनंतर सरकारवर टीका करणारी बातमी आम्ही प्रकर्षानं देत होतो. मेळघाटसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्टोरी करून शेतक-यांना न्याय कसा देता येईल ? हाच प्रश्न आमच्या मनात असायचा. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही वेगळाच अनुभव देणा-या ठरल्या.

पुराची बातमी कव्हर करण्यासाठी मी, आशिष यावले, कृष्णा लोखंडे, राजेश सोनोने, सत्यपाल, प्रवीण मनोहर गेलो होतो. आमच्या गाडीच्या जवळपास पाणी जमू लागलं होतं. कृष्णा लोखंडेने धोका ओळखून तिथून गाडी दुसरीकडे न्यायला लावली. थोड्याच वेळात तिथं मोठा लोंढा आला. मात्र आम्ही त्यातून थोडक्यात बचावलो. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी पुरूषोत्तम भापकर यांनी बचावपथक पाठवून पत्रकारांची सुटका केली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दौ-यावर आले की, पत्रकारांच्या अंगावर काटा उभा रहायचा कारण नेत्यांच्या पुढेपुढे करणा-या कार्यकर्त्यांमुळे पत्रकारांची दाणादाण उडायची. त्या तुलनेत शिवसेना - भाजप युतीच्या नेत्यांचा कार्यक्रम शिस्तबद्ध असायचा. या मुळे आघाडी आणि युतीतल्या नेत्यांच्या वागणुकीचा तुलनात्मक अभ्यासही करता आला. नाही तर मास कम्युनिकेशनला 'कन्टेन्ट अँनालेसिस'वर मी लघुप्रबंध सादर केला होता. त्याचं प्रॅक्टीकल अमरावतीमध्ये पुन्हा एकदा करायला मिळालं.

अमरावतीमधली सांबरवडी आणि कचोरीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सांबरवडी म्हणजे कोथंबिर वडी. सुरूवातीला मला वाटलं की, इडली बरोबरच्या सांबरमध्ये एखादी वडी देत असावेत. या आठवणींबरोबर पत्रकारितेतल्या अनेक आठवणी मनात ताज्या आहेत. नऊ डिसेंबर 2007 ला अमरावती ब्युरोमध्ये असणा-या माझ्या सर्व सहका-यांनी मला हॉटेल प्रेसिडेंटमध्ये निरोप दिला. ( राष्ट्रपतींच्याच गावात प्रेसिडेंट नावाचं हॉटेल. बहुतेक हॉटेलवाल्याला प्रतिभाताई राष्ट्रपती होणार हे आधीच कळालं असावं.) निरोपाच्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. आमच्या अनेक ब्युरो चीफने जेव्हा शहर सोडलं तेव्हा इतरांनी आनंदानं पार्टी केली होती. मात्र माझं नशीब बलवत्तर होतं. कारण मला सर्व सहकारीच चांगले लाभले होते.
 अर्थात पत्रकारितेतला 'अर्थ' अमरावतीत जवळून कळाला. अनेक पत्रकारांना तिथं दुकान म्हटलं जायचं. मात्र मुंबईत आल्यावर तर पत्रकारितेतली दुकानं नव्हे तर 'मॉल' पहायला मिळाले.


8 comments:

  1. लेख छान आहे. तत्कालीन राष्ट्रपतींचे नाव अब्दुल कलम आझाद असे चुकून लिहिले गेले असावे. ते ए.पी.जे.अब्दुल कलाम असे पाहिजे होते. मौलाना अबुल कलम आझाद हे १९४२-४७ ह्या काळात कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.
    यशवंत कर्णिक.

    ReplyDelete
  2. गारू, हा ब्लॉग अमरावतीतल्या पत्रकारांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करा, म्हणजे झालं...

    पंकज इंगोले

    ReplyDelete
  3. गारू हैदराबादच्या आठवणी ताज्या झाल्या. पण मला जे आवडते ते कुठल्याही गटाचा तुमच्यावर शिक्का नाही ते... अहो हे टिकवतानाच प्रगती करणे हे तुम्ही साध्य केलयं आणि पुढेही कराल यासाठी शुभेच्छा.... :)

    विशाल पाटील

    ReplyDelete
  4. एकदम छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  5. व्वा छान..मुंबईत 'दुकानाचा मॉल' होतो, हा ब्लॉगचा कळसाध्याय उत्तम..संबंधितांपर्यंत ब्लॉग जरूर पोहचला पाहिजे..
    दिनेश पोतदार

    ReplyDelete
  6. संतोष गोरेजी,
    आपण आजही अमरावतीच्या आठवणी मनात जपून ठेवल्यात त्याबद्दल आपले अमरावती कराकडून मानावे तेवढे आभार.आपण तब्बल पाच वर्षांनी अमरावतीच्या पत्रकारितेतील "पाकीटबाजी" उजागर केली.आपण अमरावतीतली पाकीट बाजी किवा हफ्तेखोरी अर्धवट मांडली जरा त्या महाभागांचे नवे आपण प्रकशित केली असती तर संबंध अमरावतीतल्या पत्रकारांना कुणी संशयान पाहल नसत कारण आपण च उल्लेख केला कि या बजबजपुरीत काही चांगले पत्रकार आहेततेव्हा त्या महाभागांच्या रांगेत आपण या लोकांना उभ करन आपल्या सारख्यांच्या "संस्कारात" बसणार नाही.आपण या पाकीटबाज पत्रकारांचे ,हफ्तेखोर पत्रकारांचे नावे घोषित करून आपल्या निडर पत्रकारितेचा परिचय द्यावा

    ReplyDelete
  7. लेख झकास झाला आहे..अमरावतीला मी जाऊन आल्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर आहे..आता दुसरा कोपरा तुझ्या आणि अमरावतीच्या ऋणानुबंधामुळे..

    ReplyDelete
  8. अमरावतीच्या गोरेभाऊंची मुंबईच्या भायमध्ये बदली झाली वाटतं....लेख सुंदर झालाय..

    ReplyDelete