Friday, December 24, 2010

जातीय राजकारणाचा काँग्रेसी विखार

पुणे महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा ठराव मंजूर केला. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणारे साहित्य संमेलन उधळण्याची धमकी दिलीय. संभाजी ब्रिगेडसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माना तुकवत असल्याचे यातून स्पष्ट होतेय.
आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की, या संभाजी ब्रिगेडचा कशामुळे बाऊ केला जात असेल ? तर याचे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे की, संभाजी ब्रिगेडला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे या ब्रिगेडवर अधिक प्रेम आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या संघटनेचे अनधिकृत पितृत्वही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जात होते. आजही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही 'मराठ्यांचा पक्ष' अशीच आहे. मराठ्यांचा पक्ष म्हणवून घ्यायचे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा वारसा सांगायचा आणि आपले जातीय राजकारण रेटायचे ही राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यपद्धती आहे. जेम्स लेन प्रकरणावरून पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्युटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर ही ब्रिगेड विशेषकरून नावारूपाला आली. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसची ब्रिगेडला असलेली फूस लपून राहिली नव्हती.
काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस यांना इतिहास किंवा शिवाजी महाराज यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. दादोजी कोंडदेव या प्रकरणावरून त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. आदर्श सोसायटी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, लवासाचा घोटाळा, वाढती महागाई, कांद्याची दरवाढ, पेट्रोल - डिझेलची दरवाढ, शेतक-यांच्या आत्महत्या, आदर्श प्रकरणावरून हायकोर्टाने सरकारवर मारलेले ताशेरे, सानंदा प्रकरणावरून विलासरावांवर सुप्रीम कोर्टाने मारलेले ताशेरे या सारख्या अनेक समस्या आणि प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्याचा हा सत्ताधा-यांचा डाव आहे.
जर संभाजी ब्रिगेडला इतकाच इतिहासाचा पुळका असेल तर मग आतापर्यंत त्यांनी औरंगाबाद या नावाचा कलंक हटवण्यासाठी एक तरी आंदोलन का केले नाही ? ज्या पापी औरंग्याने संभाजी महाराजांना हालाहाल करून मारून टाकले त्या औरंग्याचे नाव कशासाठी या भूमीत घेतले जात असेल ? 1987 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले. मग अजूनही हे ब्रिगेडवाले औरंगाबाद हे नाव का घेतात ? सांगा कोण आहे तुमचा बाप संभाजी महाराज की औरंगजेब ? उस्मानाबादलाही धाराशिव असं नाव असताना कशामुळे सरकार हे नाव घ्यायला चाचरते ?
संभाजी ब्रिगेड या सरकारच्या पाठिंब्यावर चालत असलेल्या संघटनेने फक्त जातीय भूमिकेतून आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशा-यावर त्यांची कार्यपद्धती ठरवलेली आहे. तुमच्या ब्रिगेडच्या नावात संभाजी हे नाव आहे. किमान त्यांच्या नावावर तरी असे 'लांडे' राजकारण करू नका.

2 comments:

  1. Everybody knows this. question is what action is to be taken and by whom? Also Santosh pl. mail your phone number.. Want to talk about coverage of this issue on your channel. Sanjay Dabke

    ReplyDelete
  2. कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
    सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
    - कविराज भूषण.
    जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही.
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!

    "अनामिका"

    ReplyDelete