Wednesday, December 4, 2024

फिर वही दिल लाया हूं

 

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते देवेंद्र फडणवीस. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करून चित्र बदलून टाकलं. सलग तिसऱ्यांदा भाजपला शंभरीपार करण्याचा पराक्रम करून देवेंद्र फडणवीस बाजीगर ठरले.  2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शंभर नंबरी कामगिरी केलीय. मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर मला मोकळं करा असं वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांनी नंतर सगळ्यांनाच मोकळं केलं. विरोधकांना दणदणीत पराभव करून संपवलं. पक्षातील स्पर्धकही त्यांनी गलितगात्र करून टाकले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे ही तशी जुनी उदाहरणं. तर विनोद तावडेंना हितेंद ठाकूर यांनी डांबून ठेवलं होतं. तावडेंची टिप भाजपमधूनच दिल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. (ती टिप कुणी दिली? टिप देणारा कुणाचा खास होता? ही माहिती ठाकूरांकडून मिळवा.)

लोकसभा निवडणुकीत सुमारे 165 मतदारसंघात महाविकास आघाडीला अॅडव्हान्टेज होता. तर दुसरीकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात नाराजी होती. मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा परिणामकारक ठरण्याची शक्यता होती. कपाशी आणि सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे मराठवाडा, विदर्भातला शेतकरी सरकारवर खूश नव्हता. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होती.  मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. जागावाटप ते प्रचारयंत्रणा राबवण्याचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले. देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना सोबत घेत त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. राज्यभर प्रचाराचं नियोजन करून सरकारनं केलेली विकासकामं त्यांनी मतदारांसमोर मांडली. आणि सर्वात मोठा विजय साकार केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद झाल्याचा मुद्दा महायुतीकडून सातत्यानं मांडण्यात येत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनंही बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं. विधानसभा निवडणूक महायुतीनं धर्मयुद्धाप्रमाणं लढवली.राज्यभरात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, राज्यात झालेली सर्वाधिक गुंतवणूक, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड याचा फायदा महायुतीला झाला. विकासाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तयारी झालेली प्रतिमा महायुतीच्या यशात महत्त्वाची ठरली. 

देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे पक्षाचा आदेश पाळणे आणि वेळेनुसार भूमिका घेणे. 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री राहणार नाही, असं जाहीर केलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. 2014 मध्ये युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद दिलं नव्हतं. उपमुख्यमंत्रिपद असंवैधानिक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र ही ताठरता त्यांनी 2022 मध्ये सोडली आणि लवचिक धोरण स्वीकारत उपमुख्यमंत्री झाले.  

राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शिक्कामोर्तब केलंय. भाजपनं या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014च्या निवडणुकीत मिळवलेल्या 123 जागांचा विक्रम मोडला. भाजप आणि महायुतीनं विजयाचा नवा अध्याय लिहिलाय. अर्थात यामागे मेहनत होती ती देवेंद्र फडणवीस यांची. परिणामी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बाजीगर ठरले.

#संगो #BJP #devendrafadanvis #CM #maharashtra

Friday, November 29, 2024

शिवसैनिक ते मुख्यमंत्री

 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी त्यांची छाप उमटवली. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अर्थात हे शक्य झालं ते भाजपमुळे. उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपसोबत युती करून लढलेल्या उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्या घावाचा बदला घेण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. हिंदूत्व, बाळासाहेबांचा विचार असा मुलामा एकनाथ शिंदेंच्या बंडाला देण्यात आला. गद्दारी, 50 खोके अशी टीका सहन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्ष एकनाथ शिंदें मुख्यमंत्री राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं. 

कितीही टीका झाली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणावर स्वत:ची छाप उमटवण्यात यशस्वी ठरले.. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी नवी ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली होती. धर्मवीर आनंद दिघेंचे पट्टशिष्य असलेले एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या कार्यशैलीप्रमाणेच ठाण्यात काम सुरू केलं होतं. शाखाप्रमुखापासून सुरू झालेला एकनाथ शिंदेंचा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. 

मागील 25 वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावरील भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेवर कायम शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. इतकंच नव्हे तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार निवडून आणण्यातही एकनाथ शिंदेंची मेहनत होती. इतकंच नव्हे तर राज्यभरात कुठेही आपत्ती कोसळली तर मदतीचा हात देताना सर्वात पुढे एकनाथ शिंदेच असायचे. कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना एकनाथ शिंदेंनी केलेली भरीव मदत राज्यानं पाहिली होती.

2004 पासून विधानसभेवर निवडून येणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात 2022 मधील जून महिना महत्त्वाचा ठरला. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले होते. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी स्थापन केली होती. अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे भाजपच्या छावणीत दाखल झाले. 20 जून 2022 रोजी आमदार आणि मंत्र्यांसह त्यांनी सूरत गाठलं. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात गेलं. महायुतीसोबत जाऊन 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्याच्या क्षणापासून एकनाथ शिंदेंनी कामाला जोरदार सुरूवात केली. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट घटनास्थळी जाऊन मदतकार्यावर देखरेख ठेवली. इतकंच नव्हे तर इर्शाळवाडीतील नागरिकांचं पूनर्वसन आणि त्यांना नवी घरं देण्याची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना एकनाथ शिंदेंनी भेट दिली. सामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना मोठी मदत एकनाथ शिंदेंनी उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील महिलांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. 

महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा ठरला. या निर्णयामुळे एसटी महामंडळ नफ्यात आलं. तर विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवून महायुतीनं दणदणीत विजय मिळवला.  शिवसेनेचे तब्बल 57 उमेदवार निवडून आणले. मात्र एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच अमित शाह यांनी, त्याग करावा लागेल असं वक्तव्य एका बैठकीत केलं होतं. त्या बैठकीतील वक्तव्य माध्यमात आल्यानंतर, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं.

आता एकनाथ शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत वावरावं लागणार आहे. महायुतीत आधीच अजित पवार आल्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंची कितपत गरज आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपचा हा प्रवास किती वर्ष सुरू राहणार? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण भाजपसोबत राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी 'युतीत 25 वर्ष सडली' असं वक्तव्य केलं होतं. तशी वेळ एकनाथ शिंदेंवर येईल का? या प्रश्नाचं उत्तर आता भविष्यातच मिळेल. #संगो #शिवसेना  #एकनाथशिंदे #eknathshinde #cm