मागील 5 वर्ष आरोपांचा सामना करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर जिंकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियालाच अनेकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तर त्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईत मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या. परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असतानाही काही संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तर अक्षरश: खलनायिका ठरवलं होतं. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. 8 सप्टेंबर 2020 रोजी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे रियाची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तर आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे.
मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यात हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्स आघाडीवर होते. त्या काळात त्या चॅनेल्सच्या रिपोर्टर्सनी कसा उच्छाद मांडला होता, हे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत.
त्यातच 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत्या. आणि सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' अशा घोषणा तिथं भाजपकडून देण्यात आल्या.
मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. कारण माध्यमातील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती. बिहारमध्ये राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिकलफेक केली होती. मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरं गेली. रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली. आणि खोटे आरोप करणारा मीडिया, सोशल मीडिया, राजकीय पक्ष तोंडावर आपटले. अन् रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली.
#संगो #रियाचक्रवर्ती #सुशांतसिंहराजपूत