Saturday, January 17, 2026

'देवा'ची करणी विजयाची हमी, विरोधक कुठे पडले कमी?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा नंबर केलं. मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे तब्बल 89 उमेदवार जिंकले. संपूर्ण राज्यभरात हेच चित्र दिसलं. देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेतल्या. पक्षाची सर्व टीम कामाला लावली. त्यामुळे मोठं यश मिळालं. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 

 मागील तीन दशकांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नंबर वन असायची. शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकत होता. आताही जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, सहा आमदार आणि पालकमंत्री आहे. मात्र असं असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तर दुसऱ्या क्रमांकावर एमआएएमचे उमेदवार निवडून आले. परिणामी नंबर वन असलेल्या भाजपचा छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं. भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर मात केली. परिणामी जालन्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या भाजपचा महापौर बसणार यात आता कोणतीही शंका उरली नाही. जालन्या प्रमाणेच नांदेडमध्येही भाजपनं सर्वांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकवलाय. असंच यश नाशिक, जळगाव, केडीएमसी, उल्हासनगर, नागपूरसह तब्बल 23 महापालिकांमध्ये भाजपनं मिळवलं.

2017 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक होते. आता 2026 मध्ये भाजपचे 89 नगरसेवक आहेत. डबल इंजिन सरकार, कमकुवत विरोधक असतानाही 9 वर्षात भाजपचे सातच नगरसेवक वाढले. तर विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणारी शिंदेंची शिवसेना ठाण्यात अव्वल राहिली. मुंबई परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार चांगल्या संख्येनं निवडून आले. मात्र मुंबईत शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले होते, माजी नगरसेवकही शिंदेंसोबत होते. मात्र अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत चांगली झुंज देत 71 उमेदवार निवडून आणले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत महायुतीला कडवी झुंज दिली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. पक्षातील बडे नेते आणि अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र संकटाच्या काळात सोबत आलेल्या राज ठाकरेंमुळे कठिण काळातही ठाकरे ब्रँड टिकून राहिला. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मिळालेल्या जागा त्यांचा आत्मविश्वास बळकट करणाऱ्या ठरणार आहेत. इतकंच नव्हे तर ठाकरेंमुळे विरोधी पक्षही सक्षम झालाय.

हातात कोणतीही सत्ता नसताना ठाकरे बंधूंनी मुंबईत त्यांची ताकद दाखवून दिली. तर महायुतीत भाजपच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या. एकंदरीतच मुंबई महापालिकेवर महायुतीनं वर्चस्व निर्माण केलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंनी यश मिळवलं. टायगर अभी जिंदा हैं, अशी डरकाळी फोडत आम्ही अजून मैदानात आहोत, असा संदेशच ठाकरे बंधूंनी दिला. मात्र मुंबईच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. याचा बहुतेक ठाकरे बंधूंना विसर पडला असावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणि करिष्मा वेगळा होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीमध्ये सभा घ्यायचे. मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनाप्रमुखांची युतीची शेवटची सभा मुंबईत शिवाजी पार्कवर व्हायची. वातावरण बदलायचं आणि युतीला यश मिळायचं. मात्र आता राजकारण बदललं आहे. भाजप हा पक्ष आणि त्यांचे नेते 24 X 7 इलेक्शन मोडवर असतात. त्यामुळे ठाकरे बंधू आणि आदित्य, अमित यांनाही ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी भागासोबत नाळ जोडावी लागेल. तरच त्यांचे पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतील. 

सत्तेत असूनही एकनाथ शिंदे मुंबईत मागे पडले. मुंबईत भाजपचा महापौर होणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईवरील शिवसेनेचा झेंडा जावून आता भाजपचा झेंडा लागणार, ही बाब एकनाथ शिंदेंसाठी चिंता वाढवणारी आहे. आणि बहुतेक हेच हेरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जयचंद संबोधलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा रोवायला मदत केली, असं जिव्हारी लागणारं वक्तव्य त्यामुळेच करण्यात आलं. एकनाथ शिंदेंना मुंबईच नव्हे तर मराठवाड्यातही अपयश आलं. मागील तीन दशकांपासून ताब्यात असलेली छत्रपती संभाजीनगरची सत्ता राखण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संभाजीनगर आणि मराठवाड्यावर मोठा प्रभाव होता. तो प्रभाव शिंदेंच्या शिवसेनेला टिकवता आला नाही. मुंबई ठाण्यानंतर शिवसेना सर्वात जास्त जोमानं वाढली ती छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये. मात्र या दोन्ही शहरांमध्ये आता भाजपचा महापौर होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे.  

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीही एकत्र येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावांवर अनेक महानगर पालिकांमध्ये झीरो जागा मिळवण्याचा विक्रम जमा झाला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांवर भाजपनं मजबूत पकड मिळवली आहे. परिणामी कुटुंब म्हणून एकत्र असलेले दोन्ही पवार आगामी झेडपी, पंचायत समिती एकत्रितपणे लढवून कधी पक्षांचं विलिनीकरण कळतील हे कळणारही नाही.

सर्वात आश्चर्य आहे ते काँग्रेसचं. ना कुणाची सभा, ना कुणाचा रोड शो तरीही काँग्रेसनं लातूर, सोलापूर, कोल्हापूरमध्ये चांगली कामगिरी केली. एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होते. जो मेहनत घेईल त्याला यश मिळेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राज्यभर मेहनत घेतली त्यांनी संपूर्ण राज्यात यश मिळालं. बिकट परिस्थितीत ठाकरे बंधूंनी मेहनत घेतली त्यांना मुंबईत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्यानं पुढील राजकारण करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.

भाजपचे कार्यकर्ते अकेला देवेंद्र क्या क्या करेगा, असं म्हणत असत असतात. त्यावर विरोधक अशी टीका करतात की, देवेंद्र सोबत ईडी, सीबीआय, सरकारी यंत्रणा आणि दुसऱ्या पक्षातून घेतलेले भ्रष्टाचारी नेते आहेत. मात्र असं असलं तरी विरोधकांना मेहनत करायला, राज्यभर सभा घ्यायला कुणीही रोखलेलं नाही. आता बघूयात लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणते पक्ष किती मेहनत घेतात, रस्त्यावर उतरतात, जनतेत मिसळतात. जो जनतेत जाईल, शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न हाती घेईल त्याचा मतदारांचा आशीर्वाद मिळेल.


#संगो #बाळासाहेबठाकरे #शिवसेना  #भाजप  #महापालिका  #मुंबई #ठाकरे #फडणवीस #शिंदे

Sunday, July 6, 2025

पवार, फडणवीसांना जमलं. ठाकरेंना जमेल?

 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. पण हे दोन्ही भाऊ त्यांचे दोघांचे पक्ष किती वाढवतील? राज्यात सातत्यानं किती दौरे करतील? इतर पक्षातील किती नेते त्यांच्या पक्षात आणतील? असे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण पक्ष वाढवायचा असेल तर सातत्यानं दौरे करावे लागतात. कार्यकर्त्यांमध्ये मिसळावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं देता येईल. 

शरद पवार या वयातही राज्याच्या विविध भागात दौरे करतात. कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या पक्षातून कुणी दुसऱ्या पक्षात गेलं तर त्याला गद्दार म्हणत नाहीत. इतर पक्षातून कुणी आलं तर हुरळूनही जात नाही. नुकतंच आपण पाहिलं. विधानसभा निवडणुकीत अनेकांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतला, निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर संदीप नाईकसह अनेक नेत्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली. मात्र त्या बाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली नाही. नव्वदच्या दशकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पप्पू कलानीला पवारांनी राजकीय आश्रय दिला होता.  बॉम्ब स्फोटातील आरोपींना विमानात सोबत आणल्याचा आरोपही शरद पवारांवर झाला होता. नंतरच्या काळात त्यांच्या सोबत असलेले अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण शरद पवारांनी त्याची पर्वा केली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना बळ देत पक्ष वाढवण्यावर भर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपला प्रचंड सशक्त केलं आहे. अनेक पक्षातील नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. नेत्यांना पक्षात घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर त्या नेत्यांनी आधी काय आरोप केले होते, याकडे लक्ष दिलं नाही. फडणवीस नावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देऊ शकतो का? असं प्रश्न विचारून फडणवीसांच्या जातीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेंनाही त्यांनी पक्षात घेतलं. ही सोबतची लिंक पाहा, यातून तुम्हाला सर्व कळेल.

https://www.facebook.com/watch/?ref=search&v=3861802557419897&external_log_id=67696409-9e7b-4f75-8368-a428f81d5d45&q=%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

नितेश राणेंची वडील नारायण राणेंनी तर भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. त्यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंवरील गंभीर गुन्हेच वाचून दाखवले होते. सोबतची लिंक पाहा.

https://www.youtube.com/watch?v=d6fcR6uzi80

पक्ष वाढवायचा असेल तर मागील आरोप-प्रत्यारोप विसरून पुढे जायला देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिलं. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण यांच्यासारखे अनेक बडे ईडीच्या कारवाईनंतर किंवा ईडीनं कारवाई करू नये यासाठी थेट भाजपमध्ये आले किंवा भाजपच्या सोबत आले. या सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एकीकडे ईडी, सीबीआय, किरीट सोमय्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे लागायचे. नंतर हे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरण यायचे. किरीट सोमय्या कसे हात धुवून मागे लागायचे, त्याचं एक उदाहरण पाहा.

https://www.loksatta.com/maharashtra/kirit-somaiya-aggressive-over-sunil-tatkare-in-irrigation-scam-1216811/

अर्थात यात चूक काय म्हणता येईल? कारण तत्व जपून पक्ष वाढत नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी तत्वांचं राजकारण केलं. पण पक्ष वाढला नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह सत्तेत आल्यानंतर त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला. हेमंत बिस्व सरमा, मुकल रॉय, सुवेंदू अधिकारी, अजय चौटाला, भुमा नागी रेड्डी या भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेण्यात आलं. हे करताना भाजपचं पार्टी विथ डिफन्स कुठच्या कुठे गळून पडलं, हे कळालंही नाही. महाराष्ट्रातही राणे कुटुंब, विखे कुटुंब, अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांनाच पक्ष मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी सोबत घेण्यात आलं. भ्रष्ट नेत्यांना सोबत घेणं हा रणनीतीचा भागही असू शकेल. मात्र त्या सोबतच कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, मेळावे, विकास कामं, चौफेर दोरे, कार्यकर्त्यांची कामं करणं, नेत्यांकडून कामं करून घेणं या सर्वांवर भर देवून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विस्तार केला. राज्यात परकीय गुंतवणूक कशी वाढेल, औद्योगिकीकरण, समृद्धी महामार्ग अशी अनेक कामंही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शरद पवार आणि दवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणे कार्य करता येईल का? अर्थात ED, CBI, गृह खातं हाती नसल्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना पक्षविस्तार करताना नक्कीच मर्यादा आहेत. असं असलं तरी पक्षविस्तार अशक्यही नाही. पक्ष सोडून गेलेले मात्र पुन्हा येण्यास इच्छुक असलेल्यांना ठाकरे पक्षात घेतील का? मुंबई सोडून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकण या भागात हे दोघे भाऊ सातत्यानं दौरे करणार आहेत का? ग्रामीण भागात जावून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत का? ग्रामीण भागातील शिवसैनिक, मनसैनिक थेट मुंबईत येवून ठाकरेंना भेटू शकतील का? आदित्य ठाकरे, अमित ठाकरे रस्त्यावर उतरून युवकांचे प्रश्न मांडणार आहेत का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी ठाकरे आंदोलन करणार आहेत का?  कर्जमाफीसाठी ठाकरे पेटून उठतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तरच उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकतील.

#संगो #उद्धवठाकरे #राजठाकरे #शरदपवार #देवेंद्रफडणवीस  #BJP #SHIVSENAUBT #ED 


Sunday, March 23, 2025

...आणि रिया जिंकली



मागील 5 वर्ष आरोपांचा सामना करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर जिंकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियालाच अनेकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू  आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. तर त्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईत मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या. परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असतानाही काही संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तर अक्षरश: खलनायिका ठरवलं होतं. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. 8 सप्टेंबर 2020 रोजी रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे रियाची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तर आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे.

मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यात हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्स आघाडीवर होते. त्या काळात त्या चॅनेल्सच्या रिपोर्टर्सनी कसा उच्छाद मांडला होता, हे अजूनही नागरिकांच्या लक्षात आहेत. 


त्यातच 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत्या. आणि सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला. 'ना भूले हैं, ना भूलने देंगे' अशा घोषणा तिथं भाजपकडून देण्यात आल्या. 

मात्र आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. कारण माध्यमातील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती. बिहारमध्ये राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिकलफेक केली होती. मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरं गेली. रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली. आणि खोटे आरोप करणारा मीडिया, सोशल मीडिया, राजकीय पक्ष तोंडावर आपटले. अन् रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली. 

#संगो  #रियाचक्रवर्ती  #सुशांतसिंहराजपूत

Wednesday, December 4, 2024

फिर वही दिल लाया हूं

 

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते देवेंद्र फडणवीस. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करून चित्र बदलून टाकलं. सलग तिसऱ्यांदा भाजपला शंभरीपार करण्याचा पराक्रम करून देवेंद्र फडणवीस बाजीगर ठरले.  2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शंभर नंबरी कामगिरी केलीय. मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर मला मोकळं करा असं वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांनी नंतर सगळ्यांनाच मोकळं केलं. विरोधकांना दणदणीत पराभव करून संपवलं. पक्षातील स्पर्धकही त्यांनी गलितगात्र करून टाकले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे ही तशी जुनी उदाहरणं. तर विनोद तावडेंना हितेंद ठाकूर यांनी डांबून ठेवलं होतं. तावडेंची टिप भाजपमधूनच दिल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. (ती टिप कुणी दिली? टिप देणारा कुणाचा खास होता? ही माहिती ठाकूरांकडून मिळवा.)

लोकसभा निवडणुकीत सुमारे 165 मतदारसंघात महाविकास आघाडीला अॅडव्हान्टेज होता. तर दुसरीकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात नाराजी होती. मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा परिणामकारक ठरण्याची शक्यता होती. कपाशी आणि सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे मराठवाडा, विदर्भातला शेतकरी सरकारवर खूश नव्हता. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होती.  मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. जागावाटप ते प्रचारयंत्रणा राबवण्याचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले. देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना सोबत घेत त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. राज्यभर प्रचाराचं नियोजन करून सरकारनं केलेली विकासकामं त्यांनी मतदारांसमोर मांडली. आणि सर्वात मोठा विजय साकार केला.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद झाल्याचा मुद्दा महायुतीकडून सातत्यानं मांडण्यात येत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनंही बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं. विधानसभा निवडणूक महायुतीनं धर्मयुद्धाप्रमाणं लढवली.राज्यभरात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, राज्यात झालेली सर्वाधिक गुंतवणूक, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड याचा फायदा महायुतीला झाला. विकासाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तयारी झालेली प्रतिमा महायुतीच्या यशात महत्त्वाची ठरली. 

देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे पक्षाचा आदेश पाळणे आणि वेळेनुसार भूमिका घेणे. 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री राहणार नाही, असं जाहीर केलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. 2014 मध्ये युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद दिलं नव्हतं. उपमुख्यमंत्रिपद असंवैधानिक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र ही ताठरता त्यांनी 2022 मध्ये सोडली आणि लवचिक धोरण स्वीकारत उपमुख्यमंत्री झाले.  

राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शिक्कामोर्तब केलंय. भाजपनं या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014च्या निवडणुकीत मिळवलेल्या 123 जागांचा विक्रम मोडला. भाजप आणि महायुतीनं विजयाचा नवा अध्याय लिहिलाय. अर्थात यामागे मेहनत होती ती देवेंद्र फडणवीस यांची. परिणामी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बाजीगर ठरले.

#संगो #BJP #devendrafadanvis #CM #maharashtra

Friday, November 29, 2024

शिवसैनिक ते मुख्यमंत्री

 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी त्यांची छाप उमटवली. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अर्थात हे शक्य झालं ते भाजपमुळे. उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपसोबत युती करून लढलेल्या उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्या घावाचा बदला घेण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. हिंदूत्व, बाळासाहेबांचा विचार असा मुलामा एकनाथ शिंदेंच्या बंडाला देण्यात आला. गद्दारी, 50 खोके अशी टीका सहन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्ष एकनाथ शिंदें मुख्यमंत्री राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं. 

कितीही टीका झाली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणावर स्वत:ची छाप उमटवण्यात यशस्वी ठरले.. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी नवी ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली होती. धर्मवीर आनंद दिघेंचे पट्टशिष्य असलेले एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या कार्यशैलीप्रमाणेच ठाण्यात काम सुरू केलं होतं. शाखाप्रमुखापासून सुरू झालेला एकनाथ शिंदेंचा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. 

मागील 25 वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावरील भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेवर कायम शिवसेनेचं वर्चस्व राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. इतकंच नव्हे तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार निवडून आणण्यातही एकनाथ शिंदेंची मेहनत होती. इतकंच नव्हे तर राज्यभरात कुठेही आपत्ती कोसळली तर मदतीचा हात देताना सर्वात पुढे एकनाथ शिंदेच असायचे. कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना एकनाथ शिंदेंनी केलेली भरीव मदत राज्यानं पाहिली होती.

2004 पासून विधानसभेवर निवडून येणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात 2022 मधील जून महिना महत्त्वाचा ठरला. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले होते. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी स्थापन केली होती. अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे भाजपच्या छावणीत दाखल झाले. 20 जून 2022 रोजी आमदार आणि मंत्र्यांसह त्यांनी सूरत गाठलं. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात गेलं. महायुतीसोबत जाऊन 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्याच्या क्षणापासून एकनाथ शिंदेंनी कामाला जोरदार सुरूवात केली. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट घटनास्थळी जाऊन मदतकार्यावर देखरेख ठेवली. इतकंच नव्हे तर इर्शाळवाडीतील नागरिकांचं पूनर्वसन आणि त्यांना नवी घरं देण्याची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना एकनाथ शिंदेंनी भेट दिली. सामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना मोठी मदत एकनाथ शिंदेंनी उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील महिलांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. 

महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा ठरला. या निर्णयामुळे एसटी महामंडळ नफ्यात आलं. तर विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवून महायुतीनं दणदणीत विजय मिळवला.  शिवसेनेचे तब्बल 57 उमेदवार निवडून आणले. मात्र एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच अमित शाह यांनी, त्याग करावा लागेल असं वक्तव्य एका बैठकीत केलं होतं. त्या बैठकीतील वक्तव्य माध्यमात आल्यानंतर, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं.

आता एकनाथ शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत वावरावं लागणार आहे. महायुतीत आधीच अजित पवार आल्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंची कितपत गरज आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपचा हा प्रवास किती वर्ष सुरू राहणार? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण भाजपसोबत राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी 'युतीत 25 वर्ष सडली' असं वक्तव्य केलं होतं. तशी वेळ एकनाथ शिंदेंवर येईल का? या प्रश्नाचं उत्तर आता भविष्यातच मिळेल. #संगो #शिवसेना  #एकनाथशिंदे #eknathshinde #cm

Sunday, December 31, 2023

एकाची एन्ट्री अन् दोन बाजीगर

 

2023 या मावळत्या वर्षात मनोज जरांगे-पाटील हे नवं नेतृत्व समोर आलं आहे. उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील हिरो झालं. ज्या कुणी लाठीचार्जचा आदेश दिला त्याचे तर जरांगे पाटलांनी आभार मानायला हवे. गोळीबार झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकंदरीतच लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगे-पाटील यांचं नेतृत्व इतर कोणत्याही मराठा नेत्यांपेक्षा मोठं झालं आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे खुजे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आणि असे अनेक मराठा नेते जरांगे पाटील यांच्या लोकप्रियतेशी तुलना करू शकत नाहीत, यात शंकाच नाही.


बड्या नेत्यांना घेता येणार नाहीत अशा लाखांच्या सभा मनोज जरांगे-पाटलांनी घेतल्या. शंभर एकरच्या मैदानात भरगच्च झालेली गर्दी, असा करिश्मा मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवला आहे. राज्यभरात कुठेही सभा घेतली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं कसब मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारला मराठा आरक्षणासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची वेळ आली. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नवा नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांची एन्ट्री झाली.

दुसरीकडे अजित पवार सरत्या वर्षातील खरे बाजीगर ठरले. शिवसेना-भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून अजित पवार यांची प्रतिमा मलिन केली होती. पण त्याच अजित पवारांसोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मविआचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांच्या घोटाळ्याचे पुरावे भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपने चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केले होते. सिंचन घोटाळा संदर्भातील सुमारे 14 हजार पानाचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीवरून नेण्यात आले होते. संभाजीनगरमधील वाल्मीत चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते. ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना आपल्या सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली.  

अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवत आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला होता. त्याच शिवसेना शिंदे गटासोबतही अजित पवार टेचात सरकारमध्ये सहभागी झाले. दुसरा एखादा नेता असता तर कोलमडून गेला असता. पण अजित पवारांनी ज्यांनी टीका केली, त्यांच्यावरच सोबत नेण्याची वेळ आणली. हरलेली बाजी जिंकत अजित पवार बाजीगर ठरले.

तर दुसरीकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. तेलगी घोटाळ्यातही भुजबळांचं नाव आलं होतं. वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ मधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या सर्व घोटाळ्याच्या आरोपांमुळे आणि जेलवारीमुळे छगन भुजबळ बदनाम झाले होते. पण मविआच्या काळात त्यांना पावन करून सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. त्यानंतर महा्युतीच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री झाले. ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याच सोबत छगन भुजबळ बसले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनाच बळ देण्याचं काम सरकारला करावं लागलं, अशी चर्चा आहे. एकंदरीतच जेलवारी, घोटाळ्यांचे आरोप यावर मात करत छगन भुजबळ दुसरे बाजीगर ठरले.

राजकारणात कोणताच पराभव हा शेवटचा नसतो असं म्हटलं जातं. त्या सोबत आता असं म्हणावं लागेल की, कोणताही घोटाळा आणि जेलवारीमुळे राजकीय नेत्याचा शेवट होत नसतो. सरत्या वर्षानं हा दिलेला धडा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. #संगो

Friday, June 30, 2023

'रिमझिम' आणि 'आरडी'

 

मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यावर 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं आपसूकच ओठांवर येतं. आणि याच पावसाळ्यात या गाण्याचे संगीतकार आर.डी. बर्मन यांचा जन्मदिवस. 27 जून हा आर. डी. बर्मन यांचा जन्मदिवस. पावसाळ्यात जन्मदिन असणाऱ्या या संगीतकाराचं चिंब पावसानं भरलेलं आणि मुंबईचं  सौंदर्य खुलवणारं रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे मास्टरपीसच. पंचमदांनी दिलेल्या सुमधूर संगीतानं ओथंबलेलं हे गाणं पावसात चिंब झालेल्या कोट्यवधी प्रेमिकांच्या मनात नेहमीच गुंजत असतं.  संगीतकार राहुल देव बर्मन हे आर.डी. बर्मन या नावानं सर्वांनाच माहित आहेत. आणि त्यांच्या जादुई संगीतामुळे त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. पंचमदांच्या संगीताच्या जोरावर अनेक सिनेमे सुपरहिट झाले. काळाच्या पुढे असलेल्या या संगीतकाराच्या संगीताची जादू आजही कायम आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाईच्या ओठांवर असलेल्या गाण्याच्या भावना पंचमदांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं प्रेममय करून टाकल्या. जब हम जवां होंगे, हे गाणं त्याची साक्ष देतं. 

थिरकवणाऱ्या संगीताचा साज देतानाच प्रेमिकांच्या मनाचा आवाजही आर.डी. बर्मन यांनी ओळखला. आणि प्रेमिकेच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या गाण्याला अप्रतिम संगीताची साथ दिली. आर.डी. बर्मन यांच्या संगीताचं गारूड अनेक वर्षांनंतरही कायमच आहे. उलट जितके आर.डी. ऐकावे तितकंच त्यांचं संगीत अविट होत जातं. थिरकवणारं संगीत, प्रेमात पडलेल्यांना आवडणारं संगीत देणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी गंभीर पठडीतल्या गाण्यांनाही साज चढवला. याचं उदाहरण म्हणजे, 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आहे.

सिनेसृ्ष्टीत किती तरी संगीतकार आले आणि गेले. मात्र काळाच्या अतित असं संगीत देण्याची जादू केली ती फक्त आर.डी. बर्मन यांनी. त्यामुळेच पंचमदांचं संगीत बेभान करतं, तुम्हाला धुंद करतं आणि कायम तुमच्या ओठांवर राहतं. इतकंच नव्हे या पिढीतल्या संगीतकारांनाही पंचमदांचा संगीत खुणावतं. पंचमदांच्या गाण्यांचं रिमिक्स मोठ्या प्रमाणात करण्याचा मोह संगीतकारांना होतो. एकंदरीतच रिमिक्सच्या या जमान्यातही फिक्स असलेले एकमेव संगीतर आर. डी. बर्मनच आहेत आणि भविष्यातही राहतील यात शंकाच नाही. आर. डी. बर्मन म्हणजे बॉलिवूडला झिंग देणारा संगीतकार.  आर. डी. बर्मन पंचमदा या नावानंही ओळखले जातात. त्यांनी संगीत दिलेल्या शोले सिनेमातलं सर्वच  गाणी गाजली. मात्र असं संगीत पुन्हा होणं अशक्यच. 

आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला किशोरकुमारचा आवाज हे कॉम्बिनेशन म्हणजे सुपरहिटचा फॉर्म्युलाच. आणि हा फॉर्म्युला दोन सुपरस्टारसाठी लकी ठरला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठीही पंचमदांचं संगीत, किशोरकुमारांचा स्वरसाज जादूई ठरला.  त्यामुळेच बेमिसाल सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. काश्मीरचं सौंदर्य, किशोरकुमारांचा आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं 'कितनी खूब सुरत ये तस्बीर हैं' या गाण्याचं चित्र प्रत्येकाच्या मनात कायमचंच ठसलं. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला आशा भोसलेंचा स्वर असेल तर ते गाणं कायमचंच रसिकांच्या हृदयात कोरलं जातं. 'दो लफ्जों की', हे गाणं रसिकांच्या मनात कायमचंच घर करून राहिलं आहे.

मागील सात दशकातील कोणताही सिनेमा पाहा आणि त्यातली गाणी ऐका. प्रत्येक सुपरहिट सिनेमातल्या गाण्यांना संगीत फक्त आर. डी. बर्मन यांचंच आहे. त्यातले काही सिनेमे तर फक्त आर.डी. बर्मन यांच्या जादुई संगीतामुळे हिट झालेत. आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या तालावर बॉलिवूडेच सुपरस्टार ठेका धरत सिनेमा सुपरहिट करून गेले. त्या सिनेमांच्या यादी पाहायची झाली तर ती खूप मोठी आहे. त्यामुळे त्यातल्या मोजक्याच सिनेमांची ही नावं पाहा.शोले, शान, दिवार, शक्ती,  द ग्रेट गॅम्बलर, सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा,  अजनबी, कटि पतंग,  अमर प्रेम, आप की कसम,  मेरे जीवन साथी,  बहारों के सपने,   तीसरी मंजिल,  घर,  द ट्रेन,  आंधी, परिचय, अनामिका,  आंधी,  पडोसन, हम किसी से कम नहीं,  रामपूर का लक्ष्मण,  गोलमाल,  यादों की बारात, मासूम, सागर,  रॉकी,  लव्ह स्टोरी,  1942 अ लव्ह स्टोरी. ही नावं पाहूनच या सिनेमातली गाणी का हिट ठरली हे लक्षात येतं. कारण त्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये संगीत नव्हे तर त्यात प्राण ओतण्याचं काम पंचमदांनी केलं होतं. पंचमदांनी तयार केलेली धून अवर्णनीय अशीच असायची. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनेक गायक-गायिकांनी गायली. मात्र आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असेल तर गाणं सुपरहिट होणारच यात कोणतीही शंकाच नव्हती. मात्र आशाताईं प्रमाणेच  आर.डी. बर्मन यांच्या संगीताचा साज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजालाही तितकाच परिसस्पर्श देणारा ठरला. 

थिरकायला लावणारं संगीत ही आर.डी. बर्मन यांच्या संगीताची जादू. हा संगीतकार काळाच्या खूप पुढे होता. त्यामुळेच की काय पंचमदा कधीही आऊटडेटेड होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक पिढी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्यांच्या सूराला संगीत देण्याचं काम पंचमदा करत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताला वेगळा टच देण्याचं काम आर.डी. बर्मन यांनी केलं. त्यांच्या संगीतावर आतापर्यंत पाच पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. आताच्या तरूण पिढीतही त्यांचीच गाणी जास्त प्रमाणात रिमिक्स केली जातात. तरूणाई कोणत्याही काळातली असो त्यांना थिरकवणारं संगीत हे फक्त पंचमदा यांचंच असतं. थिरकवणारं संगीत देणाऱ्या पंचमदा यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गीतांनाही साज चढवला. आणि त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर. डी. बर्मन यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या कानात गुंजत राहतं. पंचमदा जितके ऐकावेत तितकं त्यांचं संगीत अजून ऐकावं, असंच वाटत राहतं. #संगो