'In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way.'
संजय गांधी यांना इंदिरा गांधींनी मारलं होतं, हे लहानपणी अनेकदा ऐकलं आहे. संजय गांधींचा विमान अपघात घडवून आणण्यात आला होता, असं सर्रासपणे म्हटलं जात होतं. 11 जून 2000 रोजी राजेश पायलट यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्या अपघातावरही संशय व्यक्त करण्यात आला होता. 30 सप्टेंबर 2001 रोजी माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळीही घातपाताच्या चर्चा रंगल्या होत्या.
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर घातपात, कट, भ्रष्टाचाराची फाईल असे अनेक अँगल समोर येत आहेत. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. '1999 साली राज्यात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले होते. तेव्हा, पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी ती फाईल पाहिली असता, त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र, मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले' अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
अजित पवारांनी भाजपवर केलेले आरोप आणि त्यानंतर झालेला विमान अपघात, याची आता सांगड घातली जात आहे. अजित पवार त्या विमानात नव्हते, त्यांना कुठे तरी डांबून ठेवण्यात आलं आहे, अशी चर्चा ही सुरू आहे. अजित पवारांचं घड्याळ आणि डीएनए जुळवण्यासाठी काही रक्त विमानात ठेवण्यात आलं होतं, असाही अंदाज काही जणांनी वर्तवला.
त्यातच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनीचा निष्काळजीपणा दाखवून दिला. पायलट, कट आणि आत्मघाती हल्ला अशी थेअरी रोहित पवारांनी मांडली. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले.
'पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे', असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांभोवती संशय निर्माण केला. अर्थात हे सर्वांना पटेल असं नाही.
एकंदरीतच चौकशीत काय ते समोर येईलच. पण तो पर्यंत सुरू असलेल्या चर्चा थांबणार नाहीत, हे ही तितकंच खरं.
#संगो #अजितपवार

No comments:
Post a Comment