कपिल शर्मा याने ओएलएक्सची
जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची टॅगलाईन होती, पुराना जायेगा तो नया आयेगा. आता राज्यातल्या भाजपनं
त्या टॅगलाईननुसार काम करायला सुरूवात केलीय. एकनाथ खडसे,
पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली नाही. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ.
अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना
उमेदवारी देण्यात आली. तसं पाहिलं तर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी
मार्गदर्शक मंडळाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर
जोशी, उमा भारती, सुमित्रा महाजन या ज्येष्ठांचा
आधीच गुळाचा गणपती केला आहे.
मात्र भाजपनं
पक्षासाठी खस्ता खाललेल्या एकनाथ खडसेंचा सन्मान राखायला हवा होता. भाजपला कोणी विचारत
नव्हतं त्या काळात खडसेंनी पक्षाच्या वाढीसाठी श्रम घेतले. विनोद तावडे, पंकजा
मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी किती काम केलं, हे त्यांच्या पक्षाला
माहित असेलच. पण त्यांच्यावर अन्याय झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एकनाथ खडसे अनेक
वर्ष आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांची सून खासदार आहे, मुलीलाही विधानसभेचं
तिकीट मिळालं होतं. असं असताना एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं कसं म्हणता येईल ?
पंकजा मुंडे मंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यांची बहीण खासदार
आहे. तरीही त्यांच्यावर अन्याय झाला, असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. अर्थात
पंकजा मुंडे निवडून आल्या नसल्या तरी त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेतच. (बहुतेक
त्यामुळेच ही वेळ आली असावी, असंही बोललं जातं.)
पण यामुळे एक
मुद्दा समोर येतो. याच नेत्यांना वर्षानुवर्ष आमदार-खासदार, मंत्री केल्यामुळे
त्यांच्या पक्षातल्या इतर तरूणांना संधीच मिळत नाही. त्यामुळे भाजपचा निर्णय
चुकीचा वाटत नाही. पण हा निर्णय घेताना फक्त हे चारच नेते बाजूला सारणं योग्य
नाही. पुराना माल हटवायचा असेल तर, सगळाच पुराना माल मोडित काढायला हवा. फक्त
राजकीय आकांक्षा आहेत, म्हणून सहकाऱ्यांचे पत्ते कापले जावू नयेत हे ही तितकंच
म्हत्वाचं आहे.
आता भाजप प्रमाणेच
आता इतर पक्षांनीही वर्षानुवर्ष अनेक घराण्यांमध्येच दिली जाणारी पदं, उमेदवारी
बदलावी असा विचार करण्याची गरज आहे. भाजपनं जशी (अल्प) धमक दाखवली तशी धमक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
दाखवू शकेल का ? #संगो
जबरदस्त दादा
ReplyDelete