Friday, May 8, 2020

मजूर, कामगारांचे तळतळाट भोवणार !


घराकडे निघालेले मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपले. 45 किलोमीट चालून थकलेले मजूर काही वेळ विश्रांतीसाठी ट्रॅकवर विसावले. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद आहेत, असं वाटल्यानं त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे एक मालगाडी वेगानं येत होती. धडधडत आलेल्या मालगाडीच्या लोको पायलटनं ट्रॅकवरील मजूर बघितले. त्यामुळे त्यानं ब्रेक दाबला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. मध्य प्रदेशातल्या गावाकडे निघालेल्या मजुरांच्या जीवनाचा प्रवास थांबला. मालगाडी खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला. करमाड जवळ झालेल्या या अपघातानं अवघा देश हळहळला.


घराकडे जाणाऱ्या मजुरांचे मृत्यू, मजुरांचं स्थलांतर हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. हे माझं अपयश, हे यंत्रणांचं अपयश, हे राज्य सरकारचं अपयश, हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला. एकदा नव्हे तर तीनदा लॉकडाऊन घोषित केला. देशातल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हा लॉकडाऊन गरजेचाच आहे. मात्र आता कोरोनामुळे नव्हे तर लॉकडाऊनच्या अपयशामुळे नागरिकांचा जीव चालला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन आधीच घोषित केला असता आणि त्याआधी मजुर, कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्याची संधी दिली असती तर आजच्या इतकं विदारक चित्र दिसलं नसतं. परदेशात गेलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार तत्परता दाखवत आहे. पण देशातल्या नागरिकांकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. 
महामार्गांवरून मजूर आणि कामगार प्रखर उन्हातून पायी त्यांच्या घराकडे जात आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला, खायला काही मिळत नाही. यामुळे आपल्याच या बांधवांवर पायी जाण्याची वेळ आलीय. अनेक जण हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील त्यांचं घर जवळ करण्यासाठी पायी जात आहेत. या कामगारांसोबत त्यांची मुलं, पत्नी आहेत. या सर्वांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ज्या शहरात पोट भरण्यासाठी आले होते, त्या शहरात त्यांना मदत करणारा एकही हात मिळाला नाही. सरकार त्यांना मदत देऊ शकलं नाही. त्यामुळे छोट्या मुलांनाही पायी चालावं लागतंय. उपाशी मरण्यापेक्षा परप्रांतातल्या घरी जाऊ, असा विचार करून हजारो मजूर, कामगार देशभरातून स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर करताना अनेकांचा मृत्यूही झाला. उन्हाचे चटके सोसत, उपाशीपोटी हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्यांचे तळतळाट सगळ्यांनाच भोवणार आहेत. एक नागरिक म्हणून हे माझं अपयश आहे. समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. सरकार म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते, राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रमुखांचंही अपयश आहे. #संगो

No comments:

Post a Comment