Saturday, July 7, 2012

पुन्हा विद्यापीठात जाताना...



इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हे वाक्य ब-याच वेळेस आपण वाचतो. मात्र मला सध्या त्याचा अनूभव येतोय. अर्थात असा काही फार मोठा इतिहास घडवला नव्हता, की ज्याची पुनरावृत्ती होत आहे. मात्र काही घटना पुन्हा घडत आहेत. मागच्या महिन्यापासून माझा मुलगा वेद फर्स्ट स्टॅण्डर्डमध्ये जावू लागला आहे. जून महिन्यात त्याच्या वह्या, पुस्तकं, स्कूल बॅगची खरेदी झाली. त्या खरेदीच्या वेळी माझं मनही लहानपणीच्या शालेय़ साहित्य खरेदीच्या आठवणीत रमून गेलं होतं.
शिक्षण घेतानाच्या काळातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला कालखंड अजूनही माझ्या मनात ताजा आहे. शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नलिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या प्रेमात. तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.
आणि 'इच्छा तिथं मार्ग' या उक्तीनं मुंबई विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली. फ्रेंच भाषेच्या सर्टिफिकेट कोर्सची ती जाहिरात होती. माझीही कॉलेजमध्ये असल्यापासून फ्रेंच भाषा शिकण्याची इच्छा होती. कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा अभ्यास करताना अनेक फ्रेंच शास्त्रज्ञांची नावं वाचनात यायची. सायकोलॉजीमध्ये फ्रेंच शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात भर घातलेली आहे. त्यामुळं त्या शास्त्रज्ञांनी लिहलेलं अनुवादीत वाचण्यापेक्षा थेट फ्रेंच शिकावं अशी माझी इच्छा होती. ती जाहिरात पाहून थेट कलिनाला मुंबई विद्यापीठात गेलो. फ्रेचं डिपार्टमेंटला अर्ज दाखल केला आणि प्रवेशही घेतला.
मी फ्रेंच शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे, याची मोठी बातमी झाली. एखादी ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर न्यूज रूममध्ये जशी दाणादाण उडते तशी दाणादाण माझ्या सहका-यांची उडाली. कसं काय जमवलं ? आम्हाला का सांगितलं नाही ? मला प्रवेश मिळेल का ? फ्रेंच शिकण्यासाठी किती मुली आहेत ? हे आणि अशाच आशयाचे अनेक प्रश्न सहका-यांनी विचारले. काहींनी तर आता लवकरच 'झी 24 तास'चं फ्रेंच बुलेटिन ऑन एअर जाणार असून संतोष गोरे ते प्रोड्यूस करणार असल्याचं सांगितलं. यालाही माझी हरकत नव्हती. मात्र मराठीत केलेली अँकरींगची तयारी किमान फ्रेंचसाठी तरी कामी येईल असं वाटलं होतं. मात्र माझ्या सहका-यांनी इथंही ती संधी मला नाकारायचीच असा जणू पण केला असावा.
शिकण्याची भाषा करणं, आणि भाषा शिकणं यात मात्र मोठा फरक असतो, हे या निमीत्तानं कळालं. संभाजीनगरला विद्यापीठात जर्नलिझम डिपार्टमेंटला शिकत असतानाचा तो मंतरलेला काळ पुन्हा डोळ्यासमोर येतो आहे. त्या दोन वर्षात मी आणि माझे मित्र सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबोयचो. सर्व लेक्चर अटेंड करणं, लायब्ररीमध्ये वाचन करणं, डिपार्टमेंट काढण्यात येणा-या अनियतकालिकाचं संपादन करणं, हे सर्व डोळ्यासमोर तरळून गेलं. सप्टेंबर 2000 मध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझमला असताना अनियतकालिकात मी लिहलेला अग्रलेख गाजला होता. 'मराठी पाऊल पडते कुठे ?' हा जळजळीत शैलीत लिहलेला अग्रलेख सगळ्यांनाच भावला. तेव्हा गेस्ट लेक्चरसाठी डिपार्टमेंटला आलेले सामनाचे संभाजीनगर आवृत्तीचे तत्कालीन निवासी संपादक विवेक गिरधारींनी अनियतकालिकाचं प्रकाशन केलं होतं. अनियतकालिकावर माझं संपादक म्हणून झळकलेलं नाव पाहून मूठभर मास वाढलं होतं. प्रत्येक मित्र आणि नातेवाईकाच्या घरी जाऊन त्या नियतकालिकाच्या प्रतींचं वाटप करण्याचं काम महिनाभर तरी सुरू होतं. म्हणेज आता जरी बुलेटिन प्रोड्युसर म्हणून कार्य करत असलो तरी, मी संपादक म्हणून आधी काम केलं आहे, हे आता चाणाक्ष ( आणि काही धूर्त ) वाचकांच्या लक्षात आलं असेलच.  शैक्षणिक सहली, डेझर्टेशन, कंटेन्ट अॅनलेसिस हे सर्व करताना दोन वर्षांचा काळ सरला. प्रा. सुधीर गव्हाणे, प्रा.डॉ. वि. धारूरकर, प्रा, सुरेश पुरी यांची शिकवण्याची शैली अजूनही स्मरणात आहे. तेव्हा भेटलेले अनंत साळी, शशिकांत टोणपे, डी.एम. भोसले, मंगेश मोरे, सुनील खांडेभराड, रमेश रावळे, निरा देवकत्ते, रेणूका रकवाल, तानाजी कांबळे, शेखर मगर, किरण जाधव, आसाराम, पी.टी. पांडे हे मित्र अजूनही संपर्कात आहेत. आता पुन्हा याच आठवणींचा स्मृतीगंध मनात जपून विद्यापीठाची वाट धरली आहे. संभाजीनगरला विद्यापीठात शिकत असताना जर्नलिझममध्ये करिअर करण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न पुढच्या काळात साकार झालं. गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली मेहनत फळाला आली. आता पुन्हा तशीच मेहनत भाषा शिकताना घ्यायची आहे. पुन्हा त्याच इतिहासाची किंवा घटनांची म्हणा, पण पुनरावृ्त्ती होणार आहे. कारण मी इथं पुन्हा प्रेमात पडलो आहे, विद्यापीठाच्या....

Saturday, June 9, 2012

गुन्हेगारांना जातच नव्हे तर धर्मही असतो !


धर्मनिरपेक्षतावाद्यांची माफी न मागता या लेखाचं शिर्षक छातीठोकपणे लिहलंय. आणि एकदा का काही लिहलं त्यापासून मागे हटायचं नाही, हा आपला बाणा. अर्थात नंतर काही खुलासा वगैरे करावा लागू नये यासाठी हा प्रपंच. जगात इस्लामी राज्य आणण्यासाठी कित्येक लाख मुस्लिम युवक जिहादची आरोळी देत जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. मात्र आपलं येवून - जावून 'दहशतवादाला जात नसते' हे वाक्य काही केल्या 'जात' नाही. सर्व धर्मनिरपेक्षतावाद्यांचं 'एकजात'पणे यावर एकमत आहे.
मात्र टाटा इन्सटिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (टीआयएसएस) एका रिपोर्टमधून बाहेर आलेलं सत्य या लेखाच्या शिर्षकाला पृष्टी देणारं आहे. राज्यातल्या तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी 36 टक्के कैदी हे मुस्लिम आहेत. टीआयएसएसनं राज्यातल्या पंधरा तुरूंगातली आकडेवारी सादर करून हे तथ्य मांडलंय. 3 जून 2012 रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकात पान नंबर सहावर त्याविषयीची सविस्तर बातमी छापून आली आहे. 36 टक्के गुन्हेगार मुस्लिमांमध्ये निरक्षरांची टक्केवारी ही 31.3 % इतकी आहे. 61.8 % गुन्हेगारांनी प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्यूएटपर्यंत पोचतानी ही टक्केवारी 0.1 % अशी तळाला पोचतेय.
उत्पन्नाच्या साधनांची आणि संधीची कमतरता, असल्यामुळे मुस्लिम युवकांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. तसंच निरक्षरता आणि अल्पशिक्षणामुळेही या युवकांना संधी मिळत नाहीत, हे ही आकडेवारीवरून स्पष्ट होतं. त्यामुळे सरकारने मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती करणंही गरजेचं आहे. मात्र मुस्लिम वस्त्यांमध्ये वाढणारे मदरसे आणि त्यात
जाणा-या युवकांची संख्या बघता त्यांना व्यावसायिक आणि पारंपरिक शिक्षणाची गोडी नसल्याचंच स्पष्ट होतं. धार्मिक शिक्षणातच रस
असणा-यांची गाडी नंतर गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या वाटेवर गेली नाही तर त्यात नवल ते काय ?
राज्यातल्या शेतक-यांची अवस्था पाहिली तर खेड्यांमधूनही गुन्हेगारांची फौज उभी राहावी अशी परिस्थिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या मुलांसमोर असलेलेली पारंपरिक उत्पन्नाची साधनं आधी सारखी भरवश्याची राहिलेली नाहीत. कोरडवाहू शेतीमधून खर्चही वजा होत नाही. शेतक-यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. शेतकरी त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षणही देऊ शकत नाही. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांची मुलं गुन्हेगार झाली नाहीत. परिस्थितीपुढं हारलेल्या शेतक-यांनी आत्महत्या केली, पण गुन्हेगारीची शस्त्र उचलली नाहीत. आता जातीचाच मुद्दा आला आहे, तर स्पष्टीकरणासाठी एक धक्कादायक उदाहरण देतो. विदर्भामध्ये जितक्या आत्महत्या झाल्या त्यातले नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे कुणबी मराठा होते. म्हणजे हजारो कुणबी शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. कारण गुन्हेगारी ही त्यांचा जातीत नाही.
http://santoshgore.blogspot.in/2010/05/blog-post_07.html#comment-form
याच ब्लॉगवर वरील लिंकवर आपल्याला 'तुरूंगातली धर्मांतरे आणि  आमची जात' या दोन वर्षांपूर्वी लिहलेल्या लेखातही असंच विदारक सत्य वाचायला मिळेल.
आता राहता राहिला प्रश्न सरकारच्या मानसिकतेचा. गुन्हेगारांना जात नसते, या वाक्यानं फार तर मनाचं समाधान करता येईल. पण त्यामुळं वास्तव काही बदलत नाही. आणि वर मांडलेली आकडेवारी काही खोटं बोलत नाही.

Sunday, April 22, 2012

अमरावतीतली पत्रकारिता


20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा. मात्र या पैकी कोणताही प्रयत्न न करता माझी अमरावतीसाठी निवड झाली होती. याचा माझ्यासह अनेकांना धक्का बसला होता. अर्थात कोणतंही राजकारण न करता, बदल घडवता येतात, हे यातून तेव्हा दिसून आलं. एक प्रकारे डेस्कवर कोणत्याही राजकारणात न राहता अलिप्त राष्ट्रांप्रमाणे आगेकूच करणा-या विचारसरणीचा तो विजय. आता तुम्ही म्हणाल साधी बदली पण काय कौतुक ? आता आपलं कौतुक आपणच करण्याचे हे दिवस आहेत. त्याला काय करणार ?
अर्थात मी मागितलं होतं संभाजीनगर, मात्र मला मिळाली अमरावती. असा हा प्रकार घडला होता. नाही तरी जे मागितलं ते मिळण्याऐवजी दुसरंच पदरी पडण्याचा दोषच माझ्या मागे लागला आहे. अर्थात हा दोषही दूर होईलच. थोड्याशा नाराजीनं मी अमरावतीमध्ये प्रवेश केला. वडाळी भागातल्या आमच्या ऑफिसमध्ये मी सकाळी पोहोचलो. तिथं माझी आणि प्रफुल्ल साळुंखेची भेट झाली. कॅमेरामन आशिष यावले, कृष्णा भागबोले आणि मिलिंद वाडे ही आमची तिथली टीम. तर अमरावतीच्या ब्युरोमध्ये माझ्याबरोबर उमेश अलोने, सत्यपाल घाटे, दिनेश पवार, आशिष मलबारी हे रिपोर्टर अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिममध्ये काम रिपोर्टिंग करत होते. अर्थात माझी ही नाराजी काही दिवसातच दूर झाली. मी जणू या शहराच्या प्रेमातच पडलो. मालटेकडी भागात मिळणारं भजी-पोहे हे कॉम्बिनेशन अफलातून होतं. कचोरीबरोबर जर मिरची नसेल तर हॉटेलमध्ये दंगलसदृश्य परिस्थितीच निर्माण व्हायची. कचोरी आणि मिरचीवर अमरावतीकरांचं भारीच प्रेम.
मी आणि कॅमेरामन आशिष यावले ही जोडीही अफलातून होती. शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचं दृश्य आम्ही दोघे बरोबर असताना कुणाच्याही डोळ्यासमोर यावं, अशी आमच्या दोघांची उंची. आम्ही दोघे एकमेकांना 'भाऊ' या नावाने हाक मारायचो. अर्थात अमरावती शहरात सगळेच एकमेकांना भाऊ म्हणतात. सगळे पत्रकारही भाऊ, आणि नेतेही भाऊच. तर अशा या 'भाऊ'गर्दीच्या शहरात अल्प काळ का होईना पण पत्रकारिता करता आली. अमरावती शहराचं वैशिष्ट्य असं आहे की, या शहरानं जर एखाद्याला स्वीकारलं तर त्याला जीवापासून स्वीकारतात. आणि एकदा का व्यक्ती मनातून उतरली की मग त्याची कारकिर्द संपलीच म्हणून समजा. अशी अनेक उदाहरणं अमरावतीकरांना माहित आहेत. देवाच्या दयेनं अशी वेळ माझ्यावर आली नाही.

कोणत्याही एजंटची मदत न घेता आणि डिपॉझिट न देता घरही भाड्यानं मिळालं. संजीवनी कॉलनीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आमच्या शेजारी. अँडव्हेकोट अनिल कडू यांचा मी भाडेकरू. तसंच शेजारी असलेल्या राऊत कुटुंबाबरोबरही चांगलाच जिव्हाळा निर्माण झाला होता. अर्थात याचं कारण म्हणजे तेव्हा दोन महिन्यांचा असणारा माझा मुलगा वेद. कडू आणि राऊत कुटुंबात छोटं मुल नसल्यानं वेद चांगलाच लाडोबा झाला होता. घरापासून दूर असलो तरी त्याचं घरच्यासारख कोडकौतुक तिथं सुरू असायचं. त्यामुळे स्टोरीसाठी बाहेरगावी मुक्काम असला तरी पत्नी आणि मुलाची चिंता करावी लागत नव्हती. मात्र पत्नीबरोबर खरेदीला गेल्यावर छोट्या वेदला घेऊन दुकानाबाहेर उभं रहावं लागायचं. रिपोर्टिंगच्या धबडग्यातून तसा कुटुंबासाठी वेळही कमीच मिळायचा. मात्र 'जोशी मार्केट'मध्ये खरेदी करणं कधी जीवावर यायचं नाही. अर्थात 'जोशी मार्केट'मधली हिरवळ इथं मुद्दाम सांगण्याची वेगळी गरज नाही. दुकानाबाहेर मी छोट्या मुलाला घेऊन उभा असायचो. छोटासा गोंडस वेद सगळ्यांनाच आवडायचा. त्याला बघून सगळे माझ्याशी बोलायचे. नाही तर आमच्या बरोबर बोलायला कोणाला आवडेल म्हणा ?
याच वेदनं मला हेडलाईन दिली होती. तो आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं होतं. तिथं मोठी धावपळ सुरू होती. डॉक्टरला विचारल्यावर त्यांनी डेंग्यूचा पेशंट असल्याची माहिती दिली. मग काय वेदवर उपचार करून तडक घरी गेली. आशिष बरोबर होताच. लगेच मेडिकल रिपोर्ट, हॉस्पिटलची शॉट्स आणि डॉक्टरचा बाईट घेऊन बातमी फाईल केली. थेट हेडलाईनच. पत्रकाराचा मुलगा पत्रकाराला मदत करतो ती अशी.

बहुतेक 2006 च्या डिसेंबरमध्ये दर्यापूरची पोटनिवडणुक झाली. प्रचाराच्या काळात मला एका प्रतिस्पर्धी चॅनेलमधील रिपोर्टरचा फोन आला. तुझं पाकीट तयार आहे, ते घेण्यासाठी ये. हा फोन ऐकून मी हादरलो, मात्र ही कामं मी करत नाही असं त्याला सांगितलं. तत्कालीन महापौरांनी ही पाकीटं पोचती केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई - वडिलांनी केलेल्या उच्च संस्कारांपुढे अशी पाकीटं कधीही उभी राहू शकत नाहीत. मात्र या घटनेमुळं राजकीय वर्गात चांगली इमेज निर्माण झाली. ( अर्थात इमेज आधीपासून चांगलीच होती. ) मात्र प्रतिस्पर्धी चॅनेलमधले अनेक सहकारी मेळघाटमध्ये जाऊन तर कुणी अधिका-यांना ब्लॅकमेल करायचे. काहींना तर टोल नाक्यावाले नियमीत हप्ता देत होते, अशाही खबरा कानावर यायच्या.

मात्र या बजबजपुरीतही मोहन अटाडकर, अविनाश दुधे, सध्या मुंबईत असलेले रघुनाथ पांडे, प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर या पत्रकार आणि संपादकांचा अभ्यास मनाला भावला. त्यांचा विविध विषयातला अभ्यास नवख्या पत्रकारांना नक्कीच प्रेरक ठरणारा आहे. या शिवाय कामाच्या निमीत्तानं अनेक तालुका प्रतिनिधींची ओळख झाली. अशोक पिंजरकर, अनंत बोबडे, भारत राऊत यांच्या सारेख धडपडे पत्रकारही कायमचे लक्षात राहिले.

तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम  यांचा यवतमाळमध्ये शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पहिला जाहीर सत्कार अमरावतीमध्ये झाला होता. असा हा शेवट आणि आरंभ कव्हर करण्याची संधी मला मिळाली. खैरलांजीच्या घटनेचे उमटलेले हिंसक पडसाद कव्हर करताना चांगलीच दमछाक झाली होती. या काळात पीएम पॅकेजची अधिका-यांनी कशी वाट लावली, याच्या बातम्या कव्हर करण्यासाठी मी आणि आशिषनं शर्थ केली होती. शेतकरी आत्महत्येनंतर सरकारवर टीका करणारी बातमी आम्ही प्रकर्षानं देत होतो. मेळघाटसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्टोरी करून शेतक-यांना न्याय कसा देता येईल ? हाच प्रश्न आमच्या मनात असायचा. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही वेगळाच अनुभव देणा-या ठरल्या.

पुराची बातमी कव्हर करण्यासाठी मी, आशिष यावले, कृष्णा लोखंडे, राजेश सोनोने, सत्यपाल, प्रवीण मनोहर गेलो होतो. आमच्या गाडीच्या जवळपास पाणी जमू लागलं होतं. कृष्णा लोखंडेने धोका ओळखून तिथून गाडी दुसरीकडे न्यायला लावली. थोड्याच वेळात तिथं मोठा लोंढा आला. मात्र आम्ही त्यातून थोडक्यात बचावलो. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी पुरूषोत्तम भापकर यांनी बचावपथक पाठवून पत्रकारांची सुटका केली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दौ-यावर आले की, पत्रकारांच्या अंगावर काटा उभा रहायचा कारण नेत्यांच्या पुढेपुढे करणा-या कार्यकर्त्यांमुळे पत्रकारांची दाणादाण उडायची. त्या तुलनेत शिवसेना - भाजप युतीच्या नेत्यांचा कार्यक्रम शिस्तबद्ध असायचा. या मुळे आघाडी आणि युतीतल्या नेत्यांच्या वागणुकीचा तुलनात्मक अभ्यासही करता आला. नाही तर मास कम्युनिकेशनला 'कन्टेन्ट अँनालेसिस'वर मी लघुप्रबंध सादर केला होता. त्याचं प्रॅक्टीकल अमरावतीमध्ये पुन्हा एकदा करायला मिळालं.

अमरावतीमधली सांबरवडी आणि कचोरीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सांबरवडी म्हणजे कोथंबिर वडी. सुरूवातीला मला वाटलं की, इडली बरोबरच्या सांबरमध्ये एखादी वडी देत असावेत. या आठवणींबरोबर पत्रकारितेतल्या अनेक आठवणी मनात ताज्या आहेत. नऊ डिसेंबर 2007 ला अमरावती ब्युरोमध्ये असणा-या माझ्या सर्व सहका-यांनी मला हॉटेल प्रेसिडेंटमध्ये निरोप दिला. ( राष्ट्रपतींच्याच गावात प्रेसिडेंट नावाचं हॉटेल. बहुतेक हॉटेलवाल्याला प्रतिभाताई राष्ट्रपती होणार हे आधीच कळालं असावं.) निरोपाच्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. आमच्या अनेक ब्युरो चीफने जेव्हा शहर सोडलं तेव्हा इतरांनी आनंदानं पार्टी केली होती. मात्र माझं नशीब बलवत्तर होतं. कारण मला सर्व सहकारीच चांगले लाभले होते.
 अर्थात पत्रकारितेतला 'अर्थ' अमरावतीत जवळून कळाला. अनेक पत्रकारांना तिथं दुकान म्हटलं जायचं. मात्र मुंबईत आल्यावर तर पत्रकारितेतली दुकानं नव्हे तर 'मॉल' पहायला मिळाले.


Sunday, February 26, 2012

मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !



शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी, मनसेमुळे मराठी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता या सगळ्यांवर शिवसेना, भाजप, रिपाइंच्या महायुतीनं लिलया मात करून विजय साकारला.
ठाण्यातही काँग्रेस आघाडीला पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि नागपूरमध्ये यश मिळवणा-या महायुतीला पुणे, सोलापूर, पिंपरी - चिंचवडमध्ये पराभव पत्करावा लागला. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर लढण्याचा प्रयोग करून कपाळमोक्ष ओढवून घेतला. भाजपला निवडणुकीच्या तोंडावर युती तोडण्याची बुध्दी झाली आणि महायुतीची वाताहत झाली.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूरात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं यश मिळवलं. महापालिकांच्या बरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवल्या जात होत्या. जिल्हा परिष आणि पंचायत समितीसाठी महानगर पालिकेच्या आधी मतदान झालं होतं. मात्र मोठ्या महापालिकांच्या लढाईमध्ये माध्यमांचं जिल्हा परिषदांकडे दुर्लक्ष झालं होतं.
महापालिकांसाठी जोरदारपणे लढणा-या शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचंही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे लक्ष नव्हतं. तरीही जालना आणि हिंगोलीची जिल्हा परिषद युतीनं काबीज केली. हिंगोलीत तर शिवसेनेची एकहाती सत्ता आली. धाराशिव जिल्हा परिषदमध्येही शिवसेनेचे तेरा सदस्य निवडून आले. या तिन्ही ठिकाणी महायुतीचा कोणताच मोठा नेता प्रचारासाठी गेला नव्हता. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी हा विजय संपादन केला. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या भागात महायुतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडं लक्ष दिलं नाही. महायुतीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या असत्या तर अधिक मोठं यश मिळवता आलं असतं. महायुतीच्या नेत्यांनी शहरांबरोबरच ग्रामीण भागाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण ग्रामीण भाग हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जहागीरदारी नव्हे.
शिवसेनेलाही आता प्रत्येक विभागात नेत्यांची दुसरी फळी उभारावी लागणार आहे. मुंबईतल्या नेत्यांच्या जीवावर किती काळ निवडणुका लढवायच्या ? याचा विचार पक्षानं करायला हवा. मराठवाडा आणि विदर्भावर छाप टाकणार एकही स्थानिक नेता पक्षाला निर्माण करता आलेला नाही. या भागात जर दुस-या फळीतला स्थानिक नेता असता तर त्या-त्या भागात शिवसेनेला जोरदार प्रचार करून मोठ्या प्रमाणात यश मिळवता आलं असतं.
या यशानंतर आता महायुतीचा आत्मविश्वास नक्कीच बळावला असणार. परिणामी आगामी विधानसभा निवडणुका महायुती जोरकसपणे लढवणार, यात शंका नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारकडे पैसा असला तरी महायुतीकडे असणारी जिद्द आघाडीला पुरून उरेल. त्यामुळं महापालिकांमध्ये यशस्वी ठरलेली महायुती आगामी विधानसभा निवडणुका जिंकणारच.

Saturday, January 21, 2012

शिवसेनाप्रमुख आणि मी !

26 सप्टेंबर 1993. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो. प्रसंग होता 'सामना'च्या मराठवाडा आवृत्तीच्या प्रकाशनाचा. याच काळात शिवसेनेची मराठवाड्यात घोडदौड सुरू होती. अर्थात तेव्हाच्या शेठजींच्या वृत्तपत्रात शिवसेनेच्या विरोधातल्याच बातम्या छापल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेनेला विरोधकांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आणि पक्षाची दिशा शिवसैनिकांपर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्राची गरज होती. ती मराठवाडा आवृत्तीच्या निमीत्तानं पूर्ण झाली. त्याचवर्षी मुंबईत दंगली आणि बॉम्बस्फोट झाले होते. या सर्व घटनांचा आढावा घेत शिवसेनाप्रमुखांची तोफ धडधडत होती.
याच मैदानावर 1988 मध्ये शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यातली पहिली सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मुसलमानी अत्याचाराचं निशाण असलेल्या औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं. हा तडाखा होता तिथल्या धर्मांध हिरव्या सापांना. शिवसेनाप्रमुखांच्या तडाख्यानं धर्मांध हिरव्या सापांची मराठवाड्यातली वळवळ थांबली. दंगली घडवणा-या धर्मांध हिरव्या सापांना ठेचत पूर्ण मराठवाड्यात शिवसेनेचं भगवं वादळ केव्हा पोहोचलं, हे कळालं देखील नाही.
माझं बालपण हे वादळ जवळून पहात होतं, आणि मी ही त्या वादळाचा एक भाग झालो तो कायमचाच. बंजारा कॉलनीतल्या एलनारे सरांची ट्यूशन संपवून येताना क्रांती चौकातल्या पेपर स्टॉलवरून मी सामनाचा अंक विकत घ्यायचो. माझ्या हिरो रेंजर सायकलच्या कॅरिअरला सामनाचा अंक लावून घराच्या दिशेने प्रयाण व्हायचं.
1994 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर आमच्या भागात आम्ही शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. बहुतेक त्यानंतरच शिवसेनेचं नाशिकला भव्य अधिवेशन झालं. अधिवेशनाच्या आधी मराठवाड्यात शिवसैनिक नोंदणी सुरू होती. दहा रूपये भरून मी शिवसैनिक म्हणून नोंदणी केली. शिवसैनिक म्हणून नोंदणी झाल्याचं ओळखपत्र दिलं गेलं. ते पत्र आजही मी प्राणपणानं जपून ठेवलं आहे. हेच कार्ड घेऊन नाशिकच्या अधिवेशनाला हजेरी लावली. अधिवेशनात देवीला घातलेलं 'दार उघड बये दार उघड' हे साकडं शिवसेनेला सत्तेकडे नेणारं ठरलं. या अधिवेशनासाठी नक्षत्रवाडीतून मी आणि बाबासाहेब राऊत हे दोघे गेलो होतो. नाशकातल्या गोल्फ क्लब मैदानावर विराट जाहीर सभेनं अधिवेशनाची सांगता झाली होती. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच शहरातले सारे रस्ते राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांच्या भगव्या वादळानं ओसंडून वाहत होते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 'विधानसभेवर भगवा फडकवण्याचा' आदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवसैनिकांचं वादळ त्या मैदानावरून राज्यात वेगानं पसरलं.
1995 मध्ये शिवसेनाप्रमुखांचं वादळ राज्यभर फिरत होतं. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. दुस-याच दिवशी शिवसेनाप्रमुखांची पैठणला सभा होती. संभाजीनगर - पैठण मार्गावर असलेल्या नक्षत्रवाडीतल्या आमच्या शाखेनं शिवसेनाप्रमुखांचं स्वागत केलं होतं. एका मिनीटासाठी का होईना, शिवसेनाप्रमुखांना जवळून पाहण्याची संधी आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळाली होती.
मणी - मसल्स अशा सर्वच अर्थाने प्रबळ असलेल्या काँग्रेसला आव्हान देणं सोपं नव्हतं. मात्र शिवसेनाप्रमुखांचे धगधगते विचार आणि 'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा. बस्स इतक्याच भांडवलावर विधानसभेवर भगवं निशाण फडकवण्यात शिवसेना आणि शिवसैनिकांना यश आलं.
1995 मध्येच संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी पुन्हा एकदा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. औरंगाबादचे संभाजीनगर तर करणारच पण खुल्ताबाद, दौलताबाद यांचंही नामांतर करू. ज्या शहरांच्या नावात 'बाद' आहे ते बाद करू अशी खास ठाकरी शैलीही त्यांनी दाखवून दिली.
बहुधा याचवर्षी मी मुंबईत होणा-या दसरा मेळाव्यालाही हजेरी लावली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या काही दिवस आधी शिवतीर्थावर पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराचा भव्य कार्यक्रम झाला होता. त्याचा शिवसेनाप्रमुखांनी आदरानं उल्लेख केला. 'हिंदू धर्मीय संघटित होतात ही आनंदाची बाब आहे. मात्र पांडूरंग शास्त्री आणि माझा मार्ग वेगळा आहे. ते पांडूरंग शास्त्री आहेत, तर मी दांडूरंग शास्त्री आहे', असं सांगत शिवसेनाप्रमुखांनी सभा जिंकली.
1996 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख आणि माझी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भेट झाली. अर्थात लाखोंच्या गर्दीतला मी एक. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी युतीच्या मंत्रिमंडळातून काढण्यात आलेल्या अशोक पाटील डोणगावकरांवर तोफ डागली. अपक्ष आमदार असलेल्या डोणगावकरांना राज्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र सरकारवर टीका करण्याची त्यांची खुमखुमी होती. परिणामी त्यांची गच्छंती झाली. 'डोणगावकरांना पंचपक्वानांचं ताट वाढलं होतं. मात्र त्यांना मूत कालवून खाण्याची सवय', अशा खास ठाकरी शैलीत त्यांनी समाचार घेतला.
त्यानंतर 1999 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या सभांमधून पुन्हा शिवसेनाप्रमुखांची भेट झाली. मात्र 2003 मध्ये नोकरीच्या निमीत्तानं हैद्राबादला गेल्यानं जाहीर सभेतून शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकता आले नाही. मात्र 2007 मध्ये मुंबईत आलो आणि शिवतीर्थावरची विठ्ठलाच्या भेटीसाठीची वारी चुकली नाही.
अशा या माझ्या दैवताला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा. सत्तेसाठी सतराशेसाठ असताना कोट्यवधी शिवसैनिकांना ऊर्जा देणारं हे दैवत जगभरातल्या हिंदूंना कायमच दिशा देत आलं आहे.

खमंग फोडणी - शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा मंत्र आज किती गरजेचा आहे, हे लक्षात येऊ लागलं आहे. कारण राजकीय क्षेत्र असो वा सरकारी किंवा खाजगी कार्यालयं तिथले अनेक कर्मचारी फक्त कार्यालयीन राजकारणात मश्गूल असतात. नेत्यांनाही समाजकारणाऐवजी राजकारणातच जास्त रस आहे. कोणत्याही कार्यालयात फक्त दहाच टक्के लोक काम करत असतात, असं तिथल्याच वरिष्ठ अधिका-यांचं मत असतं. असाच प्रकार राजकारणातही दिसून येतो. परिणामी टीम लिडर निर्माण न होता गटाचं हित बघणारे ग्रूप लिडर, सर्व क्षेत्रात निर्माण होत आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मंत्र जर सगळ्यांनीच आचरणात आणला तर गलिच्छ राजकारण थांबून देशाची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही.

Friday, December 30, 2011

असे पाहुणे येती...

'पाहुणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहुणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहुणे म्हणून जातोचना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.
मात्र आज इथं या ब्लॉगवर 'गेस्ट एडिटर' विषयी लिखाण करण्यात आलं आहे. वृत्तपत्रांमध्ये गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच रूजलेली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि त्यातही मराठीमध्ये झी २४ तासनं गेस्ट एडिटरच्या माध्यमातून नेत्यांमधील संपादकीय गुण प्रेक्षकांसमोर आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नेत्यांचा दररोजच पत्रकारांबरोबर संबंध येत असतो. राजकीय नेत्यांच्या विविध भूमिकांवर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून अनेकदा सडकून टीकाही होत असते. नेते मंडळेही 'माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', हे वाक्य अनेकदा टोलवून देत असतात. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेते यांचं नातं हे, 'तुझं माझं जमेना आणि....' या प्रकारातलं असतं.
मी नोकरी करत असलेल्या झी २४ तासनं गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय केली आहे. आतापर्यंत झी २४ तासमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही दिग्गज मंडळी गेस्ट एडिटर म्हणून आले आहेत. नेते असलेली ही मंडळी उत्तम संपादकही आहेत, हे या निमीत्तानं जवळून पाहता आलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कामकाज चालतं तरी कसं ? याची उत्सुकता नेत्यांच्या मनात असते. इनपुट, आऊटपूट, व्हीसॅट, स्टुडिओ, पीसीआर पाहताना त्यांच्या चेह-यावरील जिज्ञासेचे भाव बरंच काही सांगून जातात.

एखादी बातमी कशी प्रझेंट करावी याची जाणही नेत्यांना आहे. संपादकीय बैठकीत विविध बातम्यांवर चर्चा करताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकारितेतली माहिती अपडेट असल्याचं लक्षात आलं. उद्धव ठाकरेंनी संपादकीय बैठकीत शेती आणि शेतक-यांच्या आंदोलनाच्या बातम्यांना प्राधान्य दिलं होतं. तर शरद पवारांनी एका नेत्याच्या 'कारनाम्याची' बातमी जर VISUELS असतील तर हेडलाईन करा असं सांगत सगळ्यांचीच विकेट काढली. राज ठाकरेंनी घेतलेल्या मोहन भागवतांच्या भेटीचं विश्लेषणही त्यांनी खास त्यांच्या शैलीत केलं. कधी - कधी मित्र पक्षांना धक्का देण्यासाठी मीही मातोश्रीवर बाळासाहेबांकडे जात असतो, असं सांगत त्यांनी राजकारणाचा कानमंत्रही दिला.
वरील सर्व नेत्यांबरोबर ऑफिसमधल्या सर्व स्टाफला संवाद साधता आला. या नेत्यांनीही दिलखुलासपणे कोणताही पडदा न ठेवता सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्याचा अनुभव या निमीत्तानं सगळ्यांनाच आला. गेस्ट एडिटर येणार म्हटल्यावर सगळेच आपापले प्रश्न घेऊन तयार असतात. कौटुंबिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न गेस्ट एडिटरला विचारले जातात. राज ठाकरेंची बेधडक शैली, उद्धव ठाकरेंची लपवाछपवी न करता सत्यच सांगण्याची शैली पुन्हा एकदा सर्वांना पाहता आली.
शरद पवारांसारखा राज्य आणि देशातल्या राजकारणावर छाप असणारा नेता या निमीत्तानं जवळून पाहता आला. गेस्ट एडिटर म्हणून त्यांच्यात असलेले पत्रकारितेचे गुणही सगळ्यांना कळाले. कृषी, क्रीडा, राजकारण, सहकार या सारख्या विविध विषयांचा शरद पवारांचा मोठा अभ्यास आहे. परिणामी त्यांना विचारण्यासाठी प्रत्येकाकडे किमान तीन - चार प्रश्न होतेच. अर्थात सगळ्यांचे एवढे प्रश्न जर विचारले गेले असते तर गेस्ट एडिटरला मुक्कामच ठोकावा लागला असता. अर्थात जे प्रश्न विचारले गेले त्याची शरद पवारांनी सविस्तर उत्तरं दिली. त्यांचा शेतीवर असलेला अभ्यास मनाला भावला. शेतक-यांनी फक्त कापूस आणि ऊसाऐवजी इतर पिकांचाही विचार करावा असा पर्याय त्यांनी सुचवला. सहकार, कारखानदारी, राजकारण यातल्या सगळ्याच, काही खोचक प्रश्नांनाही गेस्ट एडिटर असलेल्या शरद पवारांनी उत्तरं दिली.
य़शवंतराव चव्हाण यांचा वाचनाचा व्यासंग किती दांडगा होता हे, या निमीत्तानं सगळ्यांना कळालं. जगात गाजणारं कोणतंही इंग्रजी पुस्तक हे यशवंतरावांनी वाचलेलं असायचं. तब्बल पंधरा हजार ग्रंथ यशवंतरावांच्या संग्रही होते. विदेशातल्या अनेक परराष्ट्रमंत्र्यांबरोबर त्यांची मैत्री होती. जगातल्या सर्वात्तम पुस्तकांवर यशवंतराव चव्हाणांची विदेशातल्या बड्या हस्तींबरोबर चर्चा व्हायची.
अशी दिलखुलास मुलाखत सुरू असताना शरद पवारांचे दिलदार मित्र बाळासाहेब ठाकरे यांचा विषय चर्चेत येणं सहाजिकच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची मैत्री, शिवसेनेचा उदय, गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्यांना शिवसेनेनं दिलेली प्रतिष्ठा यावर शरद पवारांनी सांगितलेल्या आठवणी मनात घर करून राहणा-या आहेत. दोन मित्रांमधला हा जिव्हाळा पुढच्या पिढीत तितकासा उतरलेला नाही, ही 'जनरेशन गॅप'ही त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. अर्थात पुढच्या पिढीत तितका जिव्हाळा नसला तरी त्यांच्यात मैत्री असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय विचारसरणीबद्दल मतभेद आहेत. मात्र त्यांचा दिलदारपणा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेली मैत्री आताच्या राजकारणात दुर्मिळ असल्याचं सांगत पवारांनी सध्याचं राजकारण कसं गढूळ झालंय हे ही दाखवून दिलं. सुप्रिया सुळे पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक लढवत असताना शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. मित्राची मुलगी राजकारणात येत आहे, म्हटल्यावर शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवार दिला नाही, ही आठवण शरद पवारांनी सांगितल्यावर या दोन्ही नेत्यांमधली मैत्री किती निरपेक्ष आहे, हेच पुन्हा सिद्ध झालं. राजकारणात वैयक्तीक प्रहार न करताही मैत्री जपता येते, हेच या दोन मित्रांकडे पाहून लक्षात येतं. अर्थात हे जर इतर नेत्यांच्या लक्षात आलं तर, राज्यातलं राजकारण स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

Thursday, December 8, 2011

ती गाणी, ते दिवस !

गाणी, ही जवळपास प्रत्येकालाच आवडतात. गाण्याला भाषेचंही बंधन नाही. सुश्राव्य वाटणारी गाणी अर्थ माहित नसली तरी ती गुणगुणली जातात. सध्या गाजत असलेले 'कोलावरी डी' हे गाणंही असंच लोकप्रिय झालं आहे. हैदराबादमध्ये नोकरीला असताना अनेक तेलुगु चित्रपट पाहिले. वर्षम, मल्लेश्वरी, घर्षणा या चित्रपटातील गाणी आजही माझ्या ओठांवर आहेत.
मात्र माझ्या हृदयाला स्पर्श करणारी गाणी होती ती आशिकी चित्रपटातली. 1990 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मी आठवीत होतो. संभाजीनगरमध्ये रॉक्सी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्या चित्रपटाचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सात शो लावण्यात आले होते. तरूणाईनं हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. आता मी आठवीत म्हटल्यावर काही तरूण नव्हतो. पण तारूण्याच्या जवळपास जायला सुरूवात झाली होती. आशिकी प्रमाणे सात शो लागण्याचं भाग्य नंतर साजन आणि माहेरची साडीच्या वाट्याला आलं होतं.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आशिकी चित्रपटातली गाणी जणू काही प्रेमग्रंथच होता. अर्थात हा चित्रपट तेव्हा मी थिएटरमध्ये पाहिला नव्हता. अर्थात कोणत्या वडलांना मुलांनी अशी थेरं पाहणं आवडलं असतं ? पण तेव्हा दूरदर्शनवरील चित्रहारमध्ये दर बुधवारी आशिकीतलं एकतरी गाणं लागायचंच. त्यावेळी केबल आणि खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. त्यामुळं बुधवारी चित्रहारमध्ये दाखवलेली गाणी
दुस-या दिवशी सगळ्यांच्या ओठांवर असायची. शाळेत जाताना बसपासून ते वर्गामध्येही तीच गाणी म्हटली जायची.
आशिकीतल्या गाण्यांमध्ये काय नव्हतं ? प्रेमात पडलेला, प्रेमभंग झालेला, प्रेमात पडू पाहणारा या सर्वांना भावतील अशी गाणी त्यात होती. 'जाने जिगर जानेमन' हे गाणं तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. याच गाण्याबरोबर चित्रपटातली इतर गाणी आजही हृदयाच्या गुलाबी कप्प्यात कस्तूरी प्रमाणं जपून ठेवली आहेत. जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही. तशीच या चित्रपटातली गाणी मनातून जात नाहीत. प्रेमभंग झालेल्यांसाठी 'मैं दूनिया भूला दूँगा तेरी चाहत में' हे गाणं विशेष होतं. अर्थात माझा कोणताही प्रेमभंग झालेला नव्हता, हे माझ्या विघ्नसंतोषी मित्रांसाठी आधीच नमूद करून ठेवत आहे. नाही तरी पत्रकारांना कशात काही नसताना, काही तरी असल्याचा वास येत असतो, म्हणून खुलासा केलेला बरा. अर्थात याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मला खात्री आहे. कारण 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या...'
चला वरील मुद्दा बाजूला ठेऊन अजून थोडं मागं जाऊ या. आशिकीच्या आदल्या वर्षी प्रदर्शित झालेला रामलखन आणि त्याच्या आधी 1988 मधल्या तेजाबच्या गाण्यांनीही चांगलाच मनाचा ठाव घेतला होता.
तेव्हा तर स्वत:चं नाव सांगता येत नसणा-या मुलांच्या तोंडून माधूरीचं 'एक दो तीन...' हे गाणं हमखास ऐकायला मिळायचं. आशिकी चित्रपटानंतर सडक आणि साजन चित्रपटातल्या गाण्यांनीही मनात चांगलंच घर केलं होतं. दहावीला जाईपर्यंत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अर्थात साजन चित्रपट काही थिएटरमध्ये पाहता आला नव्हता. तो चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर पाहिला होता. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर चित्रपट पाहण्याची गंमत या पिढीतल्या मुलांना आणि तरूणांना कशी कळणार म्हणा ? याच प्रकारचं वाक्य माझ्या वडलांच्या तोंडी असायचं. ते म्हणतात गणेशोत्सवातल्या मेळ्यांची मजा तुम्हाला काय कळणार ? माझा मुलगा मोठा झाल्यावर गणेशोत्सवातली कोणती मजा सांगेल ? हे त्या गणेशालाच माहित.
मात्र शाळेत असताना सडक चित्रपट मात्र मी थिएटरमध्ये पाहिला होता. शाळेच्या सहलीसाठी वडलांनी खर्चण्यासाठी तब्बल 70 रूपये दिले होते. त्यातले मी फक्त 30 रूपये खर्च केले. मग सहलीवरून आल्यावर मी आणि माझा लहाना भाऊ रवींद्रनं बाल्कनीचं तिकीट काढून संभाजीनगरातल्या अंबा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला. तेव्हा बाल्कनीचं तिकीटही पंधरा रूपये होतं. मग उरलेल्या दहा रूपयात इंटरव्हलमध्ये वडापाव खाऊनही काही पैसे उरले होते.
शाळेनंतर महाविद्यालयीन जीवन सुरू झालं. तेव्हाही अनेक चित्रपट पाहण्यात आले. त्यातली अनेक गाणी ऐकली, गुणगुणली. मात्र आजही मनावरून आशिकी, सडक आणि साजन मधली गाणी पुसली जात नाहीत. त्यातही आशिकीतल्या गाण्यांचा मनावर मोठा पगडा कायम राहिला आहे. प्रेमात पडलेल्यांचा तो प्रेमग्रंथ आजही माझ्या मनात तसाच जपून ठेवला आहे. त्या प्रेमग्रंथातली पानं कधीही निवांत क्षणी चाळली जातात. त्या आठवणीत मन हरपून जातं. अर्थात याचा कुणाला पत्ताही लागत नाही. आपल्या आठवणी या आपल्या साठीच असल्यावर त्याचा कुणाला पत्ता लागण्याची गरजच काय ?