Thursday, March 10, 2022

कॉमेडी आणि राजकारण

 

2008 मध्ये भगवंत मान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी झाले होते. आणि आता 2022 मध्ये मान मुख्यमंत्री होणार आहेत. म्हणजेच चौदा वर्षात कॉमेडी, टीव्ही आणि राजकारण असा प्रवास करत त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. चौदा वर्षांपूर्वी स्टार वन या वाहिनीवर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो सुरू झाला होता. त्यातूनच कपिल शर्मा, सुनील पाल यांच्याप्रमाणे अनेक कॉमेडियन प्रसिद्ध झाले. 


भगवंत मान यांच्या प्रमाणेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा प्रवास झालाय. कायद्याचा अभ्यास करत असतानाच झेलेन्स्की कॉमेडी शो मध्ये सहभाग घेत होते. 17 वर्षांचे असताना झेलेन्स्की एका स्थानिक विनोदी स्पर्धेच्या टीममध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 1997 मध्ये ते मेजर लीगमध्ये काम करून विजयी झाले. 2008 मध्ये त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केलं. तर 2011 मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. काही वर्षांपूर्वी कॉमेडी करणाऱ्या या नेत्यानं बलाढ्य रशियाला चांगलीच झुंज दिली.

झेलेन्स्की, भगवंत मान यांच्यावरच ही यादी थांबत नाही. तर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 2 राजीव निगम हा कॉमेडियन सध्या यू ट्यूबवर सक्रिय आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व्हिडिओ तयार करून निगम ते यू ट्युबवर अपलोड करतात. ट्विटरवरही व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतो.  श्याम रंगीला हा कॉमेडियन पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांची हुबेहुब मिमिक्री करतो. काही दिवसांनी हे दोघेही राजकारणात आले तर नवल वाटणार नाही.

कॉमेडी सर्कस सिझन 2 मधील रेहमान खान हा कॉमेडियन अनेक स्टँडअप कॉमेडीमध्ये सहभागी होऊन केंद्र सरकारवर टीका करताना दिसतो. मुस्लिमांचे प्रश्न मांडून सरकारवर कॉमेडीच्या माध्यमातून रेहमान खान निशाणा साधतो. 

दक्षिण भारतात जयललिता, एन.टी. रामाराव, एम.जी. रामचंद्रन हे कलाकार राजकारणात यशस्वी झाले, मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात कमल हासन आणि इतर कलाकारही राजकारणात आले. बॉलिवूडमधील धर्मेंद्र, हेमामालिनी, शत्रूघ्न सिन्हा यांच्यासारखे कलाकार लोकसभेवर निवडून गेले. मात्र भगवंत मान यांनी मिळवलेलं यश हे या सर्वांपेक्षा मोठं आहे. काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी राजकारणाचा विनोद केला होता. अर्थात राजकारणाचा विनोद आजही कमी-जास्त प्रमाणात कायम आहे. पण आता अनेक कॉमेडियन राजकारणात येत आहेत. त्यामुळे आधी राजकारणाचा विनोद झाला होता, आता विनोदाचं राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. 

#संगो

Sunday, March 6, 2022

झुंड, दिवार आणि विजय

 

अमिताभ बच्चन यांच्या दिवार आणि झुंड सिनेमातील व्यक्तीरेखेचं नाव विजय आहे. दिवारमध्ये अँग्री यंग मॅन तर झुंडमध्ये प्रशिक्षक अशा व्यक्तीरेखेत विजय पाहायला मिळतो. झुंड सिनेमात दाखवण्यात आलेल्या कॉलेजच्या दिवारच्या (भिंत) एका बाजूला इंडिया तर दुसऱ्या बाजूला भारत (झोपडपट्टी) दाखवलेला आहे. इंडिया आणि भारत यांच्या असलेली ही भिंत पाडण्याचं काम अमिताभ बच्चन यांनी केलं.

झोपडपट्टी म्हणजे नाक मुरडण्याचा विषय. नावं ठेवण्याचा विषय. मात्र हाच विषय पडद्यावर दाखवण्याची हिंमत नागराज मंजुळे यांनी दाखवली. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमातला वावर महानायकाचा वाटत नाही. अर्थात तो तसा असण्याची गरजही नाही. महानायकासमोर सामान्य चेहऱ्याच्या छोट्या कलाकारांनी केलेला अभिनय लक्षात राहतो. डॉन, बाबू, रितीक यांचे डायलॉग खळखळून हसवतात. आणि डोळ्याच्या कडाही पाणवतात. 

फेसबुकवर या सिनेमाविषयी बरंच नकारात्मक वाचण्यात आलं होतं. मात्र हा सिनेमा पाहताना त्या नकारात्मक पोस्ट कुठच्या कुठे उडून गेल्या. फँड्रीत जब्याने भिरकावलेला दगड अनेकांना लागला होता. या सिनेमात दगड भिरकावलेला नाही. तरीही त्या दगडानं अचूक मारा केला आहे. #संगो #झुंड # #jhund

Monday, February 21, 2022

पुन्हा 'तिसरा' गिअर?


 केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला.  चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो

Sunday, February 6, 2022

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे

 

लता मंगेशकरांच जीवनाचा प्रवास थांबला. मात्र त्यांचा आवाज जगभरात नेहमीच गुंजत राहणार आहे. जगभरातल्या नागरिकांवर असलेली त्यांच्या आवाजाची मोहिनी अशीच कायम राहणार आहे. कारण तो फक्त आवाज नाही. तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला काही तरी देणारा एक चिरंतन ठेवा आहे.
लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांना झालेला लतास्पर्श जीवनाचंच गाणं ठरतो. 'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणं तर प्रेमासाठी बंड करणाऱ्या तरूणाईचा आवाज आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला लतादीदींच्या स्वरानं नवी अनुभती दिली. उद्याची रात्र असेल किंवा नसेल अशा परिस्थितीत प्रियकराला गाण्यातून दिलेली साद हजारो वर्ष कोणीही विसरणार नाही.  लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो, हे गाणं ऐकताना प्रेमात पडलेली कोणतीही व्यक्ती शहारून गेली नसेल तरच नवल.  तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी लतादीदींचं हे गीत हमखास असतंच. जब हम जवां होंगे, या गाण्यातून पाहिलेली भावी प्रेमाची स्वप्नं शब्दातून मांडण्याचं काम लताजींनी केलं. प्रेमात पडल्यावर प्रियकराला पत्र लिहताना प्रेयसीच्या मनात हेच गीत दाटून आलेलं असतं. जे लतादीदींनी गायलंय, हमने सनम को खत लिखा. प्रेमात बेभान झालेल्या प्रेयसीच्या भावनांना आवाज दिला तो लता दीदींनी. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा हैं, हे बेभान गाणं मृत्यूवर मात करून जीवन कसं जगावं याचाच संदेश होतं.  अर्थात प्रत्येकाचंच प्रेम यशस्वी होत नाही. प्रेमभंग सहन करणाऱ्या हृदयानं घातलेली साद ऐकावी ती लतादीदींच्या गाण्यातूनच. शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता हैं, हे गाणं ऐकताना डोळ्यातून आपसूक अश्रू वाहू लागतात.  अनेक वर्षांनंतर आयुष्याच्या एका वळणावर भेटलेल्या प्रियकरासाठी लतादीदींनी दिलेल्या स्वरापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा नहीं, हे गाणं सर्व काही विसरून कोणतीही तक्रार करू नका, हा संदेश देतं असंच वाटत राहतं.
लतादीदींचा आवाज आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा देतो. प्रेमात पडलेल्याचं जग सुंदर करण्याचं काम लतादीदींच्या आवाजनं केलं. त्यामुळे पुढील हजारो वर्ष हा स्वर्गीय आवाज सर्वांना प्रेमाची आणि जगण्याची अनुभती देणार आहे. तुम्ही निराशा व्हाल तेव्हा प्रसन्न करण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे, प्रेमात पडाल तेव्हा तुमच्या हृदयाचा आवाज बनण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा तुमच्या हृदयाला समजावणारा लतादीदींचा आवाज. जीवनात संकटं येतील तेव्हा धीर देण्यासाठी लतादीदींचा आवाज आहे. जीवनातल्या कोणत्याही टप्प्यावर आवाज द्या, साद देण्यासाठी तुम्हाला लतादीदींचा आहे. फुलाच्या सुगंधाप्रमाणे हा आवाज आपलं जीवन असंच सुवासिक करणार आहे, लतादीदींनी गायलेल्या पुढील गाण्याप्रमाणे.... रजनीगंधा फुल तुम्हारे  यु ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में...
#संगो

Saturday, January 15, 2022

आरोग्य आणि मनाचा 'योग'!

 


कोरोनाचा धोका कधी वाढतो तर कधी कमी होतो. ही परिस्थिती किती दिवस कायम राहिल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर सज्ज असणं हीच आता मोठी गरज बनली आहे. त्यामुळे साधी, सरळ आणि कोणालाही करता येणारी योगासनं नक्की करा. सध्याच्या काळात त्याची नितांत गरज आहे. मागील वर्षी मला कोरोना झाला होता. त्यानंतर मी योगासनांकडे गांभीर्यानं वळलो. त्या आधी योगासनं करायचं मात्र त्यात सातत्य नव्हतं. आता दोन वर्षांपासून योगासनांमध्ये सातत्य असल्यानं त्याचे फायदे मला नक्कीच जाणवत आहेत. अर्थात त्यामुळे योगासनांकडे गांभीर्यानं नको तर आनंदाने वळा.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी योगासनं करून प्रतिकारशक्ती वाढवता येते. योगासनांमुळे शरीर आजारांशी समर्थपणे सामना करू शकतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं करणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपलं शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम असते. गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षा कवच प्रदान करण्याचं कार्य करते. जेणेकरून कोणत्याही आजाराचा संसर्ग सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. दैनंदिन जीवनात व्यायाम, योगासने आणि प्राणायम करण्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. 

वीरभद्रासन आणि त्यातील काही प्रकार शरीरासाठी लाभदायक आहेत. यामुळे हृदयास योग्य रक्तपुरवठा होतो. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे शरीर आजार-रोगांविरोधात सक्षमरित्या लढू शकतं. शिवाय, या आसनाच्या सरावामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कणा ताणला जातो. यामुळे अवयव बळकट होतात. नौकासन, वज्रासन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन ही आसनं सोपी आहेत.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्रिकोणासनही फायद्याचं ठरतं. त्रिकोणासन केल्यानं शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. या आसनामुळे कमरेचे स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. पाय, गुडघे, पोटऱ्या, हात, खांदे आणि छातीचे स्नायूंना चांगला ताण मिळतो. मन, मेंदू, मज्जासंस्थेचं आरोग्य सुधारते. महत्त्वाचे म्हणजे मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

योगा म्हणजे भारतानं जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. योगासनांमुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यानं या संकटात सर्वांनीच योगासनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहून कोरोनाचा सामना करण्यात नक्कीच मदत होईल. आणि हो सूर्यनमस्कार केल्यानं अनेक फायदे होतात. त्याविषयी अधिक माहिती पुढील ब्लॉगमध्ये. #संगो


Friday, January 7, 2022

व्यायामाची साथ, कोरोनावर मात!

 

कोरोनाचं सावट कायम असल्यानं प्रत्येकाने शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाचं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. निरोगी शरिरात आणि भरपूर प्रतिकारशक्ती असेल तर कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विषाणूंचा सामना करता येऊ शकतो.  व्यायाम कोणत्याही काळात शरीराला फिट ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम-प्रेमी नसाल, तरी आवश्‍यक तेवढा व्यायाम करायला सुरुवात करा. नियमित आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम लवकरात लवकर संरक्षक शक्ती वाढवतात. व्यायामाची सुरूवात करताना मध्यम प्रकारचा शारीरिक ताण देणारे आणि सुमारे 30 ते 45 मिनिटे असा व्यायाम करणे अतिशय योग्य ठरेल. 

कोरोनाचा वाढता संसर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध पाहता जिममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी करता येणारे व्यायाम तितकेच प्रभावी आहेत. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा 10 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्या तर साधारण 200 कॅलरी जळतात. एक तास दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे सरासरी 700 हून अधिक कॅलरीज जळतात. दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे एकप्रकारच्या उठाबशा आहेत. बर्पे हा जवळपास स्क्वाटसारखा व्यायाम आहे. याच्या सहाय्याने शरीरातील चरबी कमी करायला मदत होते. बर्पेस वेगवान हालचाल करतात, त्यामुळे ते तुमचे हृदयही पंप करतात.

घरात करण्यासाठी पुश अप हा व्यायाम अतिशय सोपा आहे. कमी जागेतदेखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. पुश अप्स हा अतिशय सोपा व्यायाम असून 10 मिनिटांच्या व्यायामाने तुम्हाला खूप शक्ती मिळते.

प्लॅन्क हा व्यायाम पोटासाठी अतिशय उपयोगी आहे. फॅट्स कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्ही केवळ हातांच्या मदतीनं शरीरवर घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा हा व्यायाम केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. साईड प्लॅन्क हा व्यायामची शरीराला अनेक फायदे देणारा आहे.

तर बाइसिकल क्रंचमुळे तुमच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतो. फॅट्स कमी होऊन अॅब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. या प्रकारामध्ये बेसिक क्रंच, रिव्हर्स क्रंच, डबल क्रंच असे तीन प्रकार असतात. ज्याप्रकारे आपण सायकल चालवण्यासाठी पाय वरखाली करतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपून आपण हा व्यायाम करू शकतो.

व्यायामाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झालंय की फ्लू, न्यूमोनिया, इतर काही संसर्ग, मधुमेह किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार व्यायामामुळे नियंत्रणात आले आहेत. कायम उत्साही राहिल्यामुळे जळजळ कमी होते, प्रतिकारक पेशींची संख्या वाढते. आतड्यातील मायक्रोब्सचा सकारात्मक परिणाम शरीराच्या संरक्षण संस्थेवर होतो. शरीरातील प्रतिकारक शक्तीचे नियमन होते. रोजच्या व्यायामामुळे ही संरक्षण संस्था सतत कार्यरत ठेवण्यास मदत होते. 

व्यायामाची आवड असो किंवा नसो फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. व्यायाम परिणामकारक होण्यासाठी खूप वेळाचा, शक्तिदायक आणि न आवडणारा व्यायाम असला पाहिजे, असे नाही. घरातल्या किंवा सोसायटीच्या पायऱ्यांचा चढ-उतार करणे चांगला आणि उत्साहवर्धक व्यायाम आहे. 

भरभर चालणे, पळणे, सायकल चालवणे किंवा तासभर सर्वसामान्य ताकदीचा कोणताही व्यायाम चांगल्या प्रकाराची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे जर व्यायाम करत नसाल तर आताच करायला लागा. कारण फिट राहाल तरच कोणत्याही परिस्थितीत हिट राहाल. #संगो


Tuesday, August 17, 2021

तालिबानची सत्ता, जगाला धोका


 अफगाणिस्तानचा राष्ट्रपती कोण होणार ? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे. तालिबानच्या अव्वल चार नेत्यांपैकी एक जण राष्ट्रपती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादाचं नाव राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहे. हैबतुल्लाह अखुनजादा हा तालिबानचा सर्वात मोठा नेता आहे. तोच अफगाणिस्तानाचा नवा राष्ट्रपती असेल असं बोललं जातंय. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि अन्य बाबींवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. तालिबानच्या राजकीय, धार्मिक आणि सैन्य विषयक बाबींवर त्याचा शब्द अंतिम मानला जातो. अख्तर मंसूर मारल्या गेल्यानंतर हैबतुल्लाह अखुनजादा याने तालिबानचं नेतृत्व सांभाळलं. हैबतुल्लाह याने तालिबानच्या विखुरलेल्या शक्तीला एकत्र केलं. हारलेल्या तालिबानींमध्ये त्याने विश्वास निर्माण केला. त्यामुळेच अवघ्या 103 दिवसात तालिबानींनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं.  मुल्ला हैबतुल्लाह अखुनजादा याच्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादरचं नावही अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होण्यासाठी आघाडीवर आहे. बरादर हा तालिबानच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे. राजकीय कार्यालय प्रमुख आणि शांती वार्ता पथकाचा तो सदस्य आहे. तालिबानची राजकीय वाटचाल कशी असेल याचा निर्णय अब्दुल गनी बरादरकडे असणार आहे. 1980 मध्ये अफगाणी सरकारविरोधातल्या लढ्यात बरादर आघाडीवर होता. कंदहारच्या मदरशात कमांडर मोहम्मद उमरसह त्यानं काम केलंय. 1996 ते 2001 मध्ये हेरात प्रांताचा तो गव्हर्नर होता. सिराजुद्दीन हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. हक्कानी नेटवर्क या नावानं कुख्यात असलेल्या नेटवर्कनं अमेरिका आणि नाटोला मोठा तडाखा दिला. मागील 20 वर्षात अमेरिका आणि नाटोच्या सैन्यावर अनेक आत्मघाती हल्ले करण्यात आले. हक्कानी नेटवर्कनं हे हल्ले केले होते. त्यामुळे  हक्कानीवर अमेरिकेनं 1 कोटी डॉलरचं बक्षिस जाहीर केलं. सिराजुद्दीन हक्कानी हा रशियाच्या विरोधात लढलेल्या जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यातही हक्कानी नेटवर्कचा हात होता.

सिराजुद्दीन हक्कानीनंतर मुल्ला मोहम्मद याकूब तालिबानमधला सर्वात प्रबळ नेता मानला जातो. तालिबानची स्थापना करणाऱ्या मुल्ला उमरचा याकूब हा मुलगा आहे. मुल्ला याकूबनं पाकिस्तानातल्या मदरशांमध्ये शिक्षण घेतलं. सध्या तो तालिबानच्या  मिलिट्री कमीशनचा प्रमुख आहे. त्याच्या अखत्यारीत अनेक कमांडर येतात. त्यांच्यावर विविध हल्ले करण्याची जबाबदारी दिली जाते. मुल्ला याकूब हा ऑपरेशनसाठी या कमांडरचा वापर करतो. मुल्ला उमरचा मुलगा असल्यानं याकूबला तालिबानमध्ये मोठा मान दिला जातो.  अफगाणिस्तानचा राष्ट्रपती या चार जणांपैकी कोणी तरी एक जण असणार आहे. तालिबान्यांनी रक्तरंजीत मार्गानं सत्ता हस्तगत केलीय. मात्र यानंतरचा काळ तिथल्या जनतेसाठी खडतर असणार आहे. तसंच तालिबानसमोरही अनेक आव्हानं आहेत.

अफगाणिस्तानवर विजय मिळवणं आणि त्यावर सत्ता गाजवणं कोणालाच शक्य झालं नाही. ब्रिटन, रशिया, अमेरिकेलाही अफगाणिस्तानात यश मिळालं नाही. अमेरिकेनं बॉम्बचा वर्षाव करून अफगाणिस्तान बेचिराख करून टाकला. मात्र तालिबानचा नायनाट करण्यात त्यांना अपयश आलं. जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या महासत्ता अफगाणिस्तानात पराभूत झाल्या. 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहिल्यानंतरही अमेरिकेला तालिबानची पाळंमुळं उखडून फेकता आली नाही. अमेरिकेच्या आधी ब्रिटन आणि 90च्या दशकात रशियालाही इथून पराभूत होऊन परतावं लागंल. अफगाणिस्तानची भौगोलिक रचनाच अशी आहे की, त्यांच्या जमिनीवर त्यांचा पराभव होऊ शकत नाही. डोंगराळ भागावर हवाई हल्ले करता येतात. मात्र टोरा बोरासारख्या असंख्य पर्वत रांगांमध्ये तालिबानी लपून बसतात. हवाई हल्ल्यातही त्यांचं जास्त नुकसान होत नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात अफगाणिस्तानच्या सैन्याला प्रशिक्षण दिलं. त्यांना अत्याधुनिक शस्त्रात्रं दिली. मात्र असं असूनही अफगाणिस्तानच्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त सैन्यानं तालिबानींचा प्रतिकार केला नाही. साठ हजार तालिबानींनी अवघ्या 103 दिवसात अफगाणिस्तान ताब्यात घेतला. अफगाणिस्तानच्या पळपुट्या सैनिकांनी रणांगणातून पळ काढला.

तालिबानला भारतानं अधिकृतरीत्या कधीच मान्यता दिली नाही. भारताचं तालिबानसोबत चर्चा करण्याचं आणखी एक सर्वात मोठं कारण आहे की, अफगाण सरकारसोबतच्या भारताच्या नात्यात वितुष्ट आलं असतं. भारत-अफगाणिस्तानमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिले आहेत. मात्र, आता स्थिती बदललीय. असं असलं तरी  गेल्या काही दिवसात तालिबानकडून भारतविरोधी कुठलंच वक्तव्य समोर आलेलं नाही. तालिबाननं अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या भूमिकेलाही चूक म्हटलं नाही.

दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जवळपास 2611 किलोमीटर लांबीची सीमा आहे. आपल्या सीमेवर अफगाणिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींची गर्दी होतेय की काय, याची चिंता पाकिस्तानला आहे.

तर चीनलाही चिंतेनं घेरलंय. चीनमधला शिनजियांग प्रांत संपन्न असून त्या प्रांताची अफगाणिस्तानसोबत जवळपास 8 किलोमीटरची सीमा आहे. तालिबाननं चीनच्या शिनजियांग प्रांतात सक्रिय असणाऱ्या ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट या फुटीरतावादी गटाला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर अफगाणिस्तान इस्लामिक कट्टरतावादाचं केंद्र होईल अशी भीती रशियाला आहे. अफगाणिस्तानात इस्लामिक कट्टरतावाद वाढला तर पूर्ण मध्य आशियासाठी मोठा धोका निर्माण होईल आणि हिंसाचार झाला तर त्याचे पडसाद मॉस्कोपर्यंत पोहोचतली अशी भीती रशियाला आहे. जगातल्या सर्वच देशांना तालिबानच्या राजवटीमुळे धोका निर्माण झालाय. आता या सर्व धोक्यावर काय तोडगा निघणार, यावर सर्वांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.