Sunday, November 29, 2015

चहा, आमीर, माहेर





मुलगा रोज सकाळी साडेआठ वाजता शाळेत जातो. तसा साडेसात वाजता एक चहा होतो. पण तो घाई-गडबडीतला चहा. चहा पिणं ही सुद्धा एक शास्त्रोक्त कला आहे. त्यामुळे मुलगा शाळेच्या स्कूल बसमधून रवाना झाल्यानंतर दुसरा चहा घेणं क्रमप्राप्त ठरतं. चहाचे घोट घेताना पेपरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या बातम्या वाचणंही सुरूच असतं. कितीही असहिष्णुतेची चर्चा असली तर पेपर वाचतोच. आमीर खानची पत्नीही पेपरमधल्याच बातम्या वाचून बेचैन झाली होती. ती मग आमीरला मुलांच्या सुरक्षिततेसाठी परदेशात जाऊ या का, असं म्हणाली. मग काय एकच गदारोळ उडाला.
घरातली गोष्ट बाहेर येऊ द्यायची नसते, या उक्तीचा प्रत्यय आमीरला (माहित असेल तर) आला असेल. संसारात झाकली मूठ महत्त्वाची असते. तसं पाहिलं तर हा आमीरचा दुसरा संसार. मोठा माणूस म्हटल्यावर संसाराची संख्याही वाढत जाऊ शकते. अर्थात तो काही नियम नाही. पण कितीही संसार झाले तरी पतीनं शांतपणे ऐकून घ्यावं आणि बाहेर बोलू नये, हे संसारातलं शाश्वत सत्य.हे सत्य मला पहिल्याच संसारात कळालं. 

त्यामुळे मी पत्नीला विचारलं, पेपरमधल्या बातम्या वाचून तूझं मत काय ? तेव्हा पत्नी म्हणाली, मुख्य पेपरला लगेच हात लावायचाच नाही. आधी पुरवणी वाचा. सखी, मैत्रीण, सई टाईपच्या पुरवण्या वाचा. मग विवा, आरोग्याचा ओवा वाचा. त्यानंतर हॅलो, टुडे सारखं इंग्रजी शिर्षक असलेलं काही तरी वाचा. त्यानंतर मुख्य पेपर वाचा आणि लगेच कामाला लागा. कारण पेपर काढणं हा एक बिझनेस आहे. तुम्ही नाही का चॅनेलमध्ये बुलेटिन काढता तसं. मग काय चहाने नाही, पण पत्नीच्या बोलण्याने किक बसली.
स्वत:ला सावरत पत्नीला विचारलं, या वातावरणात देश सोडून जावं असं तुला वाटतं का ? त्यावर पत्नी म्हणाली, फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी नेत जा. सामान्य पत्रकाराची सामान्य पत्नी.