Friday, May 16, 2014

शिवसेनेचा झंझावात !

शिवसेनेनं तब्बल 18 जागा जिंकून राज्यातली ताकद दाखवून दिली. उद्धव ठाकरेंनी पक्षाची केलेली बांधणी आणि घेतलेली मेहनत शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळवून देणारी ठरली. शिवसेनाप्रमुख हयात नसताना उद्धव ठाकरेंनी हे यश मिळवलं. हा विजय शिवसैनिकांना सुखावणारा आहे. देशात मोदींची लाट होती. मात्र महाराष्ट्रात शिवसैनिक जिद्दीने उतरला होता, तो शिवसेनाप्रमुखांसाठी.
 अर्थात हा विजय तितका सोपा नव्हता. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सत्ताधारी काँग्रेस आघाडीचं शिवसेनेपुढे तगडं आव्हान होतं. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस आघाडी, मनी आणि मसल पॉवरमध्ये कुठेही कमी नव्हती. त्यातच भाजपनं मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेनं सामनातून भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केल्यानं, महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अखेर भाजपनं शिवसेनेसमोर मान तुकवत मनसेचा हट्ट सोडल्यानं महायुती शाबूत राहिली.
मात्र मनसेनं वेगळीच खेळी केली. ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्याच मतदारसंघांमध्ये मनसेनं उमेदवार उभे केले. त्यामुळे शिवसेनेपुढे मतविभागणीचा धोका निर्माण झाला होता. परिणामी शिवसेनेसमोर काँग्रेस आघाडी आणि मनसे असे दोन शत्रू होते. प्रचाराची सर्व धुरा ही फक्त, उद्धव ठाकरेंच्या शिरावर होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरची सर्वात मोठी निवडणूक जिंकण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. शिवसेनाप्रमुखांनी राज्यात पाच ते सहा सभा घेतल्या तरी शिवसेनेचे दहा खासदार आरामात निवडून यायचे. मात्र आता शिवसेनाप्रमुखांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर, अभिजीत पानसेंनी पक्ष सोडला. आनंद परांजपेही राष्ट्रवादीच्या तिकीटावर कल्याणमध्ये निवडणूक लढवत होते. गजानन बाबर, गणेश दुधगावकर, भाऊसाहेब वाकचौरे या खासदारांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे शिवसेना यश मिळवणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र उद्धव ठाकरेंनी प्रतिकूल परिस्थितीतही हिंमत हारली नाही. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रचाराची राळ उडवून दिली. प्रत्येक भागात जाऊन, त्या भागातले प्रश्न मांडत त्यांनी सत्ताधा-यांवर टीकेची झोड उठवली. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं. राज्यातल्या जनतेनं शिवसेनेचे तब्बल 18 उमेदवार निवडून दिले. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे फक्त सोळाशे मताच्या अंतरानं पराभूत झाले. मुंबईतल्या तीन जागा, ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये मनसेमुळं मतविभागणीचा धोका होता. मात्र मतदारांनी मनसेला साफ नाकारलं.
मराठी माणसांनीही शिवसेनेबरोबर गद्दारी करणा-यांचे हिशेब चुकते केले. राज ठाकरेंनाही मराठी माणसांनी सोडलं नाही. राजचा पक्ष 'मन'से उतरवून टाकला. छगन भुजबळ, नारायण राणे, आनंद परांजपे, गणेश नाईक, संजय निरूपम, भाऊसाहेब वाकचौरे या गद्दारांचे हिशेब चुकते केले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये शिवसेना भाजपचा पराभव झाला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी, 'एक मारा, लेकिन सॉलिड मारा'  असा डायलॉग मारला होता. तो हिशेबही चुकता झाला. मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी किती सॉलिड मारलं, याचा हिशेब आता राज ठाकरेंना करता येईल. 'मौका सभी को मिलता है', याची प्रचिती आता राज ठाकरेंनाही आली असेल. मुंबईवर मराठी माणसाचा आणि शिवसेनेचाच ठसा आहे, हे या निवडणुकीने दाखवून दिले. राहुल शेवाळे, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर या मावळ्यांनी शिवसेनेच्या भगव्याची शान वाढवली.
शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असंच आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतरची ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक त्वेषाने लढले आणि जिंकले. आता उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसमोर आव्हान आहे ते, विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं.

Thursday, May 8, 2014

कठोर शासन आणि प्रबोधन !


 
दलितांवरील अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं देशात समानता निर्माण झाली. मात्र ही समानता प्रतिगामी मनोवृत्तीला मानवणारी नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागात हीच मनोवृत्ती वारंवारपणे संधी मिळेल तेव्हा हिंसक होत असल्याचं अनेक घटनांमधून स्पष्ट होत आहे.
खर्डातली हृदयाचा थरकाप उडवणारी नितीन आगेची हत्या, कायद्याचा धाक उरला नसल्याचं दाखवून देते. याला कारणीभूत आहे ती वर्षानुवर्षे चालत आलेली 'आपण' आणि 'ते' ही मानसिकता. उच्च जातीच्या वृथा अभिमानातून इतरांना कस्पटासमान लेखलं जातं.
देशात अनेक संतांनी समानतेचा संदेश दिला. राज्यातही वारकरी संप्रदाय जात मानत नाही. राज्याला संत परंपरेचा मोठा वारसा आहे. समाजसुधारकांनी जातीयवादाच्या विरोधात मोठा लढा दिलेला आहे. विविध पातळ्यांवरून समाजसुधारक जातीयतेच्या विरोधात लढा देत असतात. मात्र तरीही जातीयवादी मानसिकतेवर कोणताही परिणाम होत नाही. तथाकथित उच्च जातीत जन्मल्याचा वृथा अभिमान हेच त्या मागील मुख्य कारण आहे.
या प्रतिगाम्यांना महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळालेलेच नाहीत. त्यांनी जर या महापुरूषांचं साहित्य वाचलं तर, यांच्या मनातली जातीयवादाची जळमटे जळून जातील, यात शंका नाही. खुद्द सरकारनेच या महापुरूषांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर अत्याचार करणा-यांना कठोर शासन झाल्याशिवाय इतरांना धडा मिळणारच नाही. सरकारने गुन्हेगारांना शासन आणि समाजाचं प्रबोधन या दुहेरी नितीचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात जसा जातीयतेचा पगडा आहे, तसाच शहरी भागातही. शहरी भागात थेट जातीयता दिसून येत नाही, मात्र तिचं अस्तित्व आता कमालीचं जाणवू लागलं आहे. काही कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याच जातीच्या
कर्मचा-यांची भरती करत आहेत. भरती करताना आपली 'लाईन' कशी चालवली जाईल याची काळजी घेतली जात आहे. माध्यमंही याला अपवाद राहिलेली नाहीत. नसानसात जातीयवाद भिनलेली मंडळीच खर्डा या विषयावर वृत्तवाहिन्यांवर चर्चा करत आहेत.