Sunday, June 12, 2011

दलित मतांसाठी राष्ट्रवादीचा 'सनद'शीर मार्ग

शिवशक्ती - भीमशक्तीचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच धसका घेतल्याचं आता स्पष्ट होतंय. 9 जूनरोजी चैतन्यमय वातावरणात शिवशक्ती - भीमशक्तीचा महामोर्चा आझाद मैदानात पार पडला. दुस-याच दिवशी सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक परिवर्तन हक्क परिषद आयोजित केली होती. शिवशक्ती - भीमशक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कशी धास्तावली, आहे हेच यातून दिसून येत होतं.
'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.

छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.

दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?

आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद

घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.

Tuesday, June 7, 2011

ही चित्रं पहा आणि मग बोला...

दिग्विजय सिंह सोनियाजींचा हा डान्स बघितला. मग आता काँग्रेसही नाच-यांचा पक्ष आहे, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का ?





Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.