Friday, October 29, 2010

विधवांच्या वैधव्यावर नेत्यांचे फ्लॅट्स

देशाला बाहेरच्या शत्रूंचा जितका धोका नाही, तितका धोका हा भ्रष्टाचा-यांचा आहे. अतिरेक्यांपेक्षाही हे शत्रू जास्त धोकादायक आहेत. कारगिलमध्ये जे सैनिक देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाले, त्यांच्या विधवा पत्नींसाठी नौदलाचा भूखंड देण्यात आला होता. मात्र हा भूखंड आपले भ्रष्ट नेते आणि अधिका-यांनी अक्षरश: लाटला. ज्या - ज्या अधिकारी आणि मंत्र्यांसमोर 'आदर्श' सोसायटीची फाईल गेली त्या सगळ्यांना फ्लॅट्सची खिरापत वाटली गेली. आठ ते दहा कोटींचा भाव असलेले फ्लॅट्स 50 ते 60 लाखात विकले गेले. आता मेथीची जुडी स्वस्त मिळते म्हणल्यावर आपण नाही का दोनच्या ऐवजी चार जुड्या घेतो. तसंच या नेत्यांनीही केलं. स्वस्तात प्राईम लोकेशनला फ्लॅट्स म्हटल्यावर सासू, मेव्हणा आणि दूरच्या पाहुण्यांनाही फ्लॅट्स दिले गेले. सनदी अधिका-यांनीही त्यांनी ज्या तत्परतेने कामे केली त्याची फ्लॅट्सच्या माध्यमातून पुरेपूर किंमत वसूल केली. कारण अशी तत्पता ते काही 'आम आदमीसाठी' दाखवत नाही.
आमच्या भ्रष्ट नेत्यांनो आणि अधिका-यांना तुम्ही भ्रष्टाचार सुरूच ठेवा. कारण तो थांबवणं आता तुम्हाला शक्य नाही. मात्र थोडी तरी मनाची लाज ठेवा. ज्या देशातल्या मातीत जन्मलात, ज्या देशाचं अन्न खाता त्याच्याशी तरी प्रतारणा करू नका. जे सैनिक देशासाठी शहीद झाले, त्यांच्या ऋणातून थोडीतरी उतराई व्हा. कारण तुम्हाला खाण्यासाठी अख्खा देश आहे. तुमचे फारच थोडे घोटाळे उघड होतात. जे उघड झालं ते अगदीच हिमनगाचं टोक आहे, हे ही सगळ्यांना माहीत आहे. मात्र जो भूखंड शहिदांच्या विधवांसाठी होता त्याला हात लावताना तुमचे हात थरथरले नाहीत का ? शत्रूच्या गोळ्यांना निधड्या छातीने सामो-या गेलेल्या सैनिकांचेही तुम्हाला स्मरण झाले नाही का ?
कोट्यवधीच्या फ्लॅट्समध्ये तुम्ही रहायलाही जाल. मात्र त्या फ्लॅट्समध्ये तुम्हाला झोप येईल का ? या प्रश्नाचं आधी उत्तर द्या. फ्लॅटच्या भिंतींना जो लाल रंग असेल तो रंग तुम्हाला अतिरेक्यांच्या गोळ्यांनी चाळण झालेल्या शहीदांच्या लाल रक्तांची आठवण करून देईल. ज्या अलिशान फ्लॅटच्या गॅलरीतून तुम्ही समुद्र किनारा पहाल आणि त्या नंतर जेव्हा मान करून शुभ्र आकाश पहाल तेव्हा, शहीदांच्या पत्नींच्या उजाड झालेल्या कपाळाची तुम्हाला आठवण येईल. शहिदांची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील, आमच्या वडिलांनी देशासाठी मरण पत्करलं. आणि तुम्ही आम्हाला आमच्या हक्काच्या घरातही राहू देणार नाहीत का ? नेते आणि अधिका-यांनो इतकं तुमचं रक्त पांढरं झालंय का ? की तुम्हाला तुमच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.
शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी ब-या बोलाणं ते फ्लॅट्स खाली करा. नाही तर सामान्य नागरिकांना हातात दगड घेऊन तुमच्या फ्लॅट्सवर भिरकावे लागतील. आता जनतेचा उठाव होण्याची वाट पाहू नका. जनता चिडलेली आहे. जर जनेतेने दगड हातात घेतले तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल. याचे भान ठेवा.

Tuesday, October 19, 2010

शिवसेनेचा 'आदित्यो'दय आणि 'वाग्या' वेताळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा नेहमीच्या उत्साहात संपन्न झाली. प्रखर राष्ट्रवादी ( घड्याळवाले नव्हे ) विचारांचा दुष्काळ असलेल्या देशात विचारांचे सोने दृष्टीस पडत नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाकडे, ते देणार असलेल्या विचारांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनीही त्यांच्या खणखणीत आणि दणदणीत विचारांनी पार दाणादाण उडवून दिली. काश्मीरपासून ते बांग्लादेशपर्यंत आणि नेहरूंपासून ते माणिकरावांपर्यंत त्यांनी सगळ्यांनाच 'ठाकरी' तडाखा दिला.
शिवसेनेची 'यवा सेना'ही याच मुहूर्तावर मैदानात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आतापर्यंत कोणत्याही घटनात्मक पदावर बसलेले नाहीत. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. पायाशी आलेली पदं नाकारणारे हे घराणे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या पदावर बसवले. शिवसेनाप्रमुखांना 'किंग' नव्हे तर 'किंगमेकर'च्या भूमिकेत रहायला आवडते. आदित्य ठाकरे यांच्याकडे 'युवा सेना'चे सेनापतीपद देण्यात आलं. आणि वृत्तपत्रांमधून गदारोळ सुरू झाला. बरं हे पद काही घटनात्मक पद नाही.
जवाहरलाल नेहरू - पंतप्रधान, इंदिरा गांधी - पंतप्रधान,राजीव गांधी - पंतप्रधान, सोनिया गांधी - खासदार, राहुल गांधी - खासदार आणि भावी पंतप्रधान. ही घराणेशाहीची घटनात्मक पदे. तरीही अनेक पत्रकार, चॅनेल्स यांनी घराणेशाहीच्या नावाखाली शिवसेनेवर टीका का केली असेल ? या ठिकाणी प्रामाणिकपणे असं वाटतं की, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या भाषणात 'पेड न्यूज'चा मुद्दा मांडल्याने 'पेड पत्रकारांच्या' मूळावर (पोटावर) घाव बसला. आणि ते चवताळून उठले. बरं 'पेड न्यूज'विषयी बोलताना बाळासाहेबांनी न्यूज चॅनेल्सचा उल्लेखही केला नव्हता. मग तो 'वाग्या' वेताळ का घुमू लागला असेल ? शिवसेनेत घराणेशाहीला धारा नाही, हे शिवसेनाप्रमुखांचे वाक्य तुम्हाला पटते का ? असा सवाल त्याने का उपस्थित केला असेल ? हा सवाल उपस्थित करून आपल्या सोयीची टाळकी बोलवायची, आपल्याला हवे ते त्यांच्याकडून वदवून घ्यायचे आणि स्वत:च आपली पाठ थोपटून घ्यायची असा हा प्रकार. त्या संपूर्ण चर्चेत ठाकरे घराण्यातली कोणतीही व्यक्ती घटनात्मक पदावर बसलेली नाही, त्यांनी निवडणूक लढवलेली नाही, या मुद्यांकडे का दूर्लक्ष केले असेल ? कारण या चर्चेतून शिवसेना द्वेषाची मळमळ ओकून टाकण्याचाच उद्देश असावा, असं एकंदरीत चर्चेतून स्पष्ट होतं.
या चर्चेत आदित्य ठाकरेंना तलवार देण्यावर टीका करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या भाषेवर आक्षेप घेण्यात आले. हा नेता मोठा कसा ? असा सवालही उपस्थित करून पुढिल परिणामांची चिंता न करता हे विधान करत असल्याचंही म्हटलं गेलं. ही पत्रकारिता म्हणायची की मस्ती ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत की नाही याचे प्रमाणपत्र काय हा 'वाग्या' वेताळ देणार का ?
बाळासाहेबांच्या भाषेवर आक्षेप घेणा-या या महाशयांनी त्यांच्या भाषेमुळे त्या चॅनेलमधून किती लोकांना नोकरी सोडायला लावली आहे, याची ते माहिती देतील का ? त्यांच्या भाषेमुळे कित्येकांनी ते चॅनेल नव्हे तर पत्रकारिताच सोडून दिली. त्यांचा कार्यालयातला थयथयाट, तुला अक्कल नाही असे शब्द तिथे नेहमीच गुंजत असतात. तुम्ही काम करण्याच्या लायकीचे नाहीत, असे शब्द कितीतर डेसीबल्समध्ये तिथे आदळत असतात.
स्त्रियांना संरक्षणासाठी शस्त्रे द्या, असंही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावर बोलले. ही शस्त्र जर आधीच दिली गेली असती तर एका महिला कर्मचा-याकडून त्यांना 'ग्रेट भेट' नव्हे तर 'लाईफ टाईम' भेट मिळाली असती आणि 'चला, थोबाडीत खाऊ या' अशी हेडलाईनही झाली नसती.
वाद निर्माण करून हल्ले ओढवून प्रसिद्धी मिळवायची. टीआरपी वाढवायची असा हा डाव आहे. दर एक दोन वर्षांनी त्यांना असा वाद किंवा हल्ला हवाच आहे. बहुतेक याची त्यांनाच सवयच झाली असेल. असो.
शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक जमले होते. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी ते तिथे जमले होते. त्या गर्दीतला मी ही एक वारकरी. माझ्या दैवतावर चर्चेत ठरवून केलेला हा हल्ला मनाला पटला नाही. माझ्या दैवताची ही विटंबना सहन होणार नाही. त्यासाठी हा ब्ल़ॉग प्रपंच. तूर्तास इतकेच. खालच्या या दोन वेळी वरील सर्व ब्लॉगचा खुलासा नाहीत. माझ्या मनातली भावना व्यक्त केली. इतकंच.

Thursday, October 14, 2010

काँग्रेसच्या झेंडा मार्चला, पैशाचा दांडा

काँग्रेसच्या ग्राम ते सेवाग्राम अभियानाचा समारोप होण्याच्या एक दिवस आधीच, त्यांच्या भ्रष्ट आचरणाचा समारोप झाला. या अभियानाच्या समारोपासाठी कशाप्रकारे पैसे गोळा केले जातात, हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून सगळ्या जगाने पाहिले. आता यात काँग्रेसचा तरी दोष कसा म्हणायचा ? त्यांच्या नेत्याकडे कोणते असे विचार आहेत ? की जे ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी करावी. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना नाईलाजाने पैसा जमा करावा लागतो. तो झोपडपट्ट्यांध्ये वाटून गर्दी जमवावी लागते. बरं हे काय आता होतंय, अशातलाही भाग नाही. काँग्रेसला गर्दी जमवण्यासाठी अनेक वर्षांपासून पैशांचा आधार घ्यावाच लागतो.
देव जरी प्रसन्न करायचा असला तरी त्याची भक्ती करावी लागते. त्याला नवस बोलावा लागतो. त्याला काही तरी अर्पण करावं लागते. जसं देवांचं तसंच नेत्यांचंही असतं. आता नेते म्हणजेच देव अशी परिस्थिती आहे. आणि आता तर साक्षात सोनिया माताच थेट १० जनपथवरून वर्ध्यात अवतरणार म्हटल्यावर काँग्रेसी मंत्री भक्तांनी पैशांचा भोग चढवला नाही तरच नवल. पैसा, पैशातून गर्दी, गर्दीतून मातेच्या दरबारात मानाचे स्थान मिळते. मग त्यासाठी प्रत्यके मंत्र्याने 'पर हेड' दहा लाख रूपये कॉन्ट्रीब्युशन देण्याचे ठरले. मंत्र्यांना तरी पैसा द्यायला काय जड जाणार म्हणा. शेवटी 'हपापाचा माल गपापा' म्हण्तात तो असा.
असो. आता माता सोनियाच येणार म्हटल्यावर या काँग्रेसी नेत्यांच्या अंगात आलं नाही तरच नवल. मातेसमोर गर्दी जमा करण्यासाठी पैशाच्या चिंतेत असणा-या माणिकराव आणि चतुर्वेदी या नेत्यांना समोर कॅमेरा सुरू आहे, याचेही भान राहिले नसावे. इतके हे सोनिया मातेचे भक्त मातेसाठी गर्दी जमवण्याच्या चर्चेत गुंग झाले होते. 'अब सीएम लाईन पे आया' असे शब्दही या संभाषणात म्हटले गेले. पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांविषयी कशी भाषा वापरतात, हे ही नागरिकांना दिसून आले. मुख्यमंत्र्यांना दानत नाही, असं त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्पष्टपणे बोलतात.
आता यात या नेत्यांचा काही दोष आहे, असंही म्हणता येत नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांच्या सभांना जर गर्दी जमवायची असेल तर, पैशाशिवाय पर्याय नाही. कारण पैशाशिवाय काँग्रेसवाल्यांची भाषणं कुणी ऐकत नाही. कारण त्यांच्याकडे विचार नसतो. त्यामुळे भाड्याने आणि वाहनांमध्ये भरून तिथं डोकी आणावी लागतात. काँग्रेसचा व्यवहारच असा रोखीचा आहे. त्यांना पैशाशिवाय मत मिळत नाही. पैशाशिवाय सभेला गर्दी होत नाही. त्यामुळे कारभार करतानाही ते रोखीशिवाय काम करत नाही. अशा पैशाच्या गोष्टींवर काँग्रेसचा कारभार सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून ते हायकमांडपर्यंत फक्त पैसाच बोलतो. या पैश्यासाठी नेते भ्रष्टाचार करून देश नागवा करत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराने देशातला 'आम आदमी' पुरता हैरान झालाय. पण याची काँग्रेसच्या नेत्यांना काळजी नाही. कारण ते सगळं काही विकत घेऊ शकतात, हवा तितका पैसा पुरवू शकतात.
मात्र आपणही जास्त टेन्शन घेऊ नये. या सगळ्या प्रकाराकडे सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन बघणं गरजेचे आहे. कारण 'मोठ्या कार्यक्रमासाठी खर्च होतो', असं आता मुख्यमंत्र्यांनीच म्हटलं आहे. पण इथं खर्च मोठ्या कार्यक्रमासाठी नव्हे तर 'मोठी गर्दी' जमवण्यासाठी होत आहे. आपण पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीकोण ठेवून बघू यात. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासूनच ट्रक - टेम्पोमध्ये माणसं भरून आणून गर्दी जमवतो. या वेळेस त्यांनी दोन कोटी रूपये खर्चून दोन हजार बसेस भाड्याने घेतल्या आहेत. ट्रकपेक्षा 'आम आदमी'साठी बस कधीही चांगलीच नाही का ? पुढिल दहा वर्षानंतर कदाचित हेलिकॉप्टरचा वापर करून गर्दी केली जाईल. चला, काही का असेना पण प्रगती तर होत आहे ना. गर्दी जमवण्यासाठीची वाहनं बदलत चालली आहेत. मात्र त्यात भरून आणल्या जात असलेल्या 'आम आदमी'ची गरिबी काही हटत नाही. कारण त्याची गरिबी हटली तर काँग्रेस देशातून हटेल. त्यामुळे जय हो सोनिया माता की. सेवाग्राम अभियान की. वसुली करनेवाले काँग्रेस के नेताओंकी. जय हो.