Wednesday, March 11, 2009

पाकिस्तान, क्रिकेट आणि अर्थातच बाळासाहेब

'जितेगा भाई जितेगा, पाकिस्तान जितेगा' ही पाकिस्तानधील क्रिकेटप्रेमींची खेळाडूंना प्रोत्साहित करणारी घोषणा आता लवकर कानावर पडण्याची शक्यता नाही. धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या या देशात क्रिकेटची सांगड ही राष्ट्रप्रेमा बरोबर घालण्यात आली. भारताकडून युद्धात मार खालेल्या पाकिस्तानला क्रिकेटमध्ये भारताला हरवण्याची संधी मिळाली. भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानातील जनतेचा विजयाचा उन्माद वाढू लागला. शारजामध्ये जावेद मियाँदादने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास पार रसातळाला गेला होता. मात्र क्रिकेटवर प्रेम करणा-या पाकिस्तानातच श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला झाला. रशियाला शह देणे, अफगाणिस्तानात तालिबान यांचा बिमोड यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला मोठी मदत केली. मात्र त्याचा फायदा झाला नाही. उलट अफगाणिस्तानातील तालिबान तर संपला नाहीच, मात्र पाकिस्ताना तालिबानची शक्ती वाढली.
तालिबानच्या नावाने गळा काढणा-या पाकिस्तानी खेळाडूंचे वर्तनही तालिबानी प्रवृत्तीला पोषक असंच राहिलंय. 1992 सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधार इम्रान खानसह मैदानावर नमाज ( नव्हे विजयाचा माज आणि उन्माद ) अदा केली होती. भारताबरोबरील मॅच ही जेहाद असते, असं वक्तव्यही इम्रान खान याने केलं होतं. इंझमाम उल हक हा ही अनेकदा मैदानावर नमाज अदा करताना दिसलाय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर हा आता पूर्णवेळ तबलिग झालाय. पाकिस्तानच्या संघातील ख्रिश्चन खेळाडू युसूफ योहन्ना याला धर्मांतर करण्यासाठी सईद अन्वर यानेच प्रवृत्त केले. योहन्ना आता मोहंमद युसूफ या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आता दहशतवाद आणि तालिबान यांच्या विरोधात गळा काढणा-या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे वर्तन कसे चूकीचे होते, हे दिसून येते. कारण तीन वेळेस विश्वचषक जिंकणा-या ऑस्ट्रेलियाने मैदानावर कोणतीही प्रार्थना केली नव्हती. तसंच 1983 चा विश्वचषक आणि 20-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघानेही काही मैदानात सत्यनारायणाची पुजा मांडली नव्हती.
मुळात धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या पाकिस्तानात लोकशाही कधी नांदलीच नाही. जनरल अयुख खान यांनी 1958 ते 1969 पर्यंत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर जनरल याह्या खान यांनी दोन वर्ष सत्ता भोगली. 1977 ते 1988 या कालावधीत जनरल झिया उल हक यांनीही पाकिस्तानचे इस्लामीकरण करत सत्तेचा निरंकुश वापर केला. 1999 ते 2008 या कालावधीत लोकशाहीच्या नावाखाली जनरल परवेज मुशर्रफ यांनीही सत्ता उपभोगली. भारताचा द्वेष करत असताना त्यांच्याच देशात कर्मठ तालिबानी तयार होत गेले. जे आता पाकिस्तानच्या सरकारलाही जुमानत नाही.
आता सगळ्या जगाने पाकिस्तान बरोबरील क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांचेही संबंध तोडले आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशात बॉम्बस्फोट घडवणा-या, तसंच कारगिलचे युद्ध, संसदेवरील हल्ला घडवून आणणा-या पाकिस्तानबरोबर क्रिकेट नकोच ही भूमिका किती तरी आधी मांडली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी वानखेडे आणि कोटला स्टेडिअमची पिच खोदली होती. मात्र त्यानंतरही भारत सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे संबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानात भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागतही झाले. 'क्रिकेट डिप्लोमसी' असं या घटनेला संबोधलं गेलं. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटने प्रश्न सुटणार असतील तर लष्कराची गरजच काय? सीमेवर दहशतवाद्यांबरोबर क्रिकेट खेळा अशी टीकाही केली होती. मात्र आता सगळ्या जगानेच पाकिस्तानवर बहिष्कार टाकलाय.
धर्मवेड्या तालिबानींमुळ तेथिल क्रिकेट आता मरणासन्न अवस्थेला पोचलंय.