Friday, February 20, 2009

हे पक्ष गुंडांचे, हे पक्ष पुंडांचे, गँगस्टर गुन्हेगार नांदो हे राष्ट्र माफियांचे

लोकसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होणार आहेत. त्यानंतर चार - पाच महिन्यात राज्यातही निवडणुका होतील. लोकसभा आणि निवडणुका या गुन्हेगारांसाठी गंगा स्नान करून पवित्र होण्याची संधी, असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आता राजकीय पक्षांमध्ये सामील होतील.
अर्थात समान्य मतदार हा लोकशाहीला कलंक मानतील. शेवटी सामान्य माणसं ही सामान्यच विचार करणार नाही का? गुन्हेगारांचे राजकारणात येने ही लोकशाहीच्या सबलीकरणासाठी योग्य मार्ग आहे. प्रबळ गुन्हेगार राजकारणात आल्यानं लोकशाही सशक्त होणार आहे, यात आता शंका बाळगण्याचं कारण नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात नाही का देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी नेते तुरूंगात जात. तुरूंगात गेल्यानंतर त्यांना जनता पाठिंबा देई. होय लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातही हाच फॉर्म्युला वापरल्यानं हा चित्रपट लोकप्रिय झाला. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून इंग्रज सरकारला जेरीस आणलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
राजकारणात येणा-या गुन्हेगारही गांधीवादी आहेत. पण त्यात थोडा फरक आहे. हे गुन्हेगार खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, गुंडगिरी, तस्करी यासारखे कार्य करतात. म्हणजेच ते सविनय कायदेभंग नव्हे तर विनयभंग टाईप गांधीगिरी करतात, त्या मार्गातून तुरूंगात जातात. आणि राजकारणात येण्याची पात्रता मिळवतात. अर्थात हे करताना त्यांना थोड्या - फार यातनाही होत असतील, पण काय करणार कुणी तरी म्हटलंय ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
तेव्हा लोकशाहीच्या सबलीकरणासाठी गुन्हेगार, कलंकित सिनेस्टार, मॅच फिक्सींग करणारे क्रिकेटपटू, बॉम्बस्फोटातील आरोपींना सोडविणार वकील, गँगस्टर, छोटे - मोठे गुन्हेगार लवकर राजकारणात प्रवेश करा. कारण आता तुम्हीच या राष्ट्राचे तारणहर आहात. दाऊद इब्राहीम राजकीय नेत्यांना पैसा पुरविणार आहे. तेव्हा या संधीचा लाभ घ्या.
सामान्य नागरिकांनो डोळे पांढरे करू नका. अबू सालेम, अरूण गवळी, संजय दत्त, अझरूद्दीन, माजीद मेमन, अबू आझमी, राजाभैय्या, लतिफ, सूर्यभान आणि या सारखीच जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकापेक्षा एक साहस केलेली ही नरांची खाण आपल्या देशाचं नेतृत्व करायला सिद्ध झालीय. गुन्हेगारांनी राजकीय पक्षांना पैसा पुरविण्याऐवजी स्वत:च देश चालवायला घेतला तर त्यात वावगे ते काय?
गुन्हेगार सत्तेत आल्यानंतर शहरात कोणतीही जागा शिल्लक ठेवणार नाहीत. या माध्यमातून अनेकांना घर मिळेल. शस्त्रास्त्रे विनासायास मिळाल्याने प्रत्येक जण स्वत:च संरक्षण करू शकेल. अंमली पदार्थ सर्रास उपलब्ध झाल्यानं डोक्याला विचार करायला संधी मिळणार नाही, त्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही. हे सर्व गांधीवादी पाचशे किंवा हजाराच्याच नोटा स्वीकारतील त्यामुळे सामान्य नागरिकांची सुट्टया पैशांची समस्याही सुटेल. हे गुन्हेगार स्वत:चे संरक्षण करण्यास समर्थ असल्याने पोलीस विभागाचाही खर्च वाचेल.
हे काँग्रेस, भाजप,बसपा,सपा पक्षांनो सर्व गुन्हेगारांन सामावून घेण्याचं काम करत आहात. गंगा नदीप्रमाणे तुम्ही त्यांची पापे धुवून टाकत आहात. त्यामुळे सामान्य नागरिकांनी गंगेत स्नान करण्याऐवजी तुमच्या कार्यालयात स्नान करणे योग्य ठरेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्व गुन्हेगारांनो तुम्ही निवडून या हा देश हे राज्य चालवा तरच पाकिस्तान सारख्या राष्ट्राला आपली जरब बसेल. दहशतवादी भारतात प्रवेश करायला घाबरतील. देशात कुठेही परकीय हल्ले होणार नाहीत. तेव्हा गुन्हेगारांना लवकर सत्ता हाती घ्या आणि हा देश परकीय भयातून मुक्त करा.
हे राष्ट्र गुंडांचे आणि माफियांचे होवो, यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे असतील त्यांना यश येवो. हीच सदिच्छा.
वर लिहीलेलं पटतंय. होय असल्यास ,थांबा पुढील वाचू नका.
पटत नसेल तर 24 तास डोळे उघडून नीट बघत सत्य आणि सत्यच सांगा. तरच देश वाचेल आणि आपण जग जिंकू. पत्रकारांनो आता तुमचीही कसोटी आहे. गुन्हेगारांना रोखा नसता भविष्यात सगळ्यांनाच क्राईमच्याच बातम्या कराव्या लागतील.

Monday, February 16, 2009

नाचा, गा, आणि हसा, सामाजिक प्रश्न विसरा

टीआरपी. होय हीच ती तीन शब्द ज्याच्यासाठीच वाहिन्या काम करताहेत, याविषयी आता शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि ते ही खरंच आहे, म्हणा एवढा पैसा गुंतवला ( आता तो काळा की पांढरा हे मात्र विचारू नका) म्हटल्यावर तो मार्केटमधून मिळवावा लागणारच. त्यासाठी जे लोकांना आवडतं ते आम्ही देतो असं म्हणत वाहिन्यांवर सध्या वेगवेगळ्या प्रकराचे मनोरंजनाचे कार्यक्रम दिसताहेत. अर्थात यात हिंदीच्या बरोबरीने प्रादेशिक वाहिन्याही आघाडीवर आहेत.
मराठीचा विचार केला तर झी मराठीवरील सारेगमपच्या लिटील चॅम्प्सची अफाट लोकप्रियता वाहिन्यांच्या विश्वात ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल. त्याशिवाय या आधीच्या त्यांच्या सेलिब्रिटी, स्वप्न स्वरांचे नव तारूण्याचे या कार्यक्रमांनाही प्रतिसाद मिळाला होता. तसंच हास्यसम्राटचे दुसरे पर्वही पार पडले. त्याशिवाय आम्ही सारे खवय्ये, आदेश भावोजींचे होम मिनीस्टर. शहरी मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या पचनी पडणा-या मालिका येथे सुरू आहेत.
टीव्हीवरील कॉमेडी एक्सप्रेसमध्ये 'बेंचोवर उभा राहा' या शब्दाभोवतीचे विनोद सातत्याने रिपीट होतात. तसंच रंगतदार मेजवानीच्या माध्यमातून जेवायलाही घालतात. 'चार दिवस सासूचे' मालिकेत उद्योगपती आणि राजकारणी यांच्याशी सामान्यांचा कधी संबंध येत नाही, अशी कथानके अजूनही सुरू आहेत.
बाकी स्टार प्रवाह च्या मालिकाही श्रीमंतांची गुलामगिरी सोडायला तयार नाहीत.
हिंदीमध्येही सारेगमप, बुगीवुगी, 9 X वरील डान्स शो, इंडियन आयडॉल, व्हाईस ऑफ इंडिया, नच बलिये,लाफ्टर शो या सारखे कार्यक्रम विविध वाहिन्यांवर सुरू आहेत. अबाल - वृद्ध या कार्यक्रमात सहभागी होताहेत. लहान मुलेही मोठ्यांना चाट पाडतील असे विनोद सांगताहेत.
आता प्रश्न पडतो तो सामान्यांना या कार्यक्रमांची गरज आहे का? मालिकांमधील श्रीमंती, त्यांची लफडी, विवाहबाह्य संबंध यातून समाजाचं कोणतं प्रबोधन होतंय?
टीआरपीच्या मागे लागत सामान्यांना फक्त नाचायला आणि दात काढायलाच लावणार आहात का? या वाहिन्यांना जर नाचणे, गाणे आणि हसणे एवढंच कळत असेल तर त्यांच्या सामाजिक जाणिवा या नक्कीच संवेदनाहिन आहेत, असं म्हणावं लागेल. समाजाच्या समस्या, सामान्यांचे जीवन हे या वाहिन्यांमधून प्रतिबिंबीत होत नाही. हमलोग, नुक्कड, गुल गुलशन गुलफाम,रजनी, तमस या सारख्या मालिका आजही बघायला आवडतील. मात्र वाहिन्यांची तेवढी बौद्धीक क्षमता नाही की काय असा प्रश्न निर्माण होतोय. तुमच्या वाहिन्यांवरील श्रीमंतीशी सामान्यांना घेणे नाही. त्यांना काही सकस मालिका, संदेश देण्याची पात्रता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आपल्या राज्यात होताहेत. त्या विषयी मराठी मनोरंजन वाहिन्यांवर एकही मालिका झाली नाही, हा वाहिन्यांवरील कलंक आहे. नाचणे, गाणे, दात काढणे या पलिकडेही विषय आहेत. शेतक-यांच्या आत्महत्येला टीआरपीमध्ये तोलू नका. तो प्रश्नही वाहिन्यांवर दिसला पाहिजे. शेतकरी नसेल टीआरपी देत, पण त्याने पिकविलेलेच अन्न तुमच्या पोटात जाते, हे तरी तुमच्या बुद्धीला पटत असेल तर त्यादृष्टीने काही करता येत असेल तर बघा.
आणि सगळ्यात शेवटी मनोरंजन वाहिन्यांनो तुम्ही नर्तक,गायक, हास्यकलाकार घडवाच. पण त्याच बरोबर माणूसही घडवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा,प्रेक्षकही तुम्हाला साथ देतील. तुम्ही सुरूवात तर करा...